मंगळवार, १२ सप्टेंबर, २०२३

  सावरकर आमचे... पण   -  १०


सावरकर झेपण्यासाठी विज्ञाननिष्ठ, हिंदुत्वनिष्ठ, जात्युभेदोच्छेदक समाजमनाची तयारी होणे आवश्यक आहे, सावरकर हे पुतळ्यात, मूर्तीत, टोपीत मावणारे नाहीत. आम्ही सावरकर म्हणून ते राजकीय बेरीज करणारेही नाहीत, हे आमचे ते तुमचे असे म्हणणारेही ते नाहीत. 'सावरकर आमचे .... पण ' असे चाचरत म्हणण्याऐवजी 'सावरकर आमचे पण' असे म्हणावयाचे असेल तर हिंदु धर्माची खोटी झूल जशी बाजूला काढावी लागेल, तशीच तथाकथित धर्मनिरपेक्ष व मुस्लीम लांगूलचालनाचीही राजकीय बेगडी लकाकी खरडवून काढावी लागेल.

सावरकर झेपतील का?


स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार पन्नासवर्षांपूर्वी जे होते, ते आजही लागू झालेले दिसत नाहीत. त्यांच्या हिंदुत्वाला उजवे राजकीय पक्ष मतपेटीच्या आणि सत्तेच्या वापरासाठी वापरू पाहात आहे. तर त्यांच्या हिंदुत्वाला विरोध दर्शवणारे तथाकथित पुरोगामी आणि डाव्या विचारसरणीच्या दिशेने झुकणारे पक्ष वा डाव्या विचारांचे साम्यवादी वा तत्सम विचारांना मानत असल्याचा धिंडोरा पिटणारे पक्षही सावरकरांच्या मूलभूत विचारांना न समजून घेता त्यांच्याविरोधात अनाकलनीय आणि अभ्यासविरहीत तसेच हिंदुविरोधी मतगठ्ठ्यासाठी सावरकर विरोधाचा वापर करत आहेत. हिंदुत्ववादी म्हणविणारे पक्ष वा संघटना असोत वा तथाकथित पुरोगामी व धर्मनिरपेक्षतेचा टेंभा मिरवणारे पक्ष वा संघटना असोत. या सर्वांनी स्वतःचे स्वतंत्र तत्वज्ञान तरी तयार केले आहे का, असा प्रश्न पडतो. सत्तापिसाटासारखे वा सत्ताकेंद्रीत राजकारणासाठी विद्यमान भारतातील राजकारण आणि त्या अनुषंगाने समाजकारणही चालविले जात आहे, ते पाहाता स्वातंत्र्यवीर सावरकर वा तत्संबंधित प्रेरणास्रोतांचाही अपमान केला जात आहे, असे साकल्याने जाणवते. मुळात सावरकर हे प्रवाही व कालानुरूप जाऊ पाहाणारे, तसे समाजालाही त्याप्रमाणे जायला सांगणारे भविष्यवेधी तत्त्वज्ञान आहे. त्यामुळेच त्यांना द्रष्टे म्हणण्याचे धाडस केले जाते, कारण आजही त्यांच्या अनेक विधानांचे अस्तित्त्व अद्ययावत वाटते. ते आजही नवीन पिढीलाही पटू शकेल, इतके ताजे आहे. क्षकिरण असो वा  विज्ञाननिष्ठ निबंध यामधील त्यांचे विचार हे याच पद्धतीचे आहेत. धर्मासंबंधातील त्यांचे तर्क, दिग्दर्शन, धर्माकडे पाहाण्याची त्यांची दृष्टी या घटकांचा विचार केल्यास आजही ते बुद्धीनिष्ठतेकडे विचारप्रवर्तनाकडे समाजाला नेऊ पाहाणारे तत्त्वज्ञान वाटते. 
सर्वात महत्त्वाचे म्हणजे पोथिवादाला बाजूला करू पाहाणारे सावरकर ज्या पद्धतीने विचार मांडतात, बुद्धीवादी पद्धतीने विचार करा असे सांगतात, तेव्हा त्यांचे विचार आजच्या अनेक हिंदुना पटणारे नाहीत. याचे कारण वैचारिक प्रगल्भता आजही अनेक हिंदु समाजातील घटकांमध्ये तयार झालेली नाही. समाजाचा बारकाईने अभ्यास करून त्या समाजाला बदलण्याचे धाडस करण्याचे व तरीही बंड करून उठून धर्म सोडण्यापेक्षा आहे त्या धर्मशिक्क्याखालीही कसे सुधारता येईल, त्यासाठी विचार कोणत्या पद्धतीने करावा, हे सांगणारे सावरकर 'श्रुतीस्मृती पुराणोक्त' वा 'बाबा वाक्य प्रमाणं'मानू नका असे सांगणारे व्यक्तिमत्त्व होते. ते किती हिंदु वा सनातन म्हणविणाऱ्यांना झेपणारे आहे, असा प्रश्न आहे.
भारत हा विश्वगुरू आहे व होता, असे मार्केटिंग करणाऱ्या विद्यमान काळातील सत्ताधारी भारतीय जनता पक्ष असो किंवा संलग्न असणारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना असो यांचे सनातन धर्माचे प्राचीनत्व महत्त्वाचे कसे हे सांगणारे व सतत त्यावर जोर देणारे तत्त्व व विचार पुन्हा पोथिनिष्ठतेकडे जाणारे आहेत. नव्या पद्धतीने नव्या काळासाठी, नव्या काळाच्या भाषेत समजावून सांगणारे व श्रेष्ठत्त्व कसे योग्य आहे, हे विज्ञानाच्या आधारे सांगणारे किती आहे, त्याचा विचार प्रत्येकाने तटस्थपणे केला तर सावरकरांचा प्रखर बुद्धिवाद हा केवळ विज्ञाननिष्ठ होता असे नव्हे तर तो राष्ट्र संकल्पनेला अधिक वास्तव भरारी देणारा होता, असे म्हणता येते. 
यामुळेच सावरकरांचे रत्नागिरीतील काम, त्यासाठी त्यांना झालेला विरोध व त्या त्यावेळी त्यांनी तेथे धर्ममार्तंडांशी केलेले युक्तिवाद, संयुक्तिक तार्किकता पाहाता सावरकर हे प्रवाही होते, समाजाला हिंदु संस्कृती, परंपरा यांच्याबरोबरच इतिहासातील स्मरणीय, स्पृहणीय, स्फुरणीय घटनांबरोबरच त्याकालातील झालेल्या हिंदु समाजातील दोषांचेही मूल्यमापन करणारे सावरकर खरे म्हणजे आजच्या काळात असते तर ते त्याही पुढे जाणारे ठरले असते. केवळ सात बेड्या तोडण्याची त्यांचे आवाहन आणखीही विविध अप्रयोजक, अनावश्यक, दोषपूर्ण, भेदपूर्ण, क्रूर बेड्यांना तोडून समाजात बुद्धिवादाला पुढे नेणारे होऊ शकले असते. त्यांचे ते कर्तृत्व, त्यांचे ते विचार आज नव्या काळात कसे असते, त्यांचे विज्ञानवादी व्यवहार्य व उपयुक्ततावादाला धरून जातानाच ऐहिकतेला महत्त्व देत नवनागरी समाजाला उभारी देणारा त्यांचा दृष्टिकोन आज त्यांचा उदो उदो करणाऱ्या वा त्यांचे अनुनय करतो असे सांगणाऱ्यांना तरी झेपला असता का, तर त्याचे उत्तर नाही, असेच येईल. याचे कारण सावरकरांचा जीवनक्रम आणि त्यांची एकंदर वाटचाल पाहिली की, त्यांच्यातील विविध बदल हे कालानुसार विकसित होणाऱ्या प्रवाही तत्वांचे असल्याचे जाणवते. त्यामुळेच कुठे पुढे जायचे व कुठे थांबायचे हे एक शरीर म्हणून स्वीकारताना सावरकरांनी प्रायोपवेशनाचा मार्ग स्वीकारला होता. किंबहुना हाच त्यांच्या स्वमर्यादा ओळखत मानवी समाजाला प्रगतीपर बौद्धिक, वैचारिक आणि ऐहिकतेला वाटचाल करावयाची आहे, हेच सांगणारी त्यांची जीवनदृष्टी होती. यामुळेच त्यांच्या पश्चातही त्यांचे विचार मृतप्राय ठरत नाहीत, कारण ते बदल स्वीकारणारे आहेत. 
बदल स्वीकारतानाही त्यांनी राष्ट्र या संकल्पनेबद्दल मांडलेला विचार हा खरे म्हणजे रुढ धर्माच्या पलीकडे जाऊन मानवतेला स्पष्ट स्वीकारणारा होता. त्यामुळेच त्यांचे हिंदुत्व हे धर्माधिष्ठित नव्हते, सनातन नव्हते, वैदिकही नव्हते तर ते अस्सल राष्ट्र संकल्पनेला मानणारे होते. त्यामुळेच हिंदु कोण व अहिंदु कोण हे भेद करूनही त्यांनी अल्पसंख्याक वा मुस्लिमांना वेगळे सांगितले तरी स्वतंत्र भारतात त्यांच्यापेक्षा आम्हाला अधिक काही नको, असे सांगत समान पातळीवर सर्वांना नागरिक म्हणून साकारण्याचाच समानतेचाच दृष्टिकोन स्पष्ट केला. मुस्लीम नेत्यांच्या आक्रमक, हिंदुविरोधी धोरणाला, ब्रिटिशांच्या कावेबाजपणाला खरे म्हणजे हेच चोख उत्तर होते. किंबहुना तथाकथित काँग्रेसी अहिंसावादावरही त्याने कडी केली असती. जिनांची आणि सावरकरांची धर्मासंबंधातील तुलनाच मुळात होऊ शकत नाही, कारण सावरकरांनी अखंड भारत मागितला होता, त्यात सर्व समाविष्ट असतील, अशीच सुस्पष्ट व समानतेची हाक असणारी भूमिका होती. कोणाचेही लांगूलचालन नव्हते की, तुष्टीकरण नव्हते. इतिहासाला स्वीकारीत त्यातील गुणावगुणांचा विचार करून त्यांनी हिंदु समाजाला हाक दिली होती. दुर्दैवाने तो समाज आजही बहिरेपणाच्या व्यंगावर मात करू शकलेला नाही आणि धर्ममार्तंडांच्या बौद्धिक वैचारिक गुलामगिरीतूनही बाहेर पडू शकलेला नाही. यामुळेच सावरकर अद्यापही आम्हाला झेपलेले नाहीत. सावरकर झेपण्यासाठी विज्ञाननिष्ठ, हिंदुत्वनिष्ठ, जात्युभेदोच्छेदक समाजमनाची तयारी होणे आवश्यक आहे, सावरकर पुतळ्यात, मूर्तीत, टोपीत मावणारे नाहीत. आम्ही सावरकर म्हणून ते राजकीय बेरीज करणारेही नाहीत, 'हे आमचे ते तुमचे' असे म्हणणारेही ते नाहीत. 'सावरकर आमचे .... पण ' असे चाचरत म्हणण्याऐवजी 'सावरकर आमचे पण' असे म्हणावयाचे असेल तर हिंदु धर्माची खोटी झूल जशी बाजूला काढावी लागेल, तशीच तथाकथित धर्मनिरपेक्ष व मुस्लीम लांगूलचालनाचीही राजकीय बेगडी लकाकी खरडवून काढावी लागेल. तूर्तास इतकेच.

- शल्य बोचरे

(लेखातील चित्र सौजन्य - चित्रकार योगेंद्र पाटील, पाचोरा)

गुरुवार, ७ सप्टेंबर, २०२३

  सावरकर आमचे... पण   -  ९


सावरकरांचे हिंदुत्व हे अलीकडच्या काळात अध्यात्मिक वा धार्मिक दृष्टिने अधिक मानले जाऊ लागले. खरे म्हणजे धर्माची परिपूर्ण व्याख्या समजून व समजावून घेऊन देखील त्यांच्या हिंदुत्वाला सनातनी पद्धतीच्या विचारात बद्ध करणाऱ्या हिंदु समाजान, त्यांचे अनुयायी म्हणविणाऱ्यांनी, काँग्रेस विरोधकांनीह, काँग्रेसच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनीही सावरकरांचे हिंदुत्व नेमके ओळखेल नाही. त्यामुळेच देशाच्या अस्मितेची अचूक नाडी ओळखूनही देशवासींमध्ये सावरकर यांच्या ऐहिक, लोकिक तार्किक विचारांनी जी जागृती व्हायला हवी होती, ती आली नाही. सावरकर आस्तिक की नास्तिक या वादात कोणी गुरफटले, सावरकर मुस्लीम विरोधकच इतकेही कोणी मानले, सावरकर पूर्ण गांधी विरोधक मानून काहींनी त्यांच्यावर टीका केली तर काहींनी त्यांना आपले मानले. वास्तविक राष्ट्रपुरुष म्हणजे काय दिशा दाखवू शकतो, हेच भारतीय वा हिंदुस्थानींना समजले नाही. इस्लाम मानणाऱ्यांची गोष्ट बाजूलाच राहूंद्या पण हिंदुंनीही त्यांना ओळखले नाही. कारण हिंदुंनीच स्वतःला एखाद्या फतव्यात बांधून घेतले होते. तुम्ही तुमचा त्व सोडा मी माझा हिंदुत्वातील त्व सोडतो, असे किंवा ब्रिटिशांविरोधात लढण्यासाठी याल तर तुमच्यासह, न याल तर तुमच्याविना असे मुसलमानांना स्पष्ट बजावणारे सावरकर दुर्दैवाने ना मुसलमानांना कळले ना हिंदुंना.

हिंदुत्व - अध्यात्मिक पाया की इहवादी, वुद्धिवादी

हिंदुत्व हा शब्द सध्या तसा तात्विक वादाच्या भोवऱ्यात पडला आहे. विशेष करून भारतातील स्वातंत्र्योत्तर काळातील विद्यमान म्हणते २०१४ नंतरच्या राजकीय चक्रामध्ये हिंदुत्वाचा ज्या प्रकारे वापर केला गेला आहे, त्यामुळे हिंदुत्वाचा स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सांगितलेला अर्थ आणि सध्या सर्वसामान्य हिंदु जनता, रुढार्थाने सनातन धर्म मानणारे आणि अन्य पंथिय यांनी सध्या मानलेला अर्थ तसेच  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांनी, भाजपा नेत्यांनी मानलेला व स्वीकारलेला सोयीस्कर अर्थ यात चांगलाच फरक वाटतो. स्वामी विवेकानंदांनी हिंदु धर्माचा विशेष करून सनातन धर्माचा अघ्यात्मिक पद्धतीने मांडलेला तात्विक अर्थ हा प्रामुख्याने सर्वांना समानतेच्या पातळीवर आणू पाहाणारा होता. त्यात त्यांनी राष्ट्र या संकल्पनेनुसार मांडलेला हिंदुस्थान हा देखील सनातन्यांपेक्षा पारंपरिक तत्त्वज्ञानाला मांडणाऱ्या आणि मानणाऱ्या तत्कालिन धारणांना छेद देणारा होता. तसं पाहिला गेले तर स्वामी विवेकानंद यांना असणारी देशाविषयीची कळकळ ही वेगळ्या स्वरूपाची होती. ती पारमार्थिक आणि पारलौकिक तत्त्वज्ञानाला अधिक साकारत जाणारी होती. 

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पूर्वी हिंदुत्व हा शब्द फार वापरला गेला असल्याचे दिसत नाही, मात्र सावरकरांनी तो वापरला त्या शब्दाची संकल्पना, व्याप्ती आणि दिशा ही वेगळी होती. त्यामध्ये रुढार्थाने सनातन हिंदु धर्मीय सध्या ज्या पद्धतीने हिंदुत्वाचा वापर करीत आहे, तशी सावरकरांची हिंदुत्व ही संकल्पना नव्हती. सावरकर हे हिंदु धर्मातील व सनातनी धर्मातील विविध परंपरांना, रुढी, रिवाजांना धर्मनियमाना वा कायद्यांना झुगारणारे होते, मात्र त्यासाठी त्यांनी हिंदु धर्म वा सनातन धर्म पाळणाऱ्यांच्या व्यक्तीमत्त्वाचा द्वेष केला नाही, त्यांच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर आक्षेप घेतला नाही, किंबहुना धर्म या संकल्पनेला आणि राष्ट्र या संकल्पनेला लक्षात घेऊन भारतवर्षात हिंदु समाजावर मुस्लीम धर्मीयांकडून भूतकाळात झालेल्या अत्याचार, आक्रमण, राजकीय वर्चस्व, धर्मांतर अशा विविध बाबींच्या पार्श्वभूमीवर हिंदुंना जागृत करण्याचे, त्यांची धार्मिक अस्मिता जागी करण्याचे काम केले. सावरकरांची ही भूमिकादेखील तत्कालिन मुस्लिमधर्माच्या नेत्यांकडून केल्या जाणाऱ्या वर्चस्व गाजवत मनमानी भूमिका घेण्याविरोधात होती. ब्रिटिशांनी मुस्लिम नेत्यांना हाताशी धरून भारतीय समाजात धार्मिक भेदांचा फायदा घेत फूट पाडण्याच्या भूमिकेला मुस्लिम नेत्यांनीही दिलेल्या होयबा भूमिकेला दिलेले प्रत्युत्तर होते. हिंदु व मुस्लिम ही या देशातील तत्कालिन स्थितीतही अविभाज्य अंग आहेत, ही त्यांना मान्य असणारी बाब होती, त्यांचा विरोध होता, तो मुस्लिमांच्या इतिहासातील राजवटीला पुन्हा जागृत करू पाहाणाऱ्या मुस्लिमांच्या सरंजामी मानसिकतेला, त्यांच्या पोथिनिष्ठ धर्माने सांगितलेल्या आपणच सर्व काही श्रेष्ठ असल्याच्या दाव्याला आणि त्यामुळे राष्ट्रीय स्तरावर असणाऱ्या मुस्लिम लांगूलचालन केल्या जाणाऱ्या हिंदुंच्याही बोटचेप्या, लाचार वृत्तीला. हे सर्व व्यावहारिक होते. त्यामुळेच ऐहिकतेला प्राधान्य देत उपयुक्ततावादाला स्वीकारत अद्ययावात व्हा असे सांगणाऱ्या विज्ञाननिष्ठ बुद्धिवादी असलेल्या सावरकरांनी हिंदुत्व हे धर्माधारित पोथ्यांवर आधारित कर्मकांडावर मांडले नाही, ही बाब आजही नीटपणे लक्षात घेतली जात नाही, याचे कारण स्वार्थी राजकीय हेतूंमुळे हिंदुत्वाला पुन्हा संरजामी, वर्णवादी वा सामाजिक श्रेष्ठत्वाच्या गटवादी भूमिकेवर  हिंदुहिताऐवजी सत्तालोलूप वा सत्तापिसाट भूमिकेतून हिंदुंचे ध्रुवीकरण वा हिंदु मतांचे ध्रुवीकरण करण्याचा होत असलेला प्रयत्न. त्यातही कथित धर्मनिरपेक्षवाद्यांकडूनही सावरकर यांच्या हिंदुत्वाची पोचही नसणारे युक्तिवाद व दावे केले जात असताना सावरकरांच्या तत्वज्ञानाचा विपर्यास होऊ देत आपली पोळी भाजून घेणारे विचारवंत, संघटक, नेते, सत्ताभक्तिपायी गतिमंदबुद्धीचे अनुयायी कमी नाहीत. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदुबहुल देशातील हिंदुसमुदायाला केवळ सनातनी वैदिक धर्मामध्ये गणले नाही वा मोजले नाही. हिंदुबहुलता ही या भूमीमध्ये पसरलेल्या रुजलेल्या, याच मातीत उगवलेल्या वा पेरलेल्या धर्म- पंथ - विचार, आचार, तत्वज्ञान, संत- तत्वज्ञान आणि याच हिंदुस्थानच्या मातीत असलेल्या या धर्म- पंथ, विचारांशी संलग्न असलेल्या याच मातीतील समानशीलेषु अशा वास्तुंना तीर्थक्षेत्रांना पवित्र धर्म-तत्त्व क्षेत्रांना एकत्र मानण्याचा आणि मांडून त्यांना स्वीकारण्याचा सावरकरांचा प्रयत्न त्यांच्या हिंदुत्वाचा गाभा होता. इतके असूनही केवळ मुस्लिम धर्मावरच पोथिनिष्ठतेचा आरोप वा दावा त्यांनी केला नाही, पोथिनिष्ठ होऊ नका, त्यांना बाजूला ठेवा, इतिहास म्हणून कपाटात ठेवा, असे हिंदुंनाही सांगणाऱ्या सावरकरांचे हिंदुत्व हे म्हणूनच अध्यात्मिकतेच्या आधारावर वा धर्मातील कर्मकांडे रिवाज यांना अंधभक्तीने बरोबर नेणारे नाही. त्यांचे  हिंदुत्व डोळस आहे. त्यामुळेच जुन्या प्रमाण मानलेल्या बाबींना विज्ञानाच्या कसोटीवर पारखून घ्या, असे सांगण्याचा बुद्धिवादी भाग हा जातीय नव्हे तर अद्ययावत होता. त्यामुळेच रत्नागिरीमधील त्यांच्या स्थानबद्धतेच्या काळात त्यांनी केलेले कार्य हे नीट पाहिल्यास, डोळसपणे पाहिल्यास ते राष्ट्रीयत्वाचा संदेश देणेारे होते. जुन्या रुढी-रिती रिवाजाना बाजूला सारीत नव्या काळाच्या वैज्ञानिकक कसोट्यांवर त्यांना पारखू पाहाणारे होते. नवकालाच्या भविष्याचा वेध घेत समाजाने मार्गक्रमण करावे हे सांगणारे होते. मुस्लिमांच्या लांगूलचालनापेक्षा हिंदु समाजाला एकजुटीने उभे करत समानतेच्या तत्वावर नेऊ पाहाणारे होते. सनातन्यांच्या कर्मठपणाला उत्तर देत त्यांचे व्यक्तिस्वातंत्र्यही राखीत त्यांना अद्ययावत- काळाच्या बरोबर नेऊ पाहाणारे सावरकर हे हिंदु समाजाने खरे म्हणजे विज्ञानवादाकडे नेणारे समाजसुधारक राष्ट्रपुरुष म्हणूनन स्वीकारायला हवेत, तसे त्यांच्यायाकडे पाहायला हवे. स्वातंत्र्य हे केवळ ब्रिटिश राजवटीपासून मिळवण्याचा प्रयत्न सावरकरांनी केला नाही, तर समाजाला आधुनिकतेचा वसा देण्याचा त्यांचा  प्रयत्न होता. त्यांच्या कामात हिंदु समाजाने व विशेष करून नेत्यांनीही जितका सहभाग द्यायला हवा होता, विविध विचारांच्या राजकीयत्वाच्या पुढे जाऊन त्यांना स्वीकारायाला हवे होते, ते न स्वीकारल्याने भारताने खूप काही गमावले आहे.

सावरकरांचे हिंदुत्व हे अलीकडच्या काळात अध्यात्मिक वा धार्मिक दृष्टिने अधिक मानले जाऊ लागले. खरे म्हणजे धर्माची परिपूर्ण व्याख्या समजून व समजावून घेऊन देखील त्यांच्या हिंदुत्वाला सनातनी पद्धतीच्या विचारात बद्ध करणाऱ्या हिंदु समाजान, त्यांचे अनुयायी म्हणविणाऱ्यांनी, काँग्रेस विरोधकांनीह, काँग्रेसच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनीही सावरकरांचे हिंदुत्व नेमके ओळखेल नाही. त्यामुळेच देशाच्या अस्मितेची अचूक नाडी ओळखूनही देशवासींमध्ये सावरकर यांच्या ऐहिक, लोकिक तार्किक विचारांनी जी जागृती व्हायला हवी होती, ती आली नाही. सावरकर आस्तिक की नास्तिक या वादात कोणी गुरफटले, सावरकर मुस्लीम विरोधकच इतकेही कोणी मानले, सावरकर पूर्ण गांधी विरोधक मानून काहींनी त्यांच्यावर टीका केली तर काहींनी त्यांना आपले मानले. वास्तविक राष्ट्रपुरुष म्हणजे काय दिशा दाखवू शकतो, हेच भारतीय वा हिंदुस्थानींना समजले नाही. इस्लाम मानणाऱ्यांची गोष्ट बाजूलाच राहूंद्या पम हिंदुंनीही त्यांना ओळखले नाही. कारण हिंदुंनीच स्वतःला एखाद्या फतव्यात बांधून घेतले होते. तुम्ही तुमचा त्व सोडा मी माझा हिंदुत्वातील त्व सोडतो, असे किंवा ब्रिटिशांविरोधात लढण्यासाठी याल तर तुमच्यासह, न याल तर तुमच्याविना असे मुसलमानांना स्पष्ट बजावणारे सावरकर दुर्दैवाने ना मुसलमानांना कळले ना हिंदुंना. हे सांगण्यामागील त्यांचा श्रुढ राजकारणीही हिंदुना कळला नाही की मुसलमानांनाही आपली चूक कळली नाही. त्यामुळे पाकिस्तानची निर्मिती होत आजची दुर्दशाही स्वीकारण्याची वेळ त्यांच्यावर आली. मूळ हिंदु असलेल्या मुसलमानांना स्वीकारण्यास सावरकर तयार होते, पण मुसलमानांनाही तसे करण्याची बुद्धी होऊ नये यात त्यांनी त्यांचे कडवेपण, पोथिनिष्ठ धर्म स्वीकारण्याचा आत्यांतिक हटवादीपणा न सोडल्याचे परिणाम आजही त्यांना भोगावे लागत आहेत.

सावरकरांचे राजकारण हे ही देशहिताचे होते, केवळ तितकेच नव्हे तर देशाच्या भवितव्याबद्दल नजर ठेवून क्षितिजापलीकडे पाहाणारे त्याचे द्रष्टेपण होते. अध्यात्मिकतेच्या भासमान वा आभासी दुनियेत ते नसल्याने व समानपणाच्या जाणीवेसाठी ते झगडत राहूनही खऱ्या अर्थी साम्यवादी विचारांनाही मागे टाकणारे, राष्ट्रासाठी सर्व काही, या दृष्टीने उभे राहाणाऱ्या या व्यक्तीला समजण्यात तेव्हाही विलंब झाला आणित्यांच्या मृत्युनंतर इतके वर्षे लोटल्यानंतरही विलंब झाला आहे. त्यांना समजण्यातील ती जाण जेव्हा येईल आणि काळाप्रमाणे बदल स्वीकारम्याची मानसिकता आम्ही जोपासू तेव्हा सावरकरी तत्वांना स्वीकारले असे म्हणता येई शकेल. केवळ मी सावरकर या टोप्या घालून सावरकर समजणार नाही, हे ही तितकेच खरे !

(क्रमशः)

- शल्य बोचरे

(लेखातील चित्र सौजन्य - चित्रकार योगेंद्र पाटील, पाचोरा)
(लेखातील छायाचित्र सौजन्य - स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक प्रकाशन)

  सावरकर आमचे... पण   -  ८  

व्यक्तिमत्त्व मांडताना त्यामधील तत्त्वचिंतक, समाजसुधारक आणि विज्ञाननिष्ठ तसेच राजकीय ही अंगे अधिक महत्त्वाची वाटतात. ती पाहाता त्यातील कार्य हे स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या आणि लढलेल्या क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक वा नेते यांच्यापेक्षा अधिक मोठे वाटते कारण ते काळाच्या पुढे जाणारे आहे. अगदी सावरकर जिवंत असताना, अन्य नेते, राजकीय विचारसरणीचे अन्य पक्ष- प्रवाह आणि आंतरराष्ट्रीय स्थितीचा विचार करता स्वातंत्र्य मिळाले असतेच. त्यासाठी या सर्वांचे प्रयत्न होतेच. पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर वा ते मिळविताना समाज, राष्ट्र आणि धर्म ही संकल्पना कशी असावी, ती भविष्यात कशी उपकारक ठरू शकेल, तत्कालीन काळाचाही विचार करता त्यांनी मांडलेले या संबंधातील विचार आजही तितकेच प्रेरक आहेत,उपयुक्त आहेत नव्हे तर ते आणखी अधिक पुढे नेण्यासाठी प्रवृत्त करणारे आहेत. नवीन नागरीकरणाची पद्धती वा नागरी जीवनाची प्रणाली व जागतिक स्तरावर होऊ घातलेली जीवनप्रमाणाली त्याकाळात सावरकरांनी ओळखली होती. आणि त्यादृष्टीने भारतीय समाजानेही वाटचाल करायला हवी हा अतिशय महत्त्वाचा विचार त्यांनी मांडला.  

विज्ञाननिष्ठ, अद्ययावत भविष्याभिमुख समाजाचा विचार

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा प्रामुख्याने तत्त्वचिंतक, समाजसुधारक आणि विज्ञाननिष्ठ राजकीय व्यक्तिमत्त्व असा ठेवावासा वाटतो. यामध्ये स्वातंत्र्यासाठी त्यांनी केलेला संघर्ष, त्यांनी दिलेले योगदान हा खरे म्हणजे अनेक पैलू असणारा भाग आहे. त्यात वरील तत्त्वचिंतक, समाजसुधारक आणि विज्ञाननिष्ठ राजकीय व्यक्तिमत्त्व समाविष्ट आहे. परंतु हेच व्यक्तिमत्त्व केवळ आणि केवळ देश, समाज, धर्म, माणूस यांना नवकालाकडे, नव्याजमान्याकडे, बदलत्या काळाकडे पाहाण्यास आणि ते सारे स्वीकारण्यास शिकवणाऱ्या गुरुसारखे आहे. त्यांचे हे व्यक्तिमत्त्व मांडताना त्यामधील तत्त्वचिंतक, समाजसुधारक आणि विज्ञाननिष्ठ तसेच राजकीय ही अंगे अधिक महत्त्वाची वाटतात. ती पाहाता त्यातील कार्य हे स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या आणि लढलेल्या क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक वा नेते यांच्यापेक्षा अधिक मोठे वाटते कारण ते काळाच्या पुढे जाणारे आहे. अगदी सावरकर जिवंत असताना, अन्य नेते, राजकीय विचारसरणीचे अन्य पक्ष- प्रवाह आणि आंतरराष्ट्रीय स्थितीचा विचार करता स्वातंत्र्य मिळाले असतेच. त्यासाठी या सर्वांचे प्रयत्न होतेच. पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर वा ते मिळविताना समाज, राष्ट्र आणि धर्म ही संकल्पना कशी असावी, ती भविष्यात कशी उपकारक ठरू शकेल, तत्कालीन काळाचाही विचार करता त्यांनी मांडलेले या संबंधातील विचार आजही तितकेच प्रेरक आहेत,उपयुक्ताहेत नव्हे तर ते आणखी अधिक पुढे नेण्यासाठी प्रवृत्त करणारे आहेत. नवीन नागरीकरणाची पद्धती वा नागरी जीवनाची प्रणाली व जागतिक स्तरावर होऊ घातलेली जीवनप्रमाणाली त्याकाळात सावरकरांनी ओळखली होती. आणि त्यादृष्टीने भारतीय समाजानेही वाटचाल करायला हवी हा अतिशय महत्त्वाचा विचार त्यांनी मांडला. त्यासाठी कदाचित अन्य काँग्रेसच्या वा अन्य विचारसरणीच्या नेत्यांसारखे प्रचंड लेख लिखाण, पत्रलिखाण करून त्यांनी तत्कालिन कालातील लोकांपुढे आकार मोठा असलेले साहित्य काही ठेवले नाही. कदाचित अंदमानासारख्या ठिकाणी तुरुंगवासामध्ये अनेक वर्षे काढावी लागल्याने अधिक प्रमाणात ते लिखाण जनतेपर्यंत नेता येईल इतके करू शकले नसतील पण त्यातही त्यांनी केलेेले लिखाण हे मौल्यवान आहे आणि प्रेरकही आहे. पत्रलेखनही केले त्यातमध्ये अद्याप अप्रकाशित बरेच काही असू शकते.  किंबहुना १९३७ पासून प्रत्यक्ष राजकीय जीवन त्यांनी जगण्यास सुरुवात केली आणि त्यापूर्वी असलेले नियंत्रित विचारांचे लेखनही अधिक राजकीय अंगानेही विचार देत मांडले. मात्र त्याचे प्रमाण तसे कमी भासले तरी ते वैशिष्ट्यपूर्ण होते, द्रष्टे होते आणि भवितव्यातील भारतीय मानसिकतेला बदलू पाहाणारे होते. त्यामुळे त्या राजकीय लिखाणातही स्वातंत्र्यापेक्षा तत्कालीन राजकीय परिस्थितीतून समाजाला हिंदु-मुस्लीम द्वंद्वातून बाहेर काढण्यासाटी व्यावहारिक - मानसिक तयार करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केला. तो दुर्दैवाने ना हिंदु समाजापर्यंत पोहोचला ना मुस्लीम समाजापर्यंत पोहोचला. विज्ञाननिष्ठ समाज घडण्याची गरज, सतत काळाप्रमाणे बदलणे कसे आवश्यक आहे ही माहिती देत समाजसुधारणा करण्याची तळमळ त्यांनी व्यक्त करीत अखेरपर्यंत आपल्या तत्वज्ञानाचा पाठपुरावा केला. मात्र तो प्रयत्न पुढे नेण्यासाठी आवश्यक सैनिक निर्माण करण्यात त्यांना यश आले नाही, त्याची काही कारणे असूही शकतील पण त्यांचे तत्वज्ञान आजही रुजू न शकल्याने हिंदु पुन्हा त्यांच्या मानसिक आणि पारंपरिक सनातन धर्मात अडकून बसले आहेत तर मुस्लीम समाजही सत्यशोधकांच्या प्रयत्नांनंतरही कुराणाच्या पोथीनिष्ठतेने बद्ध झाला आहे. काळाप्रमाणे आव्हाने स्वीकारण्यासाठी सावरकरांनी सांगितलेल्या अद्ययावत व विज्ञाननिष्ठ समाजानिर्मितीला अजूनही सुरुवात झाली नाही. किमान भारतीय मानसिकतेत बदल होणे गरजेचे होते खरे पण समाजाला सावरकरी विचारांना पुढे नेणे सोडा पण जे त्यांनी मांडले आहेत, ते देखील स्वीकारणे जड जात असल्याने एका विशिष्ठ पोथिबद्ध हिंदुत्व वा सनातन धर्माचा आसरा सध्या घेतला जात आहे.

सावरकरांचे विज्ञाननिष्ठ निबंधाचे स्वरूप हे समाजाला संस्कारित करणाऱ्या आधुनिक चिंतकाचे होते. नवकालाला सामोरे जाणारे होते. त्यातूनच शिक्षण, जगण्याचा दृष्टिकोन, समाजिक स्तरावरील जीवनप्रणाली, धर्माबद्दलचे त्यांचे मत, जातिनष्ट व्हाव्यात आणि सर्व समाज समान स्तरावर यावा, वर्गकलह नव्हे तर वर्गहित लक्षात घेऊन अर्थनीती ठरावी हे मांडणारे सावरकर केवळ हिंदुंना आपले नेते वाटू शकतात, मुस्लिमांना ब्रिटिशांविरोधातील राजकीय लढ्यामध्ये त्यांच्या मुस्लीमधर्मनिष्ठतेला बाजूला करण्यासाठी याल त तुमच्यासह न याल तर तुमच्याविना आणि विरोधाल तर तुमच्याशीही संघर्ष करण्याची तयारी हिंदुंची असेल असे सांगण्याचा त्यांचा दृष्टिकोन त्या मुस्लीम लीगच्या कर्मठ वा धार्मिक कट्टरतेच्या वैचारिकतेतून आणि अव्यवहार्य शिकवणुकीतून मुस्लीम समाजाला बाहेर काढण्यासाठी दिलेले वैचारिक आव्हानच होते. आम्हाला मुस्लिमांपेक्षा जास्त काही सुविधा नकोत, त्यांना आमच्यापेक्षा अधिक काही देऊ नये, हे सांगणारे सावरकर हे जर अधिक समानतावादी वाटले नसतील तर तो दोष त्यांच्या विरोधातील वैचारिकतेचा, त्यांच्या विरोधकांच्या दृष्टिदोषाचा, विरोधकांच्या स्वार्थी मनोवृत्तीचा भाग ठरतो. भारतीय मानसिकतेत, वातावरणात रुजू पाहाणारा त्यांचा वर्गहितावर आधारित राष्ट्रवादाला अधिक प्राबल्य देणारा आर्थिक विचारही जो प्राथमिक स्तरावर मांडला गेला, तो ही जागतिक साम्यवादी विचारापेक्षा आणि भांडवलदारांच्या निव्वळ एकांगी व खडतर ठरू शकणाऱ्या वैचारिकतेपेक्षा अधिक सोयीस्कर व भारतीय अंतरंगाला साजेसे रूप देणाऱा साम्यवादापेक्षा उजवा ठरू शकला असता. पण सावरकरांचा हा राष्ट्रीय अर्थनीतीवाद विकसित व्हायला हवा होता, तो समाजवादी वैचारिकतेलाही झेपला नाही, हीच खरी भारतातील समाजवाद्यांच्या अपयशाची पावती म्हणावी लागेल. कारण भारतीय समाजवादाला असणारी धर्मस्वीकार्यतेची धर्मनिरपेक्षतेची गुणवत्ता कदाचित सावरकरांच्या धर्मनिरपेक्षतेला तत्वतः तोंडही देऊ शकली नाही का, याचा खरे म्हणजे विचार होणे गरजेचे आहे. किंबहुना समाजाला विज्ञाननिष्ठ बनविण्यासाठी असणारी सावरकरांची ताकद भारतीय समाजवादाला आणि तथाकथित साम्यवादालाही झेपली नसावी असे म्हणावे का? असा प्रश्न पडतो.

(क्रमशः)

- शल्य बोचरे

(लेखातील छायाचित्र सौजन्य - स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक प्रकाशन)

  सावरकर आमचे... पण   -  ७  

सावरकरांना गेल्या काही वर्षांत ते आमचे नव्हते असे सांगणारे राजकीय नेतेही आणि पक्षही आरडाओरड करीत राजकीय हितरक्षणासाठी तयार झालेले दिसतात तसेच सावरकरांची बाजू घेत असल्याचा अविर्भाव आणून ‘मी सावरकर’ अशा टोप्या घालायला लावणारेही दिसतात. वास्तविक सावरकरांना आणि त्यांच्या विचारांना यापैकी कोणाच्याही कुबड्या घेण्याची गरज नाही, इतके सावरकरांचे विचार स्पष्ट आहेत. त्यांचे हिंदुत्वही तितकेच पारदर्शक आहे. जे राष्ट्राभिमुख आहे. त्यांचे हिंदुत्व हे अतिशय तार्किकतेने मांडलेले आहे, त्यात धर्म नव्हे तर समाजरक्षण आणि नवविचारांना बदलत्या काळाप्रमाणे दिशा देणारे आहे. राष्ट्र आणि समाज यांना त्यांनी अचूकपणे समजून संकल्पित केले आहे.

 राष्ट्राभिमुख हिंदुनेस

सावरकर आणि हिंदुत्व यांचा संबंध नेमका कसा आहे, हे आतापर्यंत विविध समीक्षकांनी, लेखकांनी, राजकीय नेत्यांनी, सावरकरांचे विरोधक आणि अनुयायी म्हणवणाऱ्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला खरा पण तो तटस्थपणे किती जणांनी केला हे पाहाणे गरजेचे आहे. सावरकरांना गेल्या काही वर्षांत ते आमचे नव्हते असे सांगणारे राजकीय नेतेही आणि पक्षही आरडाओरड करीत राजकीय हितरक्षणासाठी तयार झालेले दिसतात तसेच सावरकरांची बाजू घेत असल्याचा अविर्भाव आणून ‘मी सावरकर’ अशा टोप्या घालायला लावणारेही दिसतात. वास्तविक सावरकरांना आणि त्यांच्या विचारांना यापैकी कोणाच्याही कुबड्या घेण्याची गरज नाही, इतके सावरकरांचे विचार स्पष्ट आहेत. त्यांचे हिंदुत्वही तितकेच पारदर्शक आहे. जे राष्ट्राभिमुख आहे. त्यांचे हिंदुत्व हे अतिशय तार्किकतेने मांडलेले आहे, त्यात धर्म नव्हे तर समाजरक्षण आणि नवविचारांना बदलत्या काळाप्रमाणे दिशा देणारे आहे. राष्ट्र आणि समाज यांना त्यांनी अचूकपणे समजून संकल्पित केले आहे. धर्म या शब्दाचेही त्यांनी बारकाईने विवेचन आणि विश्लेषण केले आहे. तसेच वैदिक असो, बौद्ध असो, ख्रिश्चन असो की मुस्लीम, शीख असो किंवा ज्यू अशा विविध धर्मांचा त्यांनी अभ्यास केला. लंडनमध्ये असताना त्यांनी शिखांचा इतिहास लिहिला मात्र तो काळाच्या गर्तेत कुठे गहाळ झाला. सांगायचा मुद्दा त्यांनी इतिहासाचा अन्वयार्थ वा निष्कर्ष काढताना धर्माचेही अस्तित्व लक्षात घेतले होते कारण समाज आणि धर्म याचे महत्त्व त्यांना पुरते ठाऊक होते. सावरकरांच्या संपूर्ण वाटचालीत वा आयुष्यातील विविध टप्प्यांमध्ये त्यांना येणाऱ्या अनुभवांमधून त्यांनी आपल्या विचारांनाही अधिकाधिक प्रगल्भ करण्याचा प्रयत्न केला वयानुसार त्यांच्या विचारांमध्ये फरक होत गेला अनुभवानुसार आणि घटना, परिस्थितीनुसारही त्यांना त्यातून शिकायला मिळाले ते शिकत गेले आणि त्यातूनच हिंदुत्व या समाजाचा अर्थ त्यांनी मांडला तो देखील राष्ट्राच्या जाणीवेसाठी. केवळ हिंदु या रुढार्थाने स्वीकारल्या जाणाऱ्या एका धर्माच्या संबंधात त्यांना हिंदुत्व अभिप्रेत व्हते. अंदमानातील मुसलमानांच्या अनुभवामुळेही काही केवळ त्यांनी हिंदुचे संघटन करण्याचे ठरवले नव्हते, अंदमानातील अनुभवांमुळे ब्रिटिशांची कूटनीती कळली, मुसलमानांना आपण वेगळे आहोत, ही जाणीव ज्या त्यांच्या नेत्यांनी दिली होती, त्याला खतपाणी घालण्याचे काम ब्रिटिशांनी केले ते ओळखले होते. इतकेच नव्हे तर तसे पाहायला गेले तर हिंदु समाजातील असंघटित मानसिकता जी मुस्लीम धर्मीयांच्यापुढे खूप कमी प्रमाणात होती ती स्पष्ट जाणवल्याने त्यातील उणीवा दूर करण्याची गरज आहे, हे त्यांना पक्के जाणवले. पण हे करताना ब्रिटिशांविरोधात काम करताना हिंदुमुस्लीम ऐक्य हवे पण लाचारी नको, ही भूमिका त्यांना घेणे का भाग पडले, याचाही विचार करायला हवा. तो न केल्याने अनेकदा सावरकरांवर मुस्लीम विरोध वा द्वेष करण्याचे त्यांचे धोरण असल्याचे आरोप केले जात असल्याचे दिसून येते. ही स्थिती अतिशय सावरकरांवर अन्याय करणारी आहे असेच म्हणावे लागेल. मुळात मुस्लीमांच्या संबंधात तुष्टीकरणाची वा बोटचेपेपणाची भूमिका तत्कालीन काँग्रेसजनांनी, गांधीजींनी, नेहरूंनी आणि अन्य नेत्यांप्रमाणेच हिंदु जनतेनेही का स्वीकारली हा जसा प्रश्न आहे तसाच प्रश्न हिंदु- मुस्लीम यांना न्याय्य अस्तित्व हवे असे सांगताना स्वत्व जपण्याचा प्रयत्न त्यादृष्टीने मुस्लीम नेत्यांना का करावासा वाटला नाही, मिळेल तितके घशात घालण्याची वृत्ती मुस्लीम नेत्यांनी स्वीकारली त्या बद्दल मुस्लीम समाजातील लोकांनी वा अन्य नेत्यांनी गप्प बसणे का पसंत केले असा प्रश्नही विचारण्याची आणि त्यावर अभ्यास करण्याचीही गरज आहे. हे सारे राष्ट्राभिमुखता याच घटकाकडे मुस्लिम समाजाची धारणा कशी होती, त्यावर प्रकाश टाकणारे आहे. मुळात धर्मवेडाच्या आणि इतिहासातील सत्ताधारी असल्याचा अहंकार हा भारतीय मुस्लिमांत रुजला आणि रुजवला गेलाही. त्याला कारण मुळात धर्मवेड इतकंच नव्हे तर एका धर्मग्रंथात सांगितलेले आहे तितकंच स्वीकारित नव्या काळाकडे न बघण्याची प्रामाणिक वृत्ती नसणारी धर्मवेडी वृत्ती. यामुळे बुद्धिवादी विचार करणे मुस्लिमांमधील अनेक नेत्यांना झेपले नाही. सत्यशोधक मुस्लीम व्यक्ती किती झाल्या तर त्याही हाताच्या बोटावर मोजून बोटे शिल्लक राहातील इतक्याच. धर्म त्यातील उदारमतवादी असणारे मुस्लीम नेते वा व्यक्ती स्वातंत्र्यपूर्व काळातही फार दिसून येत नाही. हिंदू समाजात मात्र तसे न झाल्याने वैदिक, सनातनी कर्मठ व्यक्तीं विचार या विरोधात बुद्धिवादी व्यक्तीही तशा बऱ्याच झाल्या. आधुनिक आणि अद्यावत शिक्षणाकडे झुकणारा हिंदु समाज त्यामुळेच राष्ट्रवाद या अर्थाने राष्ट्र या संकल्पनेला समजण्याप्रत आला अनेकांनी त्यात दिशाहीही दिली. हिंदु समाजाला पुरातन वा श्रुतिस्मृति पुराणोक्ततेपासून बाहेर काढण्याचा सावरकरांचा प्रयत्न आणि हिंदुत्वाचा संकल्प हा खऱ्या अर्थाने त्या राष्ट्र, स्वराज्य, स्वत्त्व या बाबींना अधिक खुलवून सांगमारा आहे. अर्थात तरीही हिंदु समाजात आज धार्मिक कर्मकांड वा संस्कृतीच्या नावाने पुराणकालीन प्रथांना, कर्मकांडांना मोठं करून आणि बुद्धिवादी वा ज्ञानवादी असणारी वा दावा करणारी परंपराही चालत आहे. त्या धर्मग्रंथांना बाजूला जपून इतिहास म्हणून पाहा असे सांगणारे सावरकर त्या हिंदुना झेपले नाहीत, आजही झेपतच नाहीत असेच दिसत आहे. यातून मुस्लीम समाज कुठे असेल याची फक्त कल्पना केलेली बरी. सध्याच्या काळात तर धर्माच्या नावाने फाळणी करून निर्माण झालेला मुस्लिमांचा पाकिस्तान त्याच जुन्या विचारांना, धर्मग्रंथाना पोथिबद्ध स्थितीतच स्वीकारणारा असल्याने तेथील झालेली नागरिकांची मानसिकता, बौद्धिकता ही समाजाला विकलांग करणारी दिसू लागली आहे. अशाच प्रकारची मौलवी मानसिकता हिंदु समाजात भिक्षुक मानसिकतेकडे गेली तर उत्तर पेशवाईसारखा कालखंड पुन्हा निर्माण होऊ शकतो. आणि यासाठीच धर्म, रिवाज आदी जुन्या पोथिबद्ध विचारांबद्दल सावरकरांनी दाखवलेली कपाटे हीच योग्य आहेत. विज्ञाननिष्ठ दृष्टीने व बुद्धिच्या, सारासार विवेकाच्या सहाय्याने तावून सुलाखून आणि पडताळून घेतले गेले नाही, तर जुन्या चांगल्या रिती रिवाज यांना आधार राहाणार नाही, काळाच्या कसोटीवर ते उतरतातच असे केवळ तोंडी म्हणण्याऐवजी ते विज्ञानाच्या कसोटीवर पारखले गेले पाहिजेत इतके कारण हाच हिंदुनेस वा हिंदुपण पुढे राष्ट्राभिमुख दिशादर्शनासाठी उपयुक्त ठरणार आहे. पुढच्या पिढ्यांना भुर्जपत्रांच्या आधाराऐवजी आंतरजालाचा वा त्याही पलीकडे असलेल्या वैज्ञानिक माध्यमांचा आधार द्यावा लागणार आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हिंदुत्त्व जितके सरळ साधे सोपे आहे तितकेच ते सखोल विचार करून समाजाला गांभीर्याने बुद्धिवाद पत्करायला लावणारे आहे. मानवी शरिराचा वापर हा सर्व प्रकारे करावा लागतो, होऊ शकतो केवळ त्यामुळेच जात्युच्छेदन असो वा व्यवसाय बंदीची बेडी तोडणे असो वा अन्य विविध बेड्या असोत त्या तोडण्याची गरज आहे. सावरकरांनी सांगितलेल्या सात बेड्या या किंबहुना त्यांनी दाखवून दिलेली उदाहरणे वा प्रातिनिधीकही आहेत. त्या व्यतिरिक्त अन्य बेड्या वा बंधनेही आहेत त्यांना कालनिहाय विचारांनी. उपयुक्ततावादाच्या नजरेने शोधण्याची आवश्यकता आहे. नवनव्या शोधांमुळे समजाची झालेली स्थिती, वाढणारी नगरे, नगररचना, जीवनशैली याचा विचार करता सावरकर हे त्या काळात किती पुढे होते आणि आपण आजच्या काळातही किती मागे आहोत, ते लक्षात येऊ शकते. 

 (क्रमशः)

- शल्य बोचरे

(लेखातील छायाचित्र सौजन्य - स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक )

  सावरकर आमचे... पण   -  ६  

हिंदुत्व हा शब्द स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मांडण्यापूर्वी तो शब्द फार कमी वेळा वापरला गेला असेल. अर्थात तो वापरताना हिंदु धर्म या अर्थाने वा त्या संबंधाने तो वापरला गेला.   मुळात हिंदुत्व हे हिंदुमध्ये प्रचलित अशा कोणत्याही धर्ममतापेक्षा व्यापक आहे. त्याला बहुसंख्यांकाच्या धर्ममताशी समानार्थक समजल्याने अल्पसंख्याकांना हिंदु हा शब्द अप्रिय आणि अनिष्टही वाटू लागला. सावरकरांनी मात्र हा शब्द वा संकल्पना वापरताना केलेला विचार हा खूप व्यापक आहे, त्यामागे इतिहासाचा निष्कर्ष आहे, भौगोलिक जाण आहे, मानवी समाजाची जाणीव आहे,. संस्कृती- रिती-रिवाजांची जपणूक आहे, तत्त्वज्ञान, तर्कशास्त्र, धर्म-पंथ, पूजा-प्रार्थना आणि त्यापेक्षाही महत्त्वाची बाब म्हणजे हिंदुस्थान या प्रांतातील माणसांवर झालेल्या अत्याचारांची, धर्मांतर आणि त्यासंबंधातून तयार झालेले प्रश्न तसेच गुलामगिरीच्या आणि सत्ताधारी आक्रमकांच्या राजवटीच्या प्रभावाची, स्वत्वातून बेघर करू पाहाणाऱ्या वैचारिक बलात्काराची, ब्रिटिश सत्तेमुळे व त्यांच्या कूटनीतीमुळे होत असलेल्या विविध दुष्परिणामांची अचूक जाण आहे व ती सावरकरांना होती. ... 

हिंदुत्वाची भूमिनिष्ठ संकल्पना समाजरक्षणासाठी


स्वातंत्र्यवीर सावरकरांची हिंदुत्व ही संकल्पना अतिशय सखोल पद्धतीने मांडलेली दिसते. त्यांनी केवळ अंदमानात आलेल्या मुस्लीम आक्रमकतेवरून हिंदुत्व मांडले नाही की केवळ एक धर्म म्हणून हिंदुत्वाकडे पाहिले नाही. हिंदुत्व हा शब्द स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मांडण्यापूर्वी तो शब्द फार कमी वेळा वापरला गेला असेल. अर्थात तो वापरताना हिंदु धर्म या अर्थाने वा त्या संबंधाने तो वापरला गेला. सावरकरांनी मात्र हा शब्द वा संकल्पना वापरताना केलेला विचार हा खूप व्यापक आहे, त्यामागे इतिहासाचा निष्कर्ष आहे, भौगोलिक जाण आहे, मानवी समाजाची जाणीव आहे, संस्कृती- रिती-रिवाजांची जपणूक आहे, तत्त्वज्ञान, तर्कशास्त्र, धर्म-पंथ, पूजा-प्रार्थना आणि त्यापेक्षाही महत्त्वाची बाब म्हणजे हिंदुस्थान या प्रांतातील माणसांवर झालेल्या अत्याचारांची, धर्मांतर आणि त्यासंबंधातून तयार झालेले प्रश्न तसेच गुलामगिरीच्या आणि सत्ताधारी आक्रमकांच्या राजवटीच्या प्रभावाची, स्वत्वातून बेघर करू पाहाणाऱ्या वैचारिक बलात्काराची, ब्रिटिश सत्तेमुळे व त्यांच्या कूटनीतीमुळे होत असलेल्या विविध दुष्परिणामांची अचूक जाण आहे व ती सावरकरांना होती. त्यामुळेच त्यांनी हिंदुत्व संकल्पना मांडताना हिंदु समाज, राष्ट्र, अहिंदु, हिंदु समाजामधील आणि धारणांमधील  प्राचीन आधार, लिखाण, इतिहास यांचा मागोवा घेतला आहे. मूळ ‘सप्तसिंघु’ याच्याशी वेदकालीन संबंध असल्याचे सांगत तसेच हिंदु या शब्दाचा हिंदुत्वाशी निगडित असणारा अर्थ अतिशय अभ्यासूपणे स्पष्ट केला आहे. हा शब्द मुसलमानंनी काढलेला नाही. हिंदु, हिंदुस्थान, हिंद या प्राकृत शब्दाचा उगम हा सप्तसिंधु या आपल्या प्राचीन अशा संकल्पनेत आहे. सप्तसिंधु, सिंधुस्तान, सिंधु या संस्कृत आणि स्वकीय अशा आपल्या प्राचीन अभिधांचीच  हिंदु, हिंदुस्थान ही रूपे आहेत, असे सांवरकर सांगतात. त्यात ते भविष्यपुराणाचाही आधार घेतात, अरब ग्रंथाचेही दाखले देतात. अपभ्रंश म्हणून होणारा ‘स’ चा ‘ह’ होतो ते सांगत त्यादृष्टीनेही सावरकरांनी हिंदु या शब्दाची उकल केली आहे. हे करीत असताना हिंदु हा शब्द राष्ट्रीय आहे. गुरु गोविंदसिंहांनीही त्या संबंधात काय सांगितले आहे, ते देखील ते आपल्या लेखातून सांगतात. अभ्यासपूर्णपणे ते सारे तपशील मांडतात.  हे सांगण्याचे कारण म्हणजे हिंदु हे नाव कोणत्याही धर्मग्रंथावरून तयार झालेले नाही तर ते काही धर्ममत नव्हे. आसिंधुसिंधुपर्यंत विस्तारलेल्या भौगोलिक प्रांताचा वा देशाचा निर्देश करणारे आहे. अशा या प्रांताला आणि तेथे तयार झालेल्या विविध धर्म, संस्कृती, पंथ, यांना संलग्न करणाऱ्या या हिंदु शब्दाला सावरकरांनी अतिशय सुस्पष्ट करीत मांडले आहे. रुढार्थाने सध्या हिंदु हा धर्म म्हणून संबोधला जातो, तो शब्द या सावरकरांच्या हिंदुत्वामधील एक विविध धर्म, पंथ यातील गट आहे इतकेच नव्हे तर सावरकर सांगतात की, सुरुवातीपासून एक मोठी दिशाभूल झाली की, हिंदु शब्दाचा संबंध हिंदु धर्माशीच काय तो जोडला जाऊन हिंदुत्वाची व्याख्या न करता हिंदु धर्माची व्याख्या आम्ही करू लागलो. त्यातून हिंदुत्वाची सर्वांगीण अशी व्याख्या राष्ट्रीय आणि सांस्कृतिक अशी केली गेली नाही. त्या मुख्य भागाकडेच दुर्लक्ष झाले. त्याची धार्मिक व्याख्याच जो तो करू लागला. हिंदु समाजातील अनेक लोक हे वेदांचा अनुनय करणारे असल्याने ती व्याख्या करताना वेदांचा अनुनय करणारे म्हणजे हिंदु, अशी ही व्याख्या करण्यात आली. …. मुळात हिंदुत्व हे हिंदुमध्ये प्रचलित अशा कोणत्याही धर्ममतापेक्षा व्यापक आहे. त्याला बहुसंख्यांकाच्या धर्ममताशी समानार्थक समजल्याने अल्पसंख्याकांना हिंदु हा शब्द अप्रिय आणि अनिष्टही वाटू लागला.  येथे अल्पसंख्याक हा शब्द सावरकरांना त्यावेळी अभिप्रेत होता, तो वेदप्रामाण्य न मानणारे पंथ, धर्म यांना लक्षित होता. कारण त्यावेळी आर्यसमाज, ब्राह्मोसमाज, जैन, बौद्ध, शीख आजी धर्म-पंथ यांनी हिंदु शब्दाला अनेकदा मध्येमध्ये नाकारले होते. याचे मुख्य कारण हेच की, हिंदुत्वाची व्याख्या धार्मिक दृष्टिकोनातून केली गेली; ती दिशाभूल होती, असे सांवरकर स्पष्ट सांगतात. यातच सावरकरांना अभिप्रेत असलेल्या हिंदुत्वाची स्पष्ट कल्पना येऊ लागते. वैदिक धर्माला हिंदु असे म्हणण्यामागे काही कुटील हेतू नव्हता, हे ही ते स्पष्ट करतात. मात्र त्याचा दुष्परिणाम मात्र त्यावेळी झाल्याचे त्यांनी सांगितले आहे. हिंदुत्व हा त्यांचा ग्रंंथ आणि १९३६ मधील त्यांचा या संबंधातील सह्याद्रीमध्ये आलेला लेख यामध्ये सावरकरांच्या हिंदुत्वाचे पूर्ण आकलन खरे म्हणजे होऊ शकेल. पण  लक्षात कोण घेतो, अशी स्थिती आजही आहे, हेच दुर्दैव.

हिंदु कोण आणि अहिंदु कोण याची व्याख्याही त्यांनी अतिशय बारकाईने केली आहे, ती करताना अपवादही असतात, हे ध्यानात घेत त्यांनी आपली बाजू स्पष्ट केली आहे. मुळात हिंदुत्व ही संकल्पना त्यांनी असे विविध आधार घेऊन ज्या पद्धतीने मांडली आहे, त्यामागे असणारे उद्दिष्ट लक्षात घेतले गेले पाहिजे. ते केवळ धार्मिक नाही केवळ मुस्लिम आक्रमकांनी भारतात केलेल्या धर्मांतराचे पडसादही त्यांनी विचारात घेतले आहेत. या मुस्लिमांच्या पराभूत मानसिकतेमधून हिंंदुंविरोधात असलेल्या रोषामागे असणारी कारणेही त्यांनी ओळखली आहेत. त्यासाठी ब्रिटिशांनी कसे खतपाणी घातले तेही त्यांनी हेरले आहे. इतकेच नव्हे तर अंदमानातील अनुभव, खिलाफत आंदोलन, त्याला गांधीजींचा आणि काँग्रेसमधील हिंदुंमधील नेत्यांचाही मिळालेला पाठिंबा, केरळमधील मोपला हिंसाचार, हिंदुस्थानावर राज्य केलेल्या मुसलमानी राजवटीचा मराठ्यांनीही दिलेल्या चोख उत्तरानंतरही झालेला पराभव पण त्यांना ब्रिटिशांच्या आगमनामुळे वाटू लागलेली पुन्हा सत्तास्थानी येण्याची तगमग, मुस्लीम लीग वा अलीबंधूंनी केलेली स्वतंत्र मुस्लीम देशासाठीची लागवड आदी बाजूही त्यांनी पूर्णपणे विचारात घेतल्या. पॅन इस्लामिक चळवळ त्यांनी त्यावेळी हेरली. त्याच चळवळीला त्यांनी हिंदुत्वाद्वारे दिलेले हे उत्तर केवळ राजकीय नव्हते, केवळ सामाजिक नव्हते, केवळ भौगोलिक सीमा मर्यादित करीतही माघार सांगणारे नव्हते. संपूर्ण पृथ्वीवर असलेल्या देशांमध्ये आता हिंदुंचा असणारा प्रदेश, हा एकमेव असा हिंदुस्थान असल्याचे सांगत त्यासाठी हिंदुना त्यांचा ‘सातबारा’ स्पष्ट करीत सावरकरांनी हिंदुंना एकवटण्याचा प्रयत्न केला. या हिंदुंमध्ये वैदिक, सनातनी इतकीच मर्यादा नाही तर त्यात शीख, जैन, बौद्ध, आर्यसमाजी, देवसमाजी, निरीश्वरवादी, असे सारे पंथ-धर्म यातील लोक येतात. अशी व्यापक व्याख्या त्यांनी केली ती म्हणजे 

आसिंधु- सिंधुपर्यंता यस्य भारतभूमिका। पितृभू: पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिति स्मृत:।।

खरे म्हणजे हिंदुस्थानची ही भूमी, तिची व्याप्ती आणि तिच्यावर असणारी या सर्व हिंदुंची मालकी नव्हे तर जबाबदारी त्यांनी यात स्पष्ट केली. ही जबाबदारी म्हणजेच या भूमीवर असणारा त्यांचा अधिकार हा पितृभूमी म्हणून, पुण्यभूमी म्हणून किती महत्त्वपूर्ण आहे, तेच सांगणारी ही व्याख्या आहे. याचे कारण या भूमीखेरीज जगामध्ये हिंदुंना आता स्वत:ची अशी भूमी नसल्याचे दिसत असल्यानेच आक्रमक नसणाऱ्या या हिंदुंना पुन्हा गुलामगिरीच्या जोखडाखाली, आक्रमकांच्या क्रूर राजवटीमध्ये गुलाम व्हावे लागू नये, असा स्पष्ट उद्देश असल्यानेच त्यांचे स्वत्व राखणारे हे हिंदुत्व आहे. त्या हिंदुत्वातून तयार होणारा हा हिंदुस्थान हा कसा असेल आणि तेथे अहिंदुनाही काय स्थान असेल हे देखील त्यांनी स्पष्ट केले. त्यातही त्यांचा भर हा हिंदुंच्या संघटनावर होता कारण संघटन हवे ते का तर स्वराज्यासाठीच. त्याचा हा दृष्टिकोन अतिशय महत्त्वाचा आहे, ज्यात स्वत्व राहते ते स्वराज्य आहे, असे त्यांचे मत हे किती बारकाईने आणि सखोल विचाराने मांडले गेले ते लक्षात यावे. त्या काळातील ब्रिटिशविरोधातील संघर्षात मुसलमान-हिंदु एैक्य आणि त्यासाठी वाटेल त्या पद्धतीने मुस्लीम नेत्यांच्या मागण्यांपुढे लाचार होणे किती अयोग्य आहे हे त्यांनी याच हिंदु संघटनेच्या बळकटीसाठी आणि स्वत्वासाठी स्पष्ट केले होते. विविध धर्मांसंबंधात त्यांनी बारकाईने अभ्यास केला होता. मात्र त्यामागे असणारा उद्देश हा नव्या कालाप्रमामे समाज अद्ययावत व्हावा, धर्मांच्या रुढी रिवाजांना स्वीकारताना जुन्या ग्रंथामधील विचार अंधपणे स्वीकारू नयेत. त्यांचे अस्तित्त्व हे मानवाच्या वा माणसाच्या कल्याणासाठी असते, हे समजून घेत त्या दृष्टीने कालानुसार त्यांची उपयुक्तताही महत्त्वाची असते, हे मानणारे सावरकर हे समाजाने बुद्धिवादी व्हावे यासाठीच प्रयत्नशील राहिलेले व्यक्ती होते. विज्ञानानिष्ठता वा विज्ञानावर अधिष्ठान असणे सांगणे ही बाब खरे म्हणजे बुद्धिवादीच आहे. त्यावेळच्या मुस्लीम नेत्यांचा असणारा हट्टाग्रह, दुराग्रह तसेच अल्पसंख्याक असूनही बहुसंख्याक हिंदुंना आजही आपल्या नियंत्रणाखाली  आणू पाहाणारी जुन्या काळातील सत्ताधारी मानसिकता मुस्लीम समाजातील अनेक नेत्यांमध्ये भिनली होती. धर्मवेड आणि धर्माची अन्य धर्मांचे अस्तित्तवही न मानण्याची शिकवण त्यातून ते बाहेर पडत नव्हते. त्यामुळे त्यांच्या अतिरेकी मागण्यांमुळे स्वातंत्र्य संघर्षात ब्रिटिशांपुढे हिंदु नेते मात्र हिंदु-मुस्लीम ऐक्यासाठी हतबल राहून लाचारीही करीत. हीच मानसिकता जी काँग्रेसमधील नेत्यांनी जोपासली आणि गांधीजींच्या विविध प्रयोगांपुढे नमते घेत काँग्रेसचे मुस्लीमधार्जीणे - लाचार धोरण म्हणजे हिंदू-मुस्लीम ऐक्य असे समीकरण बनले गेले. याच समीकरणाला नीट समजून घेत सावरकरांनी हिंदुंमधील स्वत्त्व जागृत करण्याचा आणि त्यासाठी संघटन करण्याचा चंग बांधला, जागृकता आणण्याचा प्रयत्न केला. सावरकरांची हिंदुत्वाबद्दलची धारणा ही हिंदु समाजाला जागृत करण्याची होती, जागे करण्याचा प्रयत्न होता, मुस्लीमांच्या आक्रमकतेबद्दल असणारे प्रत्युत्तरही होते आणि त्यांनाही ब्रिटिश विरोधातील लढाईसाठी स्वाभिमानाने सामावून घेत त्यांना पोथिनिष्ठता सोडण्यास सांगणारे आणि त्यांनीही रितीरिवाजांना विज्ञानाच्या कसोटीवर पारखावे, असे सांगणारे त्यांचे उपदेश हे द्वेषातून नव्हे तर समाजाचा घटक असणाऱ्या भारतीयांसाठीच होते. त्यामुळेच त्यांचेही स्वत्व आहे हे त्यांना अमान्य नव्हते. पण त्यांचे म्हणजे मुस्लीम नेते आणि समाज यांचे अल्पसंख्याक असूनही असणारा अट्टाहास आणि त्यांचे स्वराज्यासाठी हवे असणारे सहकार्य वा कार्य यासाठी त्यांच्यापुढे लाचार व्हायचे नाही ही सावरकरांची भूमिका होती. जी काँग्रेसला व विशेष करून गांधीजींच्या विचारांना मान्य नव्हती. वास्तविक त्यामुळे होणारे तोटे सावरकरांना नेमके उमगले होते. यासाठीच आवश्यक होते ते हिंदुंचे संघटन. त्यादृष्टीने त्यांनी केलेला विचार अतिशय आग्रही आणि व्यवहारी आहे, हे स्पष्ट होते. स्वराज्यासाठीच संघटन हवे या लेखामध्ये त्यांनी ही भूमिका अतिशय बारकाईने आणि गांभीर्याने स्पष्ट केली आहे. 

त्यात ते म्हणतात की, “ स्वराज्य की संघटन हा प्रश्न नसून सध्याच्या परिस्थितीत संघटन केले तरच स्वराज्य मिळणें शक्य आहे. आम्हांस स्वराज्य आणि संघटन हीं दोन्हीहि हवीं आहेत. कारण आम्हां हिंदूस अभिप्रेत असलेले स्वराज्य, हिंदु संघटनावाचून मिळणे शक्यच नाही. हें पूर्वीही काही विचारवंत देशभक्तांच्या ध्यानात आलेलेच होतें - आज तें मध्याह्नीच्या दिवसाइतके सुस्पष्टपणे प्रत्येक हिंदूच्या प्रत्ययास येत आहे. कारण ज्या स्वराज्याकरिता आम्ही धडपडत आहो, ज्या स्वराज्याकरिता सत्तावनच्या क्रांतियुद्धापासून शेकडो, सहस्रो क्रांतिकारक हिंदु वीर सशस्त्र प्रतिकार करीत रणात मेले, फाशीवर लटकले, अंदमानात सडले, कारागारात पडले, देशोधडी लागले, ज्या स्वराज्याकरिता राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपासून तो असहयोगाच्या आंदोलनापर्यंत शेकडो नेमस्त आणि हिंदु पुढारी निःशस्त्र प्रतिकार करीत आणि लोकमान्यांपासून गांधीजींपर्यंत खटपटत आले तें स्वराज्य म्हणजे हिंदुस्थान देशाचे एकराष्ट्रीय, स्वायत्त, लोकसत्ताक आणि स्वतंत्र राज्य हेच होय. या स्वराज्यात हिंदी नागरिक असलेल्या प्रत्येक स्त्रीपुरुषाचें जातिपंथनिर्विशेष असलेले स्वत्व राखिलें जाईल, प्रत्येक धर्मास आणि जातीस, आपापल्या संख्येप्रमाणे जे न्याय अधिकार उपभोगिता येतात, ते समानत्वे बजावता येतील. हे स्वराज्य केवल हिंदू चेंही नसेल, तें अहिंदू चेंही नसेल; तर तें प्रत्येक हिंदी मनुष्याचे असेल आणि त्यात प्रत्येकास आपलें न्याय्य स्वत्व न गमावता नांदता येईल. ....”

“स्वराज्याचें स्वरूप असें असले पाहिजे असें तुम्ही म्हणता ना की, त्यात हिंदु किंवा मुसलमान अशी कोणतीही धार्मिक भेदाभेदाची कल्पना न शिवता त्याचे स्वरूप केवळ हिंदीपणाचें असावें आणि त्यात मुसलमानादिक प्रत्येक धर्म-पंथ जातिमात्राचे स्वत्व समप्रमाणाने आणि यथान्याय राखिलें जावें ? ठीक तर, जर या स्वराज्यात प्रत्येक धर्मपंथाचें स्वत्व राखिलें जाणार आहे, तर मग त्यात हिंदुधर्मही स्वत्व योग्य प्रमाणाने आणि यथान्याय राखिलें गेलें पाहिजे, नाही काय? इतकेच नव्हे तर हिंदुस्थानातील लोकसंख्येचा दोन तृतीयांश भाग ज्या हिंदूंचा आहे. त्यांचे स्वत्व ज्या स्वराज्यात इतर अत्यल्प किंवा अल्प अशा अहिंदु समाजाच्या स्वत्वाच्या अतिरेकी मागण्यांस बळी दिलें जातें, तें स्वराज्यच नव्हे; तुम्ही म्हणता त्या व्याख्येप्रमाणेदेखील तें स्वराज्यचं नव्हे हें मानलेच पाहिजे, नाही काय ? तर मग या प्रमेयावरून दुसरें प्रमेयही आपोआपच अनुमानिलें जातें कीं नाही की, अशा रीतीने हिंदूचें स्वत्व इतर अहिंदु समाजाच्या अवास्तव आणि अवाच्या सवा मागण्यांस आम्ही बळी देऊ देणार नाही आणि उलटपक्षी त्या आमच्या अहिंदु राष्ट्रीयबंधूंच्या न्याय्य मागण्यांचा प्रतिकार न करिता जे पंथस्वातंत्र्याचे अधिकार आम्ही भोगू इच्छितो तेच इतरांसही अपभोगू दिल्यावाचून आम्ही राहणार म्हणून प्रतिज्ञाबद्ध असलेलें हिंदुसंघटन हें त्या स्वराज्याच्या विरुद्ध जात नाही; नाही इतकेंच नव्हे तर त्याच्या सिद्धीसाठी प्राणपणाने झटत आहे.”

हिंदु संघटित व्हावा हे किती गरजेचे आहे आणि त्यासाठी असलेल्या चळवळीवरही शंका-कुशंका व्यक्त करणाऱ्यांना सावरकरांनी हे दिलेले उत्तर अतिशय व्यवहारी, चोख आणि न्याय्य असेच होते. पण त्यांच्या या सुस्पष्ट अशा भूमिकेबद्दल किती मुस्लीम नेते आणि हिंदू नेते यांनी जाणून घेतले हाच प्रश्न आहे. त्यांची ही भूमिका लोकांपर्यंत का पोहोचू शकली नाही, हिंदु समाजही कोणत्या गुंगीत वा धुंदीत त्यावेळी राहिला, याची तसेच ज्या मुस्लीम नेत्यांनी आणि समज असलेल्या मुस्लिमांनी सावरकरांच्या या धारणेकडेही जर दुर्लक्ष केले असेल किंवा तर ती विचारसरणी त्यांना समजली नसेल तर त्यापेक्षा करंटेपण कोणते असाच सवाल निर्माण होतो.


राजकीय आणि सामाजिक नोंदीच्या दृष्टीनेही सावरकर जागे होते. निद्रिस्त हिंदुंना जागे करण्याचा प्रयत्न करीत होते. हिंदु आणि अहिंदु यामधील भेद स्पष्ट करतानाच हिंदुत्वाची व्याख्या सरकारकडेही नोंदवून घ्यावी असे सांगताना त्यामागील त्यांनी मांडलेली भूमिकाही दूरदृष्टीची होती. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या हिंदुत्वाच्या व्याख्येनुसार भूमीविषयी जागरुकता आणून हिंदूंचे संघटन हा महत्त्वाचा घटक त्यांनी हाती घेतला होता. केवळ अंदमानातील मुस्लीमांच्या अनुभवामुळे नव्हे किंवा ब्रिटिशांनी केलेल्या कूटनीतीतून हिंदु-मुस्लीम यांच्यात फूट पाडून आपले इप्सित साधण्याच्या कृत्यामुळे नव्हे तर हिंदुमधील सत्व आणि स्वत्त्व जागवण्यासाठी हिंदुत्वाची गरज होती ते हिंदुत्व हे वैदिक नव्हे तर राष्ट्रीय होते ते हिंदुत्व भूमिनिष्ठ समूहाला संघटित करणारे तत्त्व होते.  हिंदु समाजामधील आणि विशेष करून सनातनी, वैदिक समाजामधील दरी दूर होणे कसे गरजेचे आहे, ती बाब हिंदुंच्साठी म्हणजे या संपूर्ण भूमीसाठी किती गरजेची आहे, हे सांगताना रत्नागिरीतील त्यांचे जात्युच्छेदनाचे कार्य, सात बेड्यांना संपुष्टात आणण्याचे काम हे काळाबरोबर हिंदु समाजाला प्रवाही करणाचे होते. शुद्धिकरणाची मोहीम हा देखील त्यांच्या पद्धतीने केला जाणारा बुद्धिवादी कार्यभाग होता. त्यासाठी त्यांनी रितीरिवाज रुढी यांनाही समाजाच्या आणि व्यक्तिस्वातंत्र्याचा विचार करून सामावून घेत तर कधी वेळप्रसंगी जोरदार कठोर ताशेरे मारीत समाजाला बुद्धिवादी स्तरावर विचारप्रवृत्त करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. रत्नागिरीतील एकूणच त्यांचे प्रत्येक कार्य हे या समाजाला नवकालाच्या आव्हानांना भवितव्यात सामोरे जाण्यासाठी सज्ज करणारी मानसिकता, बौद्धिकता विकसित करणारे होते.  त्यांचे हे कार्य आणि बुद्धिवाद समाजाला त्यावेळी किती झेपला, त्यांच्या विरोधकांना व अनुयायांनाही किती झेपला, किती कळला, इतकेच नव्हे तर आजही तो प्रत्ययास येत असतानाही तो स्वीकारण्याची मानसिकता - क्षमता समाजात आहे का, ते ज्याचे त्याने ठरवावे. एक मात्र खरे की सावरकरांचे हे हिंदु संघटन हे धर्माधिष्टित नाही तर समाज आणि राष्ट्राधिष्ठित होते. तेवढे जरी आपल्याला कळले तरी भविष्यातील वाटचालीमध्ये अजूनही बदल करण्यासाठी सावरकरांच्याच विचारांच्या बीजाचा उपयोग होऊ शकेल. सावरकरांचा विचार हा कालप्रवाहाप्रमाणे पुढे सरकणारा आणि बदल करीत, बदल स्वीकारीत जाणाऱ्या समाजासाठी आहे.

(क्रमशः)

- शल्य बोचरे

(लेखातील छायाचित्र सौजन्य - स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक प्रकाशन)

रविवार, ३ सप्टेंबर, २०२३

  सावरकर आमचे... पण   -  ५  

श्रीकृष्णाने गीतेत केलेल्या उपदेशातून बदल या गोष्टीला अतिशय महत्त्व दिले आहे. सावरकरांनीही यामुळेच नेहमी बदल स्वीकारण्यासाठी आणि त्यासंबंधात बुद्धीचा वापर करावा म्हणून विज्ञानाच्या कसोटीवर तावूनसुलाखून एखादी बाब घ्यावी असे सातत्याने सांगितले आहे. त्यांचा काळानुसार अद्ययावत राहाण्याचा हाच तर खरा उद्देश समाजापुढे ठेवणे गरजेचे आहे. रत्नागिरीतील स्थानबद्धतेचा काळ म्हणजे १९२४ पासून १९३७ पर्यंतचा आता त्याला १०० वर्षे होतील. हा काळ आणि इतक्या वर्षानंतरही त्यामधील अनेक घटक लक्षात घेतले तरी सावरकरांनी सांगितलेल्या या सात बेड्यांना संपुष्टात आणण्याचे महत्त्व लक्षात यावे.


रत्नागिरीतील कृतिशीलता


स्वातंत्र्यवीर सावरकर रत्नागिरीमध्ये स्थानबद्धतेच्याकाळात आले त्यापूर्वी त्यांना रत्नागिरीत तुरुंगातही ठेवले गेले होते. रत्नागिरीत दोन ठिकाणी त्यांनी वास्तव्य केले होते. आपल्या या रत्नागिरीमधील वास्तव्यात त्यांनी केलेले कार्य हे डोळसपणे आणि बुद्धीला प्रमाण मानीत, वैचारिक क्रांतीचा उद्देशही ठेवीत वा त्यादृष्टीने वैचारिक बदलांचे प्रतिनिधीत्व करणारे सावरकर हे विविध घटनांमधून पाहिल्यास त्यांची त्या त्या कामांमधील दूरदृष्टी आणि समाजाला आधुनिक करण्याची धडपडच दिसते. केवळ इतकेच नव्हे तर अशा प्रकारच्या सामाजिक आणि धार्मिक दृष्टिकोनातील बदलांमधून त्यांना राष्ट्राच्या भविष्याचा वेध घ्यायचा होता. जो वेध होता तो त्यांच्या दृष्टीने भवितव्यात बदलणाऱ्या आणि जगाबरोबर जाऊ पाहाणाऱ्या आधुनिक समाजाच्या प्रवासाचा, त्यातील बदल स्वीकारू पाहाणाऱ्या मानसिकतेचा. रत्नागिरीतील स्थानबद्धतेच्या सुमारासच त्यांचा हिंदुत्व ग्रंथ लोकांपर्यंत पोहोचू लागला होता. त्यातूनच हिंदुत्वाचा त्यांनी सांगितलेला अर्थ आणि केलेली व्याख्या ही लक्षात घेत त्यांच्या हिंदुपणाचा वेध घेतला तर जात्युच्छेदन हा त्याचा महत्त्वाचा एक पाया होता. त्यातून भावी हिंदुराष्ट्रा वा राष्ट्राच्या वाटचालीच्या अनुषंगाने सावरकरांना काय अभिप्रेत होते, त्यांना समाज कसा अभिप्रेत होता, हे ही लक्षात येते. त्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीतील त्यांची कामगिरी लक्षात घेत तिचे विश्लेषण करणे औचित्याचे ठरते. 

जातिभेद संपुष्टात आणण्याचा उद्देश हाच मुळात राष्ट्राच्या आणि हिंदु समाजाच्या भवितव्याशी संलग्न आहे.  या भेदाभेदांना संपुष्टात आणण्यासाठी स्पर्शबंदी, वेदोक्तबंदी, व्यवसायबंदी, शुद्धीबंदी, बेटीबंदी, सिंधुबंदी आणि रोटी बंदी अशा सात शृंखला वा बेड्या तोडण्याची जाणीव समाजाला करून दिली. वरवर पाहाता या बेड्यांना संपुष्टात आणणे ही काळाची गरज आहे, हे त्यांनी ओळखले होते. किंबहुना काळाप्रमाणे राहावे, बदलावे हेच सूत्र सावरकरांनी सातत्याने राखण्याने वा तशी धारणा ठेवल्याने ते काळाच्या पुढे राहिले, असे म्हणावे लागते. विज्ञाननिष्ठ निबंधांमधून त्यांनी त्या संबंधात विश्लेषणही केले आहे. सुबुद्धीचा नव्हे तर दुर्बुद्धीचा भेद करायला हवा असे सांगताना त्यांनी एका भाषणात श्रीकृष्णाने अर्जुनाला न लढण्याच्या दुर्बुद्धीपासून परावृत्त केले त्यामुळे दुर्जनांचा नाश करणे शक्य झाले असे सांगितले. येथे श्रीकृष्णाचा उल्लेख स्पष्ट होतो तो आणखी एका महत्त्वाच्या विचारातून, श्रीकृष्णाने गीतेत केलेल्या उपदेशातून बदल या गोष्टीला अतिशय महत्त्व दिले आहे. सावरकरांनीही यामुळेच नेहमी बदल स्वीकारण्यासाठी आणि त्यासंबंधात बुद्धीचा वापर करावा म्हणून विज्ञानाच्या कसोटीवर तावूनसुलाखून एखादी बाब घ्यावी असे सातत्याने सांगितले आहे. त्यांचा काळानुसार अद्ययावत राहाण्याचा हाच तर खरा उद्देश समाजापुढे ठेवणे गरजेचे आहे.

रत्नागिरीतील स्थानबद्धतेचा काळ म्हणजे १९२४ पासून १९३७ पर्यंतचा आता त्याला १०० वर्षे होतील. हा काळ आणि इतक्या वर्षानंतरही त्यामधील अनेक घटक लक्षात घेतले तरी सावरकरांनी सांगितलेल्या या सात बेड्यांना संपुष्टात आणण्याचे महत्त्व लक्षात यावे. आजही त्या आणि त्यापेक्षाही अन्य काही बेड्या समाजाने आपल्याच हातात घालून घेतल्या आहेत. त्यांचा संबंध रुढार्थाने मानल्या जात असलेल्या धर्म कल्पनेतही येतो, त्याही तोडण्याची गरज आहे. जन्मजात जातिभेद मोडायचा म्हणजे काय करावयाचे यावर सावरकरांनी त्यासाठी मांडलेले उद्दिष्ट वेगळे आहे. त्यामागे हिंदुराष्ट्राचे अस्तित्त्वही या हाजारो वर्षांच्या रचनेला उलथल्यास नामशेष होऊ शकेल, अशा धारणेतून त्या संलग्न प्रश्नाची भीती लक्षात घेत त्या संबंधात लोकांना वा लोकांच्या मानसिकतेला तयार करण्याचाच प्रयत्न सावरकर करतात. जातिभेदाबद्दल तो मोडण्याचा प्रयत्न करणारा जो वर्ग वा गट आहे, त्याच्या मनात असणारा गोंधळ  आणि नसणारा निश्चित कार्यक्रम यासाठी सावरकरांचा त्या बद्दल विचार करणारा हा निबंध अतिशय भेदक आहे. त्यांची काही विधाने, संक्षिप्त विधाने मुद्दाम या अनुषंगाने देत आहे. 

►“ जन्मजात जातिभेदाचे उच्चाटन म्हणजे जन्मजात म्हणून केवळ गृहीत धरलेल्या उच्चनीचतेंचे उच्चाटन.”

►“ जन्मजात जातिभेदामध्ये जे काही आपणास राष्ट्रीय दृष्ट्या अनिष्टतम असल्याने मुख्यत: उच्छेदावयाचे आहे ते आजच्या जातीतील जन्मजातपणाची नुसती उपपत्ती वा भावना नसून तिच्याशी घातलेली मानीव उच्चनीचतेची आणि विशिष्टाधिकारांची सांगड ही होय.” या संबंधात ते स्पष्ट सांगतात की, “ अमुक मनुष्य ब्राह्मण कुलात जन्माला आला म्हमूनच केवळ त्याच्यात तसा विशेष गुण नसूनही त्यास अग्रपूजेचा, वेदोक्ताचा, पूर्वीच्या निर्बंधानुसार अवध्यत्वाचा इत्यादी जेविशिष्ट जन्मजात अधिकार वा सवलती देण्यात येतात त्या तेवढ्या बंद करावयाच्या आहेत….” 

►“ कोणतीही जात दुसरीहून मूलत:च श्रेष्ठ वा कनिष्ठ आहे, ही गोष्ट केवळ पोथींत तसे सांगितले आहे, म्हमूनच गृहित घेता कामा नये” 

अशा विवध प्रकारच्या विश्लेषमातून सावरकरांनी व्यवसायबंदी तोडण्यासाठी काय करावे ते सांगितले. ती रुढीच होती आणि ती देखील आज जवळजवळ नाहिशी केली गेलेली आहे, असे सांगितले तरी त्याचा उल्लेख करीत सावरकरांनी त्यासंबंधातील पार्श्वभूमी स्पष्ट करीत समाजाच्या मानात साचलेली रुढीनिहाय आनुवांशिक हक्कांबद्दलची जागाही संपवण्याचा प्रयत्न त्यावेळी केला होता. व्यवसायबंदी, रोटीबंदी, स्पर्शबंदी आणि बेटीबंजी हे जन्मजात जातिभेदाचे चार प्रमुख पाय असल्याचे स्पष्ट करीत त्यांनी या बेड्यांना तोडून टाकम्यासाठी समाजाची मानसिकता सुधारण्याचे काम केले. तसे प्रातिनिधीक स्वरूपातून दाखवून देत त्यांनी देशापुढेही कृतिशील उदाहरण समोर ठेवले. 

स्पर्शबंदीच्या बद्दल केवळ स्मृश्यच अस्पृश्यांचा छळ करतो असे नाही तर एक अस्पृश्य दुसऱ्या अस्पृश्याचाही छळ करतो, असे सांगत त्या संबंधातील उदाहरणे दाखवून देत त्यांनी हे रोख्यासाठी कंबंर कसली. रुढार्थाने असलेल्या हिंदु धर्मामधील या रुढींनी बंदीने ग्रासलेल्या हिंदुंना जागे करीत एकाच जातीत म्हणजे हिंदु या जातीत आणण्याचे सावरकरांचे प्रयत्न मोलाचे होते, सक्रीय होते. तार्किक आणि तात्विकही होते. सुधारकांनी त्यासाठी काय केले पाहिजे, कुठे कुठे त्याचा अवलंब करीत स्पर्शबंदी संपवण्यासाठी झटले पाहिजे, ते सावरकर सांगत, स्वत: त्यासाठी सक्रीय असत. शाळांमधून मुलांना सरसकट सर्वांबरोबर बसवण्याचा त्यांचा त्या काळातील कार्याचा भाग हा लक्षात घेता त्यांचे सक्रीयत्व आहेच पण त्याचबरोबर राष्ट्र म्हमून पुढे निर्माण होणार असलेल्या एका संकल्पनेमध्ये कसे राहावे, याचेही शिक्षणच आहे. सावरकरांनी रत्नागिरीच्या या स्थानबद्धतेत केलेले हे कार्य केवळ हिंदु संघटनाचे नव्हे तर मानवतेच्यादृष्टीनेही तितकेच मोलाचे होते. राष्ट्रनिर्मितीमधील हा घटक भावी राष्ट्राला घडवणारा एक महत्त्वाचा भाग होता, हे लक्षात घेण्याची आवश्यकता आहे.

रोटीबंदीसारखी बेडी तोडणे हे देखील किती गरजेचे आहे ते सांगताना सावरकर म्हणतात की,

► “जातिभेदांच्या या चार पायांमध्ये मुख्यत्वे करून हा पाय असा आहे की, त्यावर हाणताच धूड खाली कोसळणार आहे. आजच्या या हजारो जाती एकमेकांपासून पृथक करणारे मुख्य नी सर्वगामी जिवंत लक्षण रोटीबंदी नी बेटीबंदी हेच होय.”

► “नुसते जेवायचे… भिन्न जातियाबरोबर जेवायचे की हा एवढा दुर्गम दुस्साध्य वा टणारा जातिभेदाचा प्रचंड गड गडगडत कोसळलात पाहिजे… जातिभेद एकत्र लढून जन्मात मरायचा नाही पम एकत्र जेवताच तो ठीकच्या ठीकाणी मरुन पडतो.  यासाठी खर्या सुधारकाने हे सूत्र वेशीवर टांगावे की, रुचेल नी पचेल ते वैद्यकीयदृष्ट्या योद्या त्या कोणत्याही मनुष्याने खावे नी प्यावे. तो हिंदु असो, मुसलमान असो, अंदमानीज असो कोणाबरोबरही खाण्याने, पिण्याने, सहभोजनाने, सहपानाने जात जात नाही, धर्म बुडत नाही….”

सावरकरांचे अशा प्रकारचे विश्लेषण सहभोजनाच्या कल्पनेलाही तारक ठरवीत त्यांनी धाडसाने समाजातील तत्कालिन जाचक रिवाजांना, रुढींना बाजूला करीत हिंंदु समाजाला एक करीत त्यातील माणसांमधील माणूस जागा करण्याचे काम केले. 

बेटीबंदीबद्दल त्यांनी सर्व प्रकाराने विश्लेषण केले आहे. केवळ इतकेच नव्हे तर त्यामागील संकल्पना स्पष्ट करताना ते म्हणतात

► “ बेटीबंदी तोडणे म्हणजे अमक्या जातीच्या मुली तमक्या जातीत दिल्याच पाहिजेत अशी आज्ञा नसून तर कोणा हिंंदुने प्रेमशील, सुप्रजननक्षमता प्रभृति वैवाहीक गुणानुकूल असा अन्य जातीचा हिंदु वधूवर निवडला तर केवळ जात भिन्न एवढ्यासाठीत तो विवाह निषेधिला जाऊ नये वा त्या योगे त्या वधूवरांस पूर्णपणे सव्यवहार्य समजण्यास हरकत असू नये अशी एक अनुज्ञा आहे.”


रत्नागिरीमधील सावरकरांच्या कामावरून सनातनींनी दिलेले सहकार्य, बहुजन समाजाच्या नेत्यांनीही केलेले कौतुक आणि सन्मान्य स्वीकार, कर्मठ वा जुन्या विचारांना धरून बसणाऱ्या सनातनी वैदिकांनी केलेला विरोध, अगदी हिंदुमहाभेतूनही झालेला विरोध, संस्था संघटना, ब्राह्मण वा अन्य उच्चवर्णात गणला जाणारा तत्कालीन समाज यांनी केलेला विरोध व टीकेचा भडिमार असा स्रव प्रकार सावरकरांनी सन केला. त्याला तोंड दिले. त्यांच्या रत्नागिरीतील या कामामुळे खरे म्हणजे राष्ट्रनिर्मितीमधील त्यांच्या धारणेलाच सुस्पष्टता आणणारे होते. याचा दुसरा अर्थ असाही होऊ शकतो, की,. स्थानबद्धतेनंतर राजकारणात प्रत्यक्ष जावे लागेल याची जाणीव त्यांना होती, भविष्यात काय करायचे आहे, याचीही मानसिक, बौद्धिक जुळवणी त्यांनी केलेली असावी. किंबहुना अंदमानात रवानगी झाल्यानंतरच्या विविध अनुभवांमुळे त्यांनी हिंदुं समाजाच्या गुणावगुणांचा, गुणदोषांचा आणि ब्रिटिशांच्या कूटनीतीचा तसेच त्यातून मुस्लिमांनी केलेल्या आक्रमक राजकीय मागणींचा पुरेपूर अभ्यास - तपशील याचा आलेख त्यांनी मनात तयार केला होता, यामुळेच अंदमानातून सुटका करून घेण्याची त्यांची तळमळ ही पलायनाची नव्हे तर देशाला उभारी देण्यासाठी नव्या आव्हानात्मक खेळीची होती. त्यांना साथ देण्यात हिंदु समाज कुठे कमी पडला हे हिंदु समाजाने लक्षात घ्यायला हवे. बुद्धी म्हणजेच विज्ञान असेच समीकरण स्वीकारलेल्या सावरकरी तत्त्वज्ञानाला आपण गमावले का याचा विचार करीत अजूनही अद्ययावत होण्यासाठी नव्याने सावरकरी धारणेचा अभ्यास करण्याची व स्वीकारण्याची तयारी समाजाने करायला हवी.  

सावरकरांची या प्रकारे बेड्या तोडण्याची कृती ही यासाठीच त्याकाळात केलेली राष्ट्रनिर्मितीमधील महत्त्वाची पायरी होती, हिंदु समाजामध्ये एकत्व निर्माण करण्यासाठी त्यांनी केलेले रत्नागिरीतील स्थानबद्धतेमधील हे प्रयत्न केवळ धर्मसुधार, समाजसुधार, राष्ट्रनिर्मितीमधील घटक म्हणूनच नव्हेत तर त्यामागील उद्देश हा बुद्धिवादी पद्धतीने मांडून अनेक ठिकाणी सनातनींचा रोष पत्करून आणि त्यांना तोंड देत, त्यांच्या टीकांना उत्तर देत त्यांनी वेळप्रसंगी काही मार्ग सुचवूनही समाजसुधारणेची रत्नागिरीतील प्रातिनिधीक कृती देशभरात पोहोचवली होती. नव्हे ती पोहोचली होती, त्यामुळेच ती कृती केवळ स्थानबद्धतेच्या काळात जोपासलेला फावल्या वेळातील उद्योग नव्हता, तर भविष्यातील विविधांगी घटनांना सामोरे जावे लागणार आहे, यासाठीच तयार केलेला पाया होता. त्यांच्या या कृतिचा अर्थ समजून येतो तो त्यांच्या हिंदुत्वविषयक संकल्पनेतून, हिंदुत्वाच्या जाणीवेतून. मग ती कृती व जाण केवळ सुधारणेची नसते, तर ती राष्ट्रनिर्मितीमधील एक पायरी असते. बहुसंख्य असलेल्या हिंदुसमाजाला मुस्लीम लांगुलचालनापायी वा ब्रिटिशांच्या कूटनीतीमधील समाजात दुफळी माजवण्याच्या कृतीलाही दिलेले अस्मितापूर्वक आणि स्वाभिमान व स्वत्व जपत दिलेले उत्तर असते. तो अखंडत्वासाठी सांगितलेला मार्ग होता, केवळ हिंदुसमाजरक्षणासाठी नव्हे तर या संपूर्ण आसिंधुसिंधुपर्यंत…. अशा हिंदुत्वाच्या व्याख्येत बसणाऱ्या हिंदुंसाठी आणि अहिंदुनाही त्यात त्यांचे न्याय्य हक्क देत त्यांच्या अस्तित्वालाही न धुडकावता सामावण्याचा प्रयत्न करणारे ते तत्त्वज्ञान होते. राजकीय स्तरावर त्यांना त्यात जरी यश मिळाले नसले तरी त्यांचा प्रयत्न हा अतिशय गरजेचा होता, हे आज राहून राहून पटू लागते. तार्किकतेच्या दृष्टीने त्यांचे हिंदुत्व हे केवळ हिंदुंनाच नव्हे तर अहिंदुनांही तारणारे होते, ही बाब आज अन्य बाबतीत पटू लागते. फक्त ती प्रामाणिकपमे स्वीकारण्याची मानसिकता हवी.

(क्रमशः)

- शल्य बोचरे

(लेखातील छायाचित्र सौजन्य - स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक प्रकाशन)

फिर सुबह होगी .... पण कधी?

सुबह कभी तो आयेगी... हे गाणे आज नेहरूवादी नसलेल्या  व नेहरूंच्या राजवटीवर आसुड ओढणाऱ्या विचारसरणीच्या सत्ताधारी ‘भाजपवादी’ अशा १० वर्षांच्या...