कालप्रवाही सावरकर - ४
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विज्ञाननिष्ठ निबंधातील तार्किक युक्तिवाद हा केवळ तर्कापुरता असत नाही. त्याला तर्काबरोबरच तत्त्वाचे, शास्त्रशुद्ध विचारसरणीचे आणि परखड, कठोर, उपयुक्ततावादी तसेच पारलौकिकतेवर मात करून भौतिकतेच्या दृष्टिकोनाचे दिशादर्शन मिळालेले आहे. प्रत्यक्ष व्यवहार, व्यावहारिकता, शास्त्र यांना प्रोत्साहन देत प्रमाण मानण्याची सावरकरांची धारणा ही अधिकाधिक वास्तवतेला धरून आहे. याच निबंधामधील ' ईश्वराचे अधिष्ठान म्हणजे काय ?' हा अतिशय सडेतोड विचारांचा परिपाक म्हणावा लागेल. रुढ धर्माला मानून चाललेली जीवनप्रणाली, रिती,रिवाजांना, संतांच्या कर्माना, शब्दांनाही पारंपरिकतेने स्वीकारणारी झापडबंद मानसिकता यावर अतिशय भेदक प्रहार सावरकरांनी केले आहेत. या निबंधाची सुरुवातच समर्थ रामदासस्वामींच्या ' सामर्थ्य आहे चळवळीचे । जो जो करील तयाचे । परंतु तेथे भगवंताचे। अधिष्ठान पाहिजे । या ओवीने होते. त्या ओळीच्या भावार्थाची विश्लेषणाने केलेली पृथ्थक समीक्षा म्हणजेच हा निबंध म्हणाला पाहिजे. सावरकरांनी या निबंधाचा उद्देश काय आहे, ते सांगतानाच सुरुवातीलाच म्हटले आहे की, त्या ओवीने त्या काळात एक मोठे तेजस्वी कार्य केले आहे. मात्र त्या ओवीतील 'परंतु तेथे भगवंताचे। अधिष्ठान पाहिजे । ' या शब्दांचा रामदासांच्या मनातील अर्थ काय असू शकतो, ते सांगणे कठीण आहे. मात्र त्या ओवीचा आजच्या काळात जो अर्थ काढला जातो (आता येथे आजचा काळ म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या काळ – अर्थात आजही त्यापेक्षा परिस्थिती फार वेगळी नाही, हे ही तितकेच खऱे. )… तो अर्थ किती अनर्थकारक आहे व त्यातील जे तत्त्व असते ते किती ऐतिहासिक व तात्विकदृष्ट्या अतथ्य आहे ते कसे ते स्वारकर या निबंधातून दाखवू इच्छितात.
यामध्ये सामर्थ्य म्हणजे ताकद, शक्ती ही कशात आहे तर चळवळीत आहे. चळवळ म्हमजे मानवी प्रयत्न असे सावरकर सांगतात. ते जरी किती वाढविले तरी ज्या चळवळीला भगवंताचा पाठिंबा नाही, ती चळवळ अयशस्वी झालीच पाहिजे या तत्त्वाचा अर्थ नक्की काय त्याचा शोध सावरकरांना घ्यावासा वाटतो. भगवंताचा पाठिंबा म्हणजे ईईश्वराचे अधिष्ठान, ते काय त्याचा उलगडा झाला पाहिजे, असे सांगत सावरकर या निबंधात उहापोह करतात. येथे भगवंताचे अधिष्ठान जे रुढार्थाने ईश्वर आहे किंवा
🔴 🔴 🔴
।। ऐहिक आणि मानवी उपायांच्या हातीच यशाची किल्ली नसलून मनुष्याच्या ज्ञानाच्या नि शक्तीच्या पलीकडे ज्या अनेक अज्ञात, अज्ञेय, प्रचंड अशा अमानुष विश्वशक्ति आहेत, त्यांच्या आघाताप्रत्याघातांच्या टकरीतही त्या यशाचा वा अपयशाचा संभवर असतो, तर तो अर्थ बरोबर आहे. ।।
🔴 🔴 🔴
हे सांगताना सावरकर माणसाला, विज्ञानाला वा माणसाच्या उपायांच्या पलीकडे असते ती अमानवीय शक्ती हे कारण असेल तर मग ते म्हणणे धर्माने सांगितलेल्या रिवाजी वा रितीने मानलेल्या विविध अर्थांना धरून असेल तर ते विश्वशक्तीची गुंतागुंत जी आकलनापलीकडे असते. त्याची बाब असते. म्हणजेच तात्विकतेच्या विविध तुलनांमधून सावरकर या शक्तीचा शोध घेतात. आणि मग मानवी चळवळीशी तिची सांगड घालण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे जपतपादी पद्धतीचे वा धर्मकर्मकांडाचे संदर्भ त्यांना मान्य नसल्याचे ते स्पष्ट करीत जातात. भगवंताचे अधिष्ठान पाहिजे म्हमजे ईश्वरी कृपा मिळवली पाहिजे, असा सर्वसाधारण अर्थ जो त्या काळी प्रचलीतपणे स्वीकारला गेला, त्याची फोड सावरकर अधिक बुद्धीवादी पद्धतीने करतात. इतकेच नव्हे रुढ रीती रिवाजाने मानल्या जाणाऱ्या विविध घटकांना भावनिक धक्का न देता ते आपल्या अर्थाची फोड अतिशय हळुवारपणे पण तरीही परखडपणे करतात. त्यामुळे भगवंताची वा ईश्वराची कृपा मिळवावी लागते हे सांगताना तो जे स्पष्टपणा दाखवितात, तो महत्त्वाचा आहे. लोकांना डोळे उघडायला लावणारा व त्याना वास्तववादाने विचार करायला लावणारा आहे. त्यांच्या मतातून पारलौकिक आणि भौतिकता याचा स्पष्ट विचार ते करतात आणि भौतिकतावादाला ते अधिक महत्व देतात. किंबहुना त्यांची हीच विचारसरणी ही विज्ञानवादी वा विज्ञाननिष्ठ वा बुद्धीनिष्ठ स्वरूपात असल्याचे स्पष्ट जाणवते. त्यांचा धर्मासंबंधात सर्वसामान्य हिंदु काय विचार करतो त्यापक्षा त्याने काय विचार करायला हवा, कशा पद्धतीने धर्म संकल्पनेकडे आणि मानवी जीवनपद्धतीकडे पाहावयास हवे ते सांगतात. धर्मासंबंधात कोणी काय विचार करावा, त्याबद्दल त्याचे व्यक्तिस्वातंत्र्यही ते मान्य करतात, हेच येथेही दिसून येते. मात्र ते मान्य केले तरी त्यांचा शब्द, संकल्पना, वास्तव याविषयीचा शोध थांबत नाही, ते लोकांचे डोळे उघडावयाचे काम करीत राहातात, हीच त्यांची विज्ञाननिष्ठा, बुद्धीनिष्ठा आहे. ती किती हिंदुंना परवडणारी, रुचणारी व पटणारी आहे, हे ज्याचे त्याने ठरवावे.
🔴 🔴 🔴
।। परंतु ह्या ओवीचा अर्थ अशा तात्त्विक अर्थी क्वचित्च कोणी घेत असेल! सामान्यतः तिचा अर्थ असाच घेण्यात येतो, की मनुष्य ज्याला ज्याच्या त्याच्यापरी नीति वा अनीति म्हणतो, न्याय नि अन्याय म्हणतो, दैवी संपत्वा असुरी संपत्म्हणतो, धर्म वा अधर्म म्हणतो, त्यापैकी पहिले ते सत्य नि दुसरे ते असत्य असून जी चळवळ त्या मानवी सत्याच्या पायावर उभारलेली असते, त्या मानवी न्यायाची पोषक असते, त्या मानवी धर्माचे ब्रीद मिरविते; तीच काय ती यशस्वी होते ! ईश्वर तिच्यावरच कृपा करतो अशा अर्थी ईश्वराचे अधिष्ठान जिला लाभत नाही, ती चळवळ कितीही प्रबळ असली तरी ती यशस्वी होत नाही. यास्तव चळवळ करणारांनी प्रथम ते भगवंताचे अधिष्ठान संपादिले पाहिजे. ईश्वराची कृपा अर्जिली पाहिजे. आणि ही ईश्वराची कृपा संपादिण्याचा मार्ग कोणता? तर अर्थातच पंचाग्निसाधन, पाण्यात उभे राहून द्वादशवार्षिक नामजप, योगसाधन, उपासतापास, एकशेआठ सत्यनारायण, एक कोटी रामनाम जप, संतत धारेची अनुष्ठाने, रेडे वा बोकड मारणारे नवस, हजार वाती लावणे, लक्ष दुर्वा वाहणे, स्नानसंध्या, जपजाप्य, नामसप्ताह, पुरश्चरणे-पारायणे, गोग्रास, ब्राह्मणभोजने, यज्ञयाग, दक्षिणादाने प्रभृती जे शतावधि उणाय श्रुतीपासून शनिमाहात्म्यापर्यंत देवास संतोषविण्यास्तव वर्णिलेले आहेत त्यास आचरणे हा होय. या अर्थी जिला तपस्या म्हणतात ती आधी, मग मानवी चळवळ. ।।
🔴 🔴 🔴
।। वरील मत खरे की खोटे हे पाहण्यापूर्वी इतके स्पष्ट सांगून टाकतो की, वर उल्लेखिलेल्या जपतपादि साधनांची आत्मशुद्धि वा पारलौकिक मोक्ष प्रभृती जी फळे आहेत त्यांचा ऊहापोह या लेखात आम्ही करीत नसून जो त्यांची फळे प्रत्यक्ष अनुभवात केव्हाही निश्चितपणे मिळालेली नाहीत ती त्यांची फळे नव्हेत इतकेच येथे विशदावयाचे आहे. त्या साधनांविषयी किंवा त्यांच्या आध्यामिक वा पारलौकिक परिणामांविषयी ज्यास जसा आदर नि निष्ठा असेल तसे त्यांनी त्यास सुखेनैव आचरावे. त्यापासून लाभणारा आत्मप्रसाद हा भौतिक अशा कोणत्याही आनंदाहून निरूपम आंतरिक सुखाची जोड ज्यास देऊ शकतो त्यांनी त्यास सुखेनैव आस्वादावे. परंतु तशा अर्थाच्या ईश्वरीअधिष्ठानावर, वरील ओळीत ज्या राष्ट्रीय उत्थानादिक भौतिक चळवळींच्या ऐहिक यशाचा उल्लेख केलेला आहे, ते यश वा अपयश बहुधा मुळीच अवलंबून नसते; तर मुख्यतः तिच्या भौतिक सामर्थ्यावर अधिष्ठित असते, इतकेच येथे दाखवावयाचे आहे. ।।
या निबंधातील वरील दोन परिच्छेद जे सावरकरांनी मांडलेले आहेत, ते लक्षात घेतले तर समर्थ रामदासांच्या या ओवीतील 'परंतु तेथे भगवंताचे। अधिष्ठान पाहिजे' या शब्दांचा वा संकल्पनांची सावरकरांनी ज्या पद्धतीने केलेली आहे. त्यातील भगवंत त्यांनी जो पाहिला आहे, तो महत्त्वाचा आहे. त्यांच्या भगवंताच्या अधिष्ठानाचा अर्थ हा सर्वसाधारण विचार पारंपरिक मानसिकतेतून करणाऱ्यापेक्षा वेगळा आहे, वास्तव आहे आणि आधुनिक जगाला भौतिकतेच्या आवश्यकतेबद्दल त्या सामर्थ्याबद्दल सिद्ध करू पाहाणारा आहे.
याच निबंधामध्ये असलेला आणखी एक दृष्टिकोन म्हणजे सावरकरांनी महाराष्ट्राच्या इतिहासातून मिळालेल्या धड्याचे वा घटनांमधून काढलेला अन्वयार्थ. हा अन्वयार्थ अतिशय महत्त्वाचा आहे. मुसलमानांच्या हातून देशातील हिंदुंना जे सोसावे लागले, त्यामध्ये हिंदु आणि मुसलमान यांच्यातील संघर्षात हिंदुनी वा हिंदु समाजाने त्यावेळी काय केले, चमत्काराच्या वा दैवी शक्तींवर अवलंबून राहून त्यांनी दाखविलेली बेफिकिरी कशी घातक ठरली. भौतिक सामर्थ्य त्यामुळे कसे वरचढ ठरले गेले, ते सावरकरांनी उदाहरणांसह दाखविले आहे. यातून किती हिंदुंनी बोध घेतला, किती हिंदुत्वाचा सावरकरांना अभिप्रेत असणारा अर्थ किती तथाकथित हिंदुत्ववाद्यांनीही आजपर्यंत काढला की फक्त आपापल्या सोयीनुसार अगदी आजच्या स्वातंत्र्योत्तर भारतात राजकीय पटलावरील हिंदुत्ववादी म्हणविणाऱ्यांनीही सावरकरांच्या हिंदुत्वाचा बोध घेतला का, की केवळ त्यांच्या काही विधानांमधून सोयीनुसार हिंदुत्व स्वीकारले याची प्रचिती दुर्दैवाने वर्तमानात येत आहे.
सावरकर सांगतात कीस १३०० ते १६०० पर्यंतच्या काळात महाराष्ट्राच्या वा भारताच्या इतिहासात ईश्वरी अधिष्टानाच्या दृष्टिकोनातून केवढे आश्चर्य दिसून येते. यामध्ये ज्ञानेश्वर, निवृत्ती, सोपान व मुक्ताबाई हे आपल्या अलौकिक दैवी संपत्तीची महाराष्ट्रभर नुसती लूट करवीत होते. जिकडे तिकडे दैवी चमत्कार होत होते. या संबंधात सावरकरांनी अगदी संतपरंपरेच्या त्या काळातील घटनांचा हवालाही दिला आहे. यामुळेच ।। महाराष्ट्र ही त्याकाळी माणसांची भूमि नसून देवांचीच भूमि झालेली होते. महाराष्ट्र हेच त्या काळी देवांचे राहाते घर झालेले होते. वैकुंठ तेव्हा घर नव्हते. असे उपहासाने म्हटले आहे. पण या दैवी चमत्कारात या देवाच्या अधिष्ठानाने सुसंपन्न काळातच महाराष्ट्राचे असलेले स्वातंत्र्य नि राज्य धुळीस मिळवून त्या देवाच्या अधिष्ठानावर राक्षसांच्या राज्याची टोलेजंग उभारणी झालेली आढळते. ।।
🔴 🔴 🔴
हे अशा शब्दातील सावरकरांचे विश्लेषण नेमके काय सागू इच्छित होते, ते विचक्षणपणे जाणायला हवे. त्यात हिंदुत्वाच्या संबंधातील त्यांचा दृष्टिकोन वा ईश्वर किंवा भगवंत याचे अधिष्ठान या संबंधातील त्यांचे मत हे पारलौकिकत्वाला मानायला वा स्वीकारयला तयार नव्हते, असेच म्हणावे लागते. याचे कारण त्यांनी भौतिकतेवर अधिक भर दिला होता. मुसलमानांच्या त्या काळातील अत्याचारी राजवटीविरोधात सावरकरांनी लक्ष वेधले ते केवळ हिंदुंवर झालेल्या अत्याचारासंबंधात लक्ष वेधण्यासाठी नव्हेस तर हिंदुंच्या मानसिकतेला त्यांच्या धर्मभावनेविषयक भावनांना नवीन काळानुसार बदलण्याची कशी आवश्यकता आहे, हे सांगणारी भौतिक विकासाची दृष्टी देणारी सावरकरांची धारणा या ठिकाणी प्रतीत झालेली दिसून येते. हिंदु धर्माच्या सर्वधर्मसमभावी व अहिंसक वृत्तीलाही खतपाणी न घालता भौतिक सामर्थ्यशाली बनविण्याची मानसिकता हिंदुंमध्ये पर्यायाने हिंदुराष्ट्राने स्वीकारली पाहिजे, हेच सावरकरांना सुचवायचे होते. व्रत वैकल्य, उपास-तापास, चमत्कार यावर त्यांचा भर नव्हता, इतके स्पष्ट ‘हिंदुत्व’ सावरकरांनी मांडले आहे. काळानुसार पुढे जाणअयासाठी बौतिक सामर्थ्यवृद्धीची आवश्यकता त्यांनी नेहमी प्रतिपादली, त्यासाठीच विज्ञाननिष्ठता वा बुद्धीनिष्ठता हा त्यांच्या विचारांचा गाभा राहिलेला आहे.
चमत्कारांना मानणारा हिंदुधर्मीय त्यावेळी मुसलमानी आक्रमाणाबद्दल जरी बोटचेपे धोरण वा लाचारत्व स्वीकारणारा ठरला तरी हिंदुच्या देवाला काही त्याची दया आलेली नाही. कर्मकांड करण्यास कोणी विसरला तर मात्र हिंदुंचा देव रागावे, असे सांगत सावरकरांनी या निबंधता केलेले वर्णन हे केवळ मुसलमानांनी त्या काळी केलेल्या अत्याचारावर आसूड ओढणारे नाही तर हिंदु धर्मातील - हिंदु समाजातील प्रथा, कुप्रथा, अतिचमत्कार व कर्मकांडावर भर देणाऱ्या घटना वा वर्तनावर सावरकर जाज्वल्य भूमिका मांडत आहेत. मुसलमानी आक्रमणाबरोबरच त्यांनी ख्रिस्ती पोर्तुगीजांच्या अत्याचाराकडेही लक्ष वेधले आहे. त्या दृष्टीने त्यांच्या या निबंधातून हिंदु समाजाच्या डोळ्यात अंजन घालणारे वाक्यनवाक्ये कायम लक्षात ठेवून अनुनय करावीत अशी आहेत. ते म्हणतात....
🔴 🔴 🔴
।। जी गोष्ट् मुसलमानांची तीच गोष्ट किरिस्तावी पोर्तुगीजांची ! आम्ही ज्यास भगवंताचे अधिष्ठान समजतो ते त्यांच्या चळवळीत कुठले असणार ! उलट आमच्या देवाचा विद्वेष ते ते त्यांच्या चळवळीचे अधिष्ठान ! पण यश त्यांना मिळाले ! कुढे पोर्तुगाल ! तेथून मूठभर लोक येतात काय, गोमांतकात घुसतात काय, आणि घोड्याच्या एका फेरफटक्यासरशी साऱ्या देशभर, नगरोनगरी त्यांच्या राज्याचे झेंडे लावतात काय ! मारहाण, जाळपोळ, धर की बाटीव, नाकारले की कर ठार अशी त्या चांडाळांनी हिंदुवर धार्मिक छळाची नुसती आग पाखडली ! शेकडो पिती लेकरे, तरुण कन्या, दास करून युरोप आफ्रिकेच्या बाजारी भाजीसारखी विकली. मुंजी, लग्ने, पूजा सारे हिंदु संस्कार दंडनीय ठरले. जीव घेऊन लोकच नव्हेत तर देवही पल्या मूर्ती भंगू नयेत म्हमून, श्रीमंगेश, शांतादुर्गा, प्रभृती देवही पळाले, आणि ते ही आपल्या भक्तास सुरक्षितपणे आपल्या खांद्यावर घेऊन आपल्या पायांनी नव्हे तर भक्तांच्याच खांद्यावर आपल्या पालख्या लादून ! ।।
🔴 🔴 🔴
हिंदु या शब्दाचा खरा अर्थ काय आहे, त्या हिंदु धर्मासंबंधात अशा घटनांनी सावरकरांनी केवळ वास्तवतेचे भान आणून दिलेले नाही, तर त्या काळातील हिंदु मानसिकता, हिंदु धर्माच्या कर्मकांडी व भाबड्या भक्तीमयतेची एकप्रकारे खिल्ली उडवून हिंदु धर्म म्हणजे काय, त्याची संस्कृती म्हणजे काय आणि बदलत्या काळानुसार, येणाऱया संकटांना तोंड देण्याची ते आव्हान स्वीकारून झगडण्याची शक्ती त्यांनी मिळावावी यासाठी तळमळून लिहिणारे सावरकर भगवंताच्या अधिष्ठानाची नेमकी व्याख्या करू पाहातात, त्याचा अर्थ शोधू पाहातात. ते सावरकरांच्या तार्किक, तात्विक आणि विज्ञाननिष्ठ, बुद्धीवादी व्यक्तिमत्त्वाची धारणआच या निबंधातूनही दिसून येते.
या निबंधाच्या समारोपामध्ये असणारा परिच्छेद इतका बोलका आहे, की त्यासाठी वेगळे विश्लेषण करण्याची आवश्यकता नाही. सावरकर लिहितात...
🔴 🔴 🔴
।। सारांश, ज्या महाराष्ट्रीय इतिहासाला उल्लेखून ही समर्थांची ओवी रचली गेली त्याच हिंदूमुसलमानांच्या महायुद्धाचा पुरावा असे दाखवितो की, 'सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयांचे,' इतकेच काय ते खरे आहे. ऐहिक यश ज्या चळवळीस हवे तिने ऐहिक, भौतिक, प्रत्यक्ष सृष्टीत उपयोगी पडतील तेवढी साधने संपादून विपक्षावर 'सामर्थ्या’त मात केली की ती चळवळ बहुधा यशस्वी होते. मग तिला ज्याच्या त्याच्या धार्मिक पोथ्यांतील कल्पनाप्रमाणे न्यायाचा, पुण्याचा, स्नानसंध्याशील उपायांनी मिळविल्या जाणाऱ्या भगवंताच्या आध्यात्मिक अधिष्ठानाचा पाठिंबा असो वा नसो ! हीच गोष्ट जगातील पारशी, ख्रिस्ती, मुसलमानी, यहुदी प्रभृती यच्चयावत्धर्मग्रंथातील वचनांची नि त्यांच्या इतिहासांची आहे. ह्या प्रत्येक ग्रंथास ईश्वरदत्त म्हणून त्या त्या लोकानी मानले. त्यातल्या एकाचा देव तो दुसऱ्याचा राक्षसही असू शके. तो तो देव त्या त्या ग्रंथात वारंवार गर्जत राही की, मी माझ्याच भक्तांना 'काफरा'वर, 'पाखंडा'वर म्हणजेच त्या ग्रंथातील कर्मकाडाचे अनुसरण न करणारांवर सदोदित विजय देईन. ह्या आपल्या देवाच्या अधिष्ठानाचे साहाय्य आपापल्या उठावणीस मिळावे म्हणून त्या त्या लोकानी त्या त्या ग्रंथातील, बहुधा अत्यंत परस्परविरुद्ध धार्मिक कृत्ये केली. कोणी गोवध करून भगवंताचे अधिष्ठान संपादू गेले, तर कोणी गाईला तर काय पण तिच्या गोमयगोमूत्रालाही पवित्र मानून! पण ऐहिक यश असे त्यापैकी कोणालाही अशा ह्या भगवंताच्या अधिष्ठानाने मिळू शकले नाही !! ज्याच्या चळवळीत इतरांहून अवश्य त्या भौतिक साधनांचे 'सामर्थ्य' अधिक होते ते त्यापुरते ऐहिक विजय मिळवू शकले. ते भौतिक समर्थ्य लोपताच त्यांच्या त्यांच्या देवांसुद्धा नाश पावले! ।।
।। ईश्वराचे अधिष्ठान म्हणजे काय ? ज्यांना ज्यांना आपल्या चळवळीस ऐहिक यश हवे त्याने आमच्या पक्षास न्याय आहे, आमच्या पक्षास देव आहे, सत्य आहे यास्तव तो आमचा पक्ष विजयी होणारच अशा वल्गना करण्याचे आणि आंधळ्या निष्ठेत निश्चिंत राहण्याचे सोडून धार्मिक अर्थी भगवंताच्या अधिष्ठानाच्या नादी न लागता 'सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे,' इतकेच काय तेखरे मानावे आणि वैज्ञानिक सामर्थ्यशाली, प्रत्यक्षनिष्ठ अशा ऐहिक साधनांनी विपक्षाहून वरचढ होण्याचा यत्न करावा. ऐहिक विजयाचा मार्ग हाच! अन्यायी, परोपद्रवी व्हावे असे नव्हे; तर न्याय झाला तरी तो 'समर्थ' नसेल तर व्यर्थ होय- समर्थ अन्याय त्याच्यावर कुरघोडी केल्यावाचून राहणार नाही. दुर्बल पुण्याईही पंगु होय, हे विसरू नये. नुसत्या एकशेआठ तर काय पण अकराशेआठ सत्यनारायणांच्या पूजा केल्या तरी ऐहिक यश मिळणार नाही. कारण ते चळवळीच्या भौतिक सामर्थ्यावरच काय ते अवलंबते! असत्यनारायणाचे पूजकही ह्या जगात वारंवार यशस्वी होतात. फार काय, सारे जग निर्देव करू निघालेला रशिया आज ऐहिक दृष्ट्या परम बलिष्ठ म्हणूनच यशस्वी झालेला आहे की नाही? 'निर्देव' म्हणून त्याचे वैभव टिकणार नाही म्हणाल तर ते 'सदेव' अशाही कोणाचे टिकले नाही!! श्रीकृष्णाची द्वारका समुद्रात बुडाली; प्रत्यक्ष मदिनेतील मशीद घोडशाळा बनली: 'जेहोवा' " चे सुवर्णमंदिर तडकले; जीजसला रोमने फाशी दिले- क्रुसिफाय केले!!!! 'अस्पृश्यता काढता म्हणून बिहारचा भूकंप झाला' म्हणणारा सनातनी समाज, आणि' अस्पृश्यता ठेवता म्हणून तो भूकंप झाला' असे बजाविणारा सुधारकी ढोंगीपणा हा जितका खुळचट आहे तितकाच कोटि रामनाम जपाने वा निमाजपढाईने राष्ट्रावरील भौतिक सर्वारिष्ट शांत करू निघालेला भाबडेपणाही खुळचट आहे! रामास हराम समजणारेही जे यश मिळवू शकतात ते ऐहिक यश ज्यास हवे, त्याने ते अद्ययावतवैज्ञानिक सामर्थ्य संपादावे. चळवळीत ते सामर्थ्य असले तर भगवंताच्या अधिष्ठानावाचून काही अडत नाही. ते सामर्थ्य नसले तर भगवंताच्या अधिष्ठानासाठी कोटि कोटि जप केले तरी ऐहिक यश मिळत नाही, हाच सिद्धान्त! ।।
🔴 🔴 🔴
‘ईश्वराचे अधिष्ठान म्हणजे काय ?’ हा सावरकरांचा निबंध हिंदु समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन टाकणारा आहे. काळाप्रमाणे बदल स्वीकारण्याची व पारलौकिक नव्हे तर भौतिक सामर्थ्याची आवश्यकता किती महत्त्वाची ठरली आहे, ते सांगत हिंदु समाजातील पारंपरिक व तथाकथित सनातन म्हणविणाऱ्या विचारसरणीवर स्वातंत्र्यवीराचा हा क्रांतिकारी हल्ला आहे. वैचारिक बदल हिंदु समाजात घडणे आवश्यक होते, तेव्हाही आणि आत्ताही हे स्पष्ट करणारे सावरकर आजही हवे आहेत. कारण आजही स्वातंत्र्यानंतर हिंदु समाजाची भगवंत प्रीति अनेक ठिकाणी १३०० ते १६०० च्या काळातील आहे. भगवंताचे नेमके अधिष्ठान समजून घेत राष्ट्र सबळ बनविण्यासाठी आपल्याच अंतरंगात पाहाण्याची आवश्यकता आजही आहे, हेच यानिमित्ताने आवर्जून सांगावेसे वाटते. (क्रमशः)
- रवींद्र यशवंत बिवलकर
(संदर्भ - विज्ञाननिष्ठ निबंध - समग्र सावरकर वाड्मय खंड ६ प्रकाशन आवृत्ती २०००-२००१, मुद्रक प्रकाशक - पंडित बखले मुंबई व नाना गोडसे पुणे. मुद्रणस्थळ जॉली ऑफसेट १४ वडाळा उद्योग भवन, मुंबई ३१)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा