आल्या निवडणुका
म्हणता म्हणता २०१४ पासून १० वर्षांचा काळ सरण्यास आला. मोदींची गँरेंटी हा त्यांच्या दुसऱ्या टर्मच्या आधारे घेतलेली तिसऱ्या टर्ममधील विजयप्राप्तीसाठीची झूल किती उपयुक्त ठरते ते पाहाणे आता मतदारांच्या हाती आहे. पूर्वी म्हणत ऋण काढून सण साजरे करू नयेत, किंवा अंथरूण पाहून पाय पसरावेत... अशा प्रकारच्या वाक्प्रचाराची कमतरता नाही तसेचसत्ताधारी असो वा विरोधी पक्ष असो वा छोटे पक्ष असोत वा छोटे मोठे म्हणविणारे नेते असोत अव्वाच्या सव्वा घोषणा करणाऱ्या पक्षांच्या, त्यांच्या नेत्यांच्या संख्येची कमतरता नाही. किंबहुना हेच मेरा भारत महानचे वैशिष्ट्य असावे. जत्रेमध्ये एखादे दुकान मांडणाऱ्या दुकानदाराच्या दुकानातील मालाबद्दल मोठमोठ्याने ओरडत त्या मालाची जाहिरात केली जाते. त्यासाठी कधी मोठ्या आवाजात बोंबलणारा म्होरक्या नेमला जातो तर कधी मेगाफोनचाही वापर केला जातो. तस्साच प्रकार निवडणुकीच्या जत्रेतील राजकीय दुकानदारांचा असतो. खरे म्हणजे त्यांच्या जाहिरातीला भुलून ग्राहक मतदार किती साद देतो, कशी साद देतो. त्या त्या राजकीय दुकानदारांचे कार्यकर्ते- म्होरके व अन्य मतदाराला भुलविण्यात कसे कसे यशस्वी वा अयशस्वी ठरतात ते निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होते. इतके होऊनही गेल्या पाच वर्षामध्ये झालेली घोडेबाजारी व कथित वैचारिक स्तरावरील मतभेदांची देवाणघेवाण हा काही धडा घेण्याचा भाग आहे, असे जोपर्यंत ग्राहक-मतदाराला वाटत नाही, तोपर्यंत मतदारांमधील अविश्वासाला तडा जाणार नाही. त्यांचे त्यांचे त्यांच्या त्यांच्या वैचारिक गुंत्यांमधील अडकणे हे कोळ्याच्या जाळ्यात अडकलेल्या कीड्यासारखे असणार आहे. त्या कीड्याला मटकावण्यासाठी कोळी कोणता असेल, किंवा कोळी कोणता हवा तेच ठरविण्यासाठी तर ही निवडणूक असते. गेल्या अनेक वर्षांपासून हा साधारण दर पाच वर्षांमध्ये होणारा कोळ्याच्या खेळात कीड्याचा जीव जात आहे, तडफड होत आहे.
- शल्य बोचरे
अगदी चपखल !!!
उत्तर द्याहटवाखरं आहे...
उत्तर द्याहटवाअगदी खरं आहे हे 👍
उत्तर द्याहटवा