![]() |
| चित्र- चित्रकार योगेंद्र पाटील, पाचोरा |
माझ्या नजरेतून -७
पोथिनिष्ठतेवर प्रहार
धर्म, रिती-रिवाज, रुढी परंपरा यांची झालेली गल्लत आणि त्यातून धर्म आपला किती जुना आहे, किती शास्त्राधारित वा विज्ञानाधारित आहे, असे मानणारे लोक जगात भरपूर आहेत. किंबहुना पोथिनिष्ठतेमुळे डोळे मिटून धर्म जागणऱ्यांना उठवण्याचा प्रयत्न सावरकरांनी केला तो केवळ हिंदुंपुरताच नव्हे तर अगदी जागतिक स्तरावरील धर्मांची उदाहरणेही सावरकरांनी यात दिली. त्यामुळेच त्यांनी ते स्पष्ट केले आहे.
ते म्हणतात की, ‘आपल्या धर्मग्रंथातच ही अशी खिचडी झालेली नसून जगातील अितर झाडून साऱ्या अपौरुषेय म्हणविणाऱ्या प्राचीन आणि अर्वाचीन धर्मग्रंथांचीही तीच स्थिती आहे. हजारो वर्षांपूर्वीच्या मोसेस पैगंबरापासून तो अगदी आजकालच्या अमेरिकेतील मोर्मन पैगंबरापर्यंत सर्वांनी, मनुष्याच्या अठण्याबसण्यापासून दाढी-मिशा शेंडीच्या लांबीरुंदीपासून, वारसांच्या, दत्तकांच्या लग्नाच्या निर्बंधापासून तो देवाच्या स्वरूपापर्यंत आपल्या साऱ्या विधानांवर 'एष धर्मस्सनातनः' हीच राजमुद्रा आणि तीही देवाच्या नावाने ठोकलेली आहे! हे सारे विधीनिषेध देवाने साऱ्या मानवांसाठी अपरिवर्तनीय धर्म म्हणून सांगितले आहेत! सर्व मानवांनी सुंता केलीच पाहिजे हाही सनातन धर्म आणि त्रैवर्णिकांनी तसे भलतेसलते काहीएक न करता मुंजच करावी हाही सनातन धर्मच! लाक्षणिक अर्थीच नव्हे तर अक्षरशः या साऱ्या अपौरुषेय, इश्वरी धर्मग्रंथात एकाचे तोंड पूर्वेस तर एकाचे पश्चिमेस वळलेले आहे! आणि तेही अगदी प्रार्थनेच्या पहिल्या पावलीच! सकाळीच पूर्वेकडे तोंड करून प्रार्थना करणे हाही सनातन धर्म आणि सकाळी देखील प्रार्थना म्हटली की ती पश्चिमेकडेच तोंड करून केली पाहिजे हाही मनुष्यमात्राचा सनातन धर्मच ! एकाच देवाने मनूला ती पहिली आज्ञा दिली नि महंमदाला ही दुसरी दिली! देवाची अगाध लीला; दुसरे काय!’
‘हिंदुमुसलमानांचे दंगे करवून आपण अंग राखून दुरून मौज पाहात बसण्याचा आरोप शौकतअल्लीवर उगीच करण्यात येतो. हा खेळ चालू करण्याचा पहिला मान त्यांचा नसून असे अगदी परस्परविरुद्ध प्रकार अपरिवर्तनीय सनातन धर्म म्हणून त्या दोघांसही सांगून त्याची झुंज लावून देणाऱ्या गमती स्वभावाच्या देवाचाच तो मान आहे! ही मूळची त्याची लीला! आणि त्याची नसेल तर त्याच्या नावावर हे ग्रंथ चापून लादून देणाऱ्या मनुष्याच्या मूर्ख श्रद्धेची!’
स्वातंत्र्यवीर सावरकरांची ही चिकित्सा वा विश्लेषण नीटपणे ध्यानात घेतले तर चालत्या काळाप्रमाणे वागावे, राहावे आणि त्यामुळेच अद्ययावत राहावे हे सांगण्यावर त्यांनी भर दिला आहे. हे करताना धर्म म्हणजे काय याचीही चिकित्सा केली आहे. ती अनेकांना पेलवण्यासारखी नाही. किंबहुना हिंदुत्व हा सावरकरांचा शब्द केवळ घेतला गेला आहे. त्यामागील संकल्पनेला बाजूला सारले गेले आहे. प्रथा- रिवाज पाळणे म्हणजे धर्म नव्हे. त्या त्या काळात त्या त्या रिवाजला का स्वीकारले गेले याची मीमांसा त्या त्या काळात केली गेली होती. केली असेलही पण या काळात ते स्वीकारताना त्या प्रथा- रिवाजाला विज्ञानाच्या परीक्षानळीत घालून तावून सुलाखून घेण्याचा सावरकरांचा भर महत्त्वाचा आहे. नेमका तोच आपण विसरलो आहोत. काही महाभागांनी समाजाच्या या प्रवाहाला बदलण्याऐवजी या काळात विज्ञानाधारे चिकित्सा न करता त्या प्रथाच कशा विज्ञानावर आधारित आहेत, आजही त्या कशा अचूक आहेत, हे सांगण्याचा आणि जगाला आपण विश्वगुरू कसे आहोत हे दाखविण्याचा अट्टाहास चालवला आहे. मुळात पेटंट मिळवायचेही असेल तरी ते कालाच्या परीक्षेनुसारच मिळवावे लागते. परंतु सामाजिक आणि धार्मिक समस्यांचा पाढा वाचत हिदुंचे ऐक्य साधण्याच्या वा ध्रुवीकरणाच्या नावाखाली भूमिनिष्ठ आणि विज्ञानिष्ठ चाचण्यांना मात्र बगल देताना हिंदुनेस- हिंदुपण घालवून हिंदुइझमच जोपासून त्याला हिंदुत्व म्हणण्याचा आभास मात्र निर्माण केला गेला आहे. यामुळेच सावरकरांच्या हिंदुत्वाच्या तत्त्वज्ञानाला खरेच जोपासले गेले आहे का, याचे चिंतन-पुनरावलोकन करण्याची गरज आहे. पोथिनिष्ठतेच्या कुप्रथेला जेव्हा पूर्णपणे जाणून बाजूला केले जाईल, तेव्हाच सावरकरांना अभिप्रेत असणारा अद्यतनी वा अद्ययावत समाज प्रवाही होऊ शकेल.
(क्रमश:)
- रवींद्र यशवंत बिवलकर

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा