स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यामधील एक देदिप्यमान व्यक्तिमत्त्व खरे, मात्र त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची, त्यांच्या कार्याची सुयोग्य दखल ना खानग्रेसी सरकारांनी घेतली, ना बिगरखानग्रेसी पक्ष वा नेत्यांनी घेतली, ना हिंदुत्त्ववादी म्हणवणाऱ्या अनेक पक्ष-नेत्यांनीही घेतली. विचारवंतांना सावरकर यांचे विचार पचवणे तसे कठीणच गेले, कारण त्यांच्यावर कथित धर्मनिरपेक्षतेचे जणू अन्त्यसंस्कार झाले.
ल्याने हिंदुत्व हा शब्द पचवणे, समजून घेणे, सावरकरांचे हिंदुत्व कळणे अवघडच ठरले गेले. यामुळे पुरोगाम्यांनाही ते आपले वाटू शकले नाहीत, ही त्या पुरोगामीपणाचीच शोकात्मिका आहे. इतकेच नव्हे तर अनुयायी म्हणवणाऱ्यांमध्येही अनेक प्रकारचे मतभेद, मनभेद असल्याने सावरकरांचे विज्ञाननिष्ठ आणि समाजसुधारणावादी धर्मतत्त्व अनेकांना पचवता आले नाही. त्यामुळेच काहीजण डीएनए ही संकल्पना मांडत विज्ञाननिष्ठ असल्याचा कावाही करू लागले. सत्ता आणि फक्त सत्ता तसेच सत्ता आणि काँग्रेसी, डाव्यांना विरोध इतक्याच कूपमंडूक वृत्तीने सावरकर समजल्याचा अविर्भाव काही लोक आणू लागले.
छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या प्रखर हिंदुत्वनिष्ठ आणि रयतेला समजून घेणाऱ्या राजाला देवत्त्व देऊन आपण हीन मानव आहोत हे मान्य करून मग देवापुढे आपण किती क्षुल्लक आहोत असेच जणू मनामनात बिंबवले, अशाप्रमाणेच स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांनाही त्यांच्या मातृभूमीत म्हणजे स्वतंत्र झालेल्या भारतातही त्यांच्या पश्चात देवत्व देत कोनाड्यात बसवण्याचा प्रयत्न सुरू झाला. त्यांच्या विचारांचा आणि विज्ञानवादी, समाजसुधारणावादी द्रष्टेपणाचा दृष्टिकोन लोकांमध्ये बिंबवण्याऐवजी त्यांच्यावर आरोप करणारे नतद्रष्ट आणि ‘ते तुमचे आणि हे आमचे’ करणारे नवतरुण नेतृत्त्व आणि त्यांना साथ देणारे सत्ताभिलाषी, सावरकरद्वेषी वा हिंदुत्त्वद्वेष्टे यांनी केवळ सावरकरांनाच नव्हे तर साऱ्या भारतवासींनाच वैचारिक काळ्यापाण्याच्या शिक्षेला पाठवण्याचे घोर कृत्य केले आहे. स्वार्थासाठी, सत्तेसाठी तथाकथित विचारसरणीच्या धर्मनिरपेक्ष नामक नव्या धर्माच्या निर्मितीचा धर्मग्रंथच तयार करू पाहाणाऱ्यांनी या भारतभूमीलाच वेठीस धरले आहे. ते राजकारणी आहेत, ते कथित विचारवंत आहेत, ते कथित हिंदुत्ववादी आहेत, ते मुस्लीमवादी आहेत... केवळ ते त्यांच्या गल्लाभरू वैचारिक क्रांतीला मानणारे ठरले आहेत. अशांना वेळीच योग्य ठिकाणी रोखणे गरजेचे आहे. किंबहुना हिंदू आणि अहिंदू यातील फरक या गल्लाभरूंना कळला नाही, तरी चालेल पण सर्वसामान्य हिंदूंना स्व-अस्तित्त्वाची जाणीव करून देणे गरजेचे आहे. त्यासाठी सांघिक नव्हे तर वैचारिक विज्ञानवादी सावरकरी दृष्टी प्रत्येकाने मिळवावी इतकीच या लिखाणामागे तळमळ आहे. सावरकर यांना देवत्व नको तर त्यांच्या विचारांना अंमलात आणण्याची त्यांचे विचार या नव्या काळातही त्या कालानुरूप पद्धतीने अंमलात आणण्याची आवश्यकता आहे. आधुनिक युगाचा तोच कदाचित महामार्ग ठरू शकेल.

खुप छान
उत्तर द्याहटवा