शनिवार, २९ ऑक्टोबर, २०२२

 निमित्तमात्र  

... तर स्वातंत्र्य हे (स्व) तंत्रशून्यच 

महेश्वर येथील राजराजेश्वर मंदिर

ओंकारेश्वर या बारा ज्योतिर्लिंगामध्ये तेथे असणारे ओंकारेश्वर आणि ममलेश्वर ही दोन प्रमुख देवस्थाने. या ठिकाणी ओंकारेश्वर देवळात जाण्यासाठी असणारी लोकांची गर्दी अतार्किक आणि अगम्य आहे. भावना व विशेष करून धार्मिक भावना आहेत या नवाखाली बेशिस्त असण्याची, आरडाओरड करण्याची, रेटारेटी करण्याची खरे म्हणजे काहीच आवश्यकता नसते. रांग शिस्तबद्ध असण्यासाठी मंदिराचे कार्यकर्ते, स्वयंसेवक वा कर्मचारी किंवा पोलीस असले पाहिजेत ही आवश्यकता भारतीयांच्या धर्मभावनेच्या बेभानपणाचे लक्षण समजावे की, बेशिस्त वर्तणुकीचा कळस मानावा. 

स्वातंत्र्य मिळाले खरे, ७५ वर्षेही झाली असतील १०० वर्षेही होती ल पण आपण स्वातंत्र्याला पात्र आहोत का, असा विचार करायला हवा, अशी स्थिती येण्यामागे भारतीय नागरिक या नात्याने आपण या भारत- हिंदुस्तान - इंडिया नामक भूभागाचा... जो काही फाळणीनंतरही मिळालेला देश नावाचा भाग आहे त्या भूमीचा आपण मान राखला आहे का, याचा भारतीय मतदारांनीही विचार करायला हवा, भारताच्या सरकारी, खासगी, कामगार वर्गानेही विचार करायला हवा, इतकेच नव्हे तर सर्व पक्ष, सर्व नेते, सर्व कार्यकर्ते यांनीही विचार करायला हवा. थोडक्यात आपण स्वातंत्र्याला पात्र आहोत का, लायक आहोत का याचा सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक, वैयक्तिक असा सर्व बाजूंनी शोध घेऊन, त्यातील दोष सुधारण्यासाठी प्रयत्न करायला हवा. तसे सुधारण्याचा आणि कालाबरोबर जाण्याचा वैचारिक, वर्तनात्मक आणि भावनात्मकही प्रयत्न केला गेला नाही तर तो असंस्कृत आणि बेताल जीवनपद्धतीचा स्वीकार केला गेला, असेच म्हणावे लागेल. 

पहिले बाजीराव पेशवे यांचे समाधीस्थान
अलीकडेच पहिल्या बाजीराव पेशव्यांच्या समाधीस्थानाला जाण्याचा योग आला. तसेच ओंकारेश्वर, महेश्वर या मध्य प्रदेशातील धार्मिक, सामाजिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा सांगणाऱ्या ठिकाणी जाण्याचा योग आला. अशा ठिकाणी जाताना कल्पना आणि वास्तव या दोन्ही घटकांचा विचार करताना आणि तुलनात्मक दृष्टीने आपल्या जीवनपद्धतीकडे पाहाताना भारतीय असण्याचा बेशिस्तीचा अनुभव अनेक ठिकाणी आला, जसा माणुसकीचा मदतीचा अनुभव आला तसा गल्लाभरू धंदेवाईक माणसाचाही अनुभव घेता आला. तुलनात्मक दृष्टीने विचार करता स्वातंत्र्याच्यानंतर आपण काय कमावले आणि काय गमावले याचाही गांभीर्याने विचार करून बदलण्याची वेळ आली आहे असे नक्की वाटू लागते. केवळ मुद्दे देत मी  अनुभव मांडतो. 

 मुंबई पासून मध्य प्रदेशात जाण्याच्या आग्रा रोड- राष्ट्रीय महामार्गाची स्थिती बरीच चांगली आहे मात्र मुंबईकडे येताना महाराष्ट्रात इगतपुरी, घोटी, कसारा घाट उतरल्यानंतर कल्याणपर्यंतचा रस्ता खराब, खड्डेमय आहे आणि नंतर मुंबईकडे येतानाचा रस्ता अनेक बाबतीत आनंदी आनंद आहे. 

  • बाजीराव पेशव्यांसारख्या व्यक्तिमत्वाचा हा अवमानच
    मध्य प्रदेशात खालखुर्दनंतर बाजीराव पेशवे यांच्या समाधीस्थान असलेल्या रावेर खेडीकडे जातानाचा रस्ता नॅशनल खर्मल पॉवर प्रकल्पामुळे ट्रक जाऊन येऊन अतिशय खराब झाला आहे. तो थेट जवळपास ओंकारेश्वरपर्यंत खराब येतो.. रावेरखेडी फाट्यापासून मात्र रस्ता बाजीराव पेशवे यांच्या समाधीस्थानापर्यंत नवा आहे. हे सुदैव
  • बाजीराव पेशवे यांच्या समाधीस्थानाचा भाग सुशोभित करण्याची आवश्यकता आहेच आहे. नर्मदा इतकी जवळ असून तिच्या पाण्याचा वापर करून तेथे छानसे उद्यान, तयार होऊ शकेल. पण लक्षात कोण घेतो...
  • नर्मदा पाणी देईल पण बाग फुलवावी असे वाटले तर पाहिजे ना

    पाणी मिण्याची सुविधाही नर्मदेच्या या तीरावरील स्थानात नाही. ना शौचालयाची बांधणीही केली आहे. तरीही ते पर्यटन स्थळ आहे म्हणे.
  • एक दुजे के लिये चित्रपटातील ‘वासू सपना’ प्रमाणे प्रेमी युगूल वा अन्य कोणी भारतीय नागरिक यांना बाजीराव पेशवे यांचे महत्त्व वाचताही येत नसल्याने या स्थानात आनेक ठिकाणी नावे भिंतीवर कोरण्याचा व लिहिण्याच मोह काहींना आवरत नाही, हे भारतीयत्त्वाचे प्रमुख लक्षण येथेही दिसून येते.
  • समाधीस्थानावर थेट प्रत्यक्ष जाणे, तेथे उभे राहाणे, त्या ठिकाणी वर जाऊन बसणे, वा तेथे फोटो काढून घेणे आणि सेल्फी काढणे ही वैचारिक बेशिस्त भारतातील जनमानसात रुळलेली आहे. त्यामुळे आपण ज्या ठिकाणी जाऊन उभे राहातो आहोत, तेथे त्या पद्धतीत जाणे, फोटो काढून आपण आल्याचा पुरावा निर्माण करण्याच्या हेतून का होईना पण फोटो काढणे हे कृत्य अतिशय गंभीर आहे. समाधीस्थानाचा हा अपमान म्हणजे त्या थोर व ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाचा अपमान करण्यासारखे आहे. आपल्याच इतिहासाचा आणि सांस्कृतिक वारशाला आपण लाथ मारण्याच हा प्रकार आहे. दुर्दैव आहे हे...

बाजीराव पेशवे यांच्या समाधीस्थानाबाहेर असणारी ही मोकळी जागा बाग फुलण्यासाठी प्रतीक्षा करीत आहे
  • ज्या मराठा सेनापतीने मुघल शासकांना घडा शिकवला, आपल्या प्रभुत्वाखाली आणले, एकही युद्ध न हरलेल्या या पेशव्याने हिंदुपदपादशाहीची मान उंचावली... 
  • अशा व्यक्तीच्या समाधीस्थानाच्या परिसरात नर्मदा नदी जवळ असतानाही साधी बाग फुलवू शकत नाही, हा करंटेपणाच नव्हे का...
  • ओंकारेश्वर या बारा ज्योतिर्लिंगामध्ये तेथे असणारे ओंकारेश्वर आणि ममलेश्वर ही दोन प्रमुख देवस्थाने. या
    भक्तांची ही भावनिक रेटारेटी 

    ठिकाणी ओंकारेश्वर देवळात जाण्यासाठी असणारी लोकांची गर्दी अतार्किक आणि अगम्य आहे. भावना व विशेष करून धार्मिक भावना आहेत या नवाखाली बेशिस्त असण्याची, आरडाओरड करण्याची, रेटारेटी करण्याची खरे म्हणजे काहीच आवश्यकता नसते. रांग शिस्तबद्ध असण्यासाठी मंदिराचे कार्यकर्ते, स्वयंसेवक वा कर्मचारी किंवा पोलीस असले पाहिजेत ही आवश्यकता भारतीयांच्या धर्मभावनेच्या बेभानपणाचे लक्षण समजावे की, बेशिस्त वर्तणुकीचा कळस मानावा. ओमकारेश्वर प्रमुख आणि ममलेश्वर त्यापेक्षा कमी मह्त्त्वाचे असे मानण्याचा अट्टाहासही धार्मिक निरक्षरतेचा भाग म्हणावा का, ममलेश्वरमध्ये ओमकारेश्वरच्या तुलनेत नगण्य गर्दी असल्याचा अनुभव येतो तर दोन्ही शिवलिंगांचे दर्शन हे महत्त्वाचे आहे, असे सांगणारे महाभागही भेटतात. म्हणजेच सारे कसे मनाला हवे तसे वळवावेत तशा धार्मिक भावनांचे शिवभक्त असतात का, असाच प्रश्न पडावा. पोथिनिष्ठता वा तथाकथित रितीरिवाजांमधून भारतीय हिंदुत्व अजूनही बाहेर पडलेले दिसत नाही.
  • ओंकारेश्वर येथील नर्मदेकाठचा घाट हा तसा गेल्या काही वर्षांपूर्वीच बांधला आहे. त्याचा दर्जा काय वर्णावा... महेश्वरमध्ये अहिल्यादेवी होळकरांनी बांधून घेतलेले नदीकिनाऱ्यावरील घाट अजूनही खूप चांगल्या स्थितीत 
    ओंकारेश्वरचा हा घाट अहिल्यादेवींनी बांधला असता तर...
    आहेत तर ओंकारेश्वरमधील घाट, तेथील फुटलेल्या पायऱ्या, तेथील अस्वच्छता, फेरीवाले, धार्मिक कार्यांची संलग्न स्थिती याबाबतीत, नीटनेटकेपणा याची वानवा म्हणजेच ओंकारेश्वर असे वर्णन करावेसे वाटते. 
  • ओंकारेश्वर या ठिकाणी खासगी वाहन पार्किंग, लॉज-हॉटेल्स, टपऱ्या, भिक्षुकांची वा भटजींची रेलचेल मात्र भरपूर आहे. या ओंकारेश्वरमध्ये एका प्रवेशद्वारी वाहनांकडून ३० रुपये नगरपरिषद घेते. इतकी वाहने येतात पण मग अशी गलथान स्थिती तेथे असते, त्यासाठी प्रवेशाद्वारे मिळणारा पैसा भाविक, पर्यटक यांच्यासाठी किती खर्च केला जातो हाच मोठा प्रश्न तेथे पडतो. पण कोणीही त्याकडे फारसा गांभीर्याने विचार करताना दिसत नाही.
  • ओंकारेश्वर येथून महेश्वर येथे जाण्याचा मार्ग सुमारे ७० किलोमीटर इतका आहे. मात्र त्यासाठी वेळ लागतो तो सुमारे ३ तास. लहान रस्ते, निमशहरातील वेशिस्त वाहतूक, सिंगल रस्ता असला तरी तो समजून वाहने न चालवण्याची लोकांची मानसिकता, मधल्या काही गाव व निमशहरी भागातील खराब रस्ते, रस्त्यांवर मार्गदर्शक पाट्या नीट पद्धतीने न लावणे अशा विविध त्रासांमधून मध्य प्रदेशचा पर्यटन विकास येथे दिसून येतो.
  • महेश्वर येथील मंदिरे मात्र खूप चांगल्या स्थिती, स्वच्छ आणि छान ठेवली आहेत. तर जुन्या राजवाड्याची स्थिती, घाट यांची रचना आजही खूप चांगल्या स्थिती आहे. वास्तुरचना, त्यासाठी केलेले काम हे प्रामाणिकपणे, श्रद्धाभावनेने केले असल्याने आजही ते टिकून आहे. अर्थात काही ठिकाणी त्याची देखभाल म्हणावी तशी नाही. जुने बांधकाम राखणे हे सोपे नाही, हे ही खरे पण किमान बऱ्याच अंशी महेश्वर खूप सुसह्य शहर वाटते. 
  • महेश्वरमधील जुन्या भागात रस्ते लहान असून ही वाहतूक व्यवस्था शिस्तबद्ध वाटावी अशी आहे, हे ही नसे थोडके. 
  • महेश्वरमधील हा घाट... अहिल्यादेवींच्या कार्यामुळे आजही सुस्थितीत
    राजवाडा, गड येथील भाग, अहिल्यादेवींची माहिती देणारा त्यांच्या वाड्या परिसर हा त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात असून तो खूप चांगला ठेवण्याचा प्रयत्न  केला गेला आहे. मात्र तेथे सूचना लिहून ठेवलेल्या असतानाही त्याचे गांभीर्य पर्यटकांना नाही कारण ते स्वतंत्र भारतातील स्वतंत्र नागरिक आहेत. त्यामुळेच फोटो काढण्याबद्दल, शांतता राखण्याबद्दल, अगदी चप्पल काढण्याच्या शिस्तीबद्दल किंवा रांगेत शांतपणे जात स्थानाचे अवलोकन करीत आपण एखाद्या कुटुंबाच्या मालकीच्या वास्तुत वावरत आहोत, हे भानही स्वतंत्र भारताच्या या नागरिकांना नसते. 

अर्थात ही स्थिती केवळ मध्य प्रदेशात असेल असे नाही, अन्य भारतीय राज्यांमधील अनेक भागांमध्ये ही अनुभूती येऊ शकते. यामुळेच भारतीय स्वातंत्र्यासाठी इतक्या वर्षांनीही आपण स्वातंत्र्य उपभोगण्यास वा स्वतंत्र वर्तनाचा आनंद घेण्यासाठी पात्र वा सक्षम झालो आहोत का, याचा प्रत्येकाने गंभीरपणे विचार करायला हवा. काळ बदलला, राजा बदलला तरी वृत्ती गंभीरपणे विचार करणारी, त्यानुसार वर्तन करणारी नसेल, तर राष्ट्राच्या संबंधात मिळणारे स्वातंत्र्य हे (स्व)तंत्रशून्यच म्हणावे लागेल.

- रवींद्र यशवंत बिवलकर


शनिवार, ८ ऑक्टोबर, २०२२

निमित्तमात्र...

चोल वंशावरून पेटलेली दुहिं


स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी केलेली हिंदु संकल्पनेची व्याख्या लक्षात घेता हिंदु शब्दाचा, संकल्पनेचा आणि विशेष करून सध्या मानल्या जात असलेल्या हिंदु धर्म या एकांगी वा मर्यादित गट-पंथासंबंधातील निर्देशाचा आणि त्यामुळे उठवण्यात येणाऱ्या वादवादंगाचा फोलपणा आणि तसा वाद घालणाऱ्यांची अपरिपक्क्वताच दिसून येत आहे.

सावरकरांचे हिंदुत्व ही संकल्पना भूमिनिष्ठ आहे. भूमीशी ती संबंधित आहे. इतकेच नव्हे तर त्या संकल्पनेला ऐतिहासिक, बौद्धिक, धार्मिक आणि तार्किक पार्श्वभूमीही लाभली असून त्यामुळेच शैव, वैष्णव, बौद्ध, जैन, सनातन, वैदिक, आर्य, शीख अशा विविध धर्म-पंथ, तत्त्वज्ञान जे एका विशिष्ट भूमीमध्ये तयार झाले आहे. म्हणजेच त्यांची पुण्यभूमी आहे, असे हे सारे हिंदूच आहेत, हे सावरकरांचे सांगणे किती महत्त्वाचे होते हे लक्षात येईल. हिंदु-मुस्लीम या भेदांपेक्षाही आर्य-द्रविड, शैव- वैष्णव, श्वेतांबर- दिगंबर अशा याच भूमितील धर्म-पंथातील भेद हाच मोठा अडसर राष्ट्रभावनेत असू शकतो, यासाठीच भेदाभेद नष्ट व्हावेत म्हणून सावरकरांनी केलेली हिंदुत्वाची व्याख्या ही नीटपणे लक्षात घेण्याची गरज आहे. हे सांगण्याचे निमित्त म्हणजे PS:1 अर्थात ‘पोन्नियन सेल्वन हा ऐतिहासिक चित्रपट. चौल राजवंशावर आधारित असणारा हा चित्रपट असून राजराजा चोल हा हिंदु राजा नव्हता असे मत चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी राष्ट्रीय पुरस्कार विजेते तामिळ दिग्दर्शक वैत्रिमारन यांनी व्यक्त केले होते. त्यांच्या म्हणण्याला अभिनेते कमल हासन यांनी समर्थन दिले आहे. तर वेत्रियन यांच्या मतावर भाजपा नेते एच. राजा यांनी संताप व्यक्त केला आहे.

मुळात इतिहासावर या तिघांचा अभ्यास असला तरी त्या अभ्यासाचा वापर मात्र त्यांनी स्वमतप्रदर्शनासाठी करताना सारासारपणे केलेला नाही. सावरकर यांची हिंदुत्वाची व्याख्या


आसिंधु- सिंधुपर्यंता यस्य भारतभूमिका।

पितृभू: पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिति स्मृत:।।


अशी आहे. ही लक्षात घेता  सावरकर यांनी ज्या पद्धतीने स्पष्ट केली, ती भूमीनिष्ठ अशी व्याख्या आहे. या भूमीशी एकत्व सांगणारी आहे. हे एकत्व कसे तर ते तार्किक, तात्विक आणि विज्ञाननिष्ठ आहे. यामुळेच या व्याख्येनुसार हिंदु या शब्दाचा खरा अर्थ लक्षात घेऊन विचार केला गेला पाहिजे. मात्र आज सत्तेच्या राजकारणामध्ये प्रत्येकजण विरोधाचे राजकारणही करीत हिंदुत्वाच्या व्याख्येलाच हरताळ फसत आहे. असे झाले तर ते हिंदुत्वालाच नव्हे तर साऱ्या राष्ट्रालाही धक्कादायक असू शकते. सत्तेच्या राजकीय खेळामध्ये भूमिनिष्ठ राष्ट्रवादाच्या निर्मितीसाठी हिंदु समाजातील विविध धर्म-पंथ गट, तत्त्वज्ञाने यांच्या भूमिसंलग्नतेला महत्त्व देणारे सावरकरांचा विचार न स्वीकारल्याचा हा परिणाम नाही ना ?  केवळ मतलबासाठी वा मतदारांच्या ध्रुवीकरणाच्या खेळासाठी हिंदुत्व स्वीकारलेले नाही ना ?  तसेच केवळ भाजपाला डिवचण्यासाठी वा स्वत:चे अस्तित्त्व किती महत्त्वाचे आहे यासाठी कमल हासन यांच्यासारखे मान्यवर अशी हास्यास्पद आणि मूर्खपणाची घातक कृती करीत नाहीत ना? एकंदर हिंदुंचे ध्रुवीकरण होणे गरजेचे आहे. ते भूमिनिष्ठच असावे आणि असले पाहिजे, ही या ब्रिटिशांच्या हुकुमशाही गुलामगिरीतून भारतभूमीच्या सुटकेसाठी तयार व्हावी अशी मानसिकता अतिशय गरजेची आहे हे लक्षात घेतले पाहिजे.  त्याचप्रमाणे गेल्या काही काळापासून विद्यमान काळातील चष्म्यातून इतिहासाकडे विद्यमान मानसिकतेतून पाहाण्याची अहमहमिकाच लागली आहे. मुळात या सर्व प्रकारात सर्वसामान्यांची भांडणे मात्र अधिक होऊ लागतात आणि सामाजिक प्रसारमाध्यमांमुळे नटनट्यांच्या विधानांवरून लोकांमध्ये मात्र दशावतारी खेळेच सुरू होतात.

हिंदु समाजाच्या संघटनासाठी, एकजुटीसाठी, त्यांच्यावरील अन्याय मग तो इतिहासातील असो वा वर्तमानातील असो तो दूर करण्यासाठी झगडणारे स्पष्ट, पारदर्शी नेतृत्त्व म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. केवळ इतकेच नव्हे तर हिंदू या संकल्पनेला खरा अर्थ देत, राष्ट्रीयत्त्वाच्या व्याख्येत वा निकषांमध्ये बसवून हिंदू समाजाला जागतिक स्तरावर हक्काचा देश देण्याचा प्रयत्न करून त्या समाजातील उणेपणा दूर करणे, जातिपातींची संवेदनशून्य कल्पना संपुष्टात आणून, सर्वांना एकाच पातळीवर आणून, विज्ञाननिष्ठ समाज घडविण्यासाठी एक तर्कपूर्ण आणि विज्ञानाधारित तत्त्वज्ञान मांडण्याचा मोठा यज्ञच स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केला होता. पण, त्या यज्ञाचा फायदा हिंदुंना खरोखरच झाला नाही, अहिंसा न करताही हिंदुंचाच बळी काँग्रेसच्या कथित अहिंसावादी विचारसरणीने दिला गेला, असे आजही प्रत्ययास येत आहे. कमल हासन यांच्यासारख्या नामवंतांचे विधान हे देखील मानसिक आणि बौद्धिक हिंसा करण्याच्या  क्षुल्लक कृतीचे साधन ठरू शकते. तर त्या संबंधात भाजपा नेते एच. राजा यांनीही संताप व्यक्त करण्यापूर्वी हिंदुत्वाची नेमकी व्याख्या काय ते स्पष्ट करावे म्हणजे वेत्रिमारन आणि हासन यांच्या वक्तव्याला तोड देता येऊ शकेल. अन्यथा भाजपाच्या हिंदुत्त्वावर आणि विचारांवर जाणीवपूर्वक होऊ घातलेले मतभेद, मतभिन्नता ही मानसिक- बौद्धिक फाळणीकडे जाणाऱ्या सत्तालालची गटांची असेल आणि भाजपाही त्यात वेगळा ठरणार नाही. यासाठीच राजकीय दृष्टीनेही हिंदुसमाजाच्या बौद्धिक, तार्किक, तात्त्विक मंथनाची आजही गरज आहे, हेच सिद्ध होते. कारण मंथन यापूर्वीच झाले असते, तर हासन वा वेत्रिमारन यांच्यासारख्या हिंदुभूमीसंलग्न व्यक्तींनी असली विधानेच केली नसती. हासन यांची कन्या हिने तर बौद्ध धम्म स्वीकारला आहे. पण मुळात हे सर्व धर्म याच भूमीत जन्माला आले असल्याने, निर्माण झाले असल्याने त्यांचा हिंदुत्वात वा हिंदुपणात समावेश करण्यास काहीच हरकत नसावी. एखाद्याच्या विधानाचा अर्धामुर्धा वापरही टीआरपी नामक गल्लाभरू प्रमाणकासाठी करणारे प्रसारमाध्यमांमधील महाभाग कमी नाहीत, हे ही लक्षात घ्यावयास हवे. पण...

कमल हासन हे जसे अभिनेते आहेत, तसेच राजकारणातही सहभाग असलेल्या अभिनेत्यांमधील एक आहेत. त्यामुळे पोन्नियिन सेल्वन-१ या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांनी केलेल्या विधानांना खरे म्हणजे किती मनावर घ्यायचे ते ज्याचे त्याने ठरवावे. अलीकडे चित्रपटादी मनोरंजन क्षेत्रातून राजकारणात डोकावणाऱ्यांची संख्या चांगलीच वाढलेली आहे. कोणी काँग्रेसवादी, राष्ट्रवादी तर कोणी भाजपवादी, शिवसेनावादी तर कोणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा असतो, कोणी अन्य एखाद्या पक्षाचा कोणी अपक्षही असतो. महाराष्ट्राबाहेरही असलेल्या विविध राज्यामधील स्थानिक पक्षांमध्येही असे अनेक राजकीय कलाकार आहेतच. फक्त एकंदर वादांमध्ये सर्वसामान्यांनी अशा प्रकारच्या राजकीय विधानांमध्ये असणारे तथ्य पाहाताना स्वत:चे मत बनवताना वा सामाजिक माध्यमांमध्ये व्यक्त होताना तार्किकता, तात्विकता, विवेक पाळावेत. इतिहासाचाही नीट मागोवा घ्यावा. अन्यथा कोणी ‘चाची वा चाचा ४२०’ होऊ शकतो.!


- रवींद्र यशवंत बिवलकर

 


न भेटलेले महापुरुष ... आगरकर - सावरकर

००००००००००००००००००००००००००००

लोकहिताची कास धरणारे आगरकर - १

००००००००००००००००००००००००००००

सुधारणेसाठीची प्रखरता, पोथीच्या बाहेर पाहाण्याची दृष्टी, विज्ञानवादी - बुद्धिवादी कास, राष्ट्रवादाची तळमळ आणि बुद्धिप्रामाण्याचा साक्षात्कार म्हणजेच महापुरुषांची एक खूण ठरावी, असे म्हटले तर समोर उभे राहातात समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. आगरकर अवघ्या ३९ व्या वर्षी निवर्तले पण, या अल्प आयुष्यामध्येही त्यांनी आपल्या तत्त्वनिष्ठतेने व्यक्तिमत्त्व प्रगल्भ केले होते. खडतर स्थितीत शिक्षण घेत, समाजाच्या जुनाट रुढींविरोधात दंड थोपटून बुद्धिवादी, तर्कशुद्ध आणि विज्ञानवादी नजरेतूनही त्यांनी दिलेली झुंज समाजाच्या डोळ्यात अंजन टाकणारी होती.   स्वातंत्र्यवीर सावरकर यांनीही आपले आयुष्य ज्या पद्धतीने सर्वस्व वाहात राष्ट्र, समाज आणि या राष्ट्राशी एकजीव असलेल्या हिंदूंच्यासाठी त्यांच्या संघटनाबरोबरच त्यांच्या जुनाट विचारांना झुगारून विज्ञानदृष्टीने सर्वकाही स्वीकारून अद्ययावत होण्यासाठी आणि प्रखर राष्ट्रवादीवृत्तीने वेचले ते लक्षात घेता त्यांच्या विचारांच्या मार्गावर सोडा पण पायवाटेनेही अजून भारतीय समाज जाऊ शकलेला नाही. या दोन्ही महापुरुषांची महत्तता लक्षात घेण्याची आजही तितकीच गरज भासत आहे. याचे कारण त्यातूनच नवसमाजनिर्मितीच्या ध्येयाला आणि नवीन पिढीला खऱ्या अर्थाने अद्ययावत आणि बुद्धिनिष्ठ होता येईल. किंबहुना या उद्दिष्टानेच या दोन्ही महापुरुषांच्या वैशिष्ट्यांचा तुलनात्मक आढावा घेण्याचे हे धाडस करीत आहे.


१४ जुलै १८५६ रोजी गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म झाला. गणेशपंत आणि सौ. सरस्वतीबाई आगरकर यांचे हे अपत्य. १८६९ मध्ये रत्नागिरीला पुढील शिक्षणासाठी रवाना झाले. वास्तविक शालेय शिक्षण घेण्यापासून अगदी त्यावेळच्या पोटापाण्याच्या प्रश्नापर्यंत ज्यांनी झगडत, संघर्ष करीत आपले शिक्षण घेतले अशा या गोपाळराव आगरकरांनी बी. ए. झाल्यानंतर आपल्या आईला पत्र लिहिले त्यात त्यांनी आईला म्हटले की, आपल्या मुलाच्या मोठाल्या परीक्षा होत आहेत, त्याला आता मोठ्या पगाराची नोकरी मिळेल आणि आपले पांग फिटतील असे मनोरथ तू करीत असशील तर आत्ताच सांगतो की, विशेष संपत्तीची हाव न धरता मी फक्त पोटापुरत्या पैशावर संतोष मानून सर्व वेळ परहितार्थ खर्च करणार आहे. असे सांगणाऱ्या आगरकरांनी आपले ही वैचारिकता आयुष्यभर जपली, पाळली. १८८द मध्ये पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना झाली आणि तर १८८१ मध्ये एम. ए. झाल्यानंतर आगरकर न्यू स्कूलला मिळाले. त्या वर्षी नामजोशी यांच्या स्टार पत्राचे रूपांतर मराठा  आणि केसरी अशी तोन पत्रे न्यू स्कूलच्या मंडळींनी काढली आणि मराठ्याचे संपादक टिळक आणइ केसरीचे संपादक आगरकर झाले. १८८४ च्या जानेवारी महिन्यात फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना झाली १८८५ मध्ये त्यांची न्यू इंग्लीश स्कूलचे सुपरिटेंडंट म्हणून नेमणूक, तर १८८५ मध्ये आगरकर हे राष्ट्रीय सभेचे म्हणजे काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून मुंबईला झालेल्या पहिल्या अधिवेशनाला उपस्थित होते.  २५ ऑक्टोबर १८८७ रोजी आगरकरांनी टिळक- आगरकर यांच्यातील वादाअंती अखेर केसरीचे संपादकपद सोडले आणि त्यानंतर १८८८ मध्ये गोपाळ कृष्ण गोखले यांच्या सहकार्याने सुधारक हे साप्ताहिक सुरू केले. तर १८९२ मध्ये फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी त्यांनी नेमणूक झाली तर १७ जून १८९५ रोजी आगरकर काळाच्या पडद्याआड गेले. .... तसे पहावयास गेले तर हा त्यांचा अल्पायुष्याचा अल्प जीवनपट खरा पण या काळात त्यांनी दिलेली वैचारिक, सामाजिक आणि काही प्रमाणात राजकीय झुंज ही त्यांच्या महापुरुषाला चिरंतन करून गेली आहे. याच आयुष्यातील त्यांची वैचारिक कामगिरी ही त्यांच्या परखड, बुद्धिप्रामाण्यवादी आणि सच्चा शिक्षकाचीच साक्ष देणारी ठरते. सुधारक असो वा केसरी त्यांचे त्यामधील लिखाण हे समाजाला जागे करणाऱ्या जागल्याप्रमाणेच होते.

शिव्यांचा एक सभ्य प्रकार म्हणून ‘सुधारक’  या शब्दाची किंमत समाजात केली जात होती, अशा त्या काळामध्ये आगरकरांनी केसरीतून बाहेर पडल्यानंतर ‘सुधारक’ हे नाव साप्ताहिकाला दिले हे धाडस होते. सांगण्याच मुद्दा असा की, त्या काळात समाजातील रुढीस रिवाज, चाली रिती किंवा काळाप्रमाणए होत असलेल्या नव्या गोष्टींना स्वीकारण्याची आणि सामोरे जाण्याची ताकद, मानसिकता ज्या समाजात नव्हती, त्या ठिकाणी समाजाला सुधारण्याची जिद्द मनात बाळगून चिपळूणकर, देशमुख, आगरकरांसारखे लोक धडपडत होते. पाश्चिमात्य सुधारणा हा मोठा लक्षणीय भाग होता. त्यामधील काही दृष्टिकोन स्वीकारले जात होते मात्र त्याचबरोबर हिंदु समाजातील रुढी रिवाजांना आणि हिंदु धर्माला गावंढळ समजण्यावरील ब्रिटिश वा पाश्चात्य मतालाही विरोध केला जात होता. अशा स्थितीत योग्य ते सांगण्याची ताकद सुधारकांनी दाखवली होती. ती भारताच्या नव्या कालाची सुरुवात होती. नवीन काळाला सामोरे जात त्यातील आव्हाने स्वीकारण्याची ती आव्हानात्मक कृती सुरू झाली होती. त्यामुळे नव्या जुन्याचा संघर्ष सुरू होत एक वैचारिक क्रांती सुरू झाली होती. ही नुकतीच सुरुवात असल्याने सुधारणावादी दृष्टी मांडणाऱ्यांना होणारा विरोध शिगेला पोहोचला होता तर शिक्षणाचे महत्त्वही वाढू लागले होते. पुस्तकी, शालेय वा महाविद्यालयीन शिक्षणाचे महत्त्व निर्माण होऊ लागल्यानंतर आणि विशेष करून महाराष्ट्रात विष्णुशास्त्री चिपळूणकर, बाळशास्त्री जांभेकर, न्या. रानडे, म. फुले, धोंडो केशव कर्वे, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर अशी कितीतरी व्यक्तिमत्त्वे याच १८५७ नंतरच्या काळातील पेशावीनंतरच्या काळातील स्थितीमध्ये उदयास आली जी एकंदर पिढीच एका आव्हानात्मक क्रांतीला सामावून घेणारी होती. ब्रिटिशांविरोधातील मते, ब्रिटिशांच्या काहीशी भलावणी करणाऱ्यांची मते, आपल्या धर्मातील गुणदोष पाहाणारी आणि त्याचे मसर्थन विरोध करणारी मते असे सर्वच काही त्या काळातील समाजात पडसादणारे घटक हे महाराष्ट्रातील वैचारिक क्रांतीची नांदीच होती. अशा या वैचारिक क्रांतीच्या नांदीतूनच सुधारक आगरकर हे व्यक्तिमत्त्व तयार झाले होते. यासाठीच गोपाळ गणेश आगरकर यांच्या लिखाणातील, आयुष्यातील संदर्भ घेत त्यांच्या वैचारिकतेचा मागोवा घेण्याचा हा प्रयत्न आहे. किंबहुना यातच स्वातंत्र्यवीर सावरकर या वेगळ्याच व्यक्तिमत्त्वातील वैचारिकताही किती साम्य दर्शवणारी आहे, ते स्पष्ट होत जाईल.  आगरकर आणि सावरकर ही दोन्ही व्यक्तिमत्त्वे वेगळी आहेत. वेगळ्या काळातील आहेत, त्यांच्यावरील कालसंस्कारही वेगळ्या मुशीतील आहेत, हे लक्षात घेऊनही त्यांच्यातील साम्यस्थळे दिसू शकतात कारण मार्ग भिन्न असले तरी त्यांचे विचार बऱ्याच अंशानी सारखे वाटतात, कारण सामाजिक आणि वैचारिक उद्दिष्टांचे लक्ष्य सुधार, क्रांती आणि नवकालाची स्वीकृती व्हावी यासाठी असणारी तळमळ ही बुद्धिप्रामाण्याला अनुसरून जाऊ पाहाणारी आहे. 

००००००००००

परखडपणा प्रगमनशील समाजासाठी - २

०००००००००००

आपल्या समाजजीवनामध्ये इंग्रज भारतात येण्यापूर्वी असलेली स्थिती ते आल्यानंतर झालेली स्थिती, त्यामुळे समाजावर झालेले परिणाम आणि पाश्चात्य राष्ट्रे, तेथील विचार यांची तुलना आपल्या समाजाबरोबर करीत योग्यायोग्यतेचा व एकप्रकारे समाजही अद्ययावत विचाराने चालावा यासाठी असणाऱ्या त्यांच्या तळमळीचा ठसा त्यांच्या लेखनातून जाणवतो. हीच त्यांच्या वैचारिकतेची महत्त्वाची लक्षणीय बाब आहे. त्यांची सामाजिक सुधारणेची चळवळ आणि तळमळ ही पाश्चात्य शिक्षणामुळे विचारांना चालना देणारी आणि सामाजिक, वैचारिक तुलना करीत सुधारणा साधू पाहाणारी होती. त्यांच्या विविध लेख- निबंधांमधून तेच दिसून येते.

आगरकरांनी सुधारक सुरू केला, त्यावेळी त्यांच्या पहिल्याच अग्रलेखामध्ये त्यांनी ध्येय धोरण काय असेल ते स्पष्ट केले आहे. ते म्हणतात ...

आमचे स्पष्ट म्हणणे असे आहे की, हिंदु लोक रानटी अवस्थेतून निघाल्यानंतर काही शतकेंपर्यंत राज्य, धर्म,  नीती वगैरे काही शास्त्रे, वेदान्त, न्याय, गणितादी काही विद्या व काव्य गीत, नर्तनवादनादी काही कला यात त्यांचे पाऊल बरेच पुढे पडल्यावर त्यांच्या सुधारणेची वाढ खुंटली. तेव्हापासून इंग्रजी होऊपर्यंत कसे तरी राष्ट्रत्व सांभाळून राहिले. त्यामुळे त्यांचा इतिहासपट इतर देशांच्या इतिहासपटांहून फारच कमी मनोवेधक झाला आहे. आमची गृहपद्धती, आमची राज्यपद्धती, आमची शास्त्रे, आमच्या कला, आमचे वर्णसंबंध, आमच्या राहाण्याच्या चाली, आमच्या वागण्याच्या रिती... सारांश इंग्रजी होईपर्यंत आणचे व्यक्तीजीवित्व व राष्ट्रजीवित्व, ठशांत घालून ओतलेल्या पोलादासारखे किवां निबिड शृंखलाबद्ध बंदिवानासारखे अथवा उदकाच्या नित्य आघाताने दगडाप्रमाणे कठी झालेल्या लांकडासारखे किंवा हडकासारखे शेकडो वर्षे होऊन राहिले असे म्हणण्यास हरकत नाही. ही आमचीची शिलावस्था आम्हास पाश्चात्य शिक्षण मिळू लागल्यापासून बदलू लागली आहे...  एखाद्या पराक्रमी पुरुषाच्या बहुभाष विधवेप्रमाणे आम्हा भारतवर्षीयांची स्थिती झाली आहे, असे आम्हास वाटते....  ... जुन्या पुरुषांचे गुणानुवाद गाण्यातच आमच्या पुरुषार्थाची परमावधि होऊन बसली आहे...

आगरकरांचे समाजविषयक निरीक्षण अतिशय सूक्ष्म होते, शल्यासारखे टोचून सांगणे, नकारात्मक वाटले तरी  ते सत्य आणि परखड होते. सत्य कटू असते, त्याचा प्रत्यय त्यामुळे अनेकदा त्यांच्या लिखाणामधून आणि विचारामधून जाणवतो. समाजाच्या दैनंदिन प्रगतीसाठी हिंदुसमाजाच्या तत्कालीन चालीन चालण्यात आणि बोलीने बोलत राहाण्यात आगरकर यांना स्वारस्य नव्हते, अश त्यांच्या व्यक्तित्त्वाबद्दलची ओळख त्यांच्यावरील पुस्तकामध्ये केलेली आहे.

.... आगरकर म्हणतात की, देशाच्या कालाच्या व व्यक्तीच्या विवक्षित स्थितीत सौम्योपायांचे अवलंबन न करता तीव्रोपाय करणेत विशेष श्रेयस्कर असतते आणि म्हणूनच सभ्यपणाची मर्यादा न सोडता समाजाच्या हितास्तव ज्याला जी गोष्ट बरी वाटेल ती त्याने उघडपणे बोलून दाखवणे यातच समाजाचे कल्याण आहे. 

थोडक्यात त्यावेळी हिंदुसमाजाची स्थिती ही एखाद्या दगडाप्रमाणे ढिम्म होती, त्या हिंदु समाजाला प्रगमनशील म्हणजेच सुधारित वा विकसित करण्यासाठी आगरकर यांना समाजाच्या डोळ्यावर मारणे अधिक गरजेचे वाटले. ते त्यांनी केले. त्यामुळे पाश्चिमात्य सुधारणांसाठी हिंदुसमाजावर केलेल्या टीकांमुळे ते जी तत्त्वे समाजासमोर मांडत त्यातून विचारकलह जो होईल त्यामुळे लोकांना जो आपल्या वर्तनाबद्दल विचार करायला भाग पडेल, अशा कामासाठी भिता उपयोगाचे नाही, असेच त्यांचे मत होते. त्यांनी हे एकंदर हिंदु समाजावर आसूड ओढले त्यातून हिंदु समाजाबद्दल त्यांचे मत काही होते, त्यातून चुकीचा अर्थ मात्र काढणे योग्य ठरणार नाही. त्यांना हिंदु समाजाबद्दल आत्मीयता होती, द्वेष नव्हता. त्यामुळेच परक्यांनी हिंदु समाजावर टीका- हल्ला केल्यास ते तुटून पडत. मद्रासच्या एका इंडियन रिव्ह्यूमध्ये अॅशबर्नर यांनी हिंदु विधवांबद्दल कुत्सित लेख लिहिला होता, त्यावेळी असल्या उकिरड्याला आपल्या मासिकांत स्थान दिल्याबद्दल त्यांनी त्या संपादकाची हजेरी घेतली. इतकेच नव्हे तर ‘ तुमच्या मडमांनी हिंदु स्त्रियांचे चरणोदक घेऊन शुद्ध व्हावे इतक्या हिंदु स्त्रिया नीतिमत्तेत श्रेष्ठ आहेत.’ असे आगरकरांंनी सुनावून झणझणीत अंजन घातले. आगरकर यांचे हे लिखाण हे त्यामुळेच शुद्ध समाजसुधारणेच्या भावनेतून, तळमळीतून केलेले आणि तितकेच प्रखर हिंदुसमाजप्रेमीही होते. त्यामुळेच त्यांचे हिंदु समाजावरील टीकास्त्र हे महाभारतातील शल्यासारखे बोचणारे असले तरी सत्य आणि सुधारणांच्या कळकळीतून सुटलेले होते. त्यामुळेच  आपल्या मृत्युपूर्वीही त्यांनी काढलेले समाधानाचे उद्गार हे तितकेच प्रामाणिक होते. ते म्हणाले ... लोकांना मला काय सांगावयाचे होते ते सांगितले... कोणत्याही राजकीय हेतू नसताना केवळ समाज सुधारणा हेच लक्ष्य उराशी बाळगून लेखणी जिवंत ठेवणारे आगरकर, ज्या समाजासाठी हे सारे करीत होते, तो सर्व समाज हा प्रामुख्याने हिंदुसमाजच होता. हे मात्र कोणीही हिंदुंनी विसरता कामा नये, हे तितकेच खरे.

००००००००००

लोकशिक्षणाचे व्रत हेच आगरकरांचे ध्येय !

राजकीय दुर्दम्य इच्छाशक्तीही भविष्याचा वेध घेणारी... - ३

०००००००००००

सनातनी हिंदू संस्कृतीला बराच विरोध करणारे आगरकर असोत किंवा विज्ञानवादी दृष्टीने प्रत्येक बाब तावून सुलाखून घ्या आणि धर्मग्रंथ आदाराचे स्थान आहे त्यांना तितका मान देत वैज्ञानिक दृष्टीने सारे काही पारखून घ्या असे सांगणारे स्वातंत्र्यवीर सावरकर असोत, मुळात त्यांच्या दृष्टीने समाजसुधारणा, लोकांमध्ये वैचारिक मोठी झेप घेण्याची वृत्ती निर्माण व्हावी हीच तळमळ आणि कळकळ होती.

आगरकर म्हटले की, पौर्वात्य सुधारणेचा वृक्ष वठलेला आहे, म्हणून तो पुष्कळसा खच्ची करावा, त्यावर पाश्चिमात्य सुधारणांचे कलम चढवावे अशा प्रकारच्या गोष्टी सांगत आगरकर हे युरोपीयन संस्कृतीचे मराठी भाष्यकार बनले. इतकेच नव्हे तर त्यांचे निबंध पाहाता त्या अनुषंगाने अशा अनेक निबंधांचे शीर्षकही तसेच काहीसे सांगून जाते. त्यामुळे त्यांनी हिंदु धर्माला जाहीर नोटीस दिली, प्रेतसंस्कारापासून मुर्तीपूजेपर्यंत सगळ्या हिंदू चालींची टवाळी केली अशा बाबी त्यांच्या नावावर सहजपणे जातात. पण हे मुळात असे करण्याचा त्यांचा मानस वा विचार का होता, हे लक्षात घेण्यासाठी आगरकरांचे व्यक्तिमत्त्व आणि एकूणच त्यांची विचारशैली लक्षात घेत असता आणि तत्कालीन सामाजिक स्थितीचाही विचार करता आगरकर हे बंडखोर वा क्रांतिकारी विचारांचे प्रवर्तकच होते असे म्हणावे लागेल. मुळात आगरकरांनी जो भारतातील समाज हा प्रामुख्याने हिंदु होता, अशा या हिंदु धर्माविरोधात जर बंडच पुकारलेले दिसत असले तरी त्यांची निष्ठा कायम होती. देशसेवेसाठी त्यांनी आपणाहून दारिद्र्य पत्करून हिंदुधर्माला मानच दिला होता, असेच म्हणता येईल. तत्कालीन हिंदु धर्माची आणि युरोपीयन सुधारणांची स्थिती पाहाता आगरकरांसारख्या समाजाला सुधारू पाहाणाऱ्या वा कालाबरोबर नेऊ पाहाणाऱ्यांना हिंदुधर्मावर टीका करण्याशिवाय वा नोटीस देण्याशिवाय काय पर्याय होता, असाही प्रश्न विद्यमान पद्धतीचा चष्मा बाजूला ठेवून तत्कालीन समाजस्थितीतील नजरेने सोडवला तर उत्तर योग्यच मिळू शकेल. त्यामुळे एकप्रकारे सनातनी हिंदू संस्कृतीला बराच विरोध करणारे आगरकर असोत किंवा विज्ञानवादी दृष्टीने प्रत्येक बाब तावून सुलाखून घ्या आणि धर्मग्रंथ आदाराचे स्थान आहे त्यांना तितका मान देत वैज्ञानिक दृष्टीने सारे काही पारखून घ्या असे सांगणारे स्वातंत्र्यवीर सावरकर असोत, मुळात त्यांच्या दृष्टीने समाजसुधारणा, लोकांमध्ये वैचारिक मोठी झेप घेण्याची वृत्ती निर्माण व्हावी हीच तळमळ आणि कळकळ होती.

स्वातंत्र्याच्या वृथा वल्गना, सामाजिक स्थित्यंतरें, करून कां दाखवीत नाहीं? उद्योगवृद्धि, देशभाषीय ग्रंथसंग्रहाची आवश्यकता, होऊंच द्या तर दोन हात, पुण्याचें लोकांनो सावध व्हा, सामाजिक सुधारणापरिषदेचे निंदक, गुलामांचें राष्ट्र, लोक शिक्षणावर गदा, हिंदुस्थानास क्षय लागला, इंग्रजी राज्याची उलटी बाजू, अप्रतिबंध व्यापार आणि उत्तेजन, बहिष्कार, स्वदेशाभिमान, यांना कोणी विचारतां नाहीं काय ? अनाथाचा वाली कोणी नाहीं ?, भांडवल गेलें व्यापार गेला, इष्ट असेल तें बोलणार व साध्य असेल तें करणार, बल्लभोपासना, चिमाबाईचें एमाबाईशीं सख्य होणार कसें ? समाईकीने उभारलेल्या भांडवलाचे कारखाने, प्रियाराधन, हे तुमचे पुढारी नव्हत, बोलके सुधारक व सुधारणानिंदक, महाराष्ट्रियास अनावृत्त पत्र, नेटिव लोकांस इंग्रजा सारखे धाडस कधीं येईल ? बंधनें कोण व कोणती घालणार? व्यापाराखेरीज तरणो पाय नाहीं, हिंदुस्थानापासून इंग्लंडास फायदे, आमच्या निकृष्ट स्थितीस कारण कोण ? सोवळेओवळे, ग्रामण्यप्रकरण, सुधारक काढण्याचा हेतु, समाजोत्कर्षाचा एक मुख्य घटक व्यापारवृद्धि, वाचाल तर चकित व्हाल, इंग्लिश राज्यांत पोटभर अन्न मिळत नाहीं, राज्यतृष्णा, भारतीय शास्त्रकलांचे पुनरुज्जीवन, हिंदुस्थानांतील अन्नान्न दशेचे दुष्परिणाम, मि. अॅशबर्नर व हिंदु विधवा, आणखी एक शहाण्याचा कांदा, हिंदु लोकांची अविश्वसनीयता, सणांचा व खेळांचा ऱ्हास, इंग्रजी राज्यांत खावयास मिळत नाही, लोभमूलानि पापानि, शास्त्राभ्यास वगैरे लेखांतून आगरकरांचे अंतःकरण खुलें झालेले आहे.

काही बाबतीत त्यांची मते वा त्यांचे दृष्टिकोन आज पटणारे नसतील किंवा त्यांची मते त्या कालानुसारही  विचार करता पटणार नाहीत, अयोग्य वाटतील किवां झेपणारही नाहीत.  मात्र त्या संबंधातील त्यांचे विचार असे का झाले, त्यांचे शिक्षण, त्यांच्या भोवती उपलब्ध असणारी स्थिती त्याचे परिणाम हे देखील त्यांची तशी मते होण्यास कारणीभूत असतील.  अर्थात त्यांच्यासंबंधातील त्यांचे उद्दिष्ट, लक्ष्य याचा विचार करता लोकशिक्षणाचे व्रतच त्यांनी घेतलेले असल्याने त्यांनी आपली मते ठामपणे मांडताना कधी अस्पष्टपणा दाखवला नाही. शब्द, भाषा, कल्पना, भाषालंकार यांचा विचार करता त्यांची भाषा ही विहंगाप्रमाणे आहे. यामुळेच निबंधाला/ लेखांना असलेले प्रवाहीपण, बुद्धिप्रामाण्य, तर्कदृष्टी याबरोबर त्यांच्या निबंधाची असणारी वाटचाल प्रभावी वाटते. याचे कारण त्यांनी समाजसुधारणेवरही अतिभर वा भार दिला असे जरी म्हटले तरी त्यामागे त्यांची राष्ट्रीय दृष्टी होती. त्यांचा स्वयंसिद्ध होण्यावरही विश्वास होता. एका लेखात ते म्हणतात... राजकीय हक्काची, जडसुखाची किंवा स्वातंत्र्याची ‘घाल’ म्हणून कोणी भीक घालीत नाही. या गोष्टी केवळ ज्याच्या त्याच्या अकलेनेंच साध्य होण्यासारख्या आहेत.

.... अकलमंदीची ही करामत राष्ट्राने आपल्या पारतंत्र्यात कशी करावयाची ? राजकीय स्वातंत्र्य जाणे ही अत्यंत खेदजनक गोष्ट खरी; हे जाणे म्हणजे शरीरातील सर्व इंद्रिये आणि त्यांचे व्यापार यांचे पोषक असे चैतन्यसारतत्त्व ते नाहीसे होणे होय. पण ते गेले म्हणून रुदन करीत बसण्यात काय फायदा आहे? जगावयाचे असेल व जगणे ते चांगल्या प्रकारचे जगणे हवे असेल तर चैतन्यसारतत्व फिरून आपल्या हाती घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे, व सांप्रत राष्ट्रसभादि साधनांच्याद्वारे तो जितका होण्यासारखा आहे, तितका आम्ही करीत आहोत. ... राजकीय हेतु तडीस नेण्यासाठी धर्मविषयक मतभेद एकीकडे ठेवून राजकीय प्रकरणात एकमताने वागण्याइतके चांगुलपणही आजमितिस आमच्या अंगात नाही, व सांप्रतकाली हा देश ज्या स्थितीत आहे तीवरून राजकीय कामे एकदिलाने चालविण्यासाठी आम्ही धर्मकलहांत पडणार नाही, असेही चिन्ह दिसत नाही. जसे युरोप देशांत राज्यकलहापूर्वी धर्मकलह होऊन गेले तसे येथेही राज्यकलह जोराला लागण्यापूर्वी बरीच वर्ष जबरदस्त धर्मकलह चालत राहील. इतकेच नव्हे तर याच कलहापासून आमच्या राष्ट्रांत ज्या सामर्थ्याचा उद्भव होणार आहे, त्यापासूनच येथील भावी राज्यकलहासही पुष्कळ सहाय्य होणार आहे, अशी आमची खातरी झाली आहे. तेव्हा प्रस्तुत प्रसंगी चालू असलेला धर्मसंग्राम किंवा धर्मकलह पाहून आम्हास वाईट वाटत नाही; इतकेच नाही तर तो जितक्या झपाट्याने चालेल तितका चांगला असे आमचे मत आहे....

आगरकर यांची स्वराज्यासंबंधातील ही दुर्दम्य इच्छाशक्ती तेव्हापासून होती, हेच यातून दिसते. विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या निधनानंतर लिहिलेल्या मृत्युलेखात त्यांनी लिहिले आहे की, .... एखाद्यावेळी त्यांचा कल्पनाविहंग पूर्णपंख पसरून भराऱ्या मारू लागला म्हणजे त्याला हिंदुस्थान देश स्वतंत्र होऊन प्रजासत्ताक राज्याखाली सुखाने नांदत आहे असे दिसे....

अन्य एका निबंधातही त्यांची दुर्दम्य इच्छा पाहाण्यासारखी आहे.  ते म्हणतात. ... फार काय सांगावे, उद्या ाम्हास सीझर, अलेक्झांडर, नेपोलियन किंवा ड्यूक ऑफ वेलिंग्टन यासारखा पुढारी मिळेल तर इंग्रज लोकांना हिंदुस्थानचा कारभार पाहाण्याची जी दगदग पडत आहे ती दूर करू. इतकेच नाही तर नेल्सनसारखा तांडेल मिळाल्यास ‘अजिंक्य आरमारानिशी’ इंग्लंडवर चाल करून जाऊन कोहिनुरासकट जी जी मौल्यवान वस्तु म्हणून इंग्रज लोकांनी इकडून तिकडे नेली असेल ती परत आणू! तसेच ग्लॅडस्टनसारखा पुढारी मिळाल्यास हौस ऑफ लॉर्ड्सची परवानगी न करता पाच पंचवीस वर्षांत इंडिया सेल्फ गव्हर्नमेंट बिलहौस ऑफ कॉम्न्समध्ये लीलेने पास करून घेऊ....

आगरकरांचा काळ पाहिला तर स्वराज्य, संपूर्ण स्वराज्य, लोकशाही, राज्यशास्त्र आदी संकल्पना त्यांनी त्यावेळी मांडल्या होत्या. स्वराज्य हा शब्द त्यांच्या मृत्युनंतर राष्ट्रीय मुखातून खूप नंतर उच्चारला गेला होता, इतके समजून घेतले तरी आगरकरांच्या विचार प्रवाहाचा सखोलपणा लक्षात येऊ शकतो. देश- राष्ट्र या संकल्पनांचा परिपूर्ण विचार करण्यास त्यांच्यापासून सुरुवात झाली होती, असे म्हटले तर वावगे ठरू नये.

००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००

दुही माजवण्याचे इंग्रजांचे राजकारणही स्पष्ट मांडले ... - ४

००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००

राष्ट्रीय काँग्रेसचा जन्म २८ डिसेंबर १८८५ मध्ये झाला आणि त्यामुळे तसे पाहायला गेले तर स्वातंत्र्य मिळवण्याच्यादृष्टीने भारताने आपले त्यासाठी मत मांडण्यास सुरुवात केली. अर्जविनंत्यांद्वारे सुरू केलेले हे मत स्वराज्य या शब्दाने १९०५ नंतर सर्वमुखी होऊ लागले होते. मात्र हा शब्द  राष्ट्रसभेच्या जन्मापूर्वी आगरकरांनी मांडला होता. राष्ट्रीय जिवंतपणाच्यादृष्टीने तत्कालीन समाज जो बर्फाचा गोळा होऊन पडला होता, त्यात हळू हळू प्राण येण्यास सुरुवात होऊ लागली.

न्या. रानडे, विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी संपूर्ण देशालाच एकप्रकारे पुन्हा सूर्योदय होईल अशा आशेचा संदेश दिला होता. गोपाळ गणेश आगरकरांनी लोकांना ऐहिकतेचा, व्यक्तीस्वातंत्र्याचा विश्वास देण्यासाठी सुधारणेचे जे काम केले त्याला खरे म्हणजे तोड नाही. किंबहुना राजा, लोकशाही, लोकांचे हक्क, अधिकार, संसद आदी प्रकारच्या कल्पनांनाही जेव्हा भारतात सुरुवात झाली नव्हती तेव्हा आगरकरांनी ती ज्योत पेटवली हे लक्षात घेण्यासारखे आहे. राजा काय किंवा राज्यकर्ता काय यांचे काम, जबाबदाऱ्या सांगत लोकांना त्यांच्या हक्काची जाण करून देणारे आगरकर एका लेखात सांगतात ते लक्षात घेण्यासारखे आहे.  आगरकर केसरीमधील एका लेखात सांगतात.... ‘ खऱ्या कारकुनाने जमाखर्चाची चोपडी लपवून न ठेवता भर चव्हाट्यावर हिशेब देण्यास जसे नेहमी सिद्ध असले पाहिजे. त्याप्रमाणेच राज्यकर्त्यांचीही गोष्ट होय. प्रजेपासून कर घेऊन सर्व प्रकारे पालन करण्याचा पतकर जर राजाने घेतला आहे, तर सर्व कामाचा झाडा त्याने आपल्या यजमानास दिला पाहिजे, व यजमानासही वरील झडती घेण्यास पूर्ण अखत्यार आहे. ज्यातून ज्यांनी राजदरबारी अशी प्रतिज्ञा भोगलेली की, आम्ही तुम्हावर अंमल करतो तो फक्त तुमच्या कल्याणाकरिता व तुम्ही कर्तेसवरते झाला की आमचे काम आटपले. आम्ही गाशा गुंडाळून येथून निघालोच समजा..... त्यांनी तर या नि:सीम  नि:स्पृहतेच्या सोंगाची बतावणी किती चोख रितीने केली पाहिजे हे सांगायला नकोच...

आगरकरांच्या काळी राजकीय स्वातंत्र्याची चाहूल घेण्यास नुकतीच कुठे सुरुवात झाली होती. मात्र त्या इंग्रजांनी या भारतात ज्या पद्धतीने शिरकाव केला होता, ते सांगण्याचे आगरकरांचे कसबही आगळे वेगळे होते. सुस्पष्टही होते. त्या संबंधात इंग्रज, त्यांची राजवट, भारतीय लोक, त्यांची मानसिकता, त्यांची अपेक्षा- आशा आदींबद्दल विचार करून आगरकरांनी वर्तवलेली भाष्ये ही आजही विचक्षण वा सूक्ष्म संवेदनशील सूचक ठरतात.  या संबंधातील त्यांची विविध निबंधांमधील वाक्ये ही पाहाण्यासारखी आहेत.

.... हिंदु लोक धनसंपन्न अणि ज्ञानसंपन्न झाले म्हणजे इंग्रज लोक एके दिवशी आपले चंबूगबाळे आटोपून चालते होतील, असे कोणी मानू नये....

... लिबरल व कान्झर्वेटिव्ह ह या दोन नावाखाली मोडल्या जाणाऱ्या लोकांच्या वृत्तीत इंग्लंडात कितीही भेद दिसून येत असला, तथापि हिंदुस्थानचा संबंध आला की हे सारे आपले औंदार्य खुशाल एका बाजूला गुंडाळून ठेवून वाटेल ती लांछनास्पद गोष्ट करण्यास सहसा मागे सरणार नाहीत, असे वाटून हिंदुस्थानचे लोक इंग्लिश राष्ट्राच्या बहुगर्वोच्चारित न्यायबुद्धिविय़यी साशंक झाल्यावाचून राहातील असे आम्हास वाटत नाही. म्हणून काय झाले ? या साशंकतेची पर्वा इंग्रजास कोठे आहे. हिंदुस्थान देश काबीज करताना इंग्रजांनी केलेले सारेच आचरण नीतीतत्त्वास धरून होते असे नाही. ...

आगरकरांची ही लेखन शैली आणि त्यातील विचारांचा आक्रमकपणा हा भेदक होता. इंग्रज माजवीत असलेली दुही, फोडा झोडा नीती ही देखील आगरकरांच्या नजरेतून सुटलेली नव्हती. इंग्रजांच्या विश्वासार्हतेवर म्हणजे ट्रस्टीशीपवर आगरकर म्हणतात. .... इंग्रजी ‘ट्रस्टीशीप’चा बाजा असा वाजत असल्याकारणाने ‘दुही माजवा आणि राज्य करा’  या तत्त्वाचा अवलंब इंग्रजी राज्याच्या चिरस्थाकतेसाठी करण्यात येत  असतो. एका जातिस व्यर्थ महति देऊन दुसरीचा नाहक पाणउतारा करणे ...

अन्य लेखात ते इंग्रजांच्या धोरणाबाबत म्हणतात... आपल्या अंमलाला शाश्वती आणण्यासाठी आपण होऊन एकाचा दुसऱ्यांशी तंटा लावून देणे आवश्यक नसले तरी त्याचे भांडण आपणास अपकारक नाही इतकेच नाही, तर काही अंशी उपकारच आहे असे वाटते. तसेच प्रसंगविशेषी मुसलमान लोक आपल्या उपयोगी पडण्यासारखे आहेत. तेव्हा विशेष आयासांवाचून त्यांची मैत्री संपादून ठेवता आली तर तसे करणे हे आपले कर्तव्य आहे असे हे समजतात...

इंग्रजाची ही फोडा झोडा नीती आणि मुसलमानांचा वापर ते करीत आहेत, ते आगरकरांनीही जाणले होते. तसे स्पष्टपणे मांडले होते. इंग्रजांच्या राजवटीमुळे झालेल्या परिणामांचीही त्यांना योग्य जाणीव होती. मात्र तरीही त्यातून काही मार्ग पाहाण्याचे काम त्यांनी तत्कालीन स्थितीनुसार केले.  ते म्हणतात .... इंग्रजी अंमलाने आम्ही निस्तेज झालो आहोत खरे; पण त्याच अंमलामुळे सतेज होण्याचे उपायही आम्हास कळू लागले आहेत. तेव्हा आपल्या मानसिक व शारीरीक कमकुवतपणामुळे तुम्हास जी कुदशा प्राप्त झाली आहे, तीबद्दल खेद करीत न बसता जेणेकरून प्रतिदिवशी आपली स्थिती सुधारत जाईल असे वर्तन केले पाहिजे

 ००००००००००००००००००००

विवेकयुगाचे प्रवर्तक ... - ५

००००००००००००००००००००

मुळात हिंदुस्थानात त्यावेळीही बहुसंख्या समाज हा हिंदु होता. त्यावेळी हिंदुत्त्व हा शब्द अस्तित्वात आला नव्हता. सावरकरांनी हिंदुत्वाची मीमांसा करीत हिंदु कोण हे ठरवलेले नव्हते. अशामुळे त्या स्थितीत हिंदुंच्या भौगोलिक सीमांवरही काहीच निश्चिंती नव्हती मुसलमान, ख्रिश्चन यांच्यासंबंधातील चालीरिती यावरही जे आगरकरांना ज्ञात होते, त्यावरही त्यांनी टीका केली आहे. ते करीत असताना त्यांनी भीडभाड कोणाचीही ठेवलेली नाही. देवदेवतांवरही त्यांनी टीका केली, हिंदु समाजातील दोषांवर अतिशय परखडपणे त्यांनी बोट ठेवले त्यासाठी त्यांनी धर्मातील विविध कल्पनांचाही उल्लेख केला. वास्तवतेला वा तत्कालीन स्थितीला धरून त्यांनी कर्मठपणा, धर्माची, समाजाची हेकेखोर वृत्ती, त्यामुळे होणारा अन्याय, अवाजवी महत्त्व याकडे लक्ष वेधले.


समाजसुधारक आगरकर यांचे लिखाण विविधांगी होते. समाजातील अगदी छोट्या छोट्या वर्तनाचाही विचार करीत ते आपले मत ठामपणे मांडत. समाजातील दोषांवर, धर्म, जाति कल्पनांवर, रितीरिवाजांवर, त्यांनी ज्या पद्धतीने कोरडे ओढले आहेत, त्यामुळे ते वाचता ते खरोखरच मवाळ वा नेमस्त पंथीय होते का असा प्रश्न पडावा. किंबहुना त्यांच्या याच पद्धतीच्या सुधारकी आवेशामुळे हिंदु धर्मावर, समाजावर, रीती रिवाज, पंरपरा, धर्मकल्पना यावर टीका करणारा सुधारक आगरकर असेच त्या काळात त्यांच्याकडे पाहिले गेले. मुळात हिंदुस्थानात त्यावेळीही बहुसंख्या समाज हा हिंदु होता. त्यावेळी हिंदुत्त्व हा शब्द अस्तित्वात आला नव्हता. सावरकरांनी हिंदुत्वाची मीमांसा करीत हिंदु कोण हे ठरवलेले नव्हते. अशामुळे त्या स्थितीत हिंदुंच्या भौगोलिक सीमांवरही काहीच निश्चिंती नव्हती मुसलमान, ख्रिश्चन यांच्यासंबंधातील चालीरिती यावरही जे आगरकरांना ज्ञात होते, त्यावरही त्यांनी टीका केली आहे. ते करीत असताना त्यांनी भीडभाड कोणाचीही ठेवलेली नाही. देवदेवतांवरही त्यांनी टीका केली, हिंदु समाजातील दोषांवर अतिशय परखडपणे त्यांनी बोट ठेवले त्यासाठी त्यांनी धर्मातील विविध कल्पनांचाही उल्लेख केला. वास्तवतेला वा तत्कालीन स्थितीला धरून त्यांनी कर्मठपणा, धर्माची, समाजाची हेकेखोर वृत्ती, त्यामुळे होणारा अन्याय, अवाजवी महत्त्व याकडे लक्ष वेधले.

शासन, प्रशासन, जगातील घटना, इतिहास याचे त्यांना उत्तम ज्ञान होते. कमी दळणवळण यंत्रणा असूनही हे सारे त्यांना कसे प्राप्त होऊ शकले, हा देखील प्रश्न पडतो. त्यामागे त्यांचे वाचन आणि त्याही पेक्षा ठोस विचारकलह वा वैचारिक संघर्ष करीत विचारांना चालना देत जगण्याची, चिंतनशील वृत्ती हे प्रमुख घटक दिसतात. महिला, शिक्षण, उद्योग- व्यापार, समाजाचा उत्कर्ष, आळशीपणा, खगोलशास्त्रीय माहिती,  विवाह, पुनर्विवाह, बालविवाह, सामाजिक सुधारणा, यंत्रशक्ती, रेल्वे, रेल्वे कंपन्या, इतकेच नव्हे तर स्त्रियांचा पेहराव यासारख्या विषयांनाही आगरकरांनी अतिशय बारकाईने आपल्या लिखाणात स्थान देत, समाजाला प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये विचक्षणपणे विचार करायला भाग पाडले आहे. त्याची उदाहरणे खाली देत आहे, ती पाहाण्यासारखी आणि आजही विचारात घेण्यासारखी आहेत.

महिलांसंबंधातील विचार

महिलांच्या संबंधातील आगरकरांचे विचार अनेक बाबातीत त्या काळातही पुढारलेले आणि भविष्याकडे नजर ठेवणारे होते. त्यामध्ये तत्कालीन स्त्रियांची सामाजिक स्तरावरील तसेच कौटुंबीक स्तरावरील असणारी स्थितीही अंगावर काटा उभा करणारीच होती. पती निधनानंतर संसार असार आहे. जगण्याची कारण राहिले नाही, अशा मानसिकतेत असत. त्यांना होणारा त्रासही असा विचार होण्यामागे कारणीभूत असे. यामुळेच 'स्त्रियांना चरितार्थसंपादक शिक्षण देण्याची आवश्यकता' आहे, असे आगरकर यांनी याच शीर्षकाखाली लेखातून सांगितले. असे सांगताना ते म्हणतात की, .... जिचा नवरा मेला तिचे होऊल तितक्या उत्तम रितीने संगोपन करण्याची उदार चाल आमच्या देशांत असती तरसहगमनाची रुढी येथे कधीच न पडती! इतकेच नाही, तर पतीवियोगामुळे एकाएकी प्राण सोडणारी किंवाआत्महत्या करणारी स्त्री देखील येथे कधीही दृष्टीस न पडती. व्यक्तीसाठी किंवा व्यक्तिसमुदायासाठी मरणएश्लाघ्य आहे पण केव्हा? त्या मरणाने व्यक्तिसमुदायाचे मरण टळत असेल किंवा त्याला बऱ्यास चिरस्थायी सुखाचा लाभ होत असेल तर. असे नसता ज्या ठिकाणी सहज किंवा बुद्धिपुरस्सर एक इसम दुसऱ्यांकरता मरण्यास प्रवृत्त होत असेल; त्या ठिकाणच्या रुढी अत्यंत अन्यायाच्या, दुष्टपणाच्या व पराकाष्ठेच्या कोणत्या समजुतीच्या असल्या पाहिजेत हे उघड आहे. असली दु:खकारक उदाहरणे येथील खालच्या जातीतल्या स्त्रियांत किंवा कोणत्याही जातीतील पुरुषांत मुळीच सापडत नाहीत. त्याचा सारा भरणा ब्राह्मण, शेणवी, परभू इत्यादी वरिष्ठ जातीतील स्त्रियांत आहे, व त्यातच तो आहे. याचे कारण त्यांचे परावलंबन व स्वचरितार्थ हटकून चालवितां येईल अशा प्रकारता कोणताही प्रशस्त धंदा त्यास न येणे हे होय. या जातीतील सुखवस्तु घराण्याचील स्त्रियांस विद्यानंदात काळ घालवण्यास शिकवण्याचा परिपाठ पडेल व गरीब लोकांच्या मुलींस थोडाबहुत लिहिणे वाचणे शिकवून, त्या बरोबरच एखाद्या धंद्याचे ज्ञान करून देण्यांत येऊ लागेल. तर नवऱ्याच्या मृत्युनंतर आपोआप मरणारी किंवा मारून घेणारी स्त्री दिसेनाशी होईल., इतकेच नाही, तर ज्याच्यावर दुर्दैवाने तो दु:खाचा डोंगर कोसळेल, त्या हलूहळू त्याचाभास विसरू लागून आपले, आपल्या मुलाबाळांचे व इतरांचे अस्तित्त्व होईल तितके सुखावह करण्यास झटू लागतील!...

पेहराव स्त्रियांचा आणि पुरुषांचा

स्त्रियांनी वेष वा पोशाख कोणता परिधान  करावा, त्यावर तर चक्क दोन निबंध लिहिले आहेत, तत्कालीन स्थिती आणि विचार या अनुषंगाने त्यांची त्या संबंधातील मतेही प्रचंड पुढारलेली म्हणावी लागतील. इतकेच नव्हे तर अगदी बारकाईने त्यांनी तो विषय मांडला आहे. 'आमच्या स्त्रियांचा पेहराव'  या निबंधात त्यांनी भारतीय स्त्री, इतकेच नव्हे तर पाश्चात्य मड्डम यांचीही तुलना केली आहे. स्त्रीचे अवयव, ते झाकण्याचा असमआरा उपाय, दागिने, त्यांच्या पेहरावातील वस्त्रांचे विशेष आदी बाबी सांगत त्यांनी अगदी गर्भवती स्त्रियांसाठीही पोशाख कसा असावा, त्याची मीमांसा केली आहे. तसेच त्या वस्त्रांचे फायदे- तोटे हे देखील लक्षात आणून दिले आहेत हवामानाचाही विचार त्या संबधात मांडला आहे. या संबंधातील त्यांची काही वाक्ये लक्षात घेण्यासारखी आहेत. ... कोणताही पोशाख असा असावा की, तो वापरणाराच्या ताब्यात असावा, वापरणाऱ्याला त्याचे गुलामपण काढण्यास न लागावे....

युरोपियन स्त्रियांच्या पोशाखाची भालवणही उपयुक्ततावादासाठी केली तरी त्या संबंात ते म्हणतात की, .... बोलून चालून नटण्याचे काम सर्व लोकांनी स्त्रियांकडे सोपवले आहे. तेव्हा जोपर्यंत हे त्यांना व आम्हास संमत असेल तोपर्यंत त्यांचे लावण्य जितक्या थोड्या खर्चात त्यांना जितके अधिक सुखावह वआमच्या दृष्टीस जितके अधिक रमणीय होईल, तितके करणे हेच आमच्या प्रबुद्धत्वास उचित आहे. यावरून कोणी असे समजू नये की, मडमांचा पोषाख आम्हास मान्य आहे व त्यांचे अनुकरण आमच्या स्त्रियांनी करावे, असे आण्ही सुचवीत आहोत.

.... पोशाख असा असावा की, जो घातला असता कोणतेही काम करताना हस्तपादादी अवयवांचे चलनादी व्यापार सहज होऊन, शरीरास कोण्त्याही प्रकारचे कष्ट होऊ नयेत. किंवा त्यात वैरुप्यता दिसू नये. जो पोशाष क्षणोक्षणी सावरला नाही, तर ज्यापासून हाती घेतलेल्या कामांत वारंवार हरकत होणार किंवा शरीर उघडे पडणार, असा पोशाख काय कामाचा? स्त्रीची मान आणि कंबर यामधील मागला पुढला भाग नीटपणे झाकला जाऊन, कोपरापासून त्यांचे दोनही हात पाहिजे ते काम करण्यास हवे तिकडे फिरवता येण्यासारखे असावे. या गोष्टीस बहुधा कोणीही ना म्हणणार नाही....

महिलांच्या पोशाखाप्रमाणेच पुरुषांच्या पेहरावाबद्दलही अतिशय बारकाईने निबंध लिहून आगरकरांनी दिलेली माहिती केवळ विलक्षण नाही तर वास्तव, तौलनिक आणि त्याकाळातील पोशाखांची चिकित्सा करून माहिती देणारी आहे. पेहरावात केवळ कपडेच नव्हेत तर जोड्यांचाही विचार करण्याचा निबंधलेखनातील आगळी शैलीच आगरकरांनी सादर केली आहे. सुधारणा करणाऱ्याने अशा प्रकारच्या विविधांगी दृष्टीला साकारले आहे, हेच खरे म्हणजे विचक्षण आणि ठाम दृष्टिकोनाचे द्योतक म्हणता येते.

व्यापार, उद्योग आदी आर्थिक बाबींवरही नजर

आगरकरांनी आर्थिक, व्यापार, उद्योग यावरही भरपूर लेख लिहून त्या काळात मांडलेले विचार हे दिशादर्शक ठरतात. ते म्हणतात... विशेष उद्योगी मनुष्याचे सान्निध्य नसल्यास सामान्य उद्योग करून आयुष्य चालवणे शक्य आहे. पण कोणत्याही कारणाने उद्योगी मनुष्याशी गांठ पडल्यासएकतर त्यांच्याप्रमाणे उद्योग करण्यास, किंवा त्याच्या आधीन होऊन तो ठेवील त्या स्थितीत राहाण्यास तयार झाले पाहिजे. सध्या आम्ही निरुद्योगी हिंदु लोकांची उद्योगी इंग्रजी लोकांशी गांठ पडली आहे. तेव्हा तर आम्ही त्यांच्यासारखा उद्योग करण्यास राजी झाले पाहिजे किंवा ते ज्या स्थितीत ठेवतील त्या स्थितीत राहाण्यास सिद्ध असले पाहिजे,  आमचे भावी स्वातंत्र्य, अथवा आमचे निरंतर दास्य, सर्वथैव आमच्या उद्योगावर अवलंबून आहे. ...

औद्योगिक उन्नती व्हावी या संबंधात त्यांनी भरपूर विचार मांडला आहे.  ते म्हणतात की, ... नुसते धान्यपिकवू आणि रानतोडू राष्ट्र उन्नतीस चढत नाही तर सचेतन अचेतन सृष्टीचा दास मी नाही तर तिला दास करण्याचा निदान तिच्याशी बरोबरीने वागण्याचा हक्क किंवा अधिकार मला आहे असा विचार मनुष्याच्या अंतकरणात वाढू लागला म्हणजे त्याच्या खऱ्या सुधारणेस आरंभ होतो.....

पाश्चात्य सुधारणेचे कौतुक आगरकरांना होते पण भारतातील कलाविषयक प्रावीण्य यबद्दलही अभिमान होता. यंत्राला ते महत्त्वाचा भाग मानत मात्र औद्योगिक उन्नतीसंबंधात तळमळीने लिहिताना ते म्हणतात की, ....अर्वाचीन विस्तृत यंत्रकला युरोपीयन लोकांप्रमाणे आम्हास अवगत नाही व ती आम्ही शिकली पाहिजे, हे जरी प्रांजलपणे कबूल करतो. तरी ती साध्य होण्यास ज्या हस्तकलाप्रावीण्याची अवश्यकता असते, ती हस्तकलाही आम्हास सर्वांशी युरोपीयन लोकांपासून उचलली पाहिजे, हे मत आम्हास मान्य नाही.... आपली जुनी हस्तकला टाकाऊ नाही तर अत्यंत रक्षणीय आहे, अशी लोकांची खातरी केली पाहिजे. व जे त्या कलेत निष्णांत आहेत, त्यांच्याकडून अर्वाचीन यंत्रकलेचे ज्ञान संपादून ते त्या हस्तकलेच्या विस्तृत उपयुक्तत्वाला कारणीभूत होईल अशा उपायांची योजना केली पाहिजे....

रेल्वे, सरकार आणि लोक

रेल्वे आणली जात असताना त्यावरही आगरकरांनी लेखांमधून आपले निरीक्षण मांडत खूपच चांगल्या सूचना मांडल्या. रेल्वेचा, सरकारचा, उद्योगांचा असमआरा संबंध त्यांनी ओळखला होता, असे दिसते. त्यावेळीही रेल्वे कंपन्यांकडून प्रवाशांची हेळसांड होत होती, असा दावा ते करतात, त्याची उदाहरमे ते देतात. त्यामागे कारण रेल्वे कंपन्यांची अव्यवस्था आणि आणच्या लोकांचे अज्ञान, द्रव्यलोभ आणि आमचे अजागळपण असल्याचे ते सांगतात. रेल्वे कंपन्यांनी काय करायला हवे, यासाठीही त्यांनी मार्गदर्शन सविस्तर केले आहे.

धर्म, रितीरिवाज, रुढींवर जोरदार प्रहार

धर्म, रिवाज, रुढी त्यामुळे होणारे परिणाम यावर त्यांनी जोरदार प्रहार करीत समाजसुधारमेसाठी बुद्धिप्रामाण्यावर भर देताना एकप्रकारे विज्ञानाला महत्त्व दिले आहे. हिंदु धर्मासंबंधात त्यांनी केलेले लिखाण आजही तत्ताकलीन स्थितीचे दर्शन विदारकपणे देणारे आहे. धर्मकल्पना आली कोठून, आत्मा आणि पिशाच. मूर्तिपूजेचा उद्भव, देवोत्पत्तीविषयी शेवटचे चार शब्द, पुजारी व पंचाक्षरी, धर्मग्लानिबद्दल उपरति, अशा विविध लेखांमधून त्यांनी समाजाच्या डोळ्यात अंजन घातले आहे. धर्मकल्पना आली कोठून?या लेखात त्यांनी एकूणच धर्म संकल्पनेचा समाचार घेताना कालतुलना केली आहे.  ते म्हणतात की, ... मनुष्याच्या ज्या अनेक मनोवृत्ती आहेत त्यांपैकीच त्याची धर्मकल्पना ही एक आहे. ... त्याचे मनात फार प्राचीन कालापासून धर्मकल्पना वास करीत आहे किंबहुना ज्यावेळेस मनुष्याची उत्पत्ती झाली त्याचवेळेस तिचे बी त्याच्या मेंदूत लावले गेले. असे म्हणण्यास हरकत नाही. मनुष्याच्या इतर वृत्तींप्रमाणेच या वृत्तीतहीफेरफार व सुधारणा होत चालली आहे. दोन हजार वर्षांपूर्वी आमच्या ज्या ज्या धर्म कल्पना होत्या त्यात आणि आमच्या सांप्रतच्या धर्मकल्पनांत जमीन आस्मानाचे अंतर पडले आहे.. कालांतराने आणखीही पडणार आहे... या निबंधात धर्म आणि संबंधित अनेक घटकांवर तपशीलवार उहापोह आगरकर यांनी केला आहे.

आगरकर यांचे निबंध आणि त्यांचे विविध विषयांवरील विचार, ते मांडण्याची पद्धत आणि बारकाईने विषय उलगडणे पाहिल्यास आगरकर हे विवेकयुगाचे प्रवर्तक असल्याचे त्यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकात पु. पा. गोखले यांनी म्हटले आहे, ते सार्थ वाटते. त्यांच्या अनेक  निबंधांचे विषय आजही ताजे वाटतात. त्यात मुळात नकारात्मक पद्धतीनेही समाजावर टीका करताना समाजाला चैतन्यपूर्ण करण्याची आव्हानाची प्रेरणाच ते देत होते, हीच त्यांच्या लेखनातून समाजाला मिळालेली देणगी म्हणावी लागते.

००००००००००००००००००

सामाजिक सुधारणेतील विवेकवाद - ६

००००००००००००००००००

सामाजिक सुधारणा म्हणजे खरे पाहाता धर्म सुधारणाच असतात असे आगरकरांना वाटे. धर्मग्रंथाच्या आज्ञा पूर्णपणे मान्य केल्या पाहिजेत कारण त्या शतकानुशतके चालत आलेल्या असतात. मात्र याच समजुतीवर आगरकर जोरदार टीका करतात. धर्मग्रंथाचा अन्वयार्थ सांगणारे धर्मपंडित रुढी श्रद्धेवर समाजात आपले वर्चस्व कायम ठेवतात त्यातून सामाजिक उच्चनीचतेच्या, अंधश्रद्धेत्या आणि कालबाह्य आचारविचारांच्या कल्पना प्रसृत होतात त्यावर आगरकरांनी उपस्थित केलेले प्रश्न लक्षात घेण्यासारखे आहेत. 

विविध विषयांवर चिकित्सकपणे आपली मते मांडून आगरकरांनी अनेकदा समाजाचा रोष ओढवून घेतला. त्यात त्यांच्या जिवंतपणी त्यांची प्रेतयात्राही काढण्याता आली तर आगरकरांबद्दल हे ब्राह्मण बीजाचे नाहीत अशा प्रकारचा दावा करण्याइतकाही संताप व्यक्त केला गेला. एकूणातच आगरकरांनी समाजसुधारणेचा विचार मांडताना डावे-उजवे केले नाही. जातिभेदावर त्यांनी अतिशय कडाडून प्रहार केला. अस्पृश्यता संपुष्टात आण्यासाठी त्यांनी केलेले युक्तिवाद अतिशय सडेतोड होते. तर देशकल्याणासाठी असा संकुचितपणा अयोग्य असल्याचे सांगत माणसाची श्रेष्ठता आणि ज्येष्ठता ही गुणकर्मावरून ठरते असे सांगण्याचे धैर्य दाखवीत तत्कालीन सोवळ्या- ओवळ्याच्या समाजाला त्यांनी फटकारले होते. 

जातिभेदामुळे अवनती झाल्याचे त्यांनी सांगतजातिभेदाच्या दुष्ट रुढी आणि परंपरा यामुळे हिंदु समाजात फाटाफुट झाली हे तर खरे पण जातिभेद म्हणजे अमानुष प्रकार हे ह अनेक शतके सुबुद्ध म्हणवणाऱ्या लोकांच्या लक्षात आले नाही किंवा ते लक्षात येऊनही आपला फायदा होतो, हे लक्षात घेऊन भेद तसेच कायम ठेवण्यात आले... असे सांगण्याची आगरकरी लेखणी कणखर राहिली. उपहासगर्भ अशा त्यांच्या शैलीमुळे वास्तविक समाजाला ते डिवचल्यासारखे जरी दिसत असले तरी सत्य कटू असते; तेच ते स्पष्ट सांगत हेच त्यांचे प्रभावी विचार ठरतील. याच जातिभेदाच्या संदर्भात त्यांनी जात पाठीत नसल्याचे स्वत:च्या उदाहरणातून सांगितले. ते म्हणाले की... ब्राह्मणेतरांच्या हातचा चहा पिण्यास आम्हास दोष वाटत नाही. इतकेच नाही तर, आमच्या नीच मानलेल्या महारांची स्थिती सुधारून त्यांची व वेदशास्त्रसंपन्न ब्राह्मणांची एक पंगत झालेली जर आम्हास पाहाता आली तर आम्ही स्वत:स मोठे कृतार्थ मानले असते. ही गोष्ट आमच्या बांधवांपासून आम्ही चोरून ठेवीत नाही.

सामाजिक सुधारणा म्हणजे खरे पाहाता धर्म सुधारणाच असतात असे आगरकरांना वाटे. धर्मग्रंथाच्या आज्ञा पूर्णपणे मान्य केल्या पाहिजेत कारण त्या शतकानुशतके चालत आलेल्या असतात. मात्र याच समजुतीवर आगरकर जोरदार टीका करतात. धर्मग्रंथाचा अन्वयार्थ सांगणारे धर्मपंडित रुढी श्रद्धेवर समाजात आपले वर्चस्व कायम ठेवतात त्यातून सामाजिक उच्चनीचतेच्या, अंधश्रद्धेत्या आणि कालबाह्य आचारविचारांच्या कल्पना प्रसृत होतात त्यावर आगरकरांनी उपस्थित केलेले प्रश्न लक्षात घेण्यासारखे आहेत.  पोथिनिष्ठतेचे समर्थन करणाऱ्यांना त्यांनी सवाल करून निरुत्तरच केले आहे.  ते विचारतात... ही आमच्या वडिलांची विहीर आहे, तिचे पाणी शुद्ध आहे की, अशुद्ध आहे, याचा विचार न करता तुम्ही ते स्वीकारणार की त्या पाण्याची तपासणी करून ते पिणार? कोणत्याही विहिरीचे पाणी कालांतराने बदललेल्या वातावरणात अस्वच्छ आणि अशुद्ध होते, हा अनुभव तरी लक्षात घेणार की नाही की केवळ वडिलांची विहीर आहे एवढ्यासाठीच तिचे आहे तसे पाणी पिणार.... आगरकरांची ही विचार मंथन करण्याच बुद्धिप्रामाण्यवादी परंपरा कितींनी पुढे पाळली वा जोपासली हे मात्र ज्याचे त्याने ठरवावे.

धर्मग्लानीबद्दल उपरति या दोन लेखांमध्ये आगरकरांनी मांडलेले तर्कसंगत विश्लेषण वाचण्यासारखे आहेच पण एकंदर धर्माचे आचरणासंबंधातील स्वरूप आणि नीती तत्त्व, मंत्र तंत्र, विविध धर्मांचे असणारे धर्मग्रंथ म्हणजे जणू इश्वरप्रणीत असणे आणि त्याचा हवाला देणे यालाच त्यांनी अमान्य केले आहे. त्यासंबंधात केलेले तर्कसंगत युक्तिवादही यात अतिशय विस्तृतपणे दिले आहेत. त्यातून लोकांच्या डोळ्यात तर्कसंगतीचे आणि विचारांचे अंजनच त्यांनी घातले आहे.

एकूणच आगरकरांनी स्वातंत्र्य, समता, नीती आणि न्याय यांचा पुरस्कार कायम केला जनतेची मूळ मनोवृत्तीही यातून भरूभरून असावी असे त्यांना वाटे आणि तसे करणे म्हणजे मोठे धाडसाचे काम पण ते कणखर काम करीतच त्यांनी सामाजिक चळवळीला हात घातला. आपल्या या कामामध्ये स्वमताला ठामपणे कवटाळणारे आगरकर म्हणूनच हे सर्व करताना कशालाही डगमगले नाहीत आर्थिक, सामाजिक वा राजकीय विषमतेप्रमाणेच बौद्धिक विषमताही असता कामा नये, यावर आगरकरांनी ठाम राहात काम केले आणि त्यामुळेच त्यांचे प्रबोधन विवेकयुग म्हणावे लागते.

आगरकरांचा विवेकवाद

आगरकर वाड्.मयाच्या खंडात संपादकांनी आगरकरांविषयी लिहिलेल्या काही बाबी मुद्दाम येथे नमूद करावयाशा वाटतात. त्यात म्हटले आहे की,

आगरकरांच्या सर्व विचारांचा पाया विवेक हा होता. त्यांनी मानवी जीवनाची जी समीक्षा केली. त्याचे जे दोष सांगितले. त्यात ज्या नवीन सुधारणा सुचविल्या. त्या सर्व विवेकाच्या आधारावर. वृत्तपत्राच्या माध्यमातून विवेकवादाचा सर्वांगीण ऊहापोह करणे त्यांना शक्य नव्हते. तरीही त्याच्या मूलभूत तत्त्वांचे प्रसंगोपात्त विवेचन त्यांनी केले आहे. ते एकत्र केल्यास त्यातून विवेकवादाचे प्रतिपादन व बरेच तपशीलवार विवरण आपल्याला मिळू शकते.

परंतु हे करण्यापूर्वी 'विवेकवाद' या शब्दाविषयी थोडे लिहिणे जरूर आहे. इंग्रजी भाषेतील 'rationalism' या शब्दाचा पर्याय म्हणून मराठीत बुद्धिवाद', 'बुद्धिप्रामाण्यवाद' 'विवेकवाद' हे शब्द वापरले जातात. यांपैकी पहिले दोन शब्द न वापरता, तिसरा, 'विवेकवाद' हा शब्द येथे वापरला आहे. ... आगरकरांनीही सामान्यपणे 'विवेक' हाच शब्द वापरला आहे.

०००००००००००००००००००००००००००००००००००००००००

मुस्लीमांना परखड बोल सुनावणारे 'हिंदुसमाजनिष्ठ' - ७

०००००००००००००००००००००००००००००००००००००००००


ब्रिटिश राजवटीत हिंदु काय आणि मुस्लीम काय दोघेही गुलामच बनले आहेत हे जाणून आगरकर मुसलमानांना स्पष्ट समजवतात की, .... दास्य दोघांच्याही कपाळी आले आहे, व दोघांनाही आपापल्या उन्नतीचा उपाय करणे जरूर आहे. इंग्रजी म्हणीप्रमाणे दोघेही एकाच होडीत आहेत; तेव्हा ही होडी सुरक्षितपणे तीराला जाऊन लागणे उभयतांच्या सहकार्यावर व मैत्री विषेशवर अवलंबून आहे.  ... मुसलमानांनी पारशी लोकांप्रमाणे हिंदू लोकांचा हेवा करणे सोडून देऊन एकंदर साऱ्या गोष्टीत विशेषत: राजकीय गोष्टींत एकमेकांच्या हातात हात घालून चालले पाहिजे... मुसलमान लोकांनी एक गोष्ट विशेष रीतीने ध्यानात ठेवली पाहिजे ती ही की, इंग्रज सरकारने त्यांच्यावर कितीही मेहरबानी केली तरी तीपासून त्यांचा विशेष फायदा होण्याचा संभव नाही. 


समाजसुधारणा व्हावी यासाठी आगरकरांनी कळवळीने आणि तळमळीने लिहिले, हिंदु समाजावर जोरदार टीका केली. हे सारे करीत असताना समाजातीलच घटक असलेल्या मुसलमान धर्माच्या लोकांबाबत त्यांची मते आणि दृष्टी स्पष्ट होती. ब्रिटिशांनी हिंदू- मुस्लीम अशी फूट पाडली हे स्वीकारतानाच पूर्वीची उभय समाजामधील मानसिकताही त्यांनी अचूकपणे लक्षात घेतलेली होती. ती त्यांनी मांडलेली आहेच त्यामुळे दोन्ही धर्मातील तंट्यांचे विवेचन त्यांनी केलेले आहे. मात्र हिंदु-मुसलमान सलोखा होणार का, तर तो कसा होऊ शकेल, तो का होत नाही याची एक चांगली मीमांसाही त्यांनी केली आहे. ते आपल्या निबंधामध्ये म्हणतात उभयतांची संसारयात्रा वर्षेच्या वर्षे बिनबोभाट एकत्र होऊ लागण्यास दोघांतही सुशिक्षणाचा व सुनीतीचा पुष्कळच प्रचार झाला पाहिजे.  ही जबाबदारी अर्थातच पुढाऱ्यांची आहे. .... मुसलमान व हिंदु . यांतील रणाचेही निरसन होईल याविषयी आम्हास शंका नाही. पण ते लौकरच होणे किवां न होणे त्या लोकांतील पुढाऱ्यांच्या अकलेवर, दूरदृष्टीवर, आत्मसंयमनावर आणि लोककल्याणेच्छेवर अवलंबून आहे. प्रसंगविशेषांचे महत्त्व नीटपणे लक्षात न आणता व मागचा पुढचा विचार न करता स्वजातीयांच्या छंदाप्रमाणे वागून व त्यांना रुचेल असे बोलणे बोलून जे पुढारी आपल्या प्रतिपक्ष्यांवर तुटून पडतील आणि त्यांच्या मनात दु: ख होईल अशा प्रकारची भाषणे करतील किंवा लेख लिहितील ते पुढारी उभयपक्षांचा संधी त्यामानाने कालावधीवर नेतील असे आमच्याने म्हटल्यावाचून राहात नाही.....

आगरकरांची ही जाण राजकारण ओळखणारी, धर्मकारण जाणणारी, माणसे- त्यांचे स्वार्थ-परमार्थ समजणारी आणि भविष्यात अशा प्रकारांच्या वर्तनामुळे काय होऊ शकेल, ते ज्ञान आणि ज्ञात असणारीच होती, असे म्हणता येते. एकूण आगरकरांच्या निबंधांच्या विषयाचा विचार केला तर प्रामुख्याने त्यांनी हिंदु समाजाचा आणि एकंदर नागरिक कसा असावा यादृष्टीने त्या त्या व्यक्तीला मिळणाऱ्या स्वातंत्र्य, हक्क, अधिकार, जबाबदाऱ्या, पात्रता, त्यांचे त्यांचे धार्मिक -सामाजिक, रुढीनिहाय वा नीतीनिहाय वर्तन यांचा विचार केला. अर्थात हिंदु हा बहुसंख्य समाज होता, हे त्यांना पक्के माहिती होते. त्यामुळेच हिंदु समाजावर वा हिंदुवर अधिकाधिक लक्ष ठेवत टीका करणे स्वाभाविक होते. मात्र या अर्थ असा होत नाही की, त्यांचे हिंदुंकडेच लक्ष अधिक होते, मुस्लीम समाजाच्या वा त्यांच्या नेत्यांच्या वक्तव्यांकडेह लक्ष होते. त्यामुळेच त्यांना केवळ हिंदुधार्जीणे ही म्हणता येणार नाही, समाजाचा विचार करताना, एक पूर्ण देश म्हणूनही विचार करताना त्यांचा सारासार विवेक नेहमीच जागा होता. त्यामुळेच त्यांचे निबंध वाचताना त्यातील हिंदु समाजावरील टीका म्हणजे मुस्लीमधार्जीणेपणही नव्हते किंवा हिंदुंचे पक्षपातीपणही नव्हते. सामाजिक सुधारणा ही धार्मिक सुधारणेशी संबंधित असते, हे देखील त्यांना पक्के माहिती होते. त्यामुळेच त्यांनी मुस्लिमांसंबंधात कमी लेख लिहिलेले दिसत असले तरी ते अचूक, परखड आणि हिंदुंना रुढींबद्दल सांगितलेल्या आणि सुधाराच्या सांगितलेल्या बाबी मुसलमांनानाहीलागू होत्याच असे म्हटले तरी वावगे नाही. मात्र मुस्लीम समाज, धर्म याची मीमांसा, त्यांच्या मानसिकतेचे विश्लेषणही त्यांनी परखडपणे केले आहे.

ब्रिटिश राजवटीत हिंदु काय आणि मुस्लीम काय दोघेही गुलामच बनले आहेत हे जाणून आगरकर मुसलमानांना स्पष्ट समजवतात की, .... दास्य दोघांच्याही कपाळी आले आहे, व दोघांनाही आपापल्या उन्नतीचा उपाय करणे जरूर आहे. इंग्रजी म्हणीप्रमाणे दोघेही एकाच होडीत आहेत; तेव्हा ही होडी सुरक्षितपणे तीराला जाऊन लागणे उभयतांच्या सहकार्यावर व मैत्री विषेशवर अवलंबून आहे.  ... मुसलमानांनी पारशी लोकांप्रमाणे हिंदू लोकांचा हेवा करणे सोडून देऊन एकंदर साऱ्या गोष्टीत विशेषत: राजकीय गोष्टींत एकमेकांच्या हातात हात घालून चालले पाहिजे... मुसलमान लोकांनी एक गोष्ट विशेष रीतीने ध्यानात ठेवली पाहिजे ती ही की, इंग्रज सरकारने त्यांच्यावर कितीही मेहरबानी केली तरी तीपासून त्यांचा विशेष फायदा होण्याचा संभव नाही.  .... तसेच तुम्ही पूर्वी राज्यकर्ते होतात तेव्हा स्वजातीकरता जो पक्षपात करीत असा तो आता इंग्रज लोकांनी आपल्या जातीकरता केला तर चालणार आहे. पणत्या तो आपल्याकरता करावा आणि तुमच्याकरताही करावा हे कसे जुळणार?  इंग्रजी अंमलाचा भार सध्या तुम्हा-आम्हावर आहेस पण तुम्हीही इंग्रज झाला म्हमजे आमच्या डोक्यावर दोन इंग्रजांचे ओझे होणार, आम्हास ओझे उचलण्याची बरीच सवय आहे हे आम्ही कबूल करतो. पण ते आम्हास झेपेनासे झाले म्हणजे ते आपाल्याआपण कोसळून पडते किंवा आमचा जीव वैतागून जाऊन त्रासून गेलेल्या उंटाप्रमाणे ते आम्ही फेकून देण्याचा प्रयत्न करतो ! ...

आगरकरांनी मुसलमानांना समजावलेली ही विधाने म्हणजे किती सूक्ष्मपणे समाज आणि मुस्लीम वृत्ती त्यांनी ओळखलेली आहे हे लक्षात येते. ते हिंदुत्ववादी नसले तरी त्यांची वृत्ती मुस्लीमलाचारीची नव्हती, असे असूनही त्यांचे सहकारी असलेल्या नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांच्यासारख्या नेमस्तांच्या शिष्याने (!) भारतात नंतरच्या काळात मुसलमांनापुढे लाचारी वा ते म्हणतील त्यानुसार हिंदुंना का वागायला लावले असा प्रश्न उभा राहातो.

अशाने निभाव कसा लागेल? या लेखामध्ये (३० ऑक्टोबर १८९३) आगरकरांनी मुसलमानांबद्दल व्यक्त केलेली मते, मीमांसा आजही प्रत्ययकारी ठरावी.  ते म्हणतात... मुसलमान लोक शूर व धर्मवेडे आहेत; त्यांच्या शौर्यामुळे ते हिंदुस्थानचे राज्यकर्ते झाले, हिंदु लोकांशी त्यांचे जे वारंवार भांडण होते ते त्यांच्या धर्मवेडामुळे होते. धर्मवेड हा वाखाणण्याजोगा गुण आहे किंवा नाही याची शंका आहे. पण त्याला शौर्याचे पाठबळ असल्यामुळे जो त्याला विरोध करण्यास प्रवृत्त होतो त्याला जिवावर उदार व्हावे लागते. हिंदु लोक जात्या गरीब आहेत, ते आपण होऊन विनाकारण कोणाच्याही अंगावर तुटून पडावयाचे नाहीत. एकादृष्टीने त्यांच्या धर्मासारखा दुसरा धर्म नाही. व्हावृत्ती हा या धर्माचा प्रशंसनीय गुण होय. परधर्माच्या लोकांनी हिंदु व्हावे अशी या धर्माची बिलकुल इच्छा नाही. दुसऱ्या धर्माचे लोक हिंदु धर्मात हिंदु करून घेता येत नाहीत. हिंदु धर्माच्या या निषेधक स्वरूपामुळे हिंदु लोकांचे धर्मसंबंधाने सहसा कोणाशी भांडण व्हावयाचे नाही. मुसलमानांपेक्षा किंवा ख्रिस्ती लोकांपेक्षा हिंदु लोकांच्या वृत्तीत जी शांती दिसते, तिचे हेच कारण होय. ..... जोपर्यंत दुसऱ्या लोकांची डोकी धर्मवेडाने भणभणून गेली आहेततोपर्यंत त्यांच्याशी संबंध पडणाऱ्या लोकांतही धर्माभिमानाचे थोडेसे वारे  असले पाहिजे. नाहीतर त्यांच्या हातून स्वधर्माचे संरक्षण व्हावयाचे नाही. हिंदु लोकांचा घर्माभिमान इतक्यापुरताच आहे व तो श्लाघ्य आहे. मुसलमान लोकांनी त्यांना फार छळले तेव्हा गोब्राह्मणांचा प्रतिपाल करणारा साक्षात शंकराचा अवतार श्री शिवाजी राजा यांच्यात निर्माण झाला. त्याने व त्यानंतर महाराष्ट्र देशात जे मराठे व ब्राह्मण शास्ते झाले त्यांनी मुसलमान लोकांचा धर्मच्छल नाहीसा करून त्यांचे राज्यही अगदी संपुष्टात आणून ठेवले. यावरून हिंदुंच्या अंगातही थोडाबहुत धर्माभिमान व शौर्य आहे हे सिद्ध होते. त्यांच्या अंगात ज्याची उणीव दृष्टीस पडते असा कोणता गुण म्हणाल तर निश्चयी धाडस किंवा धाडसी निश्चय हा होय, या अवगुणामुळे किंवा गुणाभावामुळे इंतर लोकांपुढे त्यांचे पडावे तेस तेज पडत नाही. इंग्रज लोक किंवा मुसलमान लोक त्यांना फारसे वचकत नाहीत याचे बऱ्याच अंशी हेच कारण होय. तथापि हा गुण राष्ट्रातील साऱ्याच लोकांत असणे आवश्यक आहे असे नाही. लोकांच्या पुढाऱ्यांत हा गुण भरपूर असला पाहिजे म्हणजे पुष्कळ कामगिरी होते....

आगरकरांचे मुसलमानांविषयीचे काही उद्गारही बोलके आहेत... हिंदुंचा द्वेष करून तुमचा कसा निभाव लागेल ? तुम्ही उभयतांनी सख्या भावाप्रमाणे वागण्यातच तुमचे कल्याण आहे. याकरता इस्मायल खानासारख्यांच्या नाद सोडून आ. मि बद्रुद्दीन तय्यबजींसारख्यांच्या तंत्राने वागू लागा, म्हणजे थोड्या काळात सर्व काही ठीक चालू लागेल. ......... जेव्हा आम्ही हिंदु लोक ब्रिटिश पलटणीची पर्वा न करता ब्रिटिश लोकांच्या हातून आपले राज्य हिसकावून घेण्यास तयार होऊ तेव्हा त्याबरोबर त्यांना टेकू देणाऱ्या मुसलमान लोकांचाही समाचार आम्हास सहज घेता येणार आहे. ...

इस्मायलखानच्या एका पत्राला लंडन टाइम्सने जागा कशी दिली याचा आम्हास मोठा चमत्कार वाटतो. एखाद्या हिंदुने असे पत्र लिहिले असते तर ते खचितच राजद्रोह ठरले असत, असे सांगत आगरकरांनी इस्मायलखान त्यांची मुस्लीम संबंधित आगावूपणाची बाजू याचा मोठा समाचार घेतला आहे.  या अनुषंगाने त्यांनी केलेली मीमांसा अधिक भेदक आहे. ते म्हणतात.... अलीकडे हाऊस ऑफ कॉमन्स सभेत सिव्हील सर्व्हिसविषयी पास झालेला ठराव आणि हिंदुस्थान कौन्सिलाच्या संबंधाने नवीन झालेला कायदा या दोहोंमुळे या खानाचे माथें अगदी फिरून गेल्यासारखे दिसते. ब्रिटिश पार्लमेंटात असले ठराव व कायदे पास होतात हे ब्रिटिश लोकांच्या अज्ञानाचे किंवा गर्हणीय औदार्याचे फल होय! ज्या ठरावांनी व कायद्यांनी हिंदुत व मुसलमानांत अधिकच अंतर पडत जाणार ते कायदे व ठराव काय कामाचे? ज्यांच्या योगाने हिंदूस व मुसलमाना्स बरोबरीचे हक्क मिळतील असे ठराव व कायदे पास केले तर ठीक आहे नाही तर मुसलमान लोक बिथरून जाऊन हिंदु लोकांवर चालून जातील आणि त्यांची खोड मोडेतोपर्यंत हाती घेतलेली शस्त्रे खाली ठेवणार नाहीत.

या संबंधात इस्मायल खानचे म्हणणे म्हणजे हिंदुस्थानचे राज्य इंग्रजांनी मुसलमांपासून राज्य घेतले... ते चूक आहे. आगरकरांनी सांगितले की, ..... रजपूत, मराठे शीख यांनी इंग्रजी येण्यापूर्वी मुसलमानांची बादशाही जमीनदोस्त केली होती. महादजी शिंद्यांची लहर लागती तर त्याला स्वत:लास, दिल्लीचा अधिपती होता आले असते.  किंवा सवाई माधवराव पेशव्यास करता आले असते. त्यामुळे आजमतीस इंग्रजी राज्य नसते तर हिंदुंचे राज्य असते याविषयी कोणासही शंका घेता येणार नाही. .... हिंदुस्थानच्या तीस कोटी प्रजेत सहा कोटी मुसलमान आणि  चोवीस कोटी हिंदू असतील तर त्यांना त्यामानाने कौन्सिलात प्रतिनिधी निवडण्याचे हक्क मिळतील. दोघांचीही संख्या सारखी असणे बरोबर नाही. त्यात हिंदु मुसलमानांची बरोबरी कशी राहाणार. ....

आगरकरांनी इस्मायलखान याच्या म्हणण्यावर जोरदार प्रहार केले ते करताना त्यांनी मुसलमानांनाही सुधारण्याचा प्रयत्न केला आहे. ते म्हणचाचय ..., त्यांच्या लोकांतील अडाणीपणाच्या समजुती, पोकळ अभिमान, निरर्थक वल्गना आणि अप्रशस्त मार्गाने सुखसंपादनाची इच्छा इत्यादी दुर्गुणांनी त्यास सोडलेले नाही, असे उघड होते. ब्रिटिश लोकांनी बंडे वगैरे मोडून टाकून शांततेची स्थापना केली व शाळा घातल्या या गोष्टीमुळे मुसलमानांचा व्हावा तसा फायदा न होता हिंदुनीच आपले डोके मोठ्या झपाट्याने वर काढले व त्यांच्या विद्या व्यासंगामुळे सरकारच्या पदरी त्यांना जो आश्य मिळत आहे त्यामुळे ते अगदी शेफारून गेले आहेत! गेले असतील कदाचित. पण मुसलमानांला कोणी आडकाठी केली होती? पूर्वीपासून ब्रिटिश अधिकाऱ्यांनी मुसलमान लोकांवर आपल्या प्रीतीचे दोन अधिक किरण पाडण्याचा क्रम ठेवला असून मुसलमान लोकांनी इंग्रजी अंमलापासून आपला हवा तसा फायदा करून घेतला नाही, याला आम्ही काय करावे? व यावर आम्हावर जळफळून काय फायदा? आम्ही हिंदू लोकांस ठोकून काढून नाहीसे करू, असल्या शुष्क वल्गना करण्यात मुसलमानांनी कधी समाधान मानू नये..... इंग्रजी लोकांनी आपणास विशेष सवलती द्याव्या अशी त्यांची इच्छा दिसते. आमच्या राज्यकर्त्यांस उघडपणे तसे करता येणार नाही. मुसलमान लोकांचा खरा तरणोपाय हिंदु लोकांशी एकमत करण्यात आणि जोडीचे ज्ञान, संपत्ती, व राजकीय हक्क  संपादण्यात आले, असे आम्हास वाटते.....

समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर यांची उत्तम तार्किकता, तत्त्वनिष्ठता, इतिहासावरून योग्य बोध समाजाला करून देण्याची वृत्ती, अचूक युक्तिवाद आणि हिंदु समाजाविषयी असणारी कळकळ हिंदुना उपहासगर्भ भाषेत जाणीव करून देणारी होतीच.  पण जेव्हा त्यांना  तर  मुसलमानांच्या मनमानी मागण्या आणि वर्तनाबद्दल बोलावयाचे होते, तेव्हा त्यांनी मुस्लीमांपुढे त्यांच्या मागण्यांपुढे मान तुकवण्याचे काम केले नाही. तार्किकतेने बाजू मांडवत कणखर इशाराही दिला. नेमस्तपंथी असणाऱ्या या सुधारककार आगरकरांचा वसा ते राष्ट्रीय काँग्रेसचे कट्टर समर्थन करणारे असूनही, त्यांच्या विचारांना मानणाऱ्या त्यांच्या नंतरच्या पिढीने म्हणजेच टिळकांच्या नंतर किती राष्ट्रीय सभावाल्यांनी म्हणजेच काँग्रेसजनांनी घेतला त्याचा शोध घेण्याचीही गरज आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय काँग्रेसमधील हिंदुमहासभा ही संघटना जेव्हा सभेतच राहून हिंदुंची बाजू लढवू पाहात होती, त्यावेळी मुस्लीम लीग धार्जीण्या नेत्यांनी आणि काँग्रेस जनांनी  हिंदुचीच केवळ बाजू घेणे सोडा पण मुस्लीमांच्या मागण्यांपुढे मान तुकवण्यापेक्षा किमान आगरकरी तार्किकता जरी स्वीकारली असती तरी कदाचित खूप काही टाळता आले असते, आवश्यक ते करता आले असते. अर्थात तार्किकतेबरोबर असणारी खरी आणि परखड तर्कनिष्ठता, तत्त्वनिष्ठा त्यावेळी होती की नाही, हा संशोधनाचा विषय ठरावा.

आगरकरांच्या बरोबरीने नंतरच्या काळात समाजाला विशेष करून भारताला एक राष्ट्र म्हणून भौगोलिक, सांस्कृतिकतेने बद्ध, धर्म-पंथ- तत्त्वज्ञान यांनी सिद्ध असलेल्या भूमीला राष्ट्राचे महत्त्व दिले गेले. असे हिंदुत्त्व मानणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांची सामाजिक, राजकीय आणि तार्किक-तात्त्विक भूमिकाही आगरकरांच्या तुलनेत बऱ्याच अंशी महत्त्वाची वाटते, समान वाटते. 

००००००००००००००००००००००००००००००

संकटाना सामोरे जाणारे विनायक.... - ८

००००००००००००००००००००००००००००००

स्वातंत्र्याबरोबरच आपला धर्म, आपला समाज सुधारावा ही निर्माण झालेली त्यांची जाज्ज्वल्य इच्छा यामुळे विनायक दामोदर सावरकर केवळ क्रांतिकारकच नव्हे, केवळ विज्ञानवादी, समाजसुधारकच नव्हे तर मार्गदर्शक आणि द्रष्टे व्यक्तिमत्त्वच ठरले आहे.  विविध विषयांवरील प्रचंड लिखाण, अनेक भाषणे आणि जवळजवळ सर्व प्रकाराचे वाईट अनुभव घेऊनही सावरकर हे सर्व संकटांविरोधात उभे राहाणारे कठोर व्यक्तिमत्त्व बनले, द्रष्टेपणाने मार्गदर्शन करूनही आजतागायत हिंदु समाजामधील सुधारणा परिपूर्ण होऊ शकली नाही, हे खरे म्हणजे हिंदुंचे दुर्दैव. पोथिनिष्ठता सोडा आणि विज्ञानवादाची कास धरा त्यांचा हा संदेश आजही तितकाच अंमलात आणण्याची आवश्यकता आहे.


स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म २८ मे १८८३ या दिवशी नाशिक जिल्ह्यातील भगूर येथे झाला.   दामोदरपंत आणि राधाबाई यांचे विनायक दामोदर सावरकर हे अपत्य.  याशिवाय विनायक दामोदर सावरकर यांना ज्येष्ठ बंधूू गणेश तथा बाबाराव, बहीण मैनाबाई आणि धाकटे भाऊ नारायण तथा बाळ सावरकर अशी ही एकूण चार भावंडे. राधाबाई यांच्या अकाली निधनामुळे आपल्या मुलांचा सांभाळ दामोदरपंतानीच केला, दामोदरपंत सावरकर यांचा अभ्यास मोठा , त्यांना काव्य करण्याचाही छंद होता इतकेच नव्हे तर घरी पुस्तकांचा चांगला संग्रही होता. अर्थातच सा सर्व बाबींचे संस्कार विनायक सावरकर यांच्यावरही घडले. इंग्रजी ग्रंथांचे वाचन, विविध तत्कालीन वृत्तपत्रे यांचे वाचन, इतिहासाचे आकलन यामुळे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना गुलामगिरीबद्दल चीड निर्माण झाली,. परिस्थितीचे भान आले आणि स्वातंत्र्यासाठी ते तळमळू लागले. काळ या राष्ट्रवादी वृत्तपत्रामुळे त्यांना क्रांतिकार्याची प्रेरणाही मिळाली.

स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर म्हणजे देशप्रेमाचे, देशभक्तीचे, क्रांतिकार्याचे, साहित्यनिर्मितीचे इतकेच नव्हे तर विज्ञानवादाचे प्रेरणास्थानच बनले समाजाबद्दल, हिंदुधर्माबद्दल त्यांना निर्माण झालेली आस्था आणि स्वातंत्र्याबरोबरच आपला धर्म, आपला समाज सुधारावा ही निर्माण झालेली त्यांची जाज्ज्वल्य इच्छा यामुळे विनायक दामोदर सावरकर केवळ क्रांतिकारकच नव्हे, केवळ विज्ञानवादी, समाजसुधारकच नव्हे तर मार्गदर्शक आणि द्रष्टे व्यक्तिमत्त्वच ठरले आहे.  विविध विषयांवरील प्रचंड लिखाण, अनेक भाषणे आणि जवळजवळ सर्व प्रकाराचे वाईट अनुभव घेऊनही सावरकर हे सर्व संकटांविरोधात उभे राहाणारे कठोर व्यक्तिमत्त्व बनले, द्रष्टेपणाने मार्गदर्शन करूनही आजतागायत हिंदु समाजामधील सुधारणा परिपूर्ण होऊ शकली नाही, हे खरे म्हणजे हिंदुंचे दुर्दैव. पोथिनिष्ठता सोडा आणि विज्ञानवादाची कास धरा त्यांचा हा संदेश आजही तितकाच अंमलात आणण्याची आवश्यकता आहे.

ब्रिटिशांविरोधात लढताना, परदेशात जाऊनही स्वदेशाच्या स्वातंत्र्यासाठी केलेले कार्य आणि जगभरात ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीकडे वेधलेले लक्ष यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल ब्रिटिश राजवटही घाबरून होती आणि म्हणूनच तब्बल दोन जन्मठेपेची काळ्या पाण्याची शिक्षा अनैतिक पद्धतीने सुनावण्याचे कुकर्मच ब्रिटिशांनी केले. इतके होऊनही सावरकरांनी न डगमगता, जुलूम सहन करून समाजाला दिलेली दिशा, समाज सुधारणेसाठी राष्ट्र म्हणजे काय ही संकल्पनाच  समजावून हिंदूंना दिलेली प्रेरणा आणि स्वातंत्र्यानंतरही सत्ताधारी काँग्रेसच्या राजवटीत अन्याय्य वागणूक भोगूनही आणि देशाची फाळणी होऊनही मिळालेल्या स्वातंत्र्याबद्दल समाधान व्यक्त करीत धन्यो अहम, कृतार्थो अहम असे म्हणत त्यांनी केलेले आत्मार्पण म्हणजे एका द्रष्ट्या सुधारक व्यक्तिमत्त्वाने आपले कर्तव्य पार पाडून देशवासींना दिलेली शिकवण अधिक मोलाची. फक्त आता त्यांच्या मार्गदर्शक तत्त्वाने वाटचाल करून हिंदु समाजानेच नव्हे तर संपूर्ण भारताने आपला नौबतीचा डंका साऱ्या जगात वाजवायची आवश्यकता आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे आयुष्य म्हणजे तरुणपणातील तल्लख बुद्धिमत्तेसह केलेले लिखाण, घेतलेले  देशसवेचे व्रत,  क्रांतिकार्य आणि इतकेच नव्हे तर जुलमी ब्रिटिशांच्या कचाट्यातून मार्साय बंदरानजीक बोटीतून सागरात उडी घेऊन वेधलेले साऱ्या जगाचे लक्ष आणि त्यानंतर अंदमानात काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असतानाच घेतलेले भीषण अनुभव. त्या अंदमानाच्या शिक्षेमधील गांभीर्य लक्षात घेऊन केवळ देशसेवेच्या तळमळीने, स्वातंत्र्याच्या कार्यात सहभाग ठेवण्यासाठी सुटकेसाठी केलेली यथार्थ कृती इतकेच नव्हे तर तेथून सुटका करून घेऊन बहुसंख्य हिंदु समाजाला जागरुक करून त्यांना कालानुसार  सुधारण्यासाठी- अद्ययावत करण्यासाठी त्यांनी केलेली समाजप्रबोधनाची लोकोत्तर कृती ही खरी म्हणजे त्यांच्या बुद्धिमत्तेचीच साक्ष ठरते. स्वातंत्र्य म्हणजे नेमके काय, असा प्रश्न केला तर  केवळ ब्रिटिशांच्या राजवटीतूनच सुटका करून घेणे म्हणजे स्वातंत्र्य नव्हे तर समाजाला अद्ययावत करणे, त्यामधील अनेक दोष बाजूला सारून पोथिनिष्ठ स्वरूपातील धर्मामधून  साऱ्या समाजाला, भेदविरहीत- जातिविरहीत समाजामध्ये स्थापित करणे आणि विज्ञाननिष्ठतेने, विज्ञानाच्या दृष्टीने समाजाला विविध बाबींकडे चिकित्सकपणे बघण्यास शिकवणे तसे त्यांना जीवन जगण्यासाठी सिद्ध करणे हे गरजेचे होते.

रवींद्रनाथ टागोरांच्या The mind is without fearया कवितेनुसार माणसाला भयमुक्त होण्यासाठी बुद्धिनिष्ठ करण्याचे काम सावरकरांनी केले. राजकीय, सामाजिक, धार्मिक इतकेच नव्हे तर राष्ट्रीयत्वाच्यादृष्टीनेही अनेक वर्ष दास्याचा अनुभव घेणाऱ्या हिंदु समाजाजाला त्या मानसिक आणि बौद्धिक गुलामगिरीतूनही बाहेर काढण्यासाठी एक राष्ट्रव्यापी तत्त्वज्ञान मांडण्याची केवळ बौद्धिक नव्हे तर कृतीशील जबाबदारी निभावणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे सावरकर होते. अशा या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या लिखाणातील आणि तार्किक मार्गदर्शक अशा निबंधांमधील विधानांमधून सावरकर ही संकल्पना मांडण्याचा हा प्रयत्न आहे. बुद्धिवादी आणि समाजसुधारक आगरकर आणि त्यांच्या पुढच्या पिढीतील विनायक दामोदर सावरकर या व्यक्तिमत्वामधील साम्य, त्यांच्या उद्देशामधील साम्य, त्यांच्या काळामधीलही समाजाची धर्म- मानसिकता यातील साम्य यातून उलगडू शकेल. ज्यामुळे आजही आपल्या समाजात असलेल्या कमतरता दूर करण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरू शकेल. इतकेच नव्हे तर आजच्या समाजामध्ये या दोन्ही वेगळ्या काळातील नेत्यांच्या तुलनेमुळे आपण आजही नेमके कुठे आहोत, त्याचा ठाव घेता येऊ शकेल. अर्थात हा ठाव ज्याचा त्यांनीच घ्यायचा आहे, ठरवायचा आहे....

००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००

समाजाकडे सकारात्मक पाहाणारे सावरकरांचे निबंध - ९

००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००

प्रचारकी वा हिंदुत्त्ववादी वा राष्ट्रवादी वाटणारे सावरकर लोकहित जपणारे सुधारक पंथातीलच एक. भारताबरोबरच पाश्चात्य देशातील वास्तव्य, तुरुंगवासातील अनुभव यांचा सखोल  परिणामही त्यांच्या विचारांवर झाला आहे. त्यातून निबंध वाड्.मयातून सावरकर ही व्यक्ती एक बहुआयामी आणि हिंदुत्त्ववादापेक्षाही अधिक प्रखर विज्ञानवादी, तर्क आणि तत्त्वनिष्ठ समाजसुधारणावादी असल्याचे जाणवते.


साहित्यामधील विविध प्रकार हाताळणाऱ्या स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांनी समाजासाठी, सुधारकी भूमिकेतून आणि विज्ञानवादी, बुद्धिवादी दृष्टीने निबंध, लेख यांचे भरपूर लिखाण केले. सावरकर म्हणजेच हिंदुत्त्व असे समीकरण बनले इतके ते प्रखर हिंदुत्त्ववादी होते. अर्थात त्यांचे हिंदुत्त्व हे धार्मिक नव्हे तर भूमीनिष्ठ, संस्कृतीनिष्ठ असूनही ते विज्ञानवादी दृष्टीने लोकांना बुद्धिवंत करण्याचा प्रयत्न करणारे होते. त्यामुळेच त्यांची दृष्टी नेहमीच प्रयत्नवादी होती, राहिली. साहजिकच समाजाकडे पाहाताना उपहासगर्भ पद्धतीपेक्षा ते सुधारकी भूमिकेतील शिक्षकी आणि सकारात्मक पद्धतीने हिंदुत्वाकडे पाहात होते. त्यामुळेच समाजसुधारणेसंबंधात त्यांची असणारी मते प्रखर, ध्येयनिष्ठ, विवेकनिष्ठ, तर्कशुद्ध आणि नवकालनिर्मितीला अनुसरून होती. भविष्याला सामोरे नेणारी होती. विशेष करून ही वैशिष्ट्ये त्यांच्या निबंध, लेख, स्फुट लेख यामधून प्रत्ययास येतात. भाषणासारखे प्रवाहीपणच त्यांच्या या प्रकारच्या साहित्याला मिळालेले दिसते. सावरकरांच्या लिखाणाच्या तुलनेत आगरकरांची रचना सुलभ वाटते, अर्थात याचे कारण त्यांचा मूलभूत शिक्षकी पिंड असावा तर सावरकरांचा पिंड हा प्रवाही, क्रांतिकारी विचारांच्या, नेतृत्त्वगुणाचा आणि ज्वलंतराष्ट्रनिष्ठा असणाऱ्या कृतीशील व्यक्तीचा होता. विविध प्रकारचे वाचन, परदेशातील निवासातून मिळालेले अनुभव आणि प्रत्ययकारी क्रांतिकारक नेतृत्वाने भारलेले व्यक्तिमत्त्व असल्याने त्याचा परिणाम त्यांच्या या लिखाणातून दिसतोच.

साहित्यात खरे म्हणजे ते कादंबरीकार आहेत, नाटककार आहेत, कवि आहेत, लेख लिहिणारे प्रभावी पत्रकार आहेत, इतिहासाबद्दल संवेदनशील असणारे इतिहासकार आहेत आणि निबंध- लेख यातून विविधांगी उद्दिष्टाने आणि विषय मांडणीतून भारलेले निबंधकारही आहेत. समाजकारण, धर्म, राजकारण, इतिहास, तत्कालीन आणि भूतकालातील घटना- घडामोडी , जागतिक घटना- घडामोडी यावर लक्ष असल्याने त्याबद्दल स्वमत घडवणारे सावरकर केवळ इतपर्यंतच थांबत नाहीत. सत्य-अहिंसेचे तत्त्वज्ञानही ते सांगतात, त्याचा वापर कसा कितपत योग्यायोग्य आहे त्याचेही विश्लेषण करतात, हिंदु धर्मातीलच नव्हे तर अन्य धर्मातीलही गुणदोषांचे विवेचन करीत जातिभेद, चातुर्वर्ण्य सामाजिक कालबह्य वंधने उलथून टाकण्याचे तत्त्वज्ञानही मांडतात आणि हिंदु - मुस्लिमांच्या समस्या मांडत त्यांच्या त्यांच्या पोथिनिष्ठतेमधून समाजाने बाहेर पडावे यासाठी विज्ञानवादी ध्वजही फडकावतात.. क्रांतिचे त्तत्वज्ञान सांगताना त्यांचा क्रांतिकारक, इतिहास, तत्त्वज्ञान, चाली-रिती, परमेश्वराचे अस्तित्त्व, धर्मभोळेपणा, भोळसट श्रद्धा, लोकशाही, तिची तत्त्वे, विभिन्न संस्कृती आणि त्या त्या संस्कृतीचे उत्कर्ष आणि अपकर्ष , भाषाशुद्धी आदी विविधांगी अथांग विषयांनी त्यांचे निबंध आणि लेख प्रभावी होत गेलेले आहेत. मुळात त्यांचे व्यक्तिमत्त्वच या निबंधांमधून पारदर्शीपणे आणि प्रवाहीपणे दिसून येते. त्यामुळे प्रचारकी वा हिंदुत्त्ववादी वा राष्ट्रवादी वाटणारे सावरकर लोकहित जपणारे सुधारक पंथातीलच एक. भारताबरोबरच पाश्चात्य देशातील वास्तव्य, तुरुंगवासातील अनुभव यांचा सखोल  परिणामही त्यांच्या विचारांवर झाला आहे. त्यातून निबंध वाड्.मयातून सावरकर ही व्यक्ती एक बहुआयामी आणि हिंदुत्त्ववादापेक्षाही अधिक प्रखर विज्ञानवादी, तर्क आणि तत्त्वनिष्ठ समाजसुधारणावादी असल्याचे जाणवते. बुद्धिने आणि विचाराने प्रगल्भ झालेले हे व्यक्तिमत्त्व त्यांच्या विविध निबंध आणि लेखांमधून कसे दिसते ते पाहाणे, मांडणे हा देखील एक आव्हानाचाच प्रकार आहे.

००००००००००००००००००००००००००००००००००

सावरकर: तर्कनिष्ठ, बुद्धि-विज्ञाननिष्ठ तत्त्ववेत्ते - १०

००००००००००००००००००००००००००००००००००

निबंधाच्या अखेरीस म्हणतात की, ....ती विश्वाची आद्यशक्ती ज्याकाही ठरावीक नियमांनी वर्तते आहे ते तिचे नियम समजतील ते समजून घेऊन त्यातल्यात्यात आपल्या मनुष्यजातीच्या हिताला नि सुखाला पोषक होईल तसा त्यांचा साधेल तितका उपयोग करून घेणे इतकेच मनुष्याच्या हातात आहे. मनुष्यजातीच्या सुखाला अनुकूल ते चांगले, प्रतिकूल ते वाईट. अशी नीति-अनीतीची स्पष्ट मानवी व्याख्या केली पाहिजे. देवास आवडते ते चांगले आणि मनुष्यास जे सुखदायी ते देवास आवडते ह्या दोन्ही समजुती खुळचट आहेत; कारण त्या असत्य 'आहेत. विश्वात आपण आहोत पण विश्व आपले नाही; फार फार थोड्या अंशी ते आपणास अनुकूल आहे; फार फार मोठ्या अंशी ते आपणास प्रतिकूल आहे असे जे आहे ते नीटपणे, धीटपणे समजून घेऊन त्याला बेधडकपणे तोंड देणे हीच खरी माणुसकी आहे! आणि विश्वाच्या देवाची खरी खरी तीच पूजा !!


सावरकर आणि हिंदुत्त्व हे एक अविभाज्य समीकरण आहे हे खरेच. पण त्यांचे हे हिंदुत्त्व नेमके काय आहे, ते रितीरिवाजात अडकलेले नाही, ते नव्या काळाकडे भारतीयांना नेऊ पाहाणारे, अद्ययावत करू पाहाणारे आहे. उगाचच कर्मकांडामध्ये अडकावे, असे त्यांना वाटत नाही पण त्याचबरोबर आपल्या प्राचीन परंपरा आणि इतिहास याचेही भान ठेवून त्यांनी हिंदुत्वाची केलेली व्याख्या ही आधुनिक विज्ञानयुगाला पारमार्थिकदृष्टीने नव्हे तर ऐहिक, व्यावहारिक आणि उपयुक्ततावादी अंगाने पाहाणारी आहे. त्यामुळे अगदी सर्वसाधारण वैदिक वा सनातनी हिंदुंनाही अध्यात्माच्या, देव, इश्वर आदी संकल्पना सांगताना एका नास्तिकवाद्याची भूमिका ते बजावताना वाटू शकतात. किंबहुना त्यांचा दृष्टिकोन हा नास्तिकवादाचा नसून मानवतावादी, बुद्धिवादी विज्ञाननिष्ठ आणि क्रांतिवादी आहे. त्यांचे जगणे हे उपयुक्ततावाद, वास्तव, विज्ञान याची सांगड घालून जाणाऱ्या कृतीशील क्रांतिकारी व्यक्तीचे आहे. त्याचा प्रत्यय देणारे लेख- निबंध यादृष्टीनेच लक्षात घेतले पाहिजेत. खरे म्हणजे त्यांचा दृष्टिकोन समजायला कदाचित सोपा असला तरी प्रत्यक्ष स्वीकारायला मात्र हिंदु तयार नाही, हेच दुर्दैव वाटते. त्यामुळेच अद्याप श्रद्धा, अंधश्रद्धा, रिवाज, प्राचीन काळातील अर्धमाहितीचा अहंपणा यांनी माणसावर मात केली आहे. त्यामुळेच त्यांचे बुद्धिप्रामाण्य वा विज्ञानवाद पारंपरिक विचारधारेतील धर्ममार्तंडांना दाहक वाटणेही स्वाभाविक आहे. ते समजून घेऊन नव्हे तर काही अंशी स्वीकारले तरी अद्ययावत होण्याच्या दिशेने आपण मार्गक्रमण करू शकू.

सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील विविध विषयांमध्ये सावरकरांच्या लेख-निबंधांनी दिशा स्पष्ट केली आहे. `मनुष्याचा देव आणि विश्वाचा देव’ यात ते सांगतात.... सुरूप आणि कुरूप, सुगंधी आणि दुर्गंधी, मंजुळ आणि कर्कश, मृदुल आणि कठोर, प्रिय आणि अप्रिय, चांगले आणि वाईट, दैवी आणि राक्षसी ही सगळी द्वंद्वे मनुष्य हा ह्या यच्चयावत विश्वाचा, वस्तुजाताचा, केंद्र कल्पिल्यामुळेच मध्यबिंदू समजला जाताच, अकस्मात उत्पन्न होतात. मनुष्यास जो सुखद तो विश्वाचा एक भाग, मनुष्यास जो दु: खद तो दुसरा. पहिला चांगला, दुसरा वाईट.....

त्यांच्या या विधानातून त्यांचे तर्कविश्व किती सुस्पष्ट होते तेच दिसते. चांगले काय आणि वाईट काय या संबंधात वा या प्रकारच्या दोन मानलेल्या बाजूंमधून कशी मीमांसा करायची तेच त्यांनी तर्कशुद्दपणे स्पष्ट केले आहे.  मनुष्य या सजीव प्राण्याचे खरे आकलन त्यांनी केले. त्यासमाजप्रिय, गट, समूह अशा पद्धतीच्या संकल्पनेत राहाणारा हा मनुष्य काय आणि कोणत्या स्थानी आहे आणि विश्वाच्या तुलनेत त्याचे स्थान नेमके कुठे आहे, ते ओळखण्याचा वा स्पष्ट करण्याचा सावरकरांचा हा दृष्टीकोन केवळ ऐहिक नाही तर पारमार्थिक विचारानेही स्पष्ट झालेला दिसतो. विश्वरूपही या निमित्ताने ते जाणून घेत मनुष्याच्या आयुष्याशी तुलना करीत त्यांनी हा अतिशय जटील विषय खरे म्हणजे सोपा करूनच उलडण्यास सुरूवात केलेली दिसते. यामुळेच उपयुक्तता या संबंधात विचार करताना त्यांनी यात म्हटले आहे की,.... विश्वाची उपयुक्तता आपल्या मापानेच मनुष्याने अशी मापावी हे अपरिहार्यच होते. विश्वाचे रसरूपगंधस्पर्शादी सारेच ज्ञान मनुष्याला त्याच्यापाशी असलेल्या पाच ज्ञानेंद्रियांनीच काय ते कळू शकणार....

अशाच पद्धतीने सावरकरांनी या निबंधातून तर्कशुद्ध अशा विचारांमधून देव शोधला आहे. विश्वाची उपयुक्तताच नव्हे तर त्या विश्वाचे मानवाच्या वा सजीवाच्या दृष्टीने असणारे स्वरूपही त्यांनी हुडकण्यात बऱ्याच अंशी यश मिळवले आहे. त्यामुळे त्यात अनेक उदाहरणे, प्रमेये, सूत्रे, मांडत हा ‘देव’ शोधला आहे. फळे, भाज्या यांची निर्मिती, त्यांचे विशेषत्व याचाही बारकाईने दाखला देत ते म्हणतात... त्या जगास निर्मिण्यासच देवाने मनुष्यावर जी अमर्याद दया केली आहे, तीविषयी मनुष्य त्याचा उतराई होणार तरी कसा!! .... तशीच मनुष्य देहाची रचना. पायाच्या तळव्यापासून तो मज्जातील सूक्ष्मातिसूक्ष्म पिंडानुपिंडापर्यंत या शिरराची रचना मनुष्याला सुखदायी होईल अशीच सुसंवादी करताना हे मनुष्याच्या देवा, तू जी केसानुकेसागणिक काळजी घेत आला आहेस, ती कुठवर सांगावी!

सावरकरांची ही भाषा तत्त्वज्ञान्याची, संशोधक अशा संवादी व्यक्तीमनाची आहे. पण तरीही विविधांगी विचार करीत अध्यात्मिकतेच्या एका वेगळ्या स्तरापर्यंत जाण्याची ताकद त्यांच्यात आहे. त्यामुळेच ते या निबंधाच्या अखेरीस म्हणतात की, ....ती विश्वाची आद्यशक्ती ज्याकाही ठरावीक नियमांनी वर्तते आहे ते तिचे नियम समजतील ते समजून घेऊन त्यातल्यात्यात आपल्या मनुष्यजातीच्या हिताला नि सुखाला पोषक होईल तसा त्यांचा साधेल तितका उपयोग करून घेणे इतकेच मनुष्याच्या हातात आहे. मनुष्यजातीच्या सुखाला अनुकूल ते चांगले, प्रतिकूल ते वाईट. अशी नीति-अनीतीची स्पष्ट मानवी व्याख्या केली पाहिजे. देवास आवडते ते चांगले आणि मनुष्यास जे सुखदायी ते देवास आवडते ह्या दोन्ही समजुती खुळचट आहेत; कारण त्या असत्य 'आहेत. विश्वात आपण आहोत पण विश्व आपले नाही; फार फार थोड्या अंशी ते आपणास अनुकूल आहे; फार फार मोठ्या अंशी ते आपणास प्रतिकूल आहे असे जे आहे ते नीटपणे, धीटपणे समजून घेऊन त्याला बेधडकपणे तोंड देणे हीच खरी माणुसकी आहे! आणि विश्वाच्या देवाची खरी खरी तीच पूजा !!

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा हा दृष्टिकोन अध्यात्म- तत्त्वज्ञान आणि विज्ञान यांना सामावून घेणारा किंवा त्या अंगाने जाणारा आणि खरी माणुसकी शोधणारा दिसतो. यात ऋषीमुनींची तात्विकता आहे. संताचा संवेदीपणा आहे आणि नवकालातही विज्ञानाला मानणाऱ्या माणुसकीचा आत्मा आहे.  इतकी प्रगल्भता असूनही त्यांच्यावर केवळ आजकालच्या विचारातील कर्मकांडात गुंतलेल्या हिंदुचा शिक्का मारणे ही अपरिपक्व बुद्धिची लक्षणे म्हणायला हवीत.

००००००००००

अधिष्ठान हवे अद्ययावत वैज्ञानिक सामर्थ्याचे ! - ११

०००००००००००

रामास हराम समजणारेही ऐहिक सामर्थ्यास संपादून वैज्ञानिक बळाने जे ऐहिक यश मिळवू शकतात ते ऐहिक यश ज्यास हवे, त्याने ते अद्ययावत वैज्ञानिक सामर्थ्य संपादावे. चळवळीत ते सामर्थ्य असले तर भगवंताच्या अधिष्ठानावाचून काही अडत नाही. ते सामर्थ्य नसले तर भगवंताच्या अधिष्ठानासाठी कोटी कोटी जप केले तरी ऐहिक यश मिळत नाही, हाच सिद्धान्त ! !

बिंदू बिंदू एका सरळ रेषेत जुळले की रेषा बनते. प्रत्येक बिंदू हा स्वतंत्र असतो. त्याच्यावर झालेले संस्कार, प्रक्रिया या त्या त्या बिंदूला माहिती झाल्यानंतर एक रेषा तयार करण्यासाठीच्या प्रकल्पात तो बिंदू स्वत:ला असा सामावून टाकतो की, बिंदू म्हणजे रेषा की रेषा म्हणजे बिंदू असाही प्रश्न पडू शकतो. त्यातील एखादा बिंदू निखळत असला तर त्याला दुसरा बिंदू सावरून घेतो, रेषा कायम ठेवण्याचा प्रयत्न करतो. पण मुळात हे सर्व बिंदू स्वतंत्र असतात, त्यांच्यावर एकाच ठिकाणाहून होणारे संस्कार ते स्वतंत्र असल्याचे भान ठेवून झाले; म्हणजेच ‘मास प्रॉडक्शन’ म्हणून न पाहाता केले गेले तरी त्या बिंदूंचे अस्तित्त्वही राहाते, आणि बिंदूंना अन्य बिंदूंचे भानही राहाते. व्यक्तीस्वातंत्र्यासारखे हे बिंदू स्वतंत्र राहिले तरी सामुहीक असतात, त्यासाठी त्यांना तशी सामुहीक एकत्रित  वा गटनिहाय वा सांघिक अशा प्रकारची शिकवण देऊन ‘रोबो’ सदृश्य तयार न करता प्रत्येक बिंदूला जागृत करण्याचे महत्त्वही लक्षात येते त्यामुळेच त्यांचे प्रत्येकाचे अस्तित्त्व त्यांच्या त्यांच्या विचारविनिमयातून विकसितही होत असते. अशाच संकल्पनेतून सावरकरांनी आपले तत्त्वज्ञान, तर्क, विचार समाजातील लोकांपुढे, हिंदुंपुढे मांडले त्यांना विचारप्रवर्तक बनवण्यासाठी प्रेरणा देणारी शिकवण दिली यामुळेच खरे म्हणजे सावरकरांचे हिंदुत्त्व हे अधिक राष्ट्रीय होते, भूमिनिष्ठ होते, विज्ञाननिष्ठ होते. अशातूनच ‘ईश्वराचे अधिष्ठान म्हणजे काय?’ हे समजावताना त्यांचा निबंध केवळ धर्म, ईश्वर, निरीश्वर, या चर्चेत न अडकता तो व्यक्तीला समूहाचा अर्थ सांगणारा, विवेकवादाने जगायला शिकवणारा, राष्ट्राचा इतिहास जागवून झोपलेल्या हिंदुना जागे करणारा तार्किक, तात्विक, सामाजिक आणि बुद्धिवादी बनला. अर्थात हे ज्याने त्याने वाचनाने अनुभवीत पुढे जात आपली ‘रेषा’ वाढवावी, हेच अपेक्षित आहे.

सामर्थ्य आहे चळवळीचे। जो जो करील तयाचे। परंतु तेथे भगवंताचे। अधिष्ठान पाहिजे ।। या समर्थ रामदासस्वामींच्या ओवीने ‘ईश्वराचे अधिष्ठान म्हणजे काय?’ हा निबंध सावरकर सुरू करतात आणि भगवंताचे अधिष्ठान म्हणजे काय, यासंबंधात अतिशय बारकाईने विविध तार्किक उदाहरणे देत, इतिहासातील घटना नमूद करीत हा निबंध अधिक प्रगल्भ करतात. सावरकरांचा हा निबंध वाचताना इश्वर आणि निरीश्वरवादाचे विवेचनही यात विश्लेषित होते आणि सामाजिक, राजकीय, सामूहीक, धार्मिक अशा घटकांचेही महत्त्व कळत, त्यांची उकल होते.

सावरकर या निबंधात अनेक पद्धतीने तार्किकता मांडताना सांगतात की, .... जर भगवंताच्या अधिष्ठानाचा इतकाच अर्थ असेल की, ऐहिक आणि मानवी उपायांच्या हातीच यशाची किल्ली नसून मनुष्याच्या जानाच्या नि शक्तीच्या पलीकडे ज्या अनेक अज्ञात, अजेय, प्रचंड अशा अमानुष विश्वशक्ती आहेत, त्यांच्या आघाताप्रत्याघाताच्या टकरीतही त्या यशाचा वा अपयशाचा संभव असतो, तर तो अर्थ बरोबरच आहे ! ...

...  ओवीचा  अर्थ असाच घेण्यात येतो की, मनुष्य ज्याच्या त्याच्यापरी नीती-अनीती म्हणतो, न्याय व अन्याय म्हणतो, दैवी संपत वा आसुरी संपत म्हणतो, धर्म व अधर्म म्हणतो, त्यापैकी पहिले ते सत्य नि दुसरे ते असत्य असून जी चळवळ त्या मानवी सत्याच्या पायावर उभारलेली असते, त्या मानवी न्यायाची पोषक असते, त्या मानवी धमचि बीद मिरविते; तोच काय तो यशस्वी होते ! ईश्वर तिच्यावरच कृपा करतो अशा अर्थी ईश्वराचे अधिष्ठान जिला लाभत नाही, ती चळवळ कितीही प्रबळ असली तरी ती यशस्वी होत नाही. यास्तव चळवळ करणाऱ्यांनी प्रथम ते भगवंताचे अधिष्ठान संपादिले पाहिजे, ईश्वराची कृपा असली पाहिजे. आणि ही ईश्वरराची कृपा संपादिण्याचा मार्ग कोणता ? तर अर्थातच पंचाग्निसाधन, पाण्यात उभे राहून द्वादशवाधिक नामजप, योग साधन, उपासतापास, एकशेआठ सत्यनारायण, एक कोटी रामनाम जप, संतत धारेची अनुष्ठाने, रेडे वा बोकड मारणारे नवस, हजार वत्ती लावणे, दुर्वा वाहणे, स्तानसंख्या, जपजाप्य, नामसप्ताह, पुरश्चरणे-पारायणे मोपास, ब्राह्मणभोजने, यज्ञयाग, दक्षिणादाने प्रभूति जे शतावधी उपाय तोपासून अनिमाहात्म्यापर्यंत देवास संतोषविण्यास्तव वर्णिलेले आहेत त्यास आचरणे हा होय. याअर्थी जिला तपस्या म्हणतात ती आधी, मग .मानवी चळवळ.. वरील मत खरे की खोटे हे पाहण्यापूर्वी इतके स्पष्ट सांगून टाकतो की, वर उल्लेखिलेल्या जपतपादी साधनांची आत्मशुद्धी वा पारलौकिक मोक्ष प्रभृति जी फळे आहेत त्यांचा उह या लेखात आम्ही करीत नसून जी त्यांची फळे प्रत्यक्ष अनुभवात केव्हाही निश्चितपणे मिळालेली नाहीत ती त्यांची फळे नव्हेत इतकेच येथे विशदावयाचे आहे. ..... परंतु तशा अर्थाच्या ईश्वरी अधिष्ठानावर, वरील ओळीत ज्या राष्ट्रीय उत्पादनादिक भौतिक चळवळींच्या ऐहिक यशाचा उल्लेख केलेला आहे, ते • यश वा अपयश बहुधा मुळीच अवलंबून नसते; तर मुख्यतः तिच्या मौलिकसामर्थ्यावर अधिष्ठित असते, इतकेच येथे दाखवावयाचे आहे.

याच निबंधात ते मुसलमानांची आक्रमणे, त्यांनी मिळवेले विजय साधुसंतांचाही झालेला नामघोष आदी विविध उदाहरणे, घटना नमूद करीत ते सांगतात की... सहस्रावधी पुण्यपुरुष जी जपतप अनुष्ठानव्रतवैकल्यादी प्रकारांनी ईश्वरी कृपा संपादिण्यास्तव जी तपस्या करीत होते तीमुळे भगवंत प्रसन्न झाले. ते तशा अर्थाचे ईश्वरी अधिष्ठान मिळाले यास्तव ती चळवळ समय आणि यशस्वी ठरलो. अशा कोटिक्रमाने हिंदुपदपादशाहीस्तव आम्ही हि वीरांनी झुंजून तो जो जय मिळविला त्या जयाचाच नि त्या भुजीचाच पुरावा ज्या अर्थी हा ईश्वरी अधिष्ठानाच्या सिद्धान्तास देण्यात येतो त्या अर्थी त्याच कालच्या इतिहासाची छाननी करून आम्ही तो पुरावा किती लंगडा आहे हे दाखवू इच्छितो. .... यामुळेच ते अतिशय ठोसपणे सांगतात की, ....  ती हिंदुपदपादशाही त्या साधनांती किंवा तथा ईश्वरी अधिष्ठानाने जिंकली गेली नसून, तो भौतिक विजय, अशा स्वातंत्र्ययुद्धास जी भौतिक साधने संपादू शकतात तशा भौतिक साधनांनीच आम्हीही संपादू शकतो हे सिद्ध करण्यास त्या काळासारखे  दुसरे समर्पक उदाहरण सापडणे दुर्मिळ ... असे सांगत ते ज्ञानेश्वर, रामदेवराव, मुस्लीम आक्रमणे, ख्रिश्चनांची आक्रमणे, आदी अनेक प्रकारे त्यां त्या काळातील पद्धती, घटना, मुस्लीम वा ख्रिश्चन यांच्या धर्मातील तत्त्वे, उदाहणे सांगत धार्मिक कर्मकांडावर जोरदार प्रहार करतात. इतके सारे सांगितल्यानंतर तर्क- विज्ञाननिष्ठ विचार मांडत सावरकर निबंधाचा समारोप करीत जे सांगतात तेच नवकालाला अनुसरून मांडलेले सत्य...

ते म्हणतात. ...    दुर्बल पुण्याईही पंगू होय, हे विसरू नये. नुसत्या एकशेआठ तर काय पण अकराशेआठ सत्यनारा यणांच्या पूजा केल्या तरी ऐहिक यश मिळणार नाही. कारण ते चळवळीच्या भौतिक सामर्थ्यावरच काय ते अवलंबते ! असत्यनारायणाचे पूजकही ह्या  जगात वारंवार यशस्वी होतात. फार काय, सारे जग निर्देव करू निघालेला रशिया आज ऐहिक दृष्ट्या परम बलिष्ठ म्हणूनच यशस्वी झालेला आहे की नाही ? 'निर्देव' म्हणून त्याचे वैभव टिकणार नाही म्हणाल तर ते ‘सदेव' अशाही कोणाचे टिकले नाही ! ! श्रीकृष्णाची द्वारका समुद्रात बुडाली; प्रत्यक्ष मदिनेतील मशीद घोडशाळा बनली; 'जेहोवा 'चे सुवर्ण मंदिर तडकले; जीजसला रोमने फाशी दिले— क्रुसिफाय केले !   अस्पृश्यता काढता म्हणून बिहारचा भूकंप झाला ' म्हणणारा सनातनी समज आणि 'अस्पृश्यता ठेवता म्हणून तो भूकंप झाला' असे बजाविणारा सुधारकी ढोंगीपणा हा जितका खुळचट आहे तितकाच कोटी रामनाम जपाने वा निमाजपढाईने राष्ट्रावरील भौतिक सर्वारिष्ट शांत करू निघालेला भाबडेपणाही खुळचट आहे ! रामास हराम समजणारेही ऐहिक सामर्थ्यास संपादून वैज्ञानिक बळाने जे ऐहिक यश मिळवू शकतात ते ऐहिक यश ज्यास हवे, त्याने ते अद्ययावत वैज्ञानिक सामर्थ्य संपादावे. चळवळीत ते सामर्थ्य असले तर भगवंताच्या अधिष्ठानावाचून काही अडत नाही. ते सामर्थ्य नसले तर भगवंताच्या अधिष्ठानासाठी कोटी कोटी जप केले तरी ऐहिक यश मिळत नाही, हाच सिद्धान्त ! !

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हे विचार पाहाता, त्यानी दिलेले हे समाजशिक्षण व्यक्ती व्यक्ती लक्षात घेऊन व्यक्ती व्यक्तीला डोळस करण्याचा त्यांचा महायज्ञ होता. आता तो किती यशस्वी झाला, किती शिल्लक राहिला ते मात्र प्रत्येकाने आपापल्या व्यक्तीस्वातंत्र्याच्या अनुभवानेच ठरवावे किंबहुना इतका सुस्पष्ट संदेश मिळाल्यानंतर सावरकरांच्या या प्रक्रियेमुळे ‘ सर्व बिंदूंची मिळून बनलेलेी रेष केवळ लांबच नव्हे तर ठळकही तितकीच होऊ शकेल.’ त्यात असणारे मंथन व्यक्ती व्यक्तीला कसे पचते, कसे पटते ते झपाट्याने पुढे जाणाऱ्या कालानेच लक्षात येईल, अशी अपेक्षा आहे. धर्म, संस्कृती, यासंबंधातील सावरकरी विचारांचे बीज त्यांच्या याच सामाजिक, बौद्धिक, विज्ञाननिष्ठ आणि तार्किकतेतून उगवलेले आहे, हे लक्षात घेतले तरी खूप काही गवसले असे म्हणता येईल.

०००००००००००००००००००

विज्ञानऋषी सावरकर - १२

०००००००००००००००००००

खरा सनातन धर्म कोणता? या निबंधातून सावरकरांनी केलेला उहापोह आणि खरा सनातन धर्म कोणता याची केलेली उकल ही आजही प्रत्येकाने लक्षात घेण्यासारखी आहे. भोंदूपणा, आंधळी वा भाबडी श्रद्धा आणि यांचा फोलपणा त्यांनी उघड केला आहे. केवळ सनातन या शब्दाशी आज सर्वसाधारणपणे मान्य  असलेल्या हिंदू धर्माचाच नव्हे तर ख्रिश्चन, मुस्लीम या धर्मातीलही सनातनपणा नेमका काय आहे, ते सांगत सनातन धर्माचा बोध त्यांनी समाजाला करून दिला आहे. किंबहुना यामुळेच सुधारणेकडे पाहाण्याचा दृष्टिकोन क्रांतिकारक, सुधारणावादी, तर्कनिष्ठ आणि विशेष म्हणजे विज्ञाननिष्ठ असा आजही होऊ शकतो, जो स्वातंत्र्यवीर सावरकरांनी पन्नास वर्षांपूर्वीच स्वीकारला होता, अंगीकारला होता, समजवला होता. मात्र दुर्दैवाने आजही भारतातील हिंदुंसह अनेक धर्मीय; हे सावरकरांनी सांगितलेला ‘खरा सनातन धर्म’ स्वीकारण्यास नव्हे तर समजण्याच्याही निकषावर उतरलेले नाहीत. भले त्यांनी सावरकरांचा ‘हिंदुत्त्व’ हा शब्द जरी उच्चारला असला तरी त्याची लय मात्र पुरती घालवलेली आहे.


धर्माबाबत स्वातंत्र्यवीर सावरकरांनी नेमकी व्याख्या केलेली नाही. हिंदु धर्माची व्याख्या केलेली नाही असे काही कथित जाणत्यांकडून अनेकदा दावे केले जातात. हिंदुत्व सांगितले पण हिंदु धर्माची काही त्यांनी व्याख्या केलेली नसल्याचे हे तथाकथित जाणत्यांचे वा टीकाकारकांचे मत म्हणजे अल्पबुद्धीच. आपल्या निबंधांमधून सावरकरांनी सांगितलेली ईश्वराबद्दलची मते वा विश्लेषण असो की देव या संकल्पनेचे विवेचन असो. अध्यात्म, धर्म आणि विज्ञान या संबंधातील त्यांची मीमांसा ही आधुनिक विज्ञानऋषीची होती. हे विज्ञानऋषी ज्या काळात झाले त्या काळातील हिंदु, मुस्लीम, ख्रिश्चन समाजाची स्थितीही त्यांना अचूक कळलेली होती. इतकेच नव्हे तर काळाप्रमाणे अद्ययावत व्हा, असे स्पष्ट सांगण्याची त्यांची शैली ही देखील विवेचक, विश्लेषक आणि ठाम प्रतिपादन करणारी होती. धर्म आणि समाज यामधील सुधारणा किती महत्त्वाची आहे, हे मर्म त्यांनी ओळखले होते. त्यामुळेच राजकीय नेतृत्त्व करणाऱ्या या विज्ञानऋषी सावरकरांनी मांडलेली सूत्रे, प्रमेये ही ज्या काळात लिहिली गेली त्यानंतरच्या अनेक वर्षामध्येही ती तंतोतंत लागू पडू शकतील इतकेच नव्हे तर ऐहिक विकासाची गतीही त्या त्या काळात पकडू शकतील अशी त्यांची चौथी मितीही परिपूर्ण आहे. याचे कारण ती काळाप्रमाणे बदरलणारी, उत्क्रांत होणारी आहे.

खरा सनातन धर्म कोणता? या निबंधातून सावरकरांनी केलेला उहापोह आणि खरा सनातन धर्म कोणता याची केलेली उकल ही आजही प्रत्येकाने लक्षात घेण्यासारखी आहे. भोंदूपणा, आंधळी वा भाबडी श्रद्धा आणि यांचा फोलपणा त्यांनी उघड केला आहे. केवळ सनातन या शब्दाशी आज सर्वसाधारणपणे मान्य  असलेल्या हिंदू धर्माचाच नव्हे तर ख्रिश्चन, मुस्लीम या धर्मातीलही सनातनपणा नेमका काय आहे, ते सांगत सनातन धर्माचा बोध त्यांनी समाजाला करून दिला आहे. किंबहुना यामुळेच सुधारणेकडे पाहाण्याचा दृष्टिकोन क्रांतिकारक, सुधारणावादी, तर्कनिष्ठ आणि विशेष म्हणजे विज्ञाननिष्ठ असा आजही होऊ शकतो, जो स्वातंत्र्यवीर सावरकरांनी पन्नास वर्षांपूर्वीच स्वीकारला होता, अंगीकारला होता, समजवला होता. मात्र दुर्दैवाने आजही भारतातील हिंदुंसह अनेक धर्मीय; हे सावरकरांनी सांगितलेला ‘खरा सनातन धर्म’ स्वीकारण्यास नव्हे तर समजण्याच्याही निकषावर उतरलेले नाहीत. भले त्यांनी सावरकरांचा ‘हिंदुत्त्व’ हा शब्द जरी उच्चारला असला तरी त्याची लय मात्र पुरती घालवलेली आहे.

या निबंधात सनातनी आणि सुधारक याची व्य़ाख्याच प्रथम त्यांनी विश्लेषणाने सांगितली आहे. ते म्हणतात.... ज्या अर्थी आज ते शब्द योजले जातात ते अर्थ इतके विविध, विसंगत व परस्परविरुद्धही असतात की, ते आहेत तसेच स्वीकारणे अगदी अयुक्त व्हावे. श्रुति-स्मृतीपासून तो शनिमाहात्म्यापर्यंतच्या साऱ्या पोथ्या आणि वेदांच्या अपौरुषेयत्वापासून तो वांग्याच्या अभक्ष्यत्वापर्यंतचे सारे सिद्धान्त सनातन धर्म या एकाच पदवीस पोचलेले आहेत. उपनिषदांतील परब्रह्म स्वरूपाचे अत्युदार विचार हेही सनातन धर्मच आणि विस्तवापुढे पाय धरून शेक नये, कोवळ्या उन्हात बसू नये, लोखंडाचा विक्रय करणाऱ्यांचे अन्न कदापि खाऊ नये, रोगचिकित्सक वैद्यभूषणाचे अन्न तर घावातील पुवाप्रमाणे असून सावकारी करणाऱ्या, व्याजबट्टा घेणाऱ्या गृहस्थाचे अन्न विष्ठेप्रमाणे असल्यामुळे त्याच्या घरी वा सांगाती केव्हाही जेवू नये (मनु. ४- २२०); गोरसाचा खरवस, तांदुळाची खीर, वडे, घारगे खाणे निषिद्ध असून लसूण, कांदा आणि गाजर खाल्ल्याने तर द्विज तत्काल पतित होतो (पतेद्द्विजः । मनु ५ - १९); परंतु श्राद्धानिमित्त केलेले मांस जो कोणी हट्टाने खात नाही तो अभागी एकवीस जन्म पशुयोनी पावतो. (मनु ५-३५) नियुक्तस्तु यथान्यायं यो मांस नात्ति मानवः । स प्रेत्य पशुतां याति संभवानेकविंशतिम! !' हे सारे सनातन धर्मच...

अशी माहिती देत सावरकर यामधील विविध विसंगती विरोधाभासही कसा आहे ते सांगतात. ते म्हणतात....  ह्या अनेक प्रसंगी अगदी परस्परविरुद्ध असणाऱ्या विधिनिषेधांस आणि सिद्धान्तांस सनातन धर्म हाच शब्द लुंगेसुंगे भाबडे लोकच लावतात असे नसून आपल्या साया स्मृतिपुराणांतील सनातन धर्मग्रंथांतूनच ही परंपरा पाडलेली आहे. वरील प्रकारच्या सान्या मोठ्या, धाकटया, व्यापक, विक्षिप्त, शतावधानी, क्षणिक आचारविचारांच्या अनुष्टुपाच्या अंती अगदी ठसठशीतपणे ही एकच राजमुद्रा बहुधा ठोकून दिलेली असते की, 'एष धर्मस्सनातनः ! '

केवळ भारतातील या सनातनी धर्माचाच नव्हे तर अन्य जगभरातील स्थितीबद्दल ते भाष्य करतात. ते म्हणतात की....  आपल्या धर्मग्रंथांतच ही अशी खिचडी झालेली नसून जगातील इतर झाडून साऱ्या अपौरुषेय म्हणविणाऱ्या प्राचीन आणि अर्वाचीन धर्मग्रंथांची तीच स्थिती आहे. हजारो वर्षापूर्वीच्या मोसेस पैगंबरापासून तो अगदी आजकालच्या अमेरिकेतील मोर्मन पैगंबरापर्यंत सर्वांनी, मनुष्याच्या उठण्या बसण्यापासून, दाढी-मिश्या शेंडीच्या लांबीरुंदीपासून, वारसांच्या, दत्तकांच्या लग्नाच्या निर्बंधापासून तो देवाच्या स्वरूपापर्यंत आपल्या साऱ्या विधानांवर ‘एष धर्मस्सनातनः' हीच राजमुद्रा आणि तीही देवांच्या नावाने ठोकलेली आहे! हे सारे विधिनिषेध देवाने साऱ्या मानवांसाठी अपरिवर्तनीय धर्म म्हणून सांगितले आहेत ! सर्व मानवांनी सुंता केलीच पाहिजे हाही सनातन धर्म आणि वैवर्णिकांनी तसे भलतेसलते काहीएक न करता मुंजच करावी हाही सनातन धर्मच ! लाक्षणिक अर्थीच नव्हे तर अक्षरश: ह्या साऱ्या अपौरुषेय, ईश्वरी धर्मग्रंथांत एकाचे तोंड पूर्वेस तर एकाचे पश्चिमेस वळलेले आहे ! आणि तेही अगदी प्रार्थनेच्या पहिल्या पावलीच ! सकाळीच पूर्वेकडे तोंड करून प्रार्थना करणे हाही सनातन धर्म आणि सकाळी देखील प्रार्थना म्हटली की ती पश्चिमेकडेच तोंड करून केली पाहिजे हाही मनुष्य मात्राचा सनातन धर्मच ! एकाच देवाने मनूला ती पहिली आज्ञा दिली नि महंमदाला ही दुसरी दिली ! देवाची अगाध लीला; दुसरे काय !

सनातन धर्माबाबत अर्थ शोधाच्या संबंधात ते म्हणतात की... प्रथम त्याचा मूळचा व्यापक अर्थ नियम. कोणत्याही वस्तूच्या अस्ति त्वाचे नि व्यवहाराचे जो धारण, नियमन करतो तो त्या वस्तूचा धर्म. सृष्टीचे धर्म, पाण्याचे धर्म, अग्नीचे धर्म प्रभृती त्यांचे उपयोग ह्या व्यापक अर्थाच होतात. ... ह्याच व्यापक अर्थामुळे पारलौकिक आणि पारमार्थिक पदार्थाच्या नियमांसही धर्मच म्हणण्यात येऊ लागले. मग ते नियम प्रत्यक्षागत असोत वा तसे भासोत! स्वर्ग, नरक, पूर्वजन्म, पुनर्जन्म, ईश्वर, जीव, जगत यांचे परस्परसंबंध ह्या साऱ्यांचा समावेश धर्म या शब्दातच केला गेला. इतकेच नव्हे तर हळूहळू तो धर्म शब्द या त्याच्या पारलौकिक विभागाच विशेषेकरून राखून ठेवल्यासारखा झाला. आज धर्म शब्दाचा विशेष अर्थ असा हाच होतो, की या अर्थी धर्म म्हणजे रिलिजन' मनुष्याचे जे ऐहिक व्यवहार वरील पारलौकिक जगतात त्यास उपकारक ठरतीलसे वाटले, त्या पारलौकिक जीवनात त्याचे धारण करतील असे भासले, तेही धर्मच मानण्यात आले. इंग्लिशमध्ये मोसेस, अब्राहाम, महंमद प्रभृती पैगंबराच्या स्मृतीतही अशाच खच्चून असलेल्या साऱ्या कर्मकांडास  ‘लॉ’ असेच म्हटले आहे. या अर्थी धर्म म्हणजे आचार....

सनातन धर्म ह्याचा  आम्ही निश्चित केलेला अर्थ म्हणजे शाश्वत नियम, अपरिवर्तनीय, जे बदलू नयेत इतकेच नव्हे तर जे बदलणे मनुष्याच्या शक्तीच्या बाहेरची गोष्ट आहे असे अबाधित जे धर्म असतील, नियम असतील, त्यांसच सनातन धर्म ही पदवी यथार्थपणे देता येईल. हे लक्षण धर्माचा जो पहिला विभाग पाडलेला आहे त्या सृष्टिनियमांस तंतोतंत लागू पडते. प्रत्यक्ष अनुमान आणि त्यांना सर्वस्वी विरुद्ध न जाणारे आप्त वाक्य या प्रमाणांच्या आधारे सिद्ध होऊ शकणारे आणि ज्याविषयी कोणीही यथाशास्त्र प्रयोग केला असता त्या त्या कार्यकारणभावाच्या कसोटीस जे पूर्णपणे केव्हाही उतरू शकतात असे मनुष्याच्या ज्ञानाच्या आटोक्यात जे जे सृष्टिनियम आणि जी जी वैज्ञानिक सत्ये आज आलेली आहेत त्यास त्यासच आम्ही आमचा सनातन धर्म समजतो,.... असे स्पष्टपणे सावरकर सांगतात इतकेच नव्हे तर या सदर्भात जगातील विविध धर्म, त्यांचे धर्मग्रंथ यातील उदाहरणे देत, त्यामधील संगती आणि विसंगतीही स्पष्ट करीत इतिहासात भारतात झालेली विविध आक्रमणे स्पष्ट करीत त्यात हिंदुंना मिळालेले यशापयश यांचाही ताळमेल ते घेतात.  त्यानंतर या सनातन धर्मासंबंधा जे तात्पर्य सांगतात ते अतिशय महत्त्वाचे आहे. या तात्पर्यात ते म्हणतात की....  जे सृष्टिनियम विज्ञानास प्रत्यक्षनिष्ठ प्रयोगान्ती सर्वथैव अबाधित, शाश्वत, सनातन असे आढळून आले आहेत तेच काय ते खरे सनातन धर्म होत. ....  पारलौकिक वस्तुस्थितीचे असे प्रयोगसिद्ध ज्ञान आपणांस मुळीच झालेले नाही. यास्तव तो विषय अद्याप प्रयोगावस्थेत आहेसे समजून त्याविषयी अस्तिरूप वा नास्तिरूप काहीच मत करून घेणे अयुक्त आहे. त्या पारलौकिक प्रकरणी नाना क्लृप्ती सांगणारे कोणतेही धर्मग्रंथ अपौरुषेय वा ईश्वरदत्त नसून मनुष्यकृत वा मनुष्यस्फूर्त आहेत. त्यांच्या क्लृप्ती प्रमाणहीन असल्याने त्यांस सनातन धर्म, शाश्वत सत्य असे म्हणता येत नाही. .....  मनुष्याचे झाडून सारे ऐहिक व्यवहार, नीती, रीती, निर्बंध हे त्यास या जगात हितप्रद आहेत की नाहीत या प्रत्यक्षनिष्ठ कसोटीनेच ठरविले पाहिजेत, पाळले पाहिजेत, परिवर्तिले पाहिजेत. 'परिवर्तिनि संसारे' ते मानवी व्यवहारधर्म सनातन असणेच शक्य नाही, इष्ट नाही. महाभारता मध्ये म्हटले आहे तेच ठीक की, 'अतः प्रत्यक्षमार्गेण व्यवहारविधिं नयेत ।'

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे हे सारे दृष्टिकोन लक्षात घेतले, त्यातील परखडपणा लक्षात घेतला,. त्यातील त्यांची विज्ञाननिष्ठता पाहिली तर रत्नागिरीतील त्यांचे एकंदर हिंदुधर्मसुधारणेमधील कार्य केवळ धर्म सुधारणेचे नव्हे तर समाजसुधारणेचे, समाजातील व्यक्ती व्यक्तीमधील बुद्धि जागृत करून त्यांना विचारप्रवण करण्याचे होते, हेच सुस्पष्टपणे लक्षात येते. ते विचाराने विज्ञानऋषीच होते. त्यांच्या मनात हिंदु धर्मातील जातिभेद नष्ट करण्याचा, चातुर्वर्ण्य व्यवस्थेला संपवण्याचा असणारा विचार हा कोणत्याही धार्मिक श्रेष्ठत्त्वाला वा वर्णव्यवस्थेमधील ब्राह्मणांना वा उच्चवर्णीयांना स्थैर्य प्राप्त करून देण्याचा नव्हताच नव्हता. मात्र त्या संबंधात ज्या कोणी त्यांच्यावर दोष लावले होते, त्यांचे ते अज्ञान वा गैरसमज म्हणावे लागतील. केवळ हिंदूच नव्हे तर अन्य धर्मांसबंधातही त्यांनी सनातन धर्माची व्याख्या स्पष्ट करीत लोकांनी तारतम्याने विचार करीत, विज्ञाननिष्ठ होत, अद्ययावत म्हणजे कालानुसार मार्गक्रमण करावे, हेच त्यांचे सांगणे होते. त्यांच्या विचारांचे हे बीज लक्षात घेतले तरच त्यांच्या कार्याची महती समजू शकेल, मात्र त्यासाठी डोळ्यावर बांधलेली विविध स्वार्थी, राजकारणी, गटातटाची झापडे दूर करायला हवीत.

०००००००००००००००००००००००००००००००

गायीचे भाबडेपण हिंदु कधी सोडणार? - १३

०००००००००००००००००००००००००००००००

 गोमूत्र पिणे नि शेण खाणे हे पुण्य कसे ठरेल? आत्मशुद्धीचा संस्कार म्हणून, पवित्र म्हणून, जे पंचगव्य प्यायले जाते त्याचे समर्थन कसे होईल ! खरी गोष्ट मुळातच ही आहे की, ज्या भाबड्या प्रवृत्तीमुळे गायीसारख्या एका धादांत पशूंची एक देवता बनविली त्याच धर्मभोळ्या भाबडेपणाने तिचे गोखूर दाराशी काढणे शुभ मानणे, तिची शेपटी डोळ्यांवरून फिरविणे कल्याणकारक मानणे, तिला पूजणे धर्म मानणे आणि शेवटी वेडेचाराचा कळस होऊन तिचे शेण नि गोमूत्रही पवित्र ठरविणे, ते खाल्ल्याने नि प्याल्याने आत्मशुद्धी होते, पापक्षालन होते, अिहपरलोकी पुण्य लागते, इतका भाबडेपणा अतिरेकास गेला!  आपल्या थोर हिंदू संस्कृतीचे विडंबन जर कोणी करीत असेल तर ह्या आपल्या असल्या पुण्य म्हणून शेण खाणाऱ्या नि गोमूत्र पिणाऱ्या भाबड्या चाली होत.

धर्म, देव, ईश्वर या संबंधातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा दृष्टिकोन त्यांची भूमिका लक्षात आली की, त्यांचे प्रखर सुधारकी व्यक्तिमत्त्व लक्षात येते. धर्म, देव, ईश्वर या तीन घटकांबद्दल त्यांनी जे काही सांगितले आहे, त्यामागे समाज, माणूस हा अद्ययावत व्हावा, नवकालाला सामोरे जाताना त्याला अडचणी येऊ नयेत. त्यातही हिंदु समाजाला जागे करण्यासाठी त्यांनी सनातन्यांवर केलेली टीका, वेदादी ग्रंथाबद्दल आदर बाळगा पण तपोथिनिष्ठ न राहाता विज्ञाननिष्ठ व्हा हेच त्यांचे सतत सांगणे हिंदु समाजाला होते. केवळ हिंदुच नव्हेत तर भारतातील मुसलमानांबद्दलही जोरदार टीका करताना त्यांच्या धर्मवेडेवर त्यांनी गांभीर्याने प्रखर टीका केली. त्यांच्या पोथिनिष्ठतेबद्दलही त्यांना प्रचंड राग होता, तो याचसाठी कारण त्यामुळेच मुस्लीम समाजातील लोक त्यातील रुढी रिवाजांच्या आहारी गेले आणि साहजिकच हिंदुंवर अत्याचार करताना त्यांना त्या धार्मिक पोथीवादानेच अधिक आक्रमक करीत वेडे बनवले. या अनुषंगाने सावरकरांनी साततत्याने सप्रमाण ती बाब दाखवून दिली. हिंदु कोण हे स्पष्ट करताना आणि हिंदुत्त्व काय ते सांगतानाही त्यांची भूमिका ही याच प्रखर विज्ञाननिष्ठ, तर्कनिष्ठ आणि तत्त्वनिष्ठ अशीच होती. पण त्यांची भूमिका हिंदुंना समजून घेता आली नाही, तेथे अन्य समाजाची काय कथा?

राजकारण आणि मुस्लिमांसंबंधातील त्यांच्या लेखांचा- निबंधाचा आढावा घेण्यापूर्वी त्यांच्या सुधारकी सामाजिक दृष्टीवर प्रथम नजर टाकू. खरे म्हणजे त्यातूनही सावरकर बऱ्याच अंशी समजण्यास मदत होऊ शकेल. सैनिकीकरण, विज्ञान, यंतत्रयुग, औद्योगिकीकरण, जातिभेद, हिंदुंमधील सात बंद्या, गाय उपयुक्त पशू, संस्कृतीरक्षणाचा अर्थ, यज्ञसंस्था अशा विविध विषयांसंबंधात त्यांनी लिहिलेल्या विचारांमुळे सावरकरांचे विज्ञाननिष्ठ आणि व्यवहाराला, अद्ययावत होण्यासाठी सामोरे जाणारे व्यक्तिमत्त्व स्पष्ट होत जाते. खरे त्यांच्या या संबंधातील भूमिका या आजही किती भेदक आहेत, ते दिसून येते.

गायीवर त्यांनी लिहिलेला ‘गोपालन हवे, गोपूजन नव्हे’ हा निबंध आजही हिंदु समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन टाकणारा आहे. अर्थात त्यांच्या मताच्या आधारावर दुर्दैवाने काही लोक राजकीय स्वार्थासाठी वेगवेगळा अर्थही काढत आहेत, यातच आजच्या राजकीय व्यक्ती, संघटना आणि विचार यांची पात्रता समजू शकते. त्यांचे हिंदु समाजासंबंधातील तथाकथित प्रेम आणि  राजकारणही कळू शकते. त्यामुळेच त्या निबंधामधील काही विचार लक्षात घेणे गरजेचे आहे. त्यातून आजच्या राजकीय व्यक्तींची, पक्षांची दिशा आणि दशा लक्षात येऊ शकेल.

सावरकर म्हणतात...  गाय हा पशू हिंदूस्थानसारख्या कृषिप्रधान देशाला अत्यंत अपयुक्त असल्यामुळे अगदी वैदिक काळापासून आपणा हिंदू लोकांस तो आवडता असावा हे साहजिकच आहे. गायीसारखा वत्सल, माणसाळू, बापडा, सुरेख, दुधाळ पशू कोणास आवडणार नाही? आईच्या दुधाखालोखाल जिचे दूध आपल्या देशात तरी मुलास मानवते. मृगयाशील युग ओलांडण्याअितका सुधारताच त्या प्राचीन काळापासून मनुष्याची जी गाय आज युगानुयुगे अत्यंत प्रामाणिक सोबतीण झालेली आहे आणि शेतीचे खालोखाल जिच्या दूधदहीलोणीतुपावर मनुष्याचा पिंड आजही पोसला जात आहे, त्या अत्युपयुक्त पशूचे आम्हा मनुष्यास एखाद्या कुटुंबीयाइतके ममत्व वाटावे हे अगदी माणुसकीस घरूनच आहे. अशा त्या गाईचे रक्षण करणे, पालन करणे, हे आपले वैयक्तिक नि कौटुंबिकच नव्हे, तर आपल्या हिंदुस्थानपुरते तरी एक राष्ट्रीय कर्तव्यच आहे. ....

....   इतकेच नव्हे, तर जो प्राणी आपणांस इतका उपयुक्त आहे त्याविषयी मनात एक प्रकारची कृतज्ञ भावनाही उपजणे विशेषतः आपणा हिंदूंच्या भूतदयाशील स्वभावास, अगदी साजेसे आहे. आपणांस गाय ही अपयुक्त आहे म्हणून प्रिय वाटते ही गोष्ट इतकी निर्विवाद आहे की, जे गोभक्त तिला कृतज्ञतेच्या भरात देवी मानून तिला पूजतात, त्यास देखील ती पूजा योग्य आहे का, असे विचारताच, ते त्या पूजेच्या समर्थनार्थ गाय ही देवता ते आहे. इतकेच कारण सांगण्याच्या आधी चटकन ती गाय आपणास किती उपयुक्त आहे, हे सांगू लागतात. तिच्या दुधापासून तो शेणापर्यंतच्या सर्व पदार्थांचे मनुष्यास किती भिन्न भिन्न प्रकारचे ऐहिक अपयोग होतात, याचाच यथाप्रमाण वा अतिप्रमाण पाढा वाचू लागतात. अर्थातच, जे त्या गायीला देवता मानतात, ते देखील ती गाय मनुष्यास इहलोकी सुद्धा अपयुक्त आहे म्हणूनच देवता होय. मनुष्यास ती गाय सिंहासारखी जर या जगात खाधू लागती, दूध देऊन पोषणाच्या ठायी सापासारखेच विष दंशून ठार मारती, तर ती गाय आम्ही अशी देवता म्हणून मानली पूजलीच असती तरी कृतज्ञतेने नव्हे, मरीआओस पूजतो तशा त्रासिक भीतीने; हे सत्य ते गोपूजक गोभक्तदेखील कळत वा नकळत पण अपरिहार्यपणे मानून जातात. ....

स्वच्छता, तर्क आणि सर्वसामान्य नजरेतूनही ज्या अनेक बाबी दिसतात, ते लक्षात आणून देत सावरकरांनी गायीबद्दल अतिशय स्पष्ट सांगितले. इतकेच नव्हे तर त्याच अनुषंगाने माणसामाणसातील जातिभेदांची दाहकताही त्यांनी दाखवून दिली. त्यासाठी त्यांनी सांगितले की, .... गोठ्यात उभ्या उभ्या गवत कडबा खात असलेल्या, एकीकडे खाता खाताच उभ्या उभ्या दुसरीकडे मलमूत्रोत्सर्ग निःसंकोचपणे करणाऱ्या थकवा येताच रवंथ करीत त्याच मलमूत्रोत्सर्गात स्वेच्छ्या बैठक मारून बसणाऱ्या शेपटीच्या फटकाऱ्याने स्वतःच्या शेणमूत्राचा तो चिखल अंगभर अडवून घेणाऱ्या, दाते सुटून थोडा फेरफटका करण्याची संधी मिळताच अनेक समयी कोठेतरी जासून घाणीत तोंड घालणाऱ्या नि तसेच ओठ चाटीत गोठ्यात आणून बांधल्या जाणान्या त्या गायीस, शुद्ध नि निर्मळ वसने नेसलेल्या सोज्ज्वळ ब्राह्मणाने वा महिलेने हाती पूजापात्र घेऊन गोठ्यात पूजावयास जावे नि तिच्या शेपटीस स्पर्शन आपले सोवळे न विटाळता अल अधिक सोज्वळले आणि तिचे ते शेण नि ते मूत्र चांदीच्या पेल्यात घोळून पिताना आपले जीवन अधिक निर्मळले असे मानावे ते सोवळे की जे आंबेडकर महाशयांसारख्या महनीय स्वधर्म बंधूच्या श्रेष्ठ मनुष्याची सावली पडताच विटाळावे, ते ब्राह्मक्षात्र जीवन को जे तुकारामासारख्या संताच्या नुसत्या पंक्तीस बसून सत्त्वस्थ दहीभात खाल्ला असताही भ्रष्टावे! ते सोवळे नि ते ब्रह्मक्षात्र जीवन त्या गोठ्यातल्या अमंगळखाऊ गायीच्या मलमूत्रात लडबडलेल्या शेपटीस शिवता सोज्वळावे, गोमयगोमूत्र पिता निर्मळावे, पवित्रारखे!! पशु तो देव, देवासारखा माणूस तो पशू या दोन्ही रूढी धर्म निः सदाचार म्हणून अंकसमयीच अकच गौरविणाऱ्या वस्तुस्थितीतून धर्माचा छाप पडताच केवळ विसंगत मूर्खपणा, सुसंगत शहाणपणा, सच्छील पवित्रपणा वादू लागतो, मनुष्याची कशी बुद्धिहत्या होते, याचे आणखी दुसरे समर्पक उदाहरण ते कोणते द्यावे?...

इतिहासातील आक्रमणांचेही दाखले देत सावरकर सांगतात की,....  पशूला देवता मानल्याने माणुसकीसच हा जो असा कमीपणा येतो. तो नुसता तात्विक किंवा लाक्षणिकच असता तरीही या अतिरेकाचा अितका अनुष्टुप ओव्यांतून सांगत असताना स्वराष्ट्रहत्या हे त्याहूनही सहस्र पटीने महत्तर पाप आहे. प्रत्यक्ष या लोकीच त्या पापी मनुष्यास पंचवीत राहणारा महानरक आहे, हे विधान मात्र चुकूनही फारसे करीत नाहीत!! गाईला देवता मानण्याच्या यःकश्चितत एका देवलसी प्रवृत्तीचे परिणाम अितके भेसूर निः राष्ट्रहितघातक होतात हे केवळ अतिशयोक्त वर्णन आहे, असे सहजगत्या वाटणाऱ्या वाचकांनो, तुम्हाला हे ऐंकून आश्चर्य वाटेल की, गाय ही मनुष्यासाठी नसून मनुष्य हा गाईसाठी आहे ही भाबडी भावना गोपूजनाचा, गायीचे देवीकरण करून सोडण्याचा, अवश्यंभावी परिणाम आहे, हे नुसते तर्कट नसून आपल्या इतिहासात अनेक समयी तसे परिणाम प्रत्यक्षपणे पडलेले आहेत. गायीपायी हिंदू राष्ट्राच्याच पायात पारतंत्र्याची बेडी ठोकण्यासही हातभार लावण्यास ही भाबडी भावना नकळत मूर्खपणाने कचरली नाही. मुसलमानांच्या इतिहासातही  हिंदूंच्या या भाबडेपणाचा उल्लेख आहे. आपल्याही इतिहासकारांनी त्या घटना उल्लेखिलेल्या आहेत.

गाय ही उपयुक्त पशू आहे, हे सांगितले तरीही उपयुक्ततेच्या दृष्टीनेही गायीचे इतके स्तोम माजवणे चुकीचे असल्याचे सावरकर सांगतात. इतकेच नव्हे तर त्यादृष्टीनेही विविध उहादरणे प्राण्यांच्या संबंधातही देतात आणि राष्ट्राच्यादृष्टीने उपयुक्त असलेल्या, संरक्षणासाठी उपयुक्त असलेल्या प्राण्यांचेही महत्त्व कथन करतात. ते सांगतात की, .... उपयुक्त पशू आहे, यास्तव त्याची देवता कल्पून आपण हे सारे वेडेचार जे गायीच्या प्रकरणी करतो तेही निव्वळ बाष्कळपणाच, मूर्खपणाच म्हणावयास नको काय? घोडा, कुत्रा, गाढव ह्या उपयुक्त पशूंत गायीत आहेत ते वांच्छनीय गुण नसले, तर त्यांच्यात जे मनुष्यास अत्यंत आवश्यक गुण आहेत ते गायीत नाहीत. देवता कल्पून त्यांस पूजले नाही म्हणून काय त्यांची जोपासना कमी होते?

ते उपयुक्त पशू आहेत, ह्यामुळेच म्हैस, घोडा, कुत्रा यांची योग्य ती जोपासना जशी होतेच आहे, तशीच गायीचीही, तिला न मानले तरीही, तिच्या अपयुक्ततेच्या बळावरच होईल हे नक्की. इतकंच नव्हे, तर तिला देवता केल्यापेक्षा अधिक उपयुक्त प्रकारे आणि पशूस आवडेल अशा पशूच्या प्रमाणातच होऊन गोपूजनामुळे होणाऱ्या राष्ट्राच्या बुद्धिहत्येचे पापही टळेल. परंतु गोपालनाच्या इतके कर्तव्य नसून गोपूजन हा हिंदूंचा ‘धर्म’ आहे, ते ऐहिकच नसून पारलौकिक ‘पुण्य' आहे, ते अशा भाबड्या भावनेपायी आम्ही गायीस देखील नकोसे व्हावे असे तिचे कोण स्तोम माजवून ठेवले आहे पहा!....

गायीच्या पालनाबद्दलही जोरदार वाभाडेच सावरकरांनी काढले आहेत त्यामुळे गोपालनाच्या महत्त्वाबद्दल त्यांनी नवा दृष्टिकोनही ठेवला आहे. ते म्हणतात की.... गंगेस महापुरात साड्याचोळ्या आम्ही वहातोच की नाही! पण पोथीत तेवढे गळल्यामुळे देवब्राह्मणांसारखे ते वाढलेले केळीचे पान आम्ही गोमातेस पण गोठ्यातच नेअन नैवेद्य अर्पितो! पण तिला काही त्याची जाणीव? छट्, तिच्या पशुधर्माचा तो अक अपमानच वाटून की काय न जाणो-ती गाय प्रथम खीर, मग हळूच तूप ओतून वरणभात कालवून पान हलून न देता देवतेसारखी अनुक्रमे जेवायच्या ठायी, जिकडून लग्गा लागेल तिकडून जी जिभेचा लफ्फा मारते ती मीठ, खीर, भेंड्याची भाजी, वडा, कोशिंबीर, लाडू, वरण, सारे लपालप सापडेल तसे मचमचीत त्या साऱ्या सोज्वळ पदार्थांचे तिला हवे ते ओखटवाणी करून सोडते. केव्हा केव्हा तर भाताची मूद फोडून कालविण्याच्या आधीच ते हिरवेगार केळीचे पान पाहूनच तिच्या तोंडास अधिक लाळ सुटल्यामुळे पानच जिभेने अलटून ओरबाडून खाऊ लागते. पक्वान्न, आमटी, तूप सारे भुअीवर तिच्यापुढच्या शेणसड्यात सांडते! ... यापेक्षा सुग्रास मनुष्ययोग्य अन्न मनुष्यास तेवढे देअन पशूस प्रिय नि पशुयोग्य ते पंगतीतील अष्टे खरकटे, शिळेपाके तेवढेच ओखटवाणी घमेल्यात गायीपुढे ठेवून तिला जिभेचे लपके यथेच्छ मारू देण्यात तिलाही बरे, नि व्यर्थ जाणारे अष्टे कारणी लागल्याने मनुष्यासही बरे होईल, नव्हे काय? पशूइतकीच  नि पशूसारखीच जोपासना केल्याने गोपालन अधिक चांगले कसे होते त्याचे हे एक उदाहरण पुरे आहे.

अमेरिकेत गोपालनासाठी घेण्यात येणाऱ्या दक्षतेचे आणि वैज्ञानिक प्रयोगांचेही ते उदाहरण देतात. तेथील राने, गोचीड अंगावर नसणाऱ्या गायी आदींचेही ते योग्यवर्णन करीत महत्त्व पटवून देतात.  यामुळेच गोसंरक्षक संस्थांना त्यावेळीही त्यांनी कानमंत्र दिला होता, हे दिसते. त्यांची एकूणच गायी संबंधातील ही दृष्टी किती विज्ञाननिष्ठ आणि दूरगामी परिणाम पाहाणी होती, तेच यावरून दिसते. समाजाने डोळस व्हावे हे महत्त्वाचे हेच त्यांना सांगायचे होते. जे धर्मातील पोथ्यांनी नीट सांगितलेले नाही, असे ते तत्कालीन व्यवहारातील संगतीतून दाखवून देतात. ते म्हणतात... गायीस एक वेळ गोमाता म्हणा, लाक्षणिक अर्थी ते क्षणभर चालेल; पण ते अक्षरशः खरे मानणे, नव्हे; त्याहीपुढे जाऊन गायीचे देखील जे पदार्थ असेव्य मानायचे ते देखील गायीचे सेव्य मानून, पावन मानून, तिचे शेण नि गोमूत्र समारंभपूर्वक प्यायचे हा का आचार की अत्याचार !

गोमूत्र पिणे नि शेण खाणे हे पुण्य कसे ठरेल? आत्मशुद्धीचा संस्कार म्हणून, पवित्र म्हणून, जे पंचगव्य प्यायले जाते त्याचे समर्थन कसे होईल ! खरी गोष्ट मुळातच ही आहे की, ज्या भाबड्या प्रवृत्तीमुळे गायीसारख्या एका धादांत पशूंची एक देवता बनविली त्याच धर्मभोळ्या भाबडेपणाने तिचे गोखूर दाराशी काढणे शुभ मानणे, तिची शेपटी डोळ्यांवरून फिरविणे कल्याणकारक मानणे, तिला पूजणे धर्म मानणे आणि शेवटी वेडेचाराचा कळस होऊन तिचे शेण नि गोमूत्रही पवित्र ठरविणे, ते खाल्ल्याने नि प्याल्याने आत्मशुद्धी होते, पापक्षालन होते, अिहपरलोकी पुण्य लागते, इतका भाबडेपणा अतिरेकास गेला!  आपल्या थोर हिंदू संस्कृतीचे विडंबन जर कोणी करीत असेल तर ह्या आपल्या असल्या पुण्य म्हणून शेण खाणाऱ्या नि गोमूत्र पिणाऱ्या भाबड्या चाली होत. ह्या पोथीनिष्ठा, मूर्खपणाचा निषेध आमच्या सनातनी बंधूंनी ते विडंबन नको असल्यास करावा; तो मूर्खपणा आहे असे आपल्या लोकांस समजून सांगणाऱ्या आमच्या लेखाचा नव्हे!  सावरकरांना हा लेख- निबंध लिहिताने हे सांगावे लागले इतका त्यावेळचा हिंदु समाज हा पोथिनिष्ठ होता असे म्हणूून आज टीका करून विषय सोडून देण्यासारखा नक्कीच नाही, याचे कारण आजही सावरकरांच्या या दृष्टिकोनाला बाजूला सारून उजव्या पोथिनिष्ठांनी धर्मावडंबर माजवलेच आहे. त्यांच्या या धर्मावडंबरावर डावे पोथिनिष्ठ मात्र गोमूत्राचा- शेणाचा मारा हिंदु समाजावर करीत राजकारण साध्य करीत आहेत. ही स्थिती सुधारून सावरकरांच्या विचाराने प्रेरित झालेला विज्ञानवादी दृष्टिकोन हिंदु समाज आणि उजवे-डावे विचारसरणीचे हिंदूही स्वीकारतील तेव्हाच खर्या अर्थाने आजच्या नववर्षाचे स्वागत केल्यासारखे ठरेल इतकेच या निमित्ताने सांगावेसे वाटते.

००००००००००००००००००००००००००००००००

आपण सनातनी, अर्धसनातनी की अद्यतनी? - १४

००००००००००००००००००००००००००००००००

सुधारणांविषयी विज्ञाननिष्ठ आणि बुद्धिवादी भूमिकेतून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी निंबंध, लेख, भाषणे यामधून मांडलेली भूमिका ही मुद्देसूद पद्धतीने मांडली होती. त्यामधील एखादा विशिष्ट भाग सारांश पद्धतीने मांडायचा तरीही ते सोपे काम नाही, साखळीबद्ध अशी त्यांची ती मांडणी असल्यामुळे अनेकदा त्यांचे लेख, निबंध हे आकाराने मोठे असतात. किंबहुना यामुळेच ते संपूर्ण वाचणे उपयुक्त ठरते. तरीही प्रयत्नपूर्वक काही बाबी छोट्या छोट्या वाक्यांमध्ये देण्याचा प्रयत्न आता करणार आहे. याचे कारण त्यांनी मांडलेल्या विविध बाजू, विशिष्ट मुद्दे, घटक यांचे विश्लेषण करणे विचारी वाचकांनाही सोपे जाईल. सावरकरांच्या त्या त्या वाक्यामधून नेमके त्यांना काय सांगावयाचे आहे, त्याचा विचार आता लोकांनीही गांभीर्याने करण्याची वेळ आली आहे.

आजच्या सामाजिक क्रांतीचे सूत्र या निबंधामधून कट्टर सनातनी, अर्ध सनातनी, पंडित सातवळेकरांचे आक्षेप आणि त्याला दिलेले उत्तर इत्यादी मुद्दे मांडत त्यांनी हा निबंध अतिशय आशयपूर्ण आणि परखड विचाराने सादर केला आहे. त्यांनी केलेल्या मीमांसेत ते म्हणतात .... कट्टर सनातनी वर्ग आहे तो कोणतीही गोष्ट उपयुक्त आहे की नाही, त्यापेक्षा ती श्रुतिस्मृतिपुराणोक्त आहे की नाही, हा विचारणारा आहे.  त्यांच्या मते श्रुतिस्मृति पुराणोक्त असेल तर तो धर्म आणि नसेल तो अधर्म. त्याचप्रमाणे दुसरे गृहितक  असे की आज ज्य रुढी धर्म म्हणून बहुत काळ मांडलेल्या आहेत, त्या श्रुतिस्मृतिपुराणोक्त असल्याच पाहिजेत. कारण जे श्रुतीत तेच स्मृतिपुराणा शिष्टाचारात असणार कारण श्रुतिस्मृति पुराणे नि शिष्टाचार यात संपूर्णत: एकवाक्यताच आहे. प्रत्यक्ष अनुभवत या रुढी अत्यंत हानिकारक ठरत आहेत, हे सिद्ध करणाऱ्यास ते चक्क सांगतात की, तरीही शास्त्रात तसे आहे म्हणून ती रुढी आचरली पाहिजे, ...

अशा प्रकारे सावरकरांनी या कट्टर सनातनी वर्गाची स्थिती- मानसिकता स्पष्ट करीत त्यांच्या विचारांचे, वर्तनाचे चांगलेच वाभाडे काढले आहेत. त्यामुळेच सनातनींबद्दल व त्यांच्या रुढींबद्दल सनातनी काय म्हणतात, कसा विचार करतात, ते सांगताना सावरकर म्हणतात की.... आज आहे त्या श्रुतित न सापडली तर आज नाहीत त्या श्रृतित त्या असल्याच पाहिजेत. श्रुतित आहे म्हणून आजही रुढी धर्म्य आहे. इतकेच म्हणून हा धर्म थांबत नाही तर याही पुढे जाऊन तो म्हणतो- आज बहुत काळ ती धर्म्य म्हणून ज्या अर्थी आचरली जात आहेस रुढ आहे त्या अर्थी ती श्रुतीत असलीच पाहिजे... बालविवाह, पुनर्विवाहनिषेध, जन्मजात जातिभेद, जातिभेदातील पोटभेद, अस्पृश्यता, रोटीबंदी, बेटीबंदी, सिंधुबंदी, परदेशगमन निषेध आदी आज हानिकारक ठरत असणाऱ्या रुढींपासून तो बाळंतपूजेतील कातरीच्या पूजेपर्यंत नि प्रेतयात्रेतील तिरडीपासून ते भाड्याने आणलेल्या माणसांच्या उर पिटून रडण्यापर्यंत धर्म म्हमून आज मानल्या जाणाऱ्या सर्व संस्कारांचे नि रुढींचे हा वर्ग समर्थन करतो. आणि ते उपयुक्त वा अनुपयुक्त आहे हा मुख्य प्रश्न न विचारू देता ते संस्कार श्रुतिस्मृतिपुराणोक्त आहेत, म्हणून धर्म्य असलेच पाहिजेत, या मुख्य नि एकमेव आधाराने! यालाच ते शास्त्राधार म्हणतात आणि यालाच आम्ही आमच्या राष्ट्राची श्रुतिस्मृतिपुराणोक्त प्रवृत्ती म्हणतो....

सावरकरांनी केलेली ही मीमांसा वाचून त्यांचा दृष्टिकोन तर स्पष्ट होतोच. पण हे इथेच थांबत नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. आजही प्रत्येकाने यावर आजच्याच सामाजिक, राजकीय, धार्मिक वर्तनांबद्दल आणि विचारप्रणालींबद्दल गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे. किंबहुना यावरून समाजानेही आपण आता नेमके कोणत्या स्तरात आहोत, कोणत्या स्तरात असायला हवे, कसे वागायला हवे, काय वर्तन करायला हवे, विविध नेत्यांकडून काय अपेक्षा हव्यात याबदद्ल प्रश्न विचारले पाहिजेत. यातून विद्यमान समाजाने आपण सावरकरांच्या व्याख्येतील समाजात जगत आहोत का, याचाही विचार करून अद्ययावत व्हावयाचे असल्यास आपण पात्र आहोत की अपात्र ते ठरवायला हवे.

अर्धसनातनी वर्गावरही सावरकर टीकेचे फटकारे मारतात. ते म्हणतात की, प्रत्यक्षनिष्ठ, विज्ञानवादी नि अद्ययावत सुधारकांवरील आक्षेपकांपैकी दुसरा वर्ग अर्धसनातन्यांचा होय. आजच्या प्रगत जगाशी टक्कर देशून आपल्या हिन्दुराष्ट्रास असेल, तर धर्माच्या नावाखाली चालू असलेल्या वरील अनेक हानिकारक केल्याच पाहिजेत हे या वर्गास पटलेले असते. आजच्या जगाच्या प्रगतीचे त्याला बरेच ज्ञानही असते आणि आजच्या नव्यातील नव्या आपले राष्ट्रसज्ज असावे अशी त्यास अिच्छाही असते, पण ती श्रेष्ठ त्या शब्दनिष्ठ श्रुतिस्मृतिपुराणोक्त प्रवृत्तीचा सर्वस्वी त्याग केल्यावाचून, अवलंब केल्यावाचून, अद्ययावत 'अप-टू-डेट' अशा वैज्ञानिक प्रवृत्तीचा अवलंब केल्यावाचून अशक्य आहे हे मानण्याचे धाडस वा समजण्याचा विवेक त्यांच्यात पूर्णपणे बाणलेला नसतो. बुद्धी निः श्रद्धा, रूढिप्रियता आणि सुधारणा, जुने संस्कार नि नवे संस्कार यांचा सुसंगत समन्वय त्यांच्या मनात ठसलेला नसल्यामुळे ते धड अद्ययावत प्रवृतीचेही नसतात नि धड श्रुतिस्मृतिपुराणोक्त प्रवृत्तीचेही नसतात. श्रुतीपासून शनिमाहात्म्यापर्यंतचे सारे ग्रंथ एकवाक्यतेने एकच धर्म सांगतात, सारखेच प्रमाण आहेत, हे निव्वळ थोतांड आहे हे कळवण्याइतकी  त्यांची बुद्धी जागलेली असते. या कोणत्यातरी ग्रंथास अनुल्लंघ्य प्रमाण धर्मग्रंथ, शास्त्र म्हणून मानल्यावाचून कोणतातरी शास्त्राधार घेतल्यावाचून, त्यांच्या बुद्धीत केवळ स्वतःच्या बळावर त्या रूढीच्या वाटेस जावयाची धमक नसते.

अर्थात या दुसऱ्या प्रकारच्या अर्धसनातनींबद्दल सावरकरांना थोडीफार तरी अपेक्षा आहे. एकंदर सावरकरांनी आपल्या मूळ निबंधासंबंधातील आक्षेपांना दिलेली उत्तरे ही अतिशय चोख असून पंडित सातवळेकरांना ते अर्धसनातनींमध्ये मांडतात. त्यावरून त्यांनी त्यांच्या विविध आक्षेपांसबंधात दिलेली उत्तरे, तर्क हे वाचनीय आणि विचारनीय आहेत.

त्यांची अन्य काही उदाहरणेही तितकीच प्रभावी ठरतात. यज्ञसंस्थेवरही त्यांनी त्यावेळी केलेली खणखणीत टीका आजही अनेकदा लक्षात घेण्यासारखी आहे. ते म्हणतात...  ज्या हिंदुस्थानात सहस्रावधी वर्षे शतावधी यज्ञांतून नि अग्निहोत्रातून प्रत्यही खंडोगणती तूप जाळले जात आले आहे ती नि काही प्रमाणात तरी आजही जळत आहे ती 'यज्ञीय' आर्यभूमी हिवताप, महामारी, प्लेग, देवीप्रभृती झाडून साऱ्या रोगांच्या प्रात्यक्षिक अभ्यासासाठी राखून ठेवलेले जगातील पहिल्या प्रतीचे संग्रहालय बनलेली आहे आणि यज्ञात पळीभरदेखील तूप गेल्या हजारो वर्षांत न जाळणाऱ्या त्या यज्ञद्वेष्ट्या अनार्य युरोप-अमेरिकादि राष्ट्रांत आरोग्य नि आयुर्मान अतुलनीय उत्कर्ष पावत आहे हे काय यज्ञात तूप जाळणे हे आरोग्याचे अत्युत्कृष्ट अपरिहार्य नि दिव्य साधन आहे असे सिद्ध करते? बहिरोबापुढे बोकड मारले असता प्लेग हटतो, 'बाया' नाचविल्याने देवी हटतात, भडाभडा भाताचे बळी, मातंगीची पूजा करून तिला नाचवीत मिरवीत अर्पिले असता महामारी हटते आणि या जटिल कर्मकांडाच्या यज्ञीय भारुडात तूप ओतल्याने राष्ट्र निरोगी होते; मुक्त होते हे म्हणणे वैदिक असले तरी वैज्ञानिक दृष्टीने आज सारखेच हास्यास्पद ठरणारे आहे! ....

यज्ञसंस्थेवर टीका करताना प्राचीन काळाला हसण्याचे तितके कारण नाही, त्यावेळी असलेल्या मानवी ज्ञानाच्या आणि अनुभवाच्या मानाने या यज्ञासारख्या साधनांनी मोक्ष मिळतो, देवता ऐकतात हे वितचार तेव्हा पटत होते. त्या काळात या यज्ञसंस्थांनी राष्ट्राच्या एकीकरणाला हातभारच लावला होता, असे सावरकर सांगतात. म्हणजेच काळाच्यादृष्टीने विचार करण्यासाठी समाजाला जागृत करण्याचे आणि पर्यायाने धर्माधिष्ठित समाजाला जागे करण्याचे काम त्यांनी केले हे देशासाठी केलेले अतिशय मोलाचे कामच म्हणावे लागते. कारण विचारमंथन समाजाने करावे ही त्यांची असणारी यामागची धारणा सर्वात महत्त्वाची होती. यामुळेच सावरकरांचे द्रष्टेपण हे तात्कालिकही नसून ते विज्ञानवादी आणि बुद्धिवादी होते, बदल स्वीकारणारे होते हेच स्पष्ट होते. यावरून आजच्या काळात लोकांनी काय स्वीकारावे हे लोकांनाच ठरवायचे आहे. सावरकरांचा हा हिंदुधर्म भूमिनिष्ठ, विज्ञाननिष्ठ, बुद्धिवादी आणि कालातीतच ठरू शकतो तो यामुळेच. अर्थात त्यांच्या मार्गावरून चालण्यासाठी भावनिक नव्हे तर मनाची आणि बुद्धीचीही तयारी हवी. तूर्तास इतकेच!

००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००

स्वातंत्र्यवीर सावरकर .... भारतातील आधुनिक बुद्धिवादाचे जनक - १५

००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००

 बुद्धिवाद समाजामध्ये रुजविणे सोपे काम नाही. अतिशय कडवट अशा अंधश्रद्धेपासून सुरुवात केल्यानंतर बुद्धिवादाप्रत समाजाला नेणे हे सोपे नाही, ते दीर्घ आणि क्लीष्ट काम आहे. हे समाज सुधारणा करणाऱ्या व्यक्तीला नक्कीच ठावूक असते. अशा ध्येयाप्रत समाजाला नेण्यासाठी सावरकरांनी मांडलेली सूत्रे, धोरणे, केलेली घणाघाती टीका, धर्ममार्तंडांकडून होत असलेली मानहानी, अशा सर्व बाबी सोसून सावरकरांनी चक्क हिंदु धर्मातील चातुर्वर्ण्यालाही आव्हान दिले. हिंदुत्त्व हे पुस्तक लिहीत त्यांनी हिंदुत्त्वाच्या संकल्पना स्पष्ट केल्या. हिंदुत्वाला एक नवे परिमाण देण्याचा त्यांचा प्रयत्न होता. पण तो कितींना उमजला, कितींनी स्वीकारला ते त्या काळातील समाजबुद्धीनुसार पाहिले तरी चांगला परिणाम त्यांनी साध्य केला होता, असे विद्यमान काळाच्या तुलनेतही म्हणता येईल.   मात्र आजच्या विद्यमान काळात त्यांच्या हिंदुत्त्वाचा अर्थच काहींनी बदलून बुद्धिहीन, तत्त्वहीन आणि तर्कहीन हिंदुत्त्व स्वीकारले आहे.

 

अनेकांना स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या नेमक्या व्यक्तिमत्त्वाविषयीच शंका येते.  विज्ञानवादी, बुद्धिवादी, हिंदुत्ववादी अशा तीन दृष्टिकोनातून सावरकरांकडे पाहिले जाते. वास्तविक या तीनही घटकांचा एक समन्वय साधून त्यांचे राष्ट्रसुधारकाचे, मानवी समाज सुधारणेचे आणि हिंदु समाजाला स्वभूमिनिष्ठ करण्याचे तंत्र सांगणारे व्यक्तिमत्त्व घडले आहे, हे व्यक्तिमत्त्व विज्ञानवादी, बुद्धिवादी, हिंदुत्ववादी असे समन्वय साधलेले भविष्यसूचक, क्रांतिकारक आहे. खरे म्हणजे त्यांच्या या व्यक्तिमत्त्वासारखे व्यक्तिमत्त्व युरोपातील एखाद्या देशात निर्माण झाले असते, तर तेथील लोकांनी सावरकर हे नाव डोक्यावर धरले असते. मात्र सावरकर यांच्या द्रष्टेपणाची, समाजसुधारक बुद्धिवादी व्यक्तिमत्त्वाची किंमत भारतातील ना धर्मनिरपेक्ष म्हणवणाऱ्यांना समजली ना तथाकथित हिंदुत्त्ववाद्यांना समजली ना अल्पसंख्य असूनही मनमानी पद्धतीने राजकीय फायदे उठवीत मुस्लीमांसाठी स्वतंत्र राष्ट्राची मागणी करणाऱ्या आणि ती मान्य करणाऱ्यांनाही समजली नाही, हे खरे म्हणजे अखंड भारताचे दुर्दैव म्हणावे लागेल. 

भारतामध्ये बुद्धिवादी व्यक्तिमत्त्वे निर्माण झाली, त्यांची संख्या तशी पाहावयास गेले तर कमी नाहीत. मात्र धर्म, विज्ञान, उपयुक्तता आणि मानवी समाजरचना यांची सांगड घालून संपूर्ण समाजाला अद्ययावत करू पाहाणारा नेता मात्र केवळ सावरकर व्हावेत, हे लक्षात न घेण्यासारखा करंटेपणा नाही. आजही सावरकरांवर अघटित आरोप ठेवणारे, त्यांच्या नावाचा वापर करून आपल्या धोरणाचे घोडे दामटणारे महाभाग निपजू शकतात, हे पाहाता आता सावरकरांच्या या विज्ञानवादी, बुद्धिवादी, हिंदुत्ववादी व्यक्तिमत्त्वाची किमान ओळख तरी करून घेणे गरजेचे आहे. सावरकरांपूर्वी गोपाळ गणेश आगरकरांसारख्या बुद्धिवादी व्यक्तीने आपल्या वयाच्या अवघ्या ३९ व्या वर्षी  या जगाचा निरोप घेतला मात्र तोपर्यंत त्यांनी समाजाची मानसिकता सुधारम्यासाठी केलेली धडपड, केलेले लिखाण आजही तितकेच गरजेचे आहे. हर्बर्ट स्पेन्सरसारख्या पाश्चात्य बुद्धिवादी आणि समाजशास्त्रज्ञाचा प्रभाव आगरकर आणि सावरकर या दोहोंवर असलेला दिसून येतो. त्यामुळेच विज्ञानवादी, बुद्धिवादी, हिंदुत्ववादी असलेल्या सावरकरांनी धर्मसंस्थेचा परिपूर्ण विचार करूनच आपले विज्ञाननिष्ठ बुद्धिवादी विचार मांडून समाजाला जागवण्याचा प्रयत्न केला. मात्र मानवी मनातून धर्मसंस्था संपणे सोपे नाही हे जसे स्पेन्सरना कळून चुकले होते, तसेच सावरकरांनाही पुरते उमजलेले होते. यामुळेच वस्तुस्थितीची  जाण ठेवूनच मनात आणि व्यवहारात असणारी धर्मशक्ती  सावरकरांनी अचूक ओळखली होती. बुद्धिवादाने या धर्मशक्तीला जाणले असले तरी सावरकरांनी मात्र या धर्मशक्तीला विज्ञानवादी निकष लावण्याचे आव्हान ठेवत, समाजाला नवीन कालाला सामोरे जाण्यासाठी प्रयत्शील करण्यास उद्युक्त केले. अर्थात त्यांनी त्यासाठी हिंदु धर्माच्या, संप्रदायांच्या तसेच या भारतभूमिवर जन्माला आलेल्या धर्म, तत्त्वज्ञान, गुरू, तत्त्ववेत्ते यांचाही मागोवा घेत विज्ञानवादी दृष्टीने धर्माची बैठक पक्की करण्यासाठी प्रयत्न केले गेले. इतकेच नव्हे तर हे करताना मुस्लीम धर्माचा भारतातील एकंदर वाटचालीचा आढावा घेत, त्या धर्मातील रचना, त्यांचे परधर्मासंबंधात असणारे मत, त्यांच्याकडून हिंदूधर्मीयांवर झालेले अत्याचार हे लक्षात घेत, ते स्पष्ट करीत ते दाखवून देत मुस्लीम समाजालाही पोथिनिष्ठता सोडून देण्याचा इशारा दिला. 

हे सांगण्याचे कारण म्हणजे बुद्धिवाद समाजामध्ये रुजविणे सोपे काम नाही. अतिशय कडवट अशा अंधश्रद्धेपासून सुरुवात केल्यानंतर बुद्धिवादाप्रत समाजाला नेणे हे सोपे नाही, ते दीर्घ आणि क्लीष्ट काम आहे. हे समाज सुधारणा करणाऱ्या व्यक्तीला नक्कीच ठावूक असते. अशा ध्येाप्रत समाजाला नेण्यासाठी सावरकरांनी मांडलेली सूत्रे, धोरणे, केलेली घणाघाती टीका, धर्ममार्तंडांकडून होत असलेली मानहानी, अशा सर्व बाबी सोसून सावरकरांनी चक्क हिंदु धर्मातील चातुर्वर्ण्यालाही आव्हान दिले. अस्पृश्यतेच्या निवारणासाठी त्यांनी रत्नागिरीसारख्या ठिकाणाहूनही केलेली कामगिरी साऱ्या देशातही बऱ्यापैकी पोहोचली होती. पण त्याही पेक्षा कोणत्याही राजकीय पाठिंब्याविना आणि तत्कालीन समाजाच्या अतिधर्मिष्ठ रिवाजांना बाजूला करण्याचे मोठे कामही त्यांनी केले होते. ते करताना हिंदुत्त्व हे पुस्तक लिहीत त्यांनी हिंदुत्त्वाच्या संकल्पना स्पष्ट केल्या. हिंदुत्वाला एक नवे परिमाण देण्याचा त्यांचा प्रयत्न होता. पण तो कितींना उमजला, कितींनी स्वीकारला ते त्या काळातील समाजबुद्धीनुसार पाहिले तरी चांगला परिणाम त्यांनी साध्य केला होता, असे विद्यमान काळाच्या तुलनेतही म्हणता येईल.   मात्र आजच्या विद्यमान काळात त्यांच्या हिंदुत्त्वाचा अर्थच काहींनी बदलून बुद्धिहीन, तत्त्वहीन आणि तर्कहीन हिंदुत्त्व स्वीकारले आहे. हे विद्यमान  बुद्धिहीन, तत्त्वहीन आणि तर्कहीन हिंदुत्त्व ज्यावेळी बाजूला सारून हजारो वर्षांपूर्वीच्या हिंदु धर्माच्या सनातनी वा वैदिक धर्माची पोथिनिष्ठता दूर केली जाईल, तेव्हाच खऱ्या अर्थाने सावरकरांची बुद्विवादी, विज्ञानवादी हिंदुत्त्वाची बैठक पक्की होण्यास सुरुवात होऊ शकेल. भविष्यातील हिंदुराष्ट्र म्हणजे या विज्ञानवादी समाजाचाच पाया असेल हे जेव्हा स्पष्टपणे लोकांना कळेल तेव्हा कदाचित अहिंदुंनाही त्याच मार्गाने जावेसे वाटू शकेल. अन्यथा केवळ साक्षरांचे राज्य इतकेच भारतीय बुद्धिवादी वाटचालीचे फलित असेल.

०००००००००००००००००००००००००००००

बुद्विवाद, व्यक्तिस्वातंत्र्य आणि हिंदुत्त्व - १६

०००००००००००००००००००००००००००००


केवळ हिंदुंनीच नव्हे तर मुस्लीम समाजाचा आक्रमकतेचा इतिहास लक्षात घेऊनही त्यांनी पोथिनिष्ठता बाजूला सारून विज्ञानवादाला जवळ करून विचार करावा, असे स्वातंत्र्यवीरांनी सांगूनही भारतातील या दोन्ही समाजांनी फाळणीची बीजे स्वीकारली. त्यामुळे देश, भूमी, मन, तत्त्वज्ञान यांच्या फाळणीलाही स्वीकारावे लागले. इतकेच नव्हे तर मानवी बौद्धिक, लौकिक आणि सामाजिक विकासालाही मुकावे लागले.

बुद्धीनेच सत्यज्ञान प्राप्त होते, बुद्धी हाच ज्ञानाचा एकमेव मार्ग आहे, असा सिद्धान्त मांडणारी विचारसरणी म्हणजे 'बुद्धिवाद' होय. जे तत्त्ववेत्ते बुद्धिवाद स्वीकारतात ते बुद्धिवादी (Rationalist) मैनले जातात.  बुद्धिवाद वा पर्यायी शब्द म्हणजे विवेकवाद असा घेता येऊ शकेल.   बुद्धीला 'प्रज्ञा' असा अधिक प्रौढ शब्द वापरला जातो, त्यानुसार 'प्रज्ञा' हा ज्ञानाचा मार्ग आहे, असे समजणारी विचारसरणी म्हणजे 'प्रज्ञावाद' (Rationalism), अर्थात विवेकवाद असा म्हणता येईल. साधारणपणे बुद्धिवादाच्या या व्याख्येचा विचार केला तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी हिंदुत्वाला नव्या युगातील तात्विकताच प्राप्त करून दिली, मात्र ती दुर्दैवाने काही काही लोकांनी, गटांनी आपल्या सोयीप्रमाणे वापरली किंवा त्यांना सावरकरांच्या या तात्विकतेचे आकलनच झाले नाही. त्यामुळेच भारतातील हिंदु आणि हिंदुत्व या संकल्पनेबद्दल आजही अनेक बाजू मांडल्या गेल्या.

हत्ती म्हणजे काय, हे जन्मांधांनी कसे सांगितले, त्याचा दृष्टांत चक्रधर स्वामींनी कथन केला. ती गोष्ट त्यांच्या शिष्याने लिहिली आहे.   त्यानुसार एका गावात आलेल्या हत्तीला पाहाण्यासाठी लोक जमले. त्यावेळी तेथे जन्मापासून अंध असलेल्या व्यक्ती तेथे गेल्या असताना प्रत्येकाने हत्तीला केलेल्या स्पर्शानुसार हत्ती कसा असेल ते सांगितले. त्यामध्ये त्या जन्मांधानी स्पर्शाने हत्तीचा पाय अनुभवला त्यांना हत्ती खांबासारखा वाटला, ज्यांनी सोंडेला स्पर्श केला त्यांना मुसळासारखा वाटला हत्तीच्या कानाला स्पर्श केल्यानंतर सुपासारखा प्राणी असणारा तो हत्ती, असे एका जन्मांधाने सांगितले. तर हत्तीची पाठ ज्याच्या हाताला लागली त्याला भिंतीसारखा प्राणी वाटला तर शूपट ज्याच्या हाताने धरली त्याला तो हत्ती खराट्यासारखा लागला.... एकंदर या सर्व जन्मांध व्यक्तींमध्ये या हत्तीच्या असण्यावरून - अस्तित्त्वावरून वाद सुरू झाले तेव्हा एका डोळस व्यक्तीने समजूत काढणी आणि तुम्ही जो भाग म्हणजे हत्तीचा एक एक अवयव सांगत आहात तो हत्ती नसून ते सर्व अवयव मिळून असणारा प्राणी म्हणजे हत्ती आहे, असे सांगितले. यामध्ये डोळस असणारी व्यक्ती केवळ डोळे असणारी नाही, बुद्धी असणारीही आहे, तसेच सावरकर आहेत. त्यांनी हिंदु या शब्दाचा, संकल्पनेचा सांगितलेला अर्थ भरतखंडातील जन्मलेल्या सर्व हिंदु अवयवांना म्हणजेच विविध पंथ. गट, तत्त्ववादी, धर्म यांचे अस्तित्व आसिंधु सिंधुपर्यंत आहे. अशा या हिंदुत्वाचे स्वरूप राष्ट्रीयत्त्वाच्या निकषाने स्पष्ट केले. हे सर्व करताना पूर्वीच्या सर्व पोथिनिष्ठ विचारसरणीला बाजूला सारून विज्ञाननिष्ठ आणि बुद्धिप्रामाण्याने रितीरिवाज, परंपरा स्वीकारण्याचे लोकांना आवाहन केले. हे करीत असताना, प्रत्येकाने बुद्धीवादाने विचार करण्यास तयार होण्यासाठी सावरकरांनी इतिहासालाही वास्तवतेने मांडून विद्यमान हिंदुंना त्यांचे हिंदुत्त्व म्हणजे काय ते समजून घेण्यास सांगितले. ऐहिक वा व्यावहारिक, उपयुक्ततावादी जीवनशैली स्वीकारणाऱ्या समाजाला गतकालातील अंधत्वाने स्वीकारलेल्या पोथिनिष्ठतेमधून बाहेर येण्यासाठी विज्ञानवादी होण्यास ते सांगतात. 

इतिहासावरील सहा सोनेरी पाने या ग्रंथात स्वातंत्र्यवीर सावरकर इतिहासाचीही समीक्षा करतात. त्यात सद्गुणविकृति असे प्रकरण लिहिले आहे. त्यात त्यांनी सद्गुणाचा वापर करताना जर त्यावेळी देशकालादीबाबींचा विचार केला गेला नाही तर तो सद्गुण नव्हे तर दुर्गुण कसा ठरतो, आपल्याच अध:पतनास कारण कसा होतो ते सांगितले आहे. माणसाच्या ठायी असलेल्या गुणावगुणाची मीमांसाच त्यांनी त्यात केलेली आहे. त्यांचा त्या सांगण्यामधील चोखपणा इतका परखड आहे तरीही आज हिंदुंनी खऱ्या हिंदुत्वाचा मागही घेतलेला नाही, असे म्हणावे लागते. मुळात सावरकरांचा हा दृष्टीकोन बुद्धिवादाच्या मुशीतूनच निर्माण झाला आहे आणि त्यासाठी विज्ञानवाद, उपयुक्ततावाद, याचाही आधार घेत ते अशा बुद्धिहीन सद्गुणाचे तुकडे करतात. त्यांची ही दृष्टी ही त्यावेळीही क्रांतिकारक होती आणि आजही ती स्वीकारली तरी क्रांतिकारक आहे, अशी स्थिती सध्याच्या हिंदुत्वाच्या आणि एकंदर विविध धर्मांच्या पोथिनिष्ठेच्या अतिरेकामुळे मानवी समाजालाच जिवंतपणे भाजणारी ठरत आहे. केवळ बाबा वाक्यंप्रमाणम वा श्रुतिस्मृतिपुराणोक्त किंवा आमचे धर्मगुरू - नेते सांगतात म्हणून ते योग्य असे मानणारे महाभाग आजही असल्यानेच स्वातंत्र्याचे ७५ वर्ष असूनही सामाजिक स्थिती तीच आहे. मग तो भारत असो वा फाळणी होऊन तुटलेला भारताचाच भाग असलेला पाकिस्तान असो. कालानुसार बदलण्याची, वागण्याची भाषा करीत अद्ययावत राहा असे सांगणे सावरकरांसारखा महापुरुषच सांगू शकतो.

स्वातंत्र्यवीरांनी हिंदुंच्या पोथिवादी आणि पारंपरिकतेने उदात्त मानलेल्या मूल्यांवर आघात केला आहे, ते स्वीकारण्यास किती हिंदुंचे मन तयार होते आणि आहे आणि राहील हाच खरा कूट प्रश्न आहे. याचे कारण बुद्धिवादामुळे प्रत्येक मनुष्याला विचार करून एखादी गोष्ट का वाईट आणि का चांगली हे ठरवावी लागते तेव्हा त्याला त्यात वेळ घालवण्यासारखे वाटते. त्यामुळे त्याच्यावर स्वनिर्णय स्वीकारल्यानंतर येणारी जबाबदारी पत्करण्यासाठी आधार लागत असतो, तो सुखासुखी त्याला हवा असतो, त्यावेळी पोथिनिष्ठ राहात, रितीरिवाज पाळत असल्याचे सांगणे त्याला सोयीचे व सोपे असते. मात्र धर्मातील ही पोथिनिष्ठा ज्या बाबींचे उदात्तीकरण करून स्पष्ट केलेली असते, किंवा ती उदात्तमूल्यावरील पोथिनिष्ठा कशी वाईट  आहे, म्हणून मी ती नाकारतो, असे सांगण्यासाठी त्या त्या व्यक्तीला बुद्धिवादाला स्वीकारावे लागते, सामोरे जावे लागते. अशावेळी त्यात त्याला तसे करणे त्रासदायी होत असते. त्यासाठीच समाजाच्या या पोथिवादी भूमिकेला पुढे करणे अधिक सोपे वाटत असते. अर्थात असे असले तरीही स्वातंत्र्याचे फायदे हवे असतात. यामुळेच होते काय की सावरकरांसारख्या बुद्धिवादी वृत्तीला जोपासण्याऐवजी शॉर्टकट वा सोयीचा मार्ग सोपा असे म्हणत व्यक्तिस्वातंत्र्याला प्रगल्भ करणाऱ्या बुद्धिवादालाच समाज बाजूला करतो. याचे परिणाम ना त्याच्या धर्माची एकजूट होत, ना त्याचा व्यक्तीवाद वा व्यक्तिस्वातंत्र्य किंवा बुद्धिवाद प्रगल्भ बनत.  मात्र यामुळे स्वविचारांऐवजी दुसऱ्यांच्या मतावर अवलंबून राहाण्याची मानसिकता बळावते.

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदु समाजाची हीच मानसिकता बदलण्यासाठी आणि हिंदुंना स्वविचाराने प्रगल्भ होण्यासाठी व्यक्तिवादी बुद्धिवादी बनवण्याची धडपड केली, दिशा दिली. पण लोकप्रियतेची कसलीही पर्वा न करता सुयोग्य दिग्दर्शन करणाऱ्या सावरकरांना हिंदुंनी मात्र समजून न घेता स्वत:च्या अस्तित्त्वावर, सांघिकपणाच्या अतिरेकाने तर कधी आत्यंतिक अहिंसेच्या तत्त्वज्ञानावर भाळून तर कधी सत्ताधार्जीण्या वा सत्तापिपासूंवर अवलंबून राहण्याचा करंटेपणा केला. केवळ हिंदुंनीच नव्हे तर मुस्लीम समाजाचा आक्रमकतेचा इतिहास लक्षात घेऊनही त्यांनी पोथिनिष्ठता बाजूला सारून विज्ञानवादाला जवळ करून विचार करावा, असे स्वातंत्र्यवीरांनी सांगूनही भारतातील या दोन्ही समाजांनी फाळणीची बीजे स्वीकारली. त्यामुळे देश, भूमी, मन, तत्त्वज्ञान यांच्या फाळणीलाही स्वीकारावे लागले. इतकेच नव्हे तर मानवी बौद्धिक, लौकिक आणि सामाजिक विकासालाही मुकावे लागले. आज जो केवळ दिसत आहे तो विकत घेतलेल्या सुविधांचा विकास. पण या व्यक्तिकेंद्रीत आणि बुद्धिवाद विरहीत विकासामुळे भारतीय वंश मात्र पणालाच लागलेला आहे.

०००००००००० ०००००००००० ०००००००००० ०००००००००० ०००००००००० ००

ईषप्रणीत ग्रंथ-धर्म आणि त्यातील विसंगती दर्शवणारे दार्शनिक सावरकर! - १७  ०००००००००० ०००००००००० ०००००००००० ०००००००००० ०००००००००० ००

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या या विवेचक अशा परिच्छेदातूनच त्यांनी धर्मग्रंथ यांचे व्यवच्छेदक विश्लेषण केले आहे. किंबहुना या विषयावरील त्यांच्या निबंधांमधून, विचारांमधून सावरकर यांना अपेक्षित असणारा हिंदू हा नव्या युगाचा डोळस आणि विज्ञाननिष्ठ व्यक्ती आहे. केवळ हिंदूंनाच नव्हे तर मुसलमानांचे आणि विशेष करून भारतीय मुसलमानांचेही डोळे उघडावेत यासाठी त्यांनी मुस्लीम धर्म, त्यातील पंथ, त्यातील मतमतांतरे आणि त्यातील अतार्किकता या सर्व बाबी सांगताना त्यांनी तुर्कस्तानातील मुसलमानी राजवटीने केमाल पाशाने केलेल्या बदलाची माहिती देत भारतीय मुस्लीमांनीही तो मार्ग अनुसरावा आणि नव्या काळाला सामोरे जावे, त्यासाठी पोथिनिष्ठा सोडावी असे सविस्तरपणे आणि विवेचक पद्धतीने सांगितले आहे.

भारताला राष्ट्र हा दर्जा खऱ्या अर्थाने मिळावा, भारतीयांना राष्ट्र या संकल्पनेचा योग्य आणि अचूक अर्थ समजून नवीन काळानुसार विज्ञानिष्ठपणे भारतीयांनी वाटचाल केली पाहिजे, यावर स्वातंत्र्यवीर सावरकर अधिक  संवेदनशीलपणे तसेच वास्तववादी पद्धतीने विचार करीत होते. हिंदुस्थान म्हणण्यामागे त्यांचा असणारा हिंदुराष्ट्र या संकल्पनेचा अर्थ फार वेगळा आणि सामर्थ्यशाली आहे. केवळ हिंदुंसाठी हिंदुराष्ट्र ितकाच त्याचा अर्थ नाही. यामुळेच सावरकरांनी हिंदु या शब्दाला आणि अहिंदु या संकल्पनेला दिलेला अर्थ नीटपणे समजून घ्यायची गरज आहे. भारतातील हिंदु समाजाला जागृत करायचे आहे, तो हिंदु समाज वा तो हिंदु जो स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिप्रेत होता, तो एका दिवसात बदलणारा नाही, एका दिवसात तो काही विज्ञाननिष्ठ होणार नाही, याची त्यांनाही पुरेपूर कल्पना होती. मात्र एखाद्या शिक्षकाप्रमाणे, मार्गदर्शक दीपस्तंभाप्रमाणे त्यांनी हिंदुंना शिकवीत, संघटित ठेवीत आणि हिंदुंसाठी असलेल्या तार्किक आणि तात्विक हिंदुभूमीला कायम जपले आणि जपण्यास प्रवृत्त करीत त्यांनी लोकांनाही उद्युक्त केले.

धर्म या शब्दाचा अर्थ त्यांनी अतिशय अचूकपणे ओळखला होता, त्यामुळेच नव्या युगाला साजेसे जगण्यासाठी आणि त्यादृष्टीने येत असलेल्या आव्हानांनाही तोंड देण्यासाठी ‘श्रुतिस्मृतिपुराणोक्त’पणा सोडण्याचा कायम आग्रह धरला. यातून त्यांनी केलेला धर्म या संकल्पनेचा सखोल अभ्यास केला. मुस्लीम धर्म, त्यातील कल्पना, नियम- रितीरिवाज, कुराण, त्यातील विविध भाग तसेच मुस्लीमांचे विविध पंथ इतकेच नव्हे तर ख्रिश्चन धर्म  आणि जगातील अन्य धर्म - पंथ यांचीही माहिती देत त्यांनी चिकित्सा केली. हे सर्व करीत असताना विशेष म्हणजे सर्व धर्मांबद्दल एकाच तराजूने मापदंड करीत न्याय केला. प्रत्येक धर्म आणि त्यांचे धर्मग्रंथ याबद्दल केलेली मीमांसा, विश्लेषण हे परखडपणे करीत विज्ञानबळावर त्यांनी भर दिला. जात्युच्छेदक निबंधामध्ये त्यांनी ‘ मुसलमानांमधील पंथोपंथांचा परिचय’  या निबंधात त्यांनी म्हटले आहे की,...   वेद, अवेस्ता, कुराण, बायबल हे ईश्वरप्रणीत ग्रंथ आहेत असे मानले तरी आक्षेपांची आपत्ती काही टळत नाही, हीच तर खरी अडचण आहे. कारण ईश्वरनिर्मित औपौरुषेय, ईषप्रेषित म्हणून कमीतकमी पन्नासपाऊणशे ग्रंथ आज देखील भिन्न संघातील मनुष्यांनी मानलेले आहेत, ते अत्यंत परस्परविरुद्ध विधानांनी भरलेले आहेत. फार काय प्रत्येक ग्रंथ जर काही निर्विवादपणे एकस्वर सांगत असेल तर हेच की, तो स्वत: तेवढा ईशप्रेषित परमप्रमाण असून बाकी सारे ‘पाखंड’ आहेत!...

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या या विवेचक अशा परिच्छेदातूनच त्यांनी धर्मग्रंथ यांचे व्यवच्छेदक विश्लेषण केले आहे. किंबहुना या विषयावरील त्यांच्या निबंधांमधून, विचारांमधून सावरकर यांना अपेक्षित असणारा हिंदू हा नव्या युगाचा डोळस आणि विज्ञाननिष्ठ व्यक्ती आहे. केवळ हिंदूंनाच नव्हे तर मुसलमानांचे आणि विशेष करून भारतीय मुसलमानांचेही डोळे उघडावेत यासाठी त्यांनी मुस्लीम धर्म, त्यातील पंथ, त्यातील मतमतांतरे आणि त्यातील अतार्किकता या सर्व बाबी सांगताना त्यांनी तुर्कस्तानातील मुसलमानी राजवटीने केमाल पाशाने केलेल्या बदलाची माहिती देत भारतीय मुस्लीमांनीही तो मार्ग अनुसरावा आणि नव्या काळाला सामोरे जावे, त्यासाठी पोथिनिष्ठा सोडावी असे सविस्तरपणे आणि विवेचक पद्धतीने सांगितले आहे. इतके सांगत त्यांनी केवळ मुस्लीम धर्मातील धर्मवेडेपणावर टीका केलेली नाही तर निबंधाच्या अखेरीस अनेक बुद्धिवादी विचार मांडत मानवी हिताचा विचार मांडला आहे. हे धर्मग्रंथ हे ईश्वरप्रणीत नाहीत, तसेच त्या धर्मग्रंथांचा अर्थ वेगवेगळा काढत मांडत आपल्याला हवा तो विचार मांडला आहे. यामुळेच ते यामध्ये लिहितात की, .... हे कुराण, पुराण, वेद, अवेस्ता, बायबल टालमद प्रभृती सारे ग्रंथ मनुष्यकृत आहेत. त्या त्या परिस्थितीतील ज्ञान नि अज्ञान यांही संपृक्त पण लोकहितबुद्धीने प्रचलविलेले नि म्हणूनच आदरार्ह मानून आपण साऱ्यांनी ते अभ्यासावे; प्रत्यक्ष प्रयोगांती जे त्यांत आज अतथ्य ठरते, अहितकारक ठरते, तें त्यागावे. तथ्य नि हित ते साऱ्यांनी समाईक मानवी संपत्ती समजून स्वीकारावे हेच इष्टतर, तथ्यतर, हिततर होय. नव्हे काय?...

सावरकरांनी याद्वारे प्रत्येक धर्माच्या धर्मग्रंथांबद्दल मांडलेले हे विदारक पण तितकेच व्यवहार्य, अचूक असे मत आज तरी किती लोकांनी स्वीकारले आहे ? अजूनही धर्माबद्दलची जुनी पोथिनिष्ठ मते आम्ही उराशी बाळगून आहोत, राजकीय, सामाजिक नेते जे सांगतात, जी मते मांडतात त्याबद्दल मनात कोणतीही योग्यायोग्यता विचारात तार्किकपणे, तात्विकपणे न घेता पोटार्थी वृत्तीने आम्ही ती स्वीकारतो, हाच सावरकरी विचारांना धुडकाविण्याचा प्रकार ठरत नाही का? मुळात ज्या सावरकरांनी जी हिंदूभूमीची मर्यादा भौगोलिक स्वरूपात मांडली त्या मर्यादेतही निर्माण झालेल्या संत, पंत, तंत आणि पंथ यांच्या समूहाला हिंदू म्हणण्याचा व्यवहारी व्याख्येला सामावून घेण्याचा कितीसा प्रयत्न स्वातंत्र्यापासून आजतागायत केला गेला आहे, ते विचारात घ्यावे लागेल. केवळ आस्तिक-नास्तिक वादात जाऊन वा पोथिनिष्ठेतून काही पठण करून  वा सामूहीक भोंगे वाजवून वा काढून अद्यतनी सुसंस्कृतता येणार नाही. नवनागरी समाजाला घडवण्यासाठी रस्ते रुंदीकरणातून व्यापकता येणार नाही त्यासाठी बुद्धिविस्तार होणे गरजेचे आहे. बुद्धिविस्तारासाठी स्मार्टसिटीपेक्षा, चौपदरीकरणापेक्षा वाचन, चिंतन अवलोकन आणि अध्ययनाची पक्की बैठक हवी आणि ती निर्माण करण्यासाठी आवश्यक असणारा विकासाचा मार्ग हा बुद्धिवादातून, विज्ञाननिष्ठेतून जाणारा आहे. त्यासाठी धर्ममतापेक्षा हिताला उपयुक्त असेल ते जगातील कोणत्याही धर्मात सापडो ते स्वीकारले पाहिजे, असे धर्मांच्या भेदांना संपवणारा परखड उपयुक्ततावादही त्यांनी मांडला आहे. सावरकरांची धर्मातीतपणाची ही वृत्ती ही किती हिंदुंना कळली, उमगली किती पुरोगामी म्हणविणाऱ्या धर्मनिरेपक्षतावाद्यांना कळली, किती अहिंदु असणाऱ्यांनी जाणली असा सवाल स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षातही पडत आहे, अशी ही सध्याची स्थिती पाहाता बुद्धिवाद आणि व्यक्तीवाद तसेच विज्ञाननिष्ठता ही विद्यमान राजकीय पटलावर  सत्ता, स्वार्थ, धर्मांधता आणि आर्थिक दलदलीच्या गाळात अडकलेली आहे, असेच म्हणावे लागते.

००००००००००

सावरकरांच्या हिंदुत्त्वाला पेलणारे ‘कर’ आवश्यक !- १८

००००००००००

सावरकर प्रखर बुद्धिवादी असूनही धर्म ही एक वस्तुस्थिती आहे, असे मानत असत. यामुळेच सावरकर आगरकरांप्रमाणे समाजाला बुद्धिवाद विविध मार्गाने शिकवू पाहात होते. त्यांच्यावेळच्या देशकाल परिस्थितीनुसार त्यांना हिंदूंना स्पष्ट करावयाचे होते, त्यांचे अस्तित्त्व, त्यांचे महत्त्व समजावून देतानाच पोथिनिष्ठतेमधून बाहेर या सांगतानाच त्यांच्या श्रद्धांनाही जपून ते प्रयत्नशील होते. अर्थात तरीही सनातन्यांकडून त्यांच्यावर प्रचंड टीका झाली आहे. त्याचप्रमाणे ऐतिहासिक गुलामगिरीमधून बाहेर काढण्यासाठी हिंदूंना राष्ट्र म्हणून उभे करण्यासाठी त्यांना मुसलमानी आणि अन्य विविध अत्याचारी राजवटींचे दाखले देत, धर्मांतरांनी केलेल्या अत्याचारांची तपशीलवार मीमांसा करीत, धर्मशुद्धीसारखे कामही त्यांनी ज्या पद्धतीने केले ते करताना हिंदुराष्ट्र ही संकल्पना मांडताना आणि हिंदुत्त्व स्पष्ट करताना मुस्लीम हे देखील स्वतंत्र राष्ट्र आहे हे अपरिहार्यपणे मान्य करताना त्यांनी त्यांच्या हिंदुराष्ट्रातील सर्व धर्मियांना नागरिक म्हणून समान अधिकार कसे असतील हे ही स्पष्ट केले होते. त्यांचा बुद्धिवाद हा हिंदुंसाठी नव्हे तर राष्ट्रासाठी होता. त्यामुळेच मुसलमानांच्या पारंपरिक आणि कुराणाच्या धर्मप्रसारार्थ राष्ट्र तयार करण्याच्या शिकवणीलाही ओळखून त्यांनी मुस्लिमांनाही नव्या युगात येण्यासाठी पोथिनिष्ठा सोडावी, असे सांगितले.

हिंदु या समूहासाठी एका ठोस संकल्पनेला मांडणाऱ्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावर मुस्लीम समाजाचा द्वेष करणारे म्हणून किंवा द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडला म्हणून टीका करणारे तथाकथित धर्मनिरपेक्ष म्हणवणारे आणि जन्माने हिंदू असणारे महाभागही आज कमी नाहीत. मुळात त्यांना सावरकर समजलेले नाहीत किंवा त्यांना ते समजून घ्यायचे नाहीत किंवा त्यांना आपल्या राजकारणासाठी काहींना आपले तेच खरे करण्याच्या दुराग्रहापोटी सावरकरप्रणीत हिंदुत्त्वाला आपल्या हितरक्षणासाठी कसेही करून बरबटवायचे आहे. मुळात या सर्व तथाकथित सावरकरद्वेषींना सावरकरांचे हिंदुत्त्वच नीटपणे मांडता न आल्यामुळे सावरकरांच्या विचारधारणेला बदनाम करण्याचा खेळ मात्र सुरू झाला. राजकारण्यांच्या द्वेषापायी ाणि हव्यासापायीही सावरकरांवर विविधांगांनी टीका करण्याचा चंगच काहींनी मांडला आणि अजूनही ते सारे चालू आहे. यामुळेच सावरकर यांचाै हिंदुत्त्ववाद ना काँग्रेसला पटला, मान्य झाला, वा कळला नाही आणि रा. स्व. संघाने वा त्यांच्याशी संलग्न राजकीय पक्षांनीही सावरकर यांच्या विचारांना पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्नही केला नाही मात्र त्यांनी त्यांच्या हिंदुत्त्व या शब्दाचे मार्केटिंग अतिशय प्रभावीपणे साध्य केले.

या लेखमालेमध्ये प्रामुख्याने उल्लेख केला गेला तो गोपाळ गणेश आगरकर यांचा. महाराष्ट्रातील सुधारणाावादी विचारपरंपरेतील ते एक बुद्धिवादी व्यक्तिमत्त्व होते. ज्या पिढीमध्ये काँग्रेसच्या मवाळ गटात असल्याचे मानले गेले. पण त्यांची भाषा पाहून त्यांच्या बुद्धिवादी विचारांचा परिपाक पाहून ते मवाळ होते की वैचारिक क्रांतीकारी होते, असा प्रश्न पडावा. त्यांचे निबंध हे त्या काळातील जहालच म्हणावे लागतील. सावरकर यांची या बुद्धिवादी विचारसरणीमधील तसे पाहायला गेले तर दुसरी पिढी. ज्या आगरकरांच्या पिढीवर सावरकरांसारखे व्यक्तित्त्व पोसले गेले ती पिढी मुस्लीमांबद्दल त्यावेळीही विश्वास ठेवत नव्हती. धर्मकल्पना आली कुठून या निबंधात ते म्हणतात की, मनुष्याच्या ज्या अनेक मनोवृत्ति आहेत, त्यापैकी त्याची धर्मकल्पना एक आहे. ज्याप्रमाणे इतर वृत्ती किंवा त्याची बीजे त्यांच्या प्रकृतीशी खिळलेली आहेत, त्याप्रमाणेच धर्मकल्पनाहीत्याचे मनात फार प्राचीन काळापासून वास करीत आहे. ... बुद्धिवादी असे आगरकर धर्माचे सामर्थ्य मान्य करतात, हे लक्षात घेतले पाहिजे. गुलामांचे राष्ट्र या निबंधात आगरकर यांची भूमिकाही समाजाला बुद्धिवाद कसा सांगावा, शिकवावा हे समजवणारी आहे.  मार्क्सवादीही धर्म ही अफुची गोळी आहे असे मार्क्सचे वचन अयोग्य असल्याचे सांगू लागले आहेत.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही धर्म ही न चुकणारी गोष्ट आहे, हे मान्य केले आहे. प्रा. नरहर कुरुंदकर यांच्यासारख्या अलीकडच्या काळातील बुद्धीवादाचे पुरस्कर्ते आणि मार्क्सवादाकडे झुकणारे व्यक्तिमत्त्व. ते म्हणलतात या देशातील कोट्यवधी जनतेचा धर्मावर विश्वास आहे आणि जग कितीही सुधारले, आधुनिक झाले तरी अजून काही शतके समाजात धर्म ही शक्ती प्रबळ राहाणार आहे. जे देश सुधारलेले आणि आधुनिक मानले जातात तेथे तर धर्माचा दृढ प्रभाव अजून आहेच. ....

या सर्व पार्श्वभूमीवर सावरकर प्रखर बुद्धिवादी असूनही धर्म ही एक वस्तुस्थिती आहे, असे मानत असत. यामुळेच सावरकर आगरकरांप्रमाणे समाजाला बुद्धिवाद विविध मार्गाने शिकवू पाहात होते. त्यांच्यावेळच्या देशकाल परिस्थितीनुसार त्यांना हिंदूंना स्पष्ट करावयाचे होते, त्यांचे अस्तित्त्व, त्यांचे महत्त्व समजावून देतानाच पोथिनिष्ठतेमधून बाहेर या सांगतानाच त्यांच्या श्रद्धांनाही जपून ते प्रयत्नशील होते. अर्थात तरीही सनातन्यांकडून त्यांच्यावर प्रचंड टीका झाली आहे. त्याचप्रमाणे ऐतिहासिक गुलामगिरीमधून बाहेर काढण्यासाठी हिंदूंना राष्ट्र म्हणून उभे करण्यासाठी त्यांना मुसलमानी आणि अन्य विविध अत्याचारी राजवटींचे दाखले देत, धर्मांतरांनी केलेल्या अत्याचारांची तपशीलवार मीमांसा करीत, धर्मशुद्धीसारखे कामही त्यांनी ज्या पद्धतीने केले ते करताना हिंदुराष्ट्र ही संकल्पना मांडताना आणि हिंदुत्त्व स्पष्ट करताना मुस्लीम हे देखील स्वतंत्र राष्ट्र आहे हे अपरिहार्यपणे मान्य करताना त्यांनी त्यांच्या हिंदुराष्ट्रातील सर्व धर्मियांना नागरिक म्हणून समान अधिकार कसे असतील हे ही स्पष्ट केले होते. त्यांचा बुद्धिवाद हा हिंदुंसाठी नव्हे तर राष्ट्रासाठी होता. त्यामुळेच मुसलमानांच्या पारंपरिक आणि कुराणाच्या धर्मप्रसारार्थ राष्ट्र तयार करण्याच्या शिकवणीलाही ओळखून त्यांनी मुस्लिमांनाही नव्या युगात येण्यासाठी पोथिनिष्ठा सोडावी, असे सांगितले. इतकेच नव्हे तर १८५७ च्या स्वातंत्र्य समरातील मुस्लीमही त्यांना ब्रिटिशांविरोधात लढताना राष्ट्रप्रेमी वाटले आणि त्यानंतर मुस्लिमांच्या स्वतंत्र्य राष्ट्राच्या मागणीसाठी अलीबंधू, अलीगड विद्यापीठ, खिलाफत आंदोलन, मोपला बंड, दंगली या सर्व स्थितीमध्ये मुस्लीम समाजाने, मुस्लीम लीगने केलेल्या स्वतंत्र राज्याच्या मागणीमुळे तयार झालेली मुस्लीम प्रवृत्ती ही लक्षात घेऊनही त्यांनी मुस्लीमांना ब्रिटिशांविरोधात स्वातंत्र्यासाठी लढण्यासाठी याल तर तुमच्याबरोबर, न याल तर तुमच्याशिवाय आणि विरोधाल तर तुम्हालाही विरोधून ब्रिटिशांशी संघर्ष करण्याचे सुस्पष्ट केले होते.

मुळात सावरकरांची धर्मश्रद्धा कशी आहे, ते पाहाण्यासारखे आहे. ती बाब लक्षात घेतली तर सावरकर ही विचारसरणी किती व्यापक आहे, आणि व्यापक होती, ते लक्षात येईल. कम्युनिस्टांचे राज्य आल्यावर हिंदुत्त्वाचे काय होणार या संबंधात ते सांगतात की, ते आल्याने धर्माचे प्राबल्य कमी होईल हे खरे पण साम्यवादी आले तर मंदिराबरोबरच मशिदी आणि चर्चेसचा नाश करतील ना ?  ही क्रांतिसुद्धा देशाला पोषक होईल आणि पुन्हा हिंंदुत्व तरून जाील. ... मुसलमान त्यांचे मुसलमानत्व, ख्रिश्चन त्यांचे ख्रिश्चनत्व सोडायला तयार असतील तर मी माझे हिंदुत्व सोडायला एका पायावर तयार आहे, असे सांगणाऱ्या सावरकरी विचारांना न कळण्यासारखे काय आहे. पण राजकारण आणि स्वार्थ यासाठी अर्थाचा अनर्थ केल्यासारखे आहे सावरकर विरोधकांचे वा सावरकरद्वेषींचे इतकेच कशाला तथाकथित हिंदुत्त्ववादी म्हणवणाऱ्यांचेही वर्तन आहे.

आगरकरांच्या जमान्यात मुस्लीम लीगचे फार प्राबल्य वा हेकेखोरपणा तसा सुरू झालेला नव्हता. मात्र तरीही आगरकरांनी मुसलमानांविषयी आपली मते, भूमिका परखडपणे स्पष्ट केली , मुसलमान हे राष्ट्रसभेविषयी विग्नसंतोशीपणा करतात त्यावर ते म्हणाले होते की, हिंदुंचा द्वेष करून तुमचा कसा निभाव लागेल, तुम्ही उभयतांनी सख्या भावाप्रमामए वागले पाहिजे... जेव्हा आम्ही हिंदु लोक ब्रिटिश पलटणीची पर्वा न करता ब्रिटिश लोकांच्या हातून राज्य हिसकावून घेण्यास यशस्वी होवू, तेव्हा त्या बरोबर त्यांना (म्हणजे ब्रिटिशांना) टेकू देणाऱ्या मुसलमान लोकांचाही समाचार आम्हास सहज घेता येणार आहे. हे विधान आगरकरांचे आहे आणि सावरकरांनी मुसलमानांबद्दल जे धोरण ठेवले होते, त्याच प्रकारचे आहे.  धर्मवेडाला उत्तर देण्यासाठी थोडासा धर्माभिमान ठेवावाच लागतो असे आगरकर म्हणतात.

बुद्धिवादी आगरकरांचे मुसलमानांबद्दल असणारे हे मत हिंदुत्ववादी विचारांसारखे कसे असा प्रश्न पडू शकतो, पण मुस्लीम समाजाने पोथिनिष्ठा सोडावी, असे सांगण्याची धमक मात्र आगरकरांसारखे बुद्धिवादी म्हणून धर्मनिरपेक्षतेची तथाकथित झूल पांघरणाऱ्यांमध्ये नाही, ही विद्यमान काळातील वस्तुस्थिती आहे. हे लक्षात घेतले तर सावरकरांना जातीय ठरवणाऱ्यांच्या मेंदूमध्येच काही ना काही बिघाड झाला आहे आणि त्यामुळे समाजाचेही नुकसान होऊ शकते, हे लक्षात घेणे गरजेचे राहील.

हिंदुत्ववाद्यांवर कठोर टीका करणाऱ्या नरहर कुरुंदकर यांच्यासारख्या समीक्षकाचने मांडलेली मतेही या निमित्ताने महत्त्वाची वाटतात. ते वेगळ्या भाषेत मुसलमानांना बजावतात, हे महत्त्वाचे ते म्हणतात की, मुस्लीम विचारवंतांची अशी समजूत आहे की, मुसलमानांच्या दृढ, बळकट संघटना करून ते संविधानाची दिशा बदलू शकतील. मुसलमानांचा दृढ व बळकट संघटना करम्याचा उद्योग फक्त हिंदुसमाजातील उदारमतवाद कमकुवत करतो आणिस त्याचे परिणाम मुसलमानांना भोगावे लागतात. ही परिस्थिती बदलावी अशी माझी इच्छा आहे. मुसलमानांनी माझ्याबरोबर या देशाचे नागरिक म्हणून नांदावे अशी माझी भावना आहे.... सावरकरांच्या विचाराला उत्तर वा विचारणा म्हणून मुसलमानांना कुरुंदकर विचारतात, मुसलमानांना समान नागरिकत्व नको आहे काय ? स्वतंत्र देशात अल्पसंख्येला समान नागरिकत्व नसले तर कनिष्ठ नागरिकत्व मिळत असते. हे दुय्यम दर्जाचे नागरिकत्व मुसलमानाना हवे आहे का? त्यांना हिंदुस्थानात वरिष्ठ नागरिकत्व मिळेल असे वाटते ?

प्रा. कुरूंदकर म्हणतात की, समान नागरिकत्व ही कल्पनाच मुसलमानांना आवडत नव्हती. १८८९ पासून ही समान वाटपाची कल्पना पुन:पुन्हा सांगितली जाते... ७० टक्के हिंदूना ४० टक्के जागा, २२ टक्के मुसलमानांना ४० टक्के जागा, इतर सर्व मिळून ८ टक्के असंख्यांकांना १० टक्के जागा, यावर फार तर उदारमतवादी मुसलमान तयार होता. कर्मठांना सबंध भारत इस्लामसाठी हवा होता. सुशिक्षित मुस्लीम लीगला मुसलमानांना वेगळा तुकडा हवा होता. हिंदू हे एक राष्ट्र, मुसलमान हे दुसरे राष्ट्र; दोघात सत्तेत समान वाटा, म्हणजे दोघांनाही सत्तेत ५०-५० टक्के भाग ही खरी आदर्श समता आहे, असे मुसलमानांना वाटते.

कुरुंदकरांसारख्या बुद्धिवादी व्यक्तिमत्त्वाला सावरकरांची अनेक मते वा विचार पटत नसले तरी त्यांच्या मुसलमान नसण्याचा हक्क या संबंधातील विचारही पाहाण्यासारखे आहेत. हे लक्षात घेतले तर सावरकरांचे विचार हे किंबहुना तसे मुस्लीमांच्यादृष्टीने स्पष्ट आणि सौम्य आहेत. कारण लोकशाही तत्त्वाप्रमाणे मुसलमानांशी देशबंधू म्हणून वागावे, असा त्यांचा पर्याय आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचेही मुसलमांनांसंबंधात असणारे मत, फाळणीसंबंधातील मत लक्षात घेण्यासारखे आहे. कारण लोकसंख्येची अदलाबदल करण्याची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सूचना विचारात घेतली तर आजची परिस्थिती पाहाता मुसलमांनाचा प्रश्न फाळणीनंतरही संपलेला नाही. मुळात सावरकर यांचे हिंदुत्त्व आणि हिंदुराष्ट्र ही संकल्पना आणि अन्य मंडळींचे हिंदुत्त्व आणि हिंदुराष्ट्र वा हिंदू या संकल्पना वा विचारपवेगवेगळे आहेत, हे समजून घेऊन सावरकरांचा बुद्धिवाद आणि त्यांना अपेक्षित असणारा धर्मनिरपेक्ष हिंदुत्ववाद समजून घेण्याची आज मोठी गरज आहे. फक्त हे शिवधनुष्य पेलण्यासाठी आगरकर, सावरकर, कुरुंदकर, आंबेडकर यांच्यासारख्या बुद्धिवादी सक्षम ‘करां’ची ताकद हवी!

- रवींद्र यशवंत बिवलकर

***

 


फिर सुबह होगी .... पण कधी?

सुबह कभी तो आयेगी... हे गाणे आज नेहरूवादी नसलेल्या  व नेहरूंच्या राजवटीवर आसुड ओढणाऱ्या विचारसरणीच्या सत्ताधारी ‘भाजपवादी’ अशा १० वर्षांच्या...