सोमवार, २७ मे, २०२४

हे हिंदुनृसिंहा प्रभो शिवाजी राजा

२८ मे २०२४ या दिवशी   स्वातंत्र्यवीरांची १४१ वी जयंती आहे. त्या निमित्ताने त्यांच्या कवितांचा आशय समजून घ्यावा आणि त्यांच्या संस्कृत प्रचुर साहित्याची ओळख व्हावी, नव्या पिढीला त्यांची भाषा, त्यातील सौंदर्य कळावे, यासाठी आदित्य विवेक शेंडे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या हे हिंदुनृसिंहा प्रभो शिवाजी राजा या कवितेचे आगळे रसग्रहण केले आहे. तरुण भारतच्या दि. २६ मे च्या अंकातही हा लेख प्रसिद्ध झाला आहे. त्यांच्या सौजन्याने हा लेख प्रज्वलंतच्या वाचकांसाठी मुद्दाम देत आहोत.

स्वा. विनायक दामोदर सावरकरांची कविता... मुळात कविता ह्या शब्दाचा अर्थ तो काय? मूळ आदीश गजानन! त्यास “कविनां कवी:” हे ब्रीद लावून त्याचा गौरव जो केला जातो तिथे कवि ह्या शब्दाचा अर्थ “कविता रचणारा तो” असा मर्यादित आहे का? छे! कवि म्हणजे बुद्धिमान! आपले मराठी शब्द हे आपल्या संस्कृतीच्या प्राचीनत्वामुळे अनवधानाने अशा दिव्य अर्थांना आपलेसे करीत करीत अगदी त्यांना मानवी मर्यादेत बसवतातच.! जसे आद्य कवि हे श्री गजानन! श्री विघ्न विनायक तसे आजचे अद्यतन कवि म्हणजे स्वातंत्र्यविनायक. महापुरुषांचे चरित्र हे कळायला मुळात दुर्बोध.! त्यांचे विचार हे विवेकाच्या मुशीतून आलेले त्यामुळे सर्वसामान्यांचा स्वार्थ हा काही त्या अग्नित हात घालण्यास धजत नाही. आणि होतं असं की समजत तर सगळं असतं. पण कृतीत काही ते उतरत नाही. अशावेळी चाणक्य म्हणतो तसं “अग्निवत् आश्रयेत्” असं म्हणत त्या चरित्राच्या धगेत ऊब घेत; शक्य झाली तर आपली संसाराची भाकरी भाजून घेण्यास जनसामान्य कमी करीत नाहीत.! 

तात्याराव! अख्या देशास सावरणारे म्हणूनच की  काय सावरकर.! असे युगपुरुष एकटे असतात. तत्वानुगामी असतात. त्यांस जवळचं असं फारसं कुणी लाभत नाही. कारण सत्याच्या मार्गाने चालणारे त्यांच्यासारखे विरळेच. ह्या मार्गाने चालताना त्यांना आधार असतो तो म्हणजे तेजाचा..! ऊर्ध्वगामी तत्वाचा.! अग्नी हा पावक आहे. शुद्ध करणारा आहे. प्रलयकाली सारं जगत् भस्म करणारा आहे. पण ज्यांच्यामध्ये सत्य हे प्रतिष्ठित झालेलं आहे त्यांच्यासाठी मात्र तो शीतल आहे. कल्याणकारी आहे. अशा लोकांना तो आपलासा वाटतो. कारण हेतूच्या शुद्धीमुळे ते त्या अग्नितत्वाशी एकरूप झालेले असतात. त्यामुळे सहजच हात पोळण्याचा दोष अग्निला जात नाही. 

ह्या अग्निचे दोन गुण – तेज आणि उष्णता. ह्या महापुरुषांचे सुध्दा तेच.! दाहक प्रखरता ही त्यांच्या आचारात दिसते ती स्वतःसाठी.! कर्तव्य कठोरतेची! आणि इतरांना मात्र ऊब जाणवते. दुसरं ते तेज! हे तेज त्यांच्या बुद्धीत मुरतं आणि भावनेच्या परिपूर्ण प्रगल्भतेतून प्रतिभेच्या रुपाने बाहेर पडतं. हे खरं कवित्वं.! ज्यामधे असतो काळाचा अभ्यास. कठोपनिषदात सांगितलेलं श्रेयस.!  तिथे मनास ठणकावून सांगितलं जातं की “जोपर्यंत निजमातृविमोचनाच्या ध्येयाची, कर्तव्यांची इतिश्री होत नाही तोपर्यंत हे मना! तुला सुखाचा अधिकार नाही.!” अशा वेळी सावरकरांसारखे योगमार्गी पुरुष त्यांच्या आधी येऊन गेलेल्या आणि तद्वतच महान कार्याची उभारणी केलेल्या ज्ञानवृद्ध, पराक्रमी राजर्षीस सहज हाक मारतात ती अशी..

हे हिंदुशक्ति-संभूत-दिप्तितम-तेजा! 

“हिंदुशक्ति-संभूत” हा शब्द एका क्षणात आपल्या आर्यांचा; आपल्या हिंदूंचा इतिहास, ती जिद्द, तो दौर्दम्य आत्मविश्वास आपल्यासमोर उभा करतो.! कसं आहे ते तेज? ते आमच्या मूळ संस्कृतीच्या उदयीच्या बिंबाचं तेज आहे. सनातन तेज. इथे “संभूत” हा शब्द तात्याराव वापरतात. “सं” म्हणजे परिपूर्णतेने. “भूत” म्हणजे असलेले, अवतरलेले.! हे “दीप्ततम्” म्हणजे दिप्तीमान असं तेज. ज्याने डोळे दिपून जावेत असं तेज. परिपूर्णतेने जे आलेलं आहे असं. किती सहजतेने छत्रपतींना सावरकरांनी पूर्णावतारी केलं आहे.! अनेक परकीय आक्रमणे थोपवून, त्यांना शिकवून, त्यांना उदात्त शिकवण देऊन, त्या सगळ्या अनार्यांनाही आर्य करुन टाकणारी ही हिंदुशक्ती! देवांशी स्पर्धा करणारी! अनेक देवी देवता नव्याने निर्मिणारी! नीतिमान सनातन शक्ती. तिचं परिपूर्ण तेज ज्या पुरुषात एकवटलं त्याला ही हाक! 

हे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजा..!

अशी ही हिंदू शक्ती कशातून उद्भवते हो? ती जन्मोजन्मींच्या तपस्येने तपाने घडत असत्ये. म्हणूनच की काय तथाकथित आस्तिक्य आणि नास्तिक्य ह्यांच्या रेषा पुसत सावरकर ईश्वरी ओजा असं म्हणून आदिपुरूष शंकरांशी शिवरायांची तुलना करताना दिसत आहेत. 

“क्लेशकर्मविपाकाशयैः अपराम्रुष्ट पुरुषविशेष अिती ईश्वरः” (क्लेश,कर्म, विपाक आणि आशय ह्यांच्यापासून जो अलिप्त तो पुरुषांमधील म्हणजे आत्मतत्वातही विशेष असा तो म्हणजे ईश्वर.) 

ही योगशास्त्रातली ईश्वर ह्या शब्दाची फोड तात्यारावांना ज्ञात होतीच. नव्हे तसं त्यांनी आत्मचरित्रात म्हणूनही ठेवलं आहेच. अंदमानात असताना सकाळच्या वेळी थोडा काळ व्यायामासाठी जे काही जावयास मिळे त्यावेळी तात्याराव योगसूत्रे म्हणून त्यावर चिंतन आरंभित!  अशा ह्या ज्ञानसुर्याला शिवरायांना साद घालताना तो पुराणपुरुष आठवला नाही तरच नवल.! आणि तोही तपःपूत झालेला.. पुराणात तप:पूत रुद्राचे डोळे पाणावले आणि त्यातून जे अश्रू भुमीवर स्खलित झाले त्यातून रुद्राक्ष उगम पावले अशी कथा आहे. हाच भाव ठेवून तप:पूत असं तुझं ओज घेऊन तुम्ही ह्या आर्यवर्ताकडे दयार्ददृष्टीने बघा. असंच सावरकर सुचवित असावेत. आता तपस्यापूत हे विशेषण लावताना तपस्या ह्या शब्दातला तप हा शब्द! त्याचं वजन काही निराळंच! तप म्हणजे कष्ट करणं.  मग ते शारीरिक असो..बौद्धिक असो.. मानसिक असो वा आत्मिक असो!  लागतात ते कष्टच आणि हे कष्ट दोहोंकडे लागतात. वैयक्तीक पातळीवर आणि राष्ट्रीय पातळीवर! वैयक्तिक पातळीवर अभिलाष शून्य राहून शिवप्राप्तीसाठी फक्त पानांवर उदार निर्वाह करणारी आणि नंतर त्याचाही त्याग करुन अपर्णा ठरलेली पार्वती ही सुद्धा तपच करीत होती आणि राष्ट्र उत्थानासाठी रक्ताचं पाणी करुन प्रत्येक प्रांतात वणवण फिरुन हिंदूसंघटन करुन हिंदुश्री मिळवणारा चाणक्यही तपच करीत होता.! हीच देवी पार्वती महिषासुर वधासाठी मात्र परिग्रह करती झाली आणि चाणक्य हा वैयक्तिक जीवनात मात्र संन्यासासारखाच जगला.! हे आमच्या हिंदूचं तप. ते जेव्हा पूर्ण होतं, पूत होतं तेव्हा ते हिंदुश्री प्राप्त करणारं ठरतं. 

हे हिंदुश्री-सौभाग्य-भूतिच्या साजा.! 

अपरिग्रह स्थैर्ये सर्वरत्नोपस्थानम् ! ह्या तत्वास स्मरुन ती श्री ज्याने मिळविली तो वितराग, अभिलाषशून्य झालेला असा हा सौभाग्य म्हणून जे जे काही अस्तित्वात आले त्याचा साजंच ठरला. हे तर श्रींचं राज्य म्हणून अलिप्तता बाळगून राज्य सांभाळता झाला. खऱ्या अर्थाने छत्रपति! त्या छत्राचा पति, पालनकर्ता झाला.! हिंदुशक्तीमुळे सदाशीव ठरला! हिंदुश्री मुळे विष्णुरुप बनला.! नराग्रणी, नृसिंह ठरला.म्हणूनच तात्याराव अुद्गरले! 

हे हिंदुनृसिंहा प्रभो शिवाजीराजा..! 

सहाजिकच असं कर्तृत्वं डोळ्यासमोर आलं की हिंदू मन लागलीच नतमस्तक होतं. तात्याराव फक्त नतमस्तक झाले नाहीत! त्यांनी ती भावना लागलीच शब्दांत ओवून टाकली ती अशी… 

करि हिंदुराष्ट्र हें तूतें । वंदना

करि अंतःकरण तुज, अभि-नंदना 

तव चरणिं भक्तिच्या चर्ची । चंदना

हे  वंदन, अभिनंदन आणि पूजन अंतःकरण चतुष्टयातून म्हणजे मन,बुद्धी चित्त आणि अहंकार हे सगळं त्याच्या चरणी वाहिल्याने होत असतं. सावरकरांनी हे सारं आधीच मातृभूमीच्या स्थंडीलावर लोटून दिलं होतं. शिवाजी महाराज हे त्या मातेचेच सुपुत्र आणि तिच्याशीच अेकरुप झोलेले. त्यामुळे प्रार्थना तर या आधीच ह्या साऱ्या महापुरुषांपर्यंत केव्हाच पोहचलीच होती. पण आजची ही प्रार्थना काहीशी वेगळी असावी. ती होती..

गूढाशा पुरवीं त्या न कथूं शकतों ज्या..

आता थोडं थांबू गंभीरतेने ह्या विषयाचा उहापोह करू. गूढाशा शब्दामधे गूढ आणि आशा असे दोन शब्द आहेत इंग्रजीमध्ये enigmatic aspirations असा प्रयोग त्याबद्दल करता येईल. स्वातंत्र्यवीर सावरकरांची एक सवय ही की ते शब्द फार जपून वापरत . कुठला शब्द आपण केव्हा वापरला आहे हेही त्यांना ज्ञात असे. अर्थात कायद्याचे अभ्यासक असेच असावयास हवेत पण त्याहून खोल जाण तात्यारावांना होती ती म्हणजे कर्माशयाचीं. योगशास्त्रातील कृत, कारीत आणि अनुमोदित कर्मांबद्दल ते फार जागरूक असत. महाभारतातल्या “धर्माचं पर्यावसन कशात होतं” या यक्ष प्रश्नाला जे युधिष्ठिराने “दक्षतेत” हे उत्तर दिलं होतं त्याचं प्रत्यंतर वीर सावरकरांच्या चरित्रातून ठाई ठाई येतं. ही दक्षता होती कर्तव्यतत्परतेची. स्वातंत्र्यासाठी कुणीतरी जळायलाच हवे मग ते कुणीतरी “मी” का नाही? हा प्रश्न ते सतत स्वतःला विचारीत असत आणि स्वतःस अग्नि परीक्षेत झोकून देत असत. त्यांची गूढाशा ही स्वातंत्र्यप्राप्ती आणि हिंदू पुनरुत्थान यांशी निगडित होतीच पण वैयक्तिक जीवनात; अज्ञानाचे रुद्धद्वार, जगन्नाथाचा रथोत्सव, सप्तर्षी या त्यांच्या कवितांच्या उहापोहातून हेही लक्षात येते की विश्वामागल्या मूळ शक्तीचं कोडं ते आयुष्यभर सोडवीत होते. एक विलक्षण आस अशा महात्म्यांना लागून असते. खऱ्या शुद्ध ज्ञानाची. त्याच्या मागे ते आयुष्यभर, जन्मानुजन्म धावत असतात मग त्यामधेच त्यांना हेही अुमगतं की कठोपनिषदात आदेशलेली तीन प्रकारची जी कर्मे ती केल्याशिवाय मुक्ती नाही. ती कर्मे म्हणजे प्रारब्ध कर्म, कर्तव्य कर्म आणि ब्रह्मकर्म. आपली मातृभूमी परदास्यतेत असताना, आमच्या देशाची लोकं हालात जगत असताना चवीने बीसतंतूंचं सेवन करीत मी विश्वाच्या पसाराची कोणी सोडवू का? छे!  कदापि नाही! मी प्रथम मज बांधवांना सावरण्याचं, मातेला परदास्यातून सोडवण्याचं काम जे ते! ते ब्रम्हकर्म!  ते प्रथम करीन आणि मगच त्या मूळ आदि पुराणपुरुषाला डोळ्यात डोळे घालून प्रश्न करीन की बाबा बघ! जे जे करायचे होते , जे जे मज जवळ होते ते ते मी वाहिले या ध्येयाप्रती! आता तरी तुझे हे रुद्ध दार उघड.आता तरी हे अस्तित्वाचं कोडं उलगडू दे. कर्तव्यापुर्णतेचे समाधान पुढचे दरवाजे उघडीत असतं.!

ही कविता १९२६ मध्ये सावरकरांनी रत्नागिरी मध्ये स्थानबद्धतेत लिहिली आहे हा काळ स्वातंत्र्यापूर्वीचा आहे. इथे छत्रपतींना सावरकर ज्या गूढाशा पुरविण्यास सांगत आहेत त्या अगदीच काही कर्तव्यपूर्ती नंतरच्या समाधानी मनाने केलेल्या मागण्या नाहीत. इथे थोडा राजकारणाचाही अंश आहे नुकतंच १९१८ साली पहिलं महायुद्ध संपलं होतं आणि तात्यारावांसारख्या मुत्सद्दी माणसाला दुसऱ्यामहायुद्धाची बीज पहिल्या महायुद्धात पेरली गेलेली सहाजिकच दिसत होती. या संधीचा उपयोग करून घेऊन इंग्रजांवर दबाव टाकून आपल्या देशास स्वतंत्र करून कसं घेता येईल या विचारात सावरकर होते. त्यासाठी जी बुद्धी लागेल ती शिवरायांकडून घ्यावी. शिकावी हे तात्याराव योजित होते. इंग्लंडशी लढण्यासाठी जपान, अमेरिका या देशांशी वाटाघाटी करणं हे क्रमप्राप्तच होतं. जर्मनीमध्ये नवोदित हिटलर याने उभारलेल्या सेनेची अनुसंधान साधणं इत्यादी प्रयत्न हेही गूढाशेतंच येतात. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र. राजकारणात मदत घेतल्याने मिंधेपणा येत नसतो हे तत्त्वही ते शिकवू पाहत होते. तर अशा अनेक वेगवेगळ्या स्तरावरच्या गूढाशा ते शिवरायांना एकाच वेळी पुरवायला सांगत आहेत. होय! आणि हेही सगळं ठीक. पण आपल्या चरित्रात तात्याराव म्हणतात तसं “पण वर्तमानकाळ!  तुझी प्रस्तुतची स्थिती! स्वप्न! स्वप्न! मूर्खा भविष्यकाळचे तुला ते पडत असलेले केवळ स्वप्न होय! एकदम उंच कड्यावरून कोसळून पडले असता जसे शरीरास लागते तसंच एखाद्या उंच विचाराच्या शिखरावरून एकदम एखाद्या विवश प्रतिकूल आणि रुक्ष विचाराच्या गर्तेत ढकलले गेले असता मनासही लागतें.” ह्या विचारानुगमे या गूढ आशांच्या उच्च विचारातून वर्तमानकाळ सावरकरांना एकदम सद्यस्थितीत घेऊन येतो. कसा आहे तो वर्तमान काळ?


हा भग्न तट असे गडागडाचा आजी

हा भग्न आज जयदुर्ग आंसवांमाजी

ही भवानिची ह्या पुन्हा गंजली धारा

ती म्हणुनी भवानी दे न कुणा आधारा

गड कोट जंजिरे सारे । भंगले

जाहलीं राजधान्यांचीं । जंगलें

परदास्य-पराभविं सारीं । मंगले

या जगतिं जगू ही आज गमतसे लज्जा

हे हिंदुनृसिंहा प्रभो शिवाजीराजा! 


हेच ते किल्ले जे शिवराय तहांत हरले आणि पुन्हा मोठ्या जिद्दीने दोन-तीन वर्षात परत मिळवते झाले.! त्या तळपत्या भवानीच्या जोरावर! क्षणभराची पिछेहाट ही त्यांना थांबवू शकली नाही! अनेक वेळा जरासंधासमोरून पलायन ज्यांनी केले ते यादव! पण त्यांच्यातल्याच महत्तमाने भिमास बरोबर घेऊन शेवटी जरासंध्याचा काटा काढलाच! तद्वत शिवरायांनीही पराक्रम दाखवला. पण आज त्या भवानी तलवारीची धार गंजली आहे. तिचा वापर होणंच बंद झालं आहे. अहिंसेच्या अतिरेकापायी आम्ही शस्त्र वापरणंच मुळी बंद केलं आणि स्वसंरक्षण करण्यासही त्यापाई अयशस्वी ठरलो आहोत. स्वातंत्र्यवीर सावरकर अंदमानत गेले त्यावेळी अहिंसेचे तत्त्वज्ञान व त्याचा विकृत प्रसार हिंदुस्तानात झाला नव्हता. पण अकरा वर्षांनी तुरुंगातून बाहेर आल्यावर अचानक हिंदुस्तानची ती सारी संन्यस्थ खड्गं तात्यारावांना पाहवली नाहीत.देव हा अनुकूलता देऊन यश देण्याचं काम करीत असतो. तो स्वतःहून येऊन काम करीत नाही. छत्रपतींनी सुद्धा भवानी तलवारीने चंड पराक्रम केला कोवळ्या वयात! तेव्हा कुठे ती भवानी माता त्यांच्यामागे उभी राहिली. देव हे परोक्षप्रीय असतात हे सावरकर जाणून होते. 


“न ऋते श्रांतस्य सख्याय देवा:”

ही वेदकालीन रुचा म्हणते काय तर..  “अहो देव कुणाशी सख्य करतात? तर जो पराक्रम करून कष्ट करून श्रान्त झाला आहे अशांचीच.” अवलंबित्व मग ते त्या देवावर सुद्धा का असेना! उत्क्रांती क्रमात चूकच.! हे योगशास्त्रातलं दिव्य तत्त्वज्ञान तात्याराव किती सहजतेने सांगताना दिसतात . हेच तत्त्वज्ञान सांगताना त्यांना आज मनस्वी दुःखही होत आहे. हे गडकोट जंजिरे आज भंगले आहेत. साऱ्या प्रांताच्या राजधान्या ज्या होत्या त्यांची आज जंगले झाली आहेत. उज्जैन या शहरास राजधानीचे शहर ठरवण्यास स्वातंत्र्यवीरांची संमती होती कारण त्याचा गौरवशाली इतिहास. पण आज अख्खा हिंदुस्तानच दास्यत्वात खितपत पडला आहे आणि ओढून ताणून किती मंगले, शुभ गोष्टी समोर आणण्याचा प्रयत्न मनाने केला तरी या परदास्यते पाई त्या साऱ्या मंगलांचाच पराभव होताना दिसत आहे आणि महाराज मी तुम्हाला हाक मारतोय खरा पण या परिस्थितीमध्ये जगण्याची सुद्धा लाज वाटते आहे! हीच गोष्ट तात्याराव नारो शंकराचे देवालय आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्या पोवाड्यातही बोलून दाखवतात. महापुरुषांचे विचार खरोखरच अभेद असतात. ते खरे असतात त्यामुळे ही मनाची दुरुस्ती त्यांना काव्य करताना वेगवेगळ्या कवितांमध्ये करावी लागत नाही. बाजीप्रभूच्या पोवाड्यात सावरकर हाच मार्मिक प्रश्न आपल्या सगळ्यांना विचारतात..

“अहो बंधुंनो पूर्वज ऐसे स्वतंत्र रणगाजी..

स्वतंत्र त्या पूर्वजां शोभतो वंशज का आजिं?”

किंवा नारो शंकराचे देवालय बघूनही सहज उद्गारतात..

“होते ते तुमचे सुपूर्वज असे यत्कीर्तिते ना लय”

हे तुमचे आपले पूर्वज इतके पराक्रमी आणि आम्ही आज असे तलवार म्यान करून! आणि हाक शिवाजी महाराजांना? कशी मारु ही हाक? त्यांच्या डोळ्यात डोळे घालून आम्हास पाहतात तरी येईल का? अशावेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखा अयाचित, निर्व्याज, निष्काम योगी सरतेशेवटी  छत्रपतींकडे काही मागण्यास निघाला आहे. स्वतःसाठी नव्हे हिंदूंसाठी तुमच्या आमच्यासाठी! काय मागत आहेत विनायकराव सावरकर?


जी शुद्धि हृदाची रामदासशिर डुलवी

जी बुद्धि पांच शाह्यांस शत्रुच्या झुलवी

जी युक्ति कूटनीतींत खलांसी बुडवी

जी शक्ति बलोन्मत्तास पदतलीं तुडवी

ती शुद्धि हेतुची कर्मी । राहुं दे

ती बुद्धि भाबड्या जिवां । लाहुं दे

ती शक्ति शोणितामाजीं । वाहुं दे

दे मंत्र पुन्हा तो दिले समर्थें तुज ज्या

हे हिंदुनृसिंहा प्रभो शिवाजीराजा!!


शुद्धीची सगळ्यात सर्वोत्तम अशी अभिव्यक्ती म्हणजे यतीवर मान्य संतांची त्यास मिळालेली दाद! शिष्य गुरूंना त्याची शुद्धी कशी? आचरण योग्य होते आहे ना? असे विचारतो तेव्हा त्याची ती पवित्र चर्या पाहून गुरुजन कृतकृत्य होऊन मान डोलावतात. अशी ही शिवरायांच्या आचरणातली शुद्धी ही त्यांच्या हेतूंमध्ये लपली होती. हा हेतू होता ईश्वरी सत्तेचे अधिष्ठान साऱ्या हिंदुस्थानात आणण्याचा. स्वार्थाचा नव्हे परार्थाचा! स्वस्मै स्वल्पं परार्थाय सर्वस्वम् ! छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं साम्राज्य रामदासांच्या चरणी वाहिलं होतं आणि हे श्रींच राज्य म्हणून राज्य सांभाळण्याचं काम ते करीत होते. त्यासाठी रक्ताचे पाणी करीत होते. हा हेतू! ही निस्वार्थता सावरकर मागत आहेत! अधिष्ठान म्हणून! योगशास्त्रातली दृढभूमी ती हीच! त्यानंतर ते मागतात ती बुद्धी! ती बुद्धी जिने अवघ्या सोळाव्या वर्षी तोरणा सर केला! ती बुद्धी जिने वैयक्तिक जीवनात शिवरायांना त्यांच्या मातेचा भोळा शिवबा राहू दिलं आणि राष्ट्रीय पातळीवर, स्वराज्याच्या पातळीवर बादशाहीच्या पाच शाह्या झुलवंत ठेवल्या! अशी विलक्षण बुद्धीमत्ता.! सावरकर म्हणत आहेत की, असे अनेक जण आमच्यापैकी भाबडेच राहिले तरी चूक नाही पण भाबड्या मनाला आधार बुद्धी आणि विवेक देत असतात. तो मात्र आपण छत्रपतींकडून मागून घेऊ. हा विवेक हा, की वैयक्तिक जीवनातल्या अध्यात्माच्या आणि पाप पुण्याच्या कल्पना या राष्ट्रीय पातळीवर बदलत असतात.! राष्ट्रीय पातळीवर कूटनीती!, जी खलास पार बुडवूनटाकते,ती औरंगजेबास शह-काटशह देणारी कूटबुद्धीच सावरकर छत्रपतींकडे मागत आहेत. बल मागत आहेत कष्टाळू लोकांचे जीवनसुसह्य करण्यासाठी.असं छत्रपतींच बळ, अशी शक्ती, जी बलोन्मत्त म्हणून जे झाले त्यांना त्यांच्याहून अधिक बल दाखवून त्यांना वठणीवर आणती झाली. शेवटी मागत आहेत एक मंत्र!

“मननात् त्रायते इति मन्त्रः” मनन केल्याने जो तारतो तो मंत्र ! अशा वेळी “धारणासू योग्यत: मनस:” या तत्त्वानुसार मनाची योग्यता मननाने, त्या धारणेने वाढत असते. ते अधिक बलिष्ठ आणि अधिक तेजस्वी होत असतं. पण मंत्र मात्र योग्य हवा. तोच समर्थांनी त्यांच्या अख्ख्या चरित्रातून उलगडूनदाखवलेला समर्थतेचा मंत्र! एकाकी लढण्याचा मंत्र! कष्ट सोसण्याचा मंत्र! निरपेक्षतेचा मंत्र!वैयक्तिक आयुष्यात अभिलाषशून्यता आणि त्याचबरोबर राष्ट्रीय आयुष्यात समृद्धीचा मंत्र! बलवत्तर बनण्याचा मंत्र! त्या सर्वोदयी विवेकाचा मंत्र! 

सामान्य मनुष्य अग्निस भितो. अन्न रांधायला, शेकोटी करायला व उदबत्ती लावण्यासाठीच काय तो अग्नीस आवाहन जे करावयाचे ते करतो. पण सावरकरांनी मात्र तो कठोपनिषदातला “लोकदिमग्निम्” ओळखला. तो शिवरायांमध्ये शोधला. त्याचं त्यांनी आवाहन केलं. त्यांना तो प्राप्त झाला. त्या अग्नितच ते विलीन झाले. तेजाची सांगता ही त्याच्यातच व्हायची. आपण मात्र किती वेळ “अग्निवत् आश्रयेत्” हे पालुपद बाळगायचं हेमात्र आपणच ठरवायला हवं.

- आदित्य विवेक शेंडे

(तरुण भारत, मुंबईच्या सौजन्याने)


गुरुवार, १६ मे, २०२४

शहाणपण पण... उशिरा सुचलेले

निवडणुकांच्या निमित्ताने का होईनाजय-पराजयाच्या अपेक्षेने का होईना काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी रायबरेलीमध्ये केलेले एक वक्तव्य अतिशय आशादायी ठरू शकेल.  काँग्रेसनेही चुका केल्या आहेतत्या पाहाता धोरणात बदल करावा लागेलअसे त्यांनी सांगितले व देशातील जातीव्यवस्थेकडे त्यांनी लक्ष वेधलेउशिरा का होईना त्यांना या संबंधात शहाणपण सुचले आहेअसे म्हणावे लागेल.

लोकसभा निवडणुकांमुळे विविध राजकीय पक्षांच्या वैचारिकतेवरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. मुळात या वैचारिकतेचे सार लोकांपर्यंत उतरलेले आहे का, असा प्रश्न विचारला तर लक्षात येईल की, राजकीय वैचारिकता काही शिल्लक आहे का, त्याचबरोबर सामाजिकतेचा, धर्मसंस्थेचा सर्वांगीण विचाराचा विषय विचारात घेतला गेला आहे का, आणि या घटकांचा परिणाम समाजावर होत असताना समाज अंतर्मुख झाला आहे का, की सत्तेच्या पटलावरही खेळात कळतनकळत सहभागी होत वा न होताही तो समाज या देशाच्या अस्तित्वावरच वाद घालण्यासाठी राजकीय पक्षांना मोकाट सोडत आहे? राष्ट्र ही संकल्पना अतिशय महत्त्वाची असून त्या संकल्पनेचा विचार खरेखरच गांभीर्याने झाला आहे का, तर या प्रश्नांची उत्तरे नकारात्मक असतील. केवळ दिखाव्याचे तत्त्वज्ञान हा राजकीय फायद्यासाठी साध्य करण्याचा मार्ग झाला आहे. तत्व व ज्ञान संपुष्टात आले आहे. राजकीय वैचारिकतेचा भाग म्हटला तर प्रसारमाध्यमांवर काही तरी बोलायचे म्हणून राजकीय क्षेत्र हे एक व्यवसायासारखे चालविण्याचे झाले आहे. त्यात व्यावसायिक वैचारिकता अधिक आणि राजकीय वैचारिकता कमी असल्यामुळे राजकारण धंदा असल्यासारखी गुंतवणूक सुरू झाली आहे. भवितव्यातील तजवीज म्हणून त्याकडे पाहिले जाऊ लागले आहे.

सामाजिक आणि धर्मसंस्थेच्या सर्वांगीण विचाराचा विषय म्हणून राजकीय नेतृत्व पाहात आहे का तर त्याचेही उत्तर नकारात्मक मिळते. सामाजिक जाणीवा म्हणजे नेमके काय, ते शोधण्याची गरज निर्माण झाली आहे. पोटार्थी नागरिकांच्या असहाय्यतेचा फायदा घेत त्यांना मदत करणे किंवा त्यांना मदत करीत असल्याचा आभास निर्माण करून मांडणे ही आज राजकीय क्षेत्रातील सोयीनुसार केलेली तडजोड आहे. ही तडजोड करण्यामागे राजकीय स्वार्थ, राजकीय भवितव्य, त्यातून मिळणारे आर्थिक सम्यक लाभ, हेच पाहिले जात आहेत. धर्मसंस्था या अधिकाधिक कर्मठ होत चालल्या आहेत. मुळात मानवी समाजाला संघटित व एकछत्राखाली आणून धर्म या संकल्पनेखाली आणण्याचा उद्देश हा समाजातील विविध प्रकारच्या मानसिकतेला बंधनात आणण्याचा आहे. धर्मसंस्थेचा वापर हा विशिष्ट मानव समूहाला बांधून त्यांचे एक अस्तित्त्व रक्षित करण्याचा आहे. पण आज धर्माच्या दुहेरी वापरामुळे राजकारण्यांनी स्वहितरक्षणासाठी केलेल्या बेगडी धर्मतत्त्वज्ञानामुळे समाजाला फोडून दोन गटांमध्ये विभाजित करण्याचा प्रयत्न केला गेला. भारतात मुस्लीम आक्रमणामुळे धर्मपरिवर्तन झाले, त्यांचे त्यांचे मूलतत्व हे याच देशातील डीएनएशी संबंधित असले तरी मानसिकता मात्र पूर्ण बदललेली असल्याने दोन धर्मांमधील कलह, त्यांचे तत्त्वज्ञान-शिकवण यातील फरक हा नव्याने निर्माण झालेल्या भारतासाठी  एकसमान करण्याऐवजी धर्मपालनाच्या नावाने तो स्वतंत्र करण्याची मुभा दिली. बहुसंख्यांकाना दाबले गेले ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. ती वस्तुस्थिती मुळात देशाच्या स्वातंत्र्यचळवळीचे फक्त आम्हीच धुरिण आहोत, अशा थाटात वावरणाऱ्या विचारसरणीच्या पक्ष-संस्थेने दामटून पुढे नेली. त्यात सत्तास्थापनेच्या नादात अल्पसंख्याकांना दिलेले धार्मिक अधिकार हे बहुसंख्याकांपेक्षा अधिक राहिले गेल्याने धर्मसंस्थामधील ऐक्याची राष्ट्रीय भावना दोलायमान झाली. यामुळे जीवनात महत्त्वाचा घटक असलेल्या धर्माचा अर्थही सोयीस्कर बदलला गेला. अशा या परिस्थितीच्या, घटकांच्या वास्तवावर लक्ष दिल्यास नकारात्मकतेत राष्ट्र संकल्पना कशी अडकली गेली त्याचा अंदाज येऊ शकतो. यामुळे राष्ट्र या संकल्पनेला ब्रिटिशोत्तर कालखंडात देशातील नेते, राजकीय विचारसरणी, विचारवंत म्हणविणारे आम्ही डावे व आम्ही उजवे करणारे घटक यांनी धक्काच दिला. अशात बहुसंख्याकांना अल्पसंख्याकांपेक्षा अधिक काही नको म्हणजेच सर्वांना समान ठेवण्याच्या मागणीकडेही सोयीस्कर दुर्लक्ष झाले. समाजातील घटकांना धर्म, स्तर, वर्ग यात झुलवतच ठेवले गेले, हे अमान्य करता येणार नाही. राजा कालस्य कारणम, या उक्तीप्रमाणे राजाने सुरुवातीपासून  हे सर्व  केल्याने आजची ही स्थिती निर्माण झाली आहे.  यात दोन धर्मांना परस्परांमध्ये  संघर्ष करीत ठेवणे,  एखाद्या धर्माला झुकते माप देणे, धर्मनिरपेक्षतेच्या नावाखालीही धर्माकलहाला निमंत्रण देणाऱ्या धोरणांना अंगीकारणे, अशातून विरोधी विचारांचा दुसरा पक्ष सत्तेवर आल्यानंतर त्या पक्षाकडूनही या सर्वांना प्रत्युत्तर देणारी परिस्थिती तयार केली जाते. बहुसंख्याकांचे ध्रुवीकरणही केले जाते यातून संघर्ष वाढत गेला आहेच. पण राष्ट्राचे नुकसान किती झाले आहे, त्याचा विचार कोणत्याही बाजूने केला नाही. स्वातंत्र्यापूर्वीपासून झालेली काँग्रेसच्या नेत्यांची धोरणात्मक अंध चूक, लांगूलचालन करण्याची अनाकलनीय नीती धर्माधिष्ठित पक्ष, संस्था वा संघटनेला वादांमध्ये झुलवत ठेवणारी कृती ठरली आहे.

अशामध्येच गेल्या काही वर्षांमधील चंगळवाद व व्यक्तिस्वातंत्र्याचा अतिरेक यामुळे एकंदर समाज भरकटलेला आहे. समाज भरकटला आहे याचा अर्थ या ठिकाणी असलेल्या समाजातील घटकांकडूनच तयार झालेला राजकीय पक्ष व नेतृत्वाचीही स्थिती तशीच झालेली आहे, असे दुर्दैवाने म्हणावे लागेल. अशा या स्थितीत निवडणुकांच्या निमित्ताने का होईना, जय-पराजयाच्या अपेक्षेने का होईना काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी रायबरेलीमध्ये केलेले एक वक्तव्य अतिशय आशादायी ठरू शकेल.  काँग्रेसनेही चुका केल्या आहेत, त्या पाहाता धोरणात बदल करावा लागेल, असे त्यांनी सांगितले व देशातील जातीव्यवस्थेकडे त्यांनी लक्ष वेधले. उशिरा का होईना त्यांना या संबंधात शहाणपण सुचले आहे. असे म्हणण्याचे कारण आम्ही जातपात मानत नाही, ब्राह्मण्यवादाला विरोध आहे, सामाजिक दुर्बळ घटक अशा विविध लेबलखाली आमच्या राजकीय पक्ष, वैचारिकतेला खतपाणी घातले गेले आहे.  भुलभुलैयामध्ये काँग्रेसने ज्या वैचारिकतेला खतपाणी घातले त्याचे अप्रत्यक्ष परिणाम समाजाच्या अंतस्थ भावनांना प्रक्षोभित करण्यात वा होण्यात झाले आहेत न बोलूनही काँग्रेस नेत्यांकडून राजकीय कृतींमध्ये प्रत्यक्षा स्पष्ट सांगितलेल्या धोरणांच्या बरोबर उलटही काम केले गेले. अल्पसंख्याक समाजाला चुचकारण्याचे काम त्यांनी केले. ही बाब जर राहुल गांधी यांना सुधारावयाची वाटत असेल तर हे शहाणपण सुचले आहे, त्याबद्दल कौतुक करावे पण ते उशिरा सुचलेले शहाणपण आहे, असे म्हणावे लागेल.

भारतात मोठ्या प्रमाणात लोकांचे भवितव्य त्यांच्या जन्माच्या आधीच निश्चित केले गेलेले असते, असे सांगत राहुल गांधी म्हणतात की, यातून लोकांची विभागणी ही छोट्या छोट्या गटांमध्ये समूहांमध्ये केली जाते व मग हे गट ठरवितात की त्यांचे सदस्य कोणात्या कामासाठी पात्र आहेत व ते कोणती कामे करू शकत नाहीत अशा तपशींलाना स्पष्ट केले जाते. असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. जुन्या परंपरेचा हवाला देणाऱ्या काँग्रेस पक्षाचे नेते असणारे राहुल गांधी ही विधाने करू लागले असले तरी त्यामागे साहजिकच निवडणुकांचे राजकारण, त्यामागील वैचारिक संघर्षाला फोडण्याचा प्रयत्न करण्याचा हा प्रयत्न आहे. हे जरी ओघाने आले असले तरी त्यांनी या विचाराला हात घातला. अनेक वर्षे भारतात स्वातंत्र्यानंतर राज्य करणाऱ्या पक्षाच्या सत्तापतनानंतर त्यांना आपल्या चुकांंकडे पाहून त्या सुधारण्याची व धोरणांमध्ये बदल करावा लागेल, असे म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली, ही बाब काँग्रेसच नव्हे तर देशातील विविध वैचारिक गट, राजकीय पक्ष, कार्यकर्ते व सुजाण नागरिक यांनी गांभीर्याने घ्यायला हरकत नाही. तशात अल्पसंख्याक समाजाला त्यांच्या पक्षाने ज्या पद्धतीने चुचकारले, त्यांना सवलती देण्याच्या नावाखाली बुहसंख्य समाजाचे हितही धोक्यात आणले गेले, ही चूकही तितकीच मोठी आहे. त्यामुळेच जातीभेद त्याचा जन्मजातपणा या संबंधात राहुल गांधी वा काँग्रेस यांना केवळ आणि केवळ बोलावेसे वाटत असेल तर ठीक पण त्यांनी अल्पसंख्याक समाजासंबंधातही सुधारणांच्यादृष्टीने बोलावे. जातिभेद, द्वेष वाईटच आहे. पण ते करताना काँग्रेसने आत्ताच हा विषय काढला मग भले तो हिंदुत्वाची बाजू घेत हिंदु मतांचे ध्रुवीकरण साधू पाहाणाऱ्या भाजपला विरोध करण्यासाठी वा त्यांचे काही दोष दाखविण्यासाठी असेल तर मात्र त्यांचे हे वक्तव्य तात्विक नव्हे तर निवडणुकांपुरते आहे, असेच म्हणता येईल. काँग्रेसकडे मुस्लीम समाज स्वातंत्र्याच्या चळवळीच्या कामात फार आला नाही, आला तो हिंदु समाज आला होता. मुस्लीम समाज हा काँग्रेसऐवजी मुस्लीम लीगच्या बाजूने प्रामुख्याने गेला त्यामुळेच पाकिस्तान निर्मितीला चालना मिळाली, इतके होऊनही काँग्रेसच्या त्या काळातील नेतृत्वाने हिंदुहितरक्षणासाठी काम करण्याऐवजी अहिंसकता जोपासण्याच्या कथित तत्त्वासाठी व अल्पसंख्याक हित जोपासले. इतके होऊनही ते थांबले नाहीत त्यांनी सोयी सवलतींची बरसातही केली. पण यातून अल्पसंख्याक समाजाच्या शिक्षणाला ज्या आधुनिक काळाप्रमाणे शिक्षणाने गती मिळावयास हवी होती ती मिळाली नाही. त्यामुळे झालेले दुष्परिणाम आजही ते आणि त्यांचा समाजही भोगत आहे. धर्मपालनाच्या मागणीसाठी अल्पसंख्याकांचे पुरवलेले लाड आज त्यांच्या समाजाला भोवले आहेत.

केवळ इतकेच नव्हे तर बहुसंख्याक हिंदु समाजाला शहाणे करणअयाची गरज होती. या देशाच्या भौगोलिक सीमांमध्ये पूर्वापार वसलेल्या धर्म, पंथादी मूल असेल्या भूमीपुत्रांना हिंदु म्हणून एकत्र आणणे गरजेचे होते. त्यावरच घाला घातला गेला. त्यात फूट पाडून विविध पंथांनाही धर्माचे रूप देण्यासारखे धोरणात्मक निर्णय गेल्या काही वर्षांमध्ये घेतले गेले आहेत. त्यांच्या मागण्यांना न्य करणअयासाठी त्यांना सवलती देऊ केल्या गेल्या आहेत. यात केवळ एकमेव काँग्रेस पक्षही नाही अन्य पक्षही विविध स्तरावर साथीला आहेतच. यामुळे राहुल गांधी यांचे विधान काँग्रेसच्या संबंधात केले गेले असले तरी ते स्वागतार्ह आहे. पण ते उशिरा सुचलेले शहाणपण म्हणआवे लागते. तसेच ते राजकीय असेल तर त्याची प्रामाणिकता व उपयुक्तातही वादग्रस्त ठरू शकते.

काँग्रेसनेही या आधी काही चुका केल्या आहेत, असे जरी त्यांनी सांगितले असले तरी त्या चुका कोणत्या हे काही त्यांनी स्पष्ट केलेले नाही. यामुळेच त्या चुका काय आहेत, हे काँग्रेसने विश्लेषण व तपशीलवारपणे सांगितले पाहिजे. मुळातच भाजप काय किंवा काँग्रेस काय यांनी घटनेने दिलेल्या तसेच स्वातंत्र्यानंतर काही जाणीवपूर्वक बदल केलेल्या दुरुस्त्यांन्वये तयार झालेल्या मार्गाचाच अवलंब केला आहे. यातून हिंदु समाजाचे हित खरोखर रक्षिले गेले आहे का, असा मनोमन प्रश्न पडतो.  बऱ्या वर्षांची हाती असलेली सत्ता गेल्यानंतर झालेला साक्षात्कार आणि बऱ्याच वर्षांनी काँग्रेसच्या हातून सत्ता मिळविल्यानंतर त्या संबंधात आलेली सत्ताअभिलाषेतील अहंपणाची स्थिती भाजपाने १० वर्षे राखली. आता या २०२४ च्या निवडणुकीत त्यांनी त्यापेक्षाही अधिक काही मिळविण्याचा प्रण केला आहे. यासाठी देशाला सुपरपॉवर बनविण्याचा हेतू, विकासाचा हेतु स्पष्ट करीत आपल्या सत्ता कालावधीची भलावण केली आहे. राजकारण म्हणून ठीक आहे, पण काही मर्यादा घालून घ्याला सत्ताधारी व  शुचिर्भूत साधनांचा वापर करण्याचा मात्र पूर्वीचा दावा कागदोपत्रीच राहिला आहे. त्यामुळे खरे पाहाता चुका कोणी कोणी कशा व किती केल्या त्याचे परिक्षण व आत्मपरिक्षणही व्हायला हरकत नाही.

जातिव्यवस्थेवर बोलताना राहुल गांधी यांनी या जाति आधारित पूर्वापार पद्धतीमुळे देशवासीयांच्या कार्यक्षमतेचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास होत असल्याचे म्हटले आहे. हे सांगताना हे वास्तव स्वीकारून अनेकांनी त्यात बदल करण्यासाठी आवाज उठवला आहे, असेही राहुल गांधी यांनी सांगितले आहे. हे सांगताना त्यांनी सत्ताधाऱ्यांनाही लक्ष्य केले असून त्या संबंधात त्यांनी राजकीय टिका केली असल्याचे दिसते जे सत्तेवर बसले आहेत, त्यांचे पूर्ण आयुष्य फक्त सत्तेच्या मागे धावले आहे, देशातील हे वास्तव काही ते स्वीकारत नाहीत इतकेच नव्हे तर स्वतःचे वास्तवही स्वीकारलेले नाही व ते इतरांचे वास्तवही स्वीकारणार नाहीत अशी टीका केली आहे.

राहुल गांधी यांच्या एकंदर या वक्तव्यावरून काँग्रेसमधील नव नेतृत्वाची अपरिपक्वता वा अतार्किक जाणीवही दृष्टीस येऊ लागली आहे. मुळात आपली विधाने अशी करून नेमकेपणापासून दूर पळण्याचा हा प्रकार आहे. आजपर्यंत जातिवर आधारित अनेक बाबी काँग्रेस पक्षानेही स्वीकारल्या आहेत. अंतर्गत राजकीय विभाग तयार करतानाही दुर्बल घटकांसाठी केलेल्या विभागातील अंतर्भूत व्यक्ती आदींमधील निर्मितीही जात-पात विचारात घेऊन केली गेली. काळानुसार कदाचित ते अपरिहार्यही असेल, त्या त्या जातिंमधील दुर्बल घटकांच्या सबलीकरणासाठी केलेल्या प्रयत्नांचाही तो भाग असेल. निवडणुकांमध्येही तशा राखीव जागांचे धोरण असते. म्हमजे पुन्हा त्या ठिकाणी या जितिनिहाय विचारांचा पगडा आहेच हा केवळ काँग्रेसमधील नव्हे तर सर्वच पक्षांमधील एक फंडा बनला आहे. पण त्यातून काय साध्य केले गेले आतापर्यंत याचा विचार काँग्रेसनेही कारवयास हवा आणि इतर पक्षांनीही करायला हवा. मुंबईत पूर्वी गोविंदा- गणेशोत्सव यांचे उत्सव गल्लीगल्लीनुसार स्वतंत्रपणे परिचित असत. हे ही याच प्रकारातील वैचारिकतेचे द्योतक आहे. आम्ही सर्व एक आहोत ही भावना मुळातच आधीपासून जोपासावयास हवी होती. दुर्बलता ही सामाजित व आर्थिक स्तरावर आली व त्यामुळे शिक्षण मिळण्यापासूनही दुर्बल घटक वंचित झाला. मूळ आर्थिकता हा विषय यात आहे. तो जातिंवर आधारित केला गेला खरा पण या भारतीय हिंदु धर्मातील जाती या समाजव्यवस्थेतील अर्थव्यवस्थेतील घटक होत्या. ब्रिटिशांनी ही व्यवस्था मोडली, त्यामुळे त्या अधिक दयनीय स्थिती आल्या गेल्या. या प्रश्न खूप चर्चा व विश्लेषणाचा आहे. पण जातिव्यवस्थेच्या या घटकाचा संबंध हा प्रामुख्याने हिंदु समाजाचा येतो. त्याचा विचार करता काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे त्या अनुषंगाने केलेले विधान अपुरे व अतार्किक वाटते.

जातनिहाय जनगणनेवर भर देणारा काँग्रेस व त्या अनुषंगाने होणारे त्या विशिष्ट दुर्बल समाजाला होणारे फायदे हे सांगताना भारतीय जनमानसातील विशेष करून बहुसंख्याक समाजातील जात प्रामुख्याने समोर येते. मात्र त्या बहुसंख्याक समाजासाठी म्हणजेच हिंदु समाजासाठी काँग्रेसने सुधाराची किती कामे केली, त्यांना दिलासा देणारी किती कामे केली आणि धार्मिकतेला त्यांनी महत्त्व दिले नसेल तर त्यांनी अन्य धर्मांच्या धर्मभावनांना राजकारणातील फायद्यासाठी सतत पुढे आणून कोणती धर्मनिरपेक्षता दाखविली असाही प्रश्न पडतो. किंबहुना काँग्रेसच्या या धोरणांचा पुनर्विचार करण्याचीही गरज आहे. या धोरणांमुळे बहुसंख्याक हिंदु मतांचे ध्रुवीकरण करून मतपेढी तयार करण्याचे काम या धर्मनिरपेक्ष म्हणविल्या जाणाऱ्या देशात भारतीय जनता पक्षाने कसे केले, ते समजून घेण्याचीही काँग्रेसने मानसिकता दाखविण्याची गरज आहे. या जातिव्यवस्थेसंबंधात काँग्रेसच्या जुन्या नेत्यांपैकी मोहनदास करमचंद गांधी, वा गांधींचे तत्कालिन शिष्य म्हणविणारे गांधीवादी वगळता कितींनी जाणीवपूर्वक काम केले, विचार केला. मुळात लक्षात घेण्यासारखी एक बाब आहे. ती म्हणजे समाजातील प्रत्येक घटक हा महत्त्वाचा असतो, राष्ट्र म्हणून त्या त्या घटकाची महत्ता असते. जसे हाताची पाच बोटे सारखी नसतात. पण कोणत्याही बोटाची उंची कमी असल्याने ते कमी महत्त्वाचे आहे असे होत नाही. तसेच सर्व बोटे सारखीक असतील तर तो हातही काम करणार नाही. त्यामुळे प्रत्येक बोटाचे महत्त्व मान्य करून त्यांना त्यांचा मान दिलाच पाहिजे. सर्व बोटे सारखी झाली तर हात प्रभावी पणे काम करू शकणार नाही. त्याप्रमाणेच समाजातील या स्रव जातिव्यवस्थेचे आहे. हे लक्षात घेऊन प्रत्ये स्तरावरील व्यक्तीला असणारे महत्त्व दिले गेले पाहिजे. त्या त्या व्यक्तीला योग्य पद्धतीने स्वातंत्र्य दिले गेले पाहिजे. भेदरहित, द्वेषरहित, उच्चनीचतेची भावना काढून सर्वसमानता त्या त्या पूर्वापार तयार झालेल्या गटांना दिली गेली पाहिजे. त्यासाठी खरे म्हणजे हरिजन म्हणून त्यांना वेगळे मानण्याचीही आता गरज नाही. कारण भेदाभेद संपल्यानंतर त्यांची ही ओळखही कामाची नाही. तो संपण्यासाठी राजकीय मतभेद विसरून कितींनी कामे केली तितकेच कशासाठी निवडणुकीसाठीही त्यांना आपण स्वतंत्र आरक्षित मतदारसंघ देतो. आजही ते देतो, द्यावे अशी मागणी होत असते. याचा अर्थ सर्वाधिक काळ सत्तेवर असलेल्या शतकापेक्षाही बराच अधिक काळ अस्तित्त्व असल्याचा दाखला देणाऱ्या काँग्रेसने केलेल्या या संबंधातील कार्याचे आत्मपरिक्षण करायला हवे, असाच अर्थ राहुल गांधी यांच्या या वक्तव्यातून घ्यायचा का, तसे असेल तर इतक्या वर्षाची परंपरा सांगण्याचा मोठेपणा बाजूला ठेवावा लागू शकतो.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी जातीभेद नष्ट करण्यासाठी स्वतः कार्य करून रत्नागिरी सारख्या त्यावेळच्या कर्मठ व दुर्गम भागात स्थानबद्धतेत असताना एक आदर्श ठेवला. त्यांनी हिंदु धर्मातील नियमांच्या - श्रुतीस्मृती पुराणोक्त बाबींना डावलून सात बेड्या तोडल्या. त्याचा अर्थ तितकाच त्या काळापुरता वा त्या बेड्यांपुरता मर्यादित नव्हता. त्या पलीकडेही अद्ययावत होण्याचे त्यांचे सांगणे होते. ते ना सावरकरवाद्यांना नीट उमगले ना काँग्रेसवाल्यांना. सात बेड्यांच्यापलीकडेही काही बेड्या असतात.  विज्ञानाच्या कसोटीवर पारखून धर्मातील विविध रुढी, रिवाज, जातीधर्मादी व्यवस्थांचे जुनाटपण तोडण्याची गरज आहे, ती केवळ त्या काळात नव्हे तर आजही आहे. किंबहुना राष्ट्र म्हणून बहुसंख्याक हिंदु समाजातील रुढींना तोडण्याचे धाडस सावरकरांनी दाखविले होते, तसेच हमीद दलवाईंंसारख्या नास्तिक, तर्कवादाला मानणाऱ्या आणि सुधारणावादी अशा कोकणाच्या सुपुत्रानेही ते धाडस केले. मुस्लीमांना चार गोष्टी सांगून सुधारण्याचा प्रयत्न केला. राष्ट्र सेवादलापासून त्यांनी काम सुरू केले ते अगदी मुस्लीम सत्यशोधक मंडळाची स्थापना त्यांनी केली. अशा स्वातंत्रवीर सावरकर असोत वा हमीद दलवाई असोत, यांच्या विचारप्रणालीवर चालण्याचे धाडस गेल्या काही वर्षांमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाने प्रत्यक्षात दाखविले आहे, असे म्हणता येत नाही, राजकारणासाठी वापर मात्र सर्वांनी जरूर केला. जोपर्यंत या व्यक्तींच्या वैचारिकतेला काँग्रेसच काय अन्य पक्षही धोरणात्मकदृष्टीने स्वीकारणार नाहीत, तोपर्यंत जुनी परंपरा सांगणाऱ्या काँग्रेससारख्या पक्षाचे विद्यमान नेते राहुल गांधीच्या वक्तव्यालाही काही अर्थ असणार नाही. त्यांचे वक्तव्य केवळ राजकीय हितसंबंध जोपासण्यापुरतेच मर्यादित राहू शकतील.  भाजप हा उघडपणे हिंदुधार्जीणा पक्ष असला तरी तो काँग्रेसचेच एक प्रतिबिंब आहे, हे देखील नाकारता येणार नाही. राजकीय आणि वैचारिकतेच्याबाबतीत भाष्य करण्याची आता खरे म्हणजे किती राजकीय नेत्यांची पात्रता आहे, असाच प्रश्न या निमित्ताने पडतो. तूर्तास इतकेच.

- रवींद्र यशवंत बिवलकर

(१७ मे २०२४)

 

फिर सुबह होगी .... पण कधी?

सुबह कभी तो आयेगी... हे गाणे आज नेहरूवादी नसलेल्या  व नेहरूंच्या राजवटीवर आसुड ओढणाऱ्या विचारसरणीच्या सत्ताधारी ‘भाजपवादी’ अशा १० वर्षांच्या...