बुधवार, २४ ऑगस्ट, २०२२


   पुनरुत्थान   

विश्वगुरुत्वाकर्षण नको विज्ञाननिष्ठा हवी

विश्वगुरूसारखी ‘अतिउन्नत’ कल्पनेची वल्गना करण्यापूर्वी समाजसुधारक म्हणूनच त्यांनी आपली बुद्धी आणि विज्ञानवादी वृत्ती व्यावहारिकतेने पणासच लावली होती. त्यामुळेच त्यांचे हिंदुत्व हे खऱ्या अर्थाने व्यावहारिक, राजकीय आणि बौद्धिक होते. समाजात असलेल्या अंधपणाने स्वीकारलेल्या जुनाट चालीरितींबाबत, धर्माने घालून दिलेल्या बेड्यांबाबत त्यांनी केलेले पुनरुत्थान हे अतिशय गरजेचे होते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी आपला धर्म, आपले राष्ट्र मोठे आहे हे जाणूनही त्यातील महत्त्वाचा इतिहास समजून घेऊन, प्रथम समाजातील कुप्रथांना दूर करून समाजातील व्यक्ती व्यक्तींनाही विज्ञानवादी होण्यासाठी हे पुनरुत्थान केले.

हिंदु ही एक राष्ट्रवाचक भौगोलिक संकल्पना आहे आणि ही संकल्पना केवळ सनातनी वैदिक नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी कथन केलेली हिंदु या शब्दाची व्याख्या बारकाईने पाहिली तर आजच्या या भारताला त्यांनी पुण्यभू म्हणजे होलीलँड असेच मानून या भारतात जन्मलेल्या व्यक्ती, त्या व्यक्तीसमुहांची तत्त्वज्ञाने, त्यांचे संत, त्यांचे धर्म-पंथ गट-तट यांचाही जन्म याच भूमीत असल्याचे सांगत मातृभूमीचा खरा अर्थ या देशातील हिंदुंसाठी सुस्पष्ट केला आहे. हिंदु संघटना संघटित करण्यासाठी, हिंदु व्यक्तींना संघटित करण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन लोकांनी स्वीकारावा यावर भर दिला यातच खरी सावरकरी हिंदु संकल्पनेची तार्किक चौकट आहे. भारतातील हिंदुंचा विचार करून त्यांच्या रक्षणासाठी, अन्याय निवारणासाठी त्यांनी केवळ वैदिक धर्माला मानणाऱ्या गटालाच नव्हे तर या भूमीमध्ये जन्मलेल्या, निर्माण झालेल्या तत्त्वज्ञानाशी संबंधित धर्म, पंथ आणि विचारसरणीला मानणाऱ्यांना हिंदु असल्याचे त्यांनी प्रतिपादले. इतकेच नव्हे तर अहिंदु असणाऱ्यांनाही विज्ञाननिष्ठतेचे महत्त्व सांगत पोथिनिष्ठतेमधून बाहेर पडण्यास सांगितले.

एका रात्रीत वैदिक धर्म, त्यातील वर्णव्यवस्था, जाति, उपजातींचा पसारा आवरता येणार नाही, याची त्यांनाही कल्पना होतीच पण त्याबद्दल समाजाला जाण करून देण्याचा आणि प्रामुख्याने समाजातील जातपात आधारित दुहीजन्य व्यवस्था संपुष्टात आणण्याचा त्यांचा प्रयत्न होता. विश्वगुरूसारखी ‘अतिउन्नत’ कल्पनेची वल्गना करण्यापूर्वी समाजसुधारक म्हणूनच त्यांनी आपली बुद्धी आणि विज्ञानवादी वृत्ती व्यावहारिकतेने पणासच लावली होती. त्यामुळेच त्यांचे हिंदुत्व हे खऱ्या अर्थाने व्यावहारिक, राजकीय आणि बौद्धिक होते. समाजात असलेल्या अंधपणाने स्वीकारलेल्या जुनाट चालीरितींबाबत, धर्माने घालून दिलेल्या बेड्यांबाबत त्यांनी केलेले पुनरुत्थान हे अतिशय गरजेचे होते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी आपला धर्म, आपले राष्ट्र मोठे आहे हे जाणूनही त्यातील महत्त्वाचा इतिहास समजून घेऊन, प्रथम समाजातील कुप्रथांना दूर करून समाजातील व्यक्ती व्यक्तींनाही विज्ञानवादी होण्यासाठी हे पुनरुत्थान केले. त्यासाठी अंदमानातील कारागृहातून सुटका व्हावी यासाठी जे जे प्रयत्न केले ते करण्यामागे त्यांना आपल्या हाती असलेल्या आयुष्यातील काळाचे पक्के भान होते. ५० वर्षांची सजा दिल्यानंतर आपण बाहेर येऊ तेव्हा तुरुंगात राहून आपण राजकारण सोडा पण समाजासाठी  आणि देशासाठीही काम करता येणार नाही. तुरुंगात राहाणे म्हणजे तुजविण जनन ते मरण असेच त्यांना वाटत होते. यासाठीच स्वातंत्र्याचा खरा अर्थ त्यांना उमगला. त्यामुळेच तुरुंगातून बाहेर येत राजकारण बंदी स्वीकारून, स्थानबद्धता स्वीकारून ते स्वस्थ बसले नाहीत. हिंदुत्व हा ग्रंथ लिहिण्यामागे त्यांची धारणा ही समाजोत्थानाची वा समाजोद्धारणा करण्याची होती. समाजाला विशेष करून जातिप्रथेत, अनावश्यक बेड्यांमध्ये अडकलेल्यांना आधी बाहेर काढण्याचे पुनरुत्थान महत्त्वाचे होते. एकप्रकारे सर्व हिंदुना बौद्धिक बळकट करणेही गरजेचे होते.  त्यांनी आपल्याच समाजाला डोळसपणाने जगण्यासाठी आणि काळानुसार विज्ञानवादी होण्यासाठी प्रवृत्त करावयाचे ठरवले. ही तळमळ आणि काम हे किंबहुना स्वातंत्र्याच्या चळवळीइतकेच मोलाचे आणि महत्त्वाचेच होते. हिंदुत्व हा ग्रंथ कोणा एका वैदिक, सनातनी हिंदुंसाठी लिहिला नाही, तर तो राष्ट्रासाठीच लिहिला आहे. त्यामुळेच तो ग्रंथ लिहितानाही मुळात त्यांनी राष्ट्रभक्तीच स्पष्ट केली. यामुळेच त्यांना जातीय म्हणणाऱ्यांच्या बुद्धिमत्तेची कीव करावीशी वाटते. या देशामध्ये बहुसंख्य असलेल्या हिंदुंचे संख्याबळ लक्षात घेता, त्यांच्या हितासाठी काम करणारे हे व्यक्तिमत्त्व राष्ट्रोद्धारकच म्हटले पाहिजे. अहिंसावादावर भर देणाऱ्या कितींनी या देशाचे सर्वसमावेशक असे राष्ट्रीय भौगोलिक आणि सांस्कृतिक रूप देत राष्ट्रधर्माला सर्व धर्मांना समान वागणूक देण्याचे काम केले आहे? मुस्लिमांना अहिंदु म्हणवूनही त्यांनी पोथिनिष्ठा सोडून विज्ञाननिष्ठा बाणवावी, असे सांगण्याचे काम सावरकरांनी केल मात्र ते काम किती मौलानांनी वा किती अहिंसावाद्यांनी केले होते, त्याचा इतिहासही तपासण्याची आवश्यकता आहे.   

सावरकरांचे हिंदुत्त्व, राष्ट्रीयत्त्व आणि स्वत्त्व

भारतात हिंदु या धर्माची वा संकल्पनेची व्याख्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ज्या पद्धतीने स्पष्ट केली, ती भूमीनिष्ठ अशी व्याख्या आहे. या भूमीशी एकत्व सांगणारी आहे. हे एकत्व कसे तर ते तार्किक, तात्विक आणि विज्ञाननिष्ठ आहे.  त्यामुळे ते स्पष्ट सांगत की,

आसिंधु- सिंधुपर्यंता यस्य भारतभूमिका।

पितृभू: पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिति स्मृत:।।

ही व्याख्या प्रत्येक हिंदुला तोंडपाठ झाली पाहिजे.

पुन्हा हे सांगण्याचे कारण म्हणजे आजही हिंदु या शब्दाबाबत मतभिन्नता आहे. त्यामुळे हिंदुत्वाच्या संकल्पनेत प्रश्न उपस्थित होऊ लागतात आणि त्यामुळे सारवासारव करण्यातच वेळ मारून न्यावी लागते. मुळात हिंदु या शब्दाला सुयोग्य अधिष्ठान सावरकरांनी दिलेले आहे. श्रुतिस्मृतिपुराणोक्त प्रमाण म्हणजे निकष जे मानतात ते सानातनी, केवळ श्रुति हा निकष मानतात ते वैदिक तर आपल्या धर्माला वैदिक धर्माची शाखा वा विकासात्मक स्थिती आहे असे मानत नाहीत ते (म्हणजे वेदप्रामाण्य न मानणारे) स्वतंत्र धर्म असेच सांगणारे जैन, शीख, बौद्ध ( भारतीय बौद्ध)  हे याच भूमीतील आहेत. त्यामुळे ते हिंदुच आहेत. तर मुसलमान, ख्रिस्ती, ज्यू, पारशी हे अहिंदु आहेत. सावरकरांनी या संबंधात केलेली व्याख्या ही अधिक संयुक्तिक आहे. स्पष्ट आहे. घोळात गोळ न घालणारी आहे. मात्र आरक्षणे आणि अन्य फायदे मिळवण्याच्या मोहात आज हिंदु विलग होत आहे, हीच देशाची शोकांतिका आहे.

सनातनी वा वैदिक प्रमाण मानणाऱ्या वर्णव्यवस्था, जाति व्यवस्था सांगणाऱ्या हिंदु धर्मालाही वळण लावण्याची आणि अद्ययावत करण्याची तळमळ सावरकरांनी दाखवली. खरे म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महापुरुषानेही ते काम केले मात्र या दोन्ही व्यक्तिमत्त्वांची ताकद एकत्र आली असती, तर भारताची स्थिती सामाजिक, राजकीय बळकटीने विश्वगुरुचीच झाली असती. हिंदु धर्मामधील जे कोणी पारंपरिक आणि प्राचीन परंपरेचे पाईक मानतात त्यांनाही त्यामुळे जगाला शिकवण देण्यासाठी वक्तव्य करण्याची गरज भासली नसती, कारण जगाने स्वतःहूनच जे चांगले ते स्वीकारले असतेच.

मुळात मुसलमानी आक्रमणानंतर हिंदुनी हरवलेले स्वत्त्व सावरकरांच्या हिंदुत्वाने नक्कीच सुरक्षित स्वराज्य देणारे होते. याचे कारण तेव्हाही आणि आजही पॅन इस्लामच्या नावाखाली इस्लाम किती शांतता असणारा धर्म आहे, हे जाणीवपूर्वक सांगण्याची वेळ ज्या भारतीय मोहम्मदपंंथीयांना स्वीकारावी लागत आहे, त्यांनी यापूर्वीचा इतिहास नीट पाहिला, तर फाळणीनंतरही त्यांच्याइतके सुरक्षित असणारे मोहम्मदपंथी मुस्लीमबहुल देशांपेक्षाही भारतात अधिक आहेत. भारतावरील मुस्लीम आक्रमक राज्यकर्त्यांची आक्रमणे, केली गेलेली धर्मांतरे आणि तरीही मुळचे हिंदु असूनही धर्मांतराने अहिंदु झालेल्या मोहम्मदपंथीना हिंदुस्थानचा एक भाग दिला गेला आणि उर्वरित स्वतंत्र भारतात राहात आहेत. मुक्त अशा भारतात राहूनही ७५ वर्षांनंतरही इस्लाम खतरेमे वाटत असल्याच्या काहींच्या आरोळ्यांना मुस्लीम भारतीयांनीच खरे म्हणजे उत्तर देणे अपेक्षित आहे. हिंदू- मुस्लीम यांचे ऐक्य या स्वतंत्र भारतात हवे असेल तर ते असल्या काँग्रेसी मतांच्या राजकारणातून तयार झालेल्या तथाकथित सेक्युलर - धर्मनिरपेक्ष तत्त्वज्ञानाने ते नक्कीच मिळणार नाही.

सावरकरांचे निस्पृह हिंदुत्त्व आणि समानतेचे तत्त्व

देशाला  पारतंत्र्यातून बाहेर काढण्याच्या कामात  मुसलमानांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्पष्ट सांगितले होते की, ... ।।याल तर तुमच्यासह, न याल तर तुमच्यावाचून विरोधाल तर तुम्हांस विरोधून  हिंदु- राष्ट्र आपले भवितव्य बनेल तसे घडवील... ।।सावरकरांच्या त्या विधानाचा अर्थ आजच्या घडीला विचारात घेण्यासारखा आहे. स्वातंत्र्यानंतर मुस्लीम अनुनयातून काँग्रेसने आणि मुस्लीम मौलानांनी समाजाला अद्ययावत केले नाही. अहिंदु अशा या मुस्लीम समाजाने पोथिनिष्ठ राहाण्याच्या अतिरेकातून वास्तविक स्वतःला वेगळे पाडले आणि त्यातून अनावश्यक, अयोग्य कल्पना उराशी बाळगत नवीन काळाला आपलेसे केले नाही. औद्योगिकीकरणामुळे उभारी घेतलेल्या जगाचे आकलन न झाल्याने तळागाळातील मुस्लीम लोक मदरशातील धार्मिक बुरख्यात अडकले गेले. धार्मिक बुरसटलेल्या विचारांमधून हिंदु समाज जसा बाहेर येऊ पाहातो, तसे प्रयत्न आजही होत आहेत. मात्र तसे प्रमाण त्यांच्यामध्ये खूप कमी असल्याने केवळ धार्मिक शिक्षणातून काही घडत नाही, हे देखील त्यांच्या अजून लक्षात आलेले नाही. किंबहुना यामुळेच त्यावेळीही हिंदु समाजाला जात-वर्ण आदी कुप्रथातून तसेच सात बेड्यांमधून बाहेर काढण्याच्या तळमळीने केलेल्या कामाच्यावेळीही मुसलमानांच्या पोथिनिष्ठतेला विज्ञाननिष्ठ होण्याचेही आवाहन सावरकरांनी केले होते. मुस्लीम लीगच्या आणि त्यांच्या स्वार्थी नेत्यांच्या अट्टाहासाला बहुधा सावरकरांनी जितके जाणले तितके अन्य कोणी जाणले नाही, असेच म्हणावे लागते. मुस्लीम समाजातील तळागाळातील स्थिती जाणून घेऊनही कोलकाता येथील हिंदुमहासभेच्या १९३९ मधील त्यांचे अध्यक्षीय भाषण मुसलमानांनीही लक्षात घेण्यासारखे आहे.

ते म्हणतात ...।। हिंदुस्थान हे नाव  आपल्या भूमीला हवे आणि ते हवे त्यामागे अहिंदु देशबंधुंवर कोणत्याही प्रकारे अतिक्रमण वा मानहानी करण्याचा आमचा उद्देश नाही. पारशी आणि ख्रिश्चन देशबंधू सांस्कृतिकदृष्ट्या समानशील आहेत असे सांगतानाच जगामध्ये विविध देशांमध्ये मुसलमान आहेत आणि त्यांनी त्या देशांची नावे विकृत केलेली नाहीत. पोलिश मुसलमान, चिनी मुसलमान, ग्रीक मुसलमान अशा नावांनी संबोधले जाण्यातही ते धन्यता मानतात. यामुळेच हिंदुस्थानी मुसलमान या नावात येथील मुसलमानांनी समाधान मानावे. त्यामुळे त्यांच्या धार्मिक नि सांस्कृतिक स्वतंत्र अस्तित्त्वाला मुळीच बाधा येत नाही. ।।

सावरकरांचे हे भाषण जितके परखड आणि स्पष्ट आहे की, ते कोणतेही लांगुलचालन करणारे नाही.  हिंदुस्थानची राजकीय घटना कशी असेल त्यावर त्यांनी सांगितले होते की, ... ।। ही राज्य घटना व्यापक तत्त्वावर आधारण्यात येईल. सर्व नागरिकांना समान अधिकार नि कर्तव्ये राहातील मग त्यांची जात. धर्म कोणतेही असोत. मात्र त्यांनी या देशाशी पूर्णपणे एकनिष्ठ राहाण्याची, एकमेव निष्ठा ठेवण्याची  प्रतिज्ञा केली पाहिजे....।।

।।... भाषण, विचार, धर्म आणि संघ याबद्दलचे स्वातंत्र्याचे मूलभूत अधिकार सर्व नागरिकांना सारखेच उपभोगता येतील सार्वजनिक शांतता, सुव्यवस्था आणि राष्ट्रीय आवश्यकता यासाठी नागरिकांच्या अधिकारांवर बंधने घातली जातील तेव्हा ती जातीय आणि धार्मिक आधारावर नसून केवळ सर्वसामान्य राष्ट्रीय कारणासाठीच असतील. .....।।

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हिंदुमहासभेच्या या अधिवेशनातील हे भाषण पाहाता ते राष्ट्रनिष्ठ, राष्ट्रधर्म पाळणारे आणि सर्व धर्मांना घटनेत समानतेने आणि सलगतेने एकत्रित करणारे आहे. मात्र असे असूनही  सावरकरांना अवमानीत करण्याचा कृतघ्न  पणा भारतात केला जातो, यासारखे करंटेपण कोणते?

स्थानबद्धतेतूनही साधला प्रेरणादायी अभ्युदय

 स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आयुष्यात खरोखरच विविध टप्पे निर्माण झाले होते आणि हे प्रत्येक टप्पे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची सत्त्वपरीक्षा घेत, त्यांचा राष्ट्राभिमान, राष्ट्रविषयक जाणीवा या अधिकाधिक उन्नत करीत पार पडले. त्यातून जे काही घडले ते विलक्षण होते, दाहक अनुभव त्यांना देणारे होते, पण तरीही त्या कष्टप्रद स्थितीत त्यांचे वर्तन हे देशवासींना, हिंदुना प्रेरणादायीच ठरले होते. त्यांच्या कामांमुळे समाजाचे पुनरुत्थान होण्यासाठी सतत प्रेरणाच मिळत राहिली. क्रांतिकारकांचे मार्गदर्शक ठरलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना लंडनमध्ये १३ मार्च १९१० या दिवशी अटक करण्यात आली, त्यानतर चौकशीच्या नावाखाली जे काही दोषारोप ठेवले गेले त्यानंतर २० जून १९१० त्यांना भारतात पाठवण्याचा निर्णय झाला आणि १ जुलै १९१० या दिवशी बोटीमध्ये चढवले  त्यानंतर फ्रान्सच्या मार्सेलिस बंदरानजीक सावरकरांनी ७ जुलैला सागरात झेप घेऊन फ्रान्सचा किनारा गाठवला पण फ्रान्समधील पोलिसांना हाताशी धरून त्यांना पुन्हा अटक केली गेली. त्यानंतर २२ जुलै १९१० रोजी मुंबईत बोटीने आणले आणि त्यानंतर चालवलेल्या खटल्यानंतर २४ डिसेंबर १९१० या दिवशी आणि नंतर पुन्हा दुसऱ्या खटल्यात ३० जानेवारी १९११ या दिवशी मिळून दोन जन्मठेपांची सश्रम कारावासाची सजा ठोठावली, एकूण ५० वर्षांची ही शिक्षा भोगण्यासाठी २६ जून १९११ या दिवशी अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये त्यांची रवानगी केली गेली.  

त्यानंतर ६ जानेवारी १९२४ या दिवशी सुटका केली पण त्यासंबंधातील आदेशावर दिनांक होता ६ जानेवारी १९२३.  ही सुटकाही सशर्त होती. येरवड्याच्या कारागृहात त्यांनाठेवले गेले आणि तेथून राजकीय कार्यांवर निर्बंध घालीत, अन्य अटी लावीत त्यांना रत्नागिरीमध्ये अखेर स्थानबद्ध करण्यात आले. जानेवारी १९२४ मध्ये रत्नागिरीतील त्यांच्या स्थानबद्धतेला सुरुवात झाली ती मे १९३७ पर्यंत; त्यांची ही स्थानबद्धता रत्नागिरीमध्ये आणखी एका कर्मभूमीसारखी पुनरुत्थान करणारीच ठरली. या काळात हिंदुत्व या संकल्पनेला विशद करणारे पुस्तकही लिहिले गेले, याच काळात हिंदुसभेच्या नावाने वा अन्य संस्था, संघटनांद्वारे त्यांनी अस्पृश्यता निवारण, जाति आणि वर्ण व्यवस्थेविरोधात लढा दिला. सहभोजने, व्यायामशाळांची स्थापना, भाषाशुद्धी, परधर्मात गेलेल्यांचे शुद्धीकरण, सशस्त्र क्रांतिकारकांचा गोपनीयपणे पाठपुरावाही त्यांनी केला. रत्नागिरीतील त्यांच्या आयुष्याचा टप्पा हा सामाजिक, धार्मिक, पुनरुत्थानाचाच महत्त्वपूर्ण भाग होता. या सुमारे १३ वर्षांपेक्षा अधिक कालावधीत सशस्त्र क्रांतिच्या मार्गदर्शकाने केलेल्या सामाजिक, धार्मिक, मानसिक क्रांतिचा अभ्युदय केला होता. किंबहुना गांधीवादी अहिंसात्मक चळवळीपेक्षा ही वैचारिक, समाजोद्धारक आणि विज्ञानवादाला प्रोत्साहन देणारी अभ्युदय साधणारीच क्रांती होती, जी त्यांच्या हिंदुहृदयसम्राट या पदवीला नेण्याची खरे म्हणजे नांदीच ठरली. धर्माच्या जोखडाखाली गेलेल्या भारतातील हिंदु समाजाला नवकालाचे, वैज्ञानिक बुद्धीने विचार करायला लावण्याचे आणि भावी देशाची जडणघडण करण्यासाठी टाकलेले ते ठोस पाऊल होते. ज्या काळात त्यांनी हे कार्य केले ते त्यावेळच्या चष्म्यातूनच नव्हे तर आजच्या चंगळवादी तसेच विज्ञानाने निर्माण केलेल्या सुविधांच्या काळातील चष्म्यातून पाहिले तरी ते किती मोठे धाडस होते, याची प्रचिती येऊ शकेल. समाज आणि व्यक्तिविकासाला संघटित हिंदुत्वाच्या दिशेने नेण्याचा त्यांचा हा प्रयत्न वास्तविक राजकीय म्हणावा, वैचारिक म्हणावा, बौद्धिक अभ्युदयाचा म्हणावा की द्रष्ट्या धर्मक्रांतिकारकाचा म्हणावा, हे त्यांच्या कार्यासंबंधात तटस्थ आणि सध्याच्या राजकीय भ्रष्टाचारविरहीत नजरेने पाहिले- वाचले तरच कळू शकेल. यानंतर कालखंडातील मात्र सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाची वाटचाल ही खरी राजकीय विचारवंताची, स्वातंत्र्यासाठी तळमळीने केलेल्या सामाजिक- राजकीय अभिसरणाची, दिशादर्शक गुरुसारखी आणि राष्ट्र- अखंडता यांचा ध्यास घेणाऱ्या कर्मयोग्याचीच म्हणता येईल. 

 - रवींद्र यशवंत बिवलकर

छायाचित्र सौजन्य : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, दादर, मुंबई/ आंतरजाल

खाली नमूद 'फेसबुक' पेजवर वरील लेखाचे भाग क्रमश: प्रसिद्ध झाले होते.  



मंगळवार, २३ ऑगस्ट, २०२२

तथाकथित धर्मनिरपेक्ष घटनेचा पराभव; 

हिंदु मुस्लिमांचा हा करंटेपणाच!

‘धर्मवेडाची नांगी ठेचू शकेल असे एकच बळ आहे आणि ते म्हणजे विज्ञानबळ. पोथिनिष्ठ व्हावे का, मुसलमानासारखे आम्हीही पोथीनिष्ठ व्हावे का, यावर चर्चा - तुलना करताना ते खोचकपणे सांगतात की आम्ही हिंदुनीही आमच्या प्राचीन रुढी नि धर्मसमजुती आहेत त्या धर्मभोळ्या नि हास्यास्पद आहेत,   तरीही त्या मुसलमानांप्रमाणे धर्मकडवेपणा संचारविण्यासाठी पाळल्या पाहिजेत.  इतके सांगून ते थांबत नाहीत, तर  पोथिनिष्ठपणामुळे मुसलमान समाज एकवटला आहे, प्रबळ होत आहे. मात्र  त्यामुळे मुसलमानांचीही दुर्दशा होत असल्याचे ते स्पष्ट सांगतात.

रत्नागिरीमध्ये स्थानबद्ध करण्यात आले तेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर ब्रिटिशांनी अटी लादल्या होत्या. त्या अटींना पाळणे गरजेचे आणि अत्यंत आवश्यक होते. त्यामुळेच त्या अटी पाळूनही त्यांनी राष्ट्रहितासाठी सामाजिक दृष्टिकोन स्वीकारला आणि हिंदु धर्मातील जातिभेदाच्या आणि कुप्रथांच्या रितींना- रिवाजांना तीलांजली देण्याचे पाऊल अतिशय ठामपणे उचलले. हे करीत असताना हिंदु धर्म, त्यातील वर्णव्यवस्था, त्यातील जाति-उपजातिव्यवस्था इतकेच नव्हे तर अगदी तळातल्या अस्पृश्य मानल्या जात असलेल्या जातिंमध्येही असणारी वर्णव्यवस्था वा भेद आणि त्यासाठी होत असणारे वर्तन त्यांनी अतिशय सूक्ष्मपणे अभ्यासले आणि त्यावरही त्यांनी आघात केले. त्यामुळे छोट्या छोट्या जातीनिहाय असणारा जातिभेदही नष्ट होणे कसे गरजेचे आहे, हे त्यांच्या पूर्ण लक्षात आले होते. राजकीय कामात सहभागी न होण्याच्या अटीवर त्यांची अंदमानातून रत्नागिरीला केलेली स्थानबद्धतेमधील रवानगी ही प्रत्यक्ष स्वीकारणे आणि तसे जगणे सोपे नव्हते. राष्ट्रहित, स्वातंत्र्य यासाठी राजकीय क्षेत्र हा मुख्य आधार असतो हे जरी खरे असले तरी मुळात राजकारण ज्यांच्यासाठी करावयाचे असते, त्या समाजाला सुधारणेही राष्ट्राच्या उभारणीसाठी किती गरजेचे आहे, हे सावरकरांना अतिशय अचूकपणे कळले होते. यासाठीच त्यांनी ब्रिटिशांच्या या अटीमधूनही आपले ध्येय साधण्यासाठी सुरुवात केली, रत्नागिरीसारख्या एकेकाळी अति कर्मठ अशा हिंदू धर्मियांच्या भागात त्यांनी केलेली ही कामगिरी तशी ‘लिटमस टेस्ट’च होती. जातिभेदांना नष्ट करताना काही अपरिहार्यताही आहे हे देखील त्यांना माहिती होते, त्यामुळेच सर्व बदल काही अकस्मात आणि झटक्यात होतील, असे त्यांचेही अजिबात मत नव्हते. त्यामुळेच जातिसंघांबाबतचे धोरण काय  असावे, ते त्यांनी अतिशय तपशीलवारपणे विश्लेषित केले आहे. जात्युच्छेदक निबंधांमध्ये किर्लोस्कर मासिकातील मार्च १९३७ च्या अंकातील लेख समाविष्ट केला गेला आहे, तो यासाठी अभ्यासनीय आहे. याच मासिकाच्या जून १९३७ मधील अंकातील लेखामध्ये त्यांनी हिंदू धर्माला खऱ्यादृष्टीने एक दिशा दिली आहे, ती म्हणजे हिंदु आणि हिंदुराष्ट्राची दृष्टी ही पोथीनिष्ठ न राहाता विज्ञाननिष्ठ असली पाहिजे, असे त्यांनी प्रतिपादन केले.

त्यांचे म्हणणे होते की, ‘धर्मवेडाची नांगी ठेचू शकेल असे एकच बळ आहे आणि ते म्हणजे विज्ञानबळ. पोथिनिष्ठ व्हावे का, मुसलमानासारखे आम्हीही पोथीनिष्ठ व्हावे का, यावर चर्चा - तुलना करताना ते खोचकपणे सांगतात की आम्ही हिंदुनीही आमच्या प्राचीन रुढी नि धर्मसमजुती आहेत त्या धर्मभोळ्या नि हास्यास्पद आहेत,   तरीही त्या मुसलमानांप्रमाणे धर्मकडवेपणा संचारविण्यासाठी पाळल्या पाहिजेत.  इतके सांगून ते थांबत नाहीत, तर  पोथिनिष्ठपणामुळे मुसलमान समाज एकवटला आहे, प्रबळ होत आहे. मात्र  त्यामुळे मुसलमानांचीही दुर्दशा होत असल्याचे ते स्पष्ट सांगतात. यावरूनच त्यांचा देशातील समाजासंबंधातील अतिशय सूक्ष्मपणे आणि आपलेपणाने केलेला विचार स्पष्ट होतो. दुर्दैवाने तथाकथित पुरोगाम्यांना सावरकरांच्या या हिंदुत्वनिष्ठतेचा अर्थही उमगला नाही. १९३७ च्या या अंकात म्हणजे स्वातंत्र्यापूर्वी केवळ दहा वर्षे आधी त्यांनी हा लेख लिहिला आहे, त्यात हिंदुंचाच नव्हे तर मुसलमानांच्या संबंधातही विचार केला. मुसलमानांच्या संबंधातील पोथिनिष्ठता, रुढी कशा घातक आहेत, याचाही विचार त्यांनी केला. हिंदु मुस्लीम या दोन्ही धर्मांमधील उणेपणाचा एकत्रितपणे विचार त्यांनी केला आणि विज्ञाननिष्ठ व्हायला हवे, हेच सांगितले.  मुसलमान जर विज्ञाननिष्ठ नि प्रगत झाले तर त्यात हिंदुंचेही कल्याण आहे. हिंदी मुसलमानांचे तर कोटकल्याणच आहे. असे ते सांगतात. असे असूनही सावरकरांना जातीय ठरवण्याचा करंटेपणा करणारे भारतात अजूनही आहेत, यापेक्षा तथाकथित धर्मनिरपेक्ष घटनेचा पराभव तो कोणता?

- रवींद्र यशवंत बिवलकर

२९ ऑक्टोबर २०२१

छायाचित्र सौजन्य : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, दादर, मुंबई/ आंतरजाल


रविवार, २१ ऑगस्ट, २०२२

हिंदुंच्या अद्वैताची गरज !

 धर्म- कर्म आणि वर्म - ३

हिंदुंच्या अद्वैताची गरज !

सावरकरांची हिंदु महासभेची राजकीय विचारधारणा पुढे नेण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी जी भूमिका बजावली, त्यांनी जे धोरण आणि अद्वैत स्वीकारले ते त्यांच्या नंतरच्या तिसऱ्या सरसंघचालकांनी स्वीकारले असते, तर हिंदुमहासभेचे उमेदवार विजयी होऊन काँग्रेसचे अधिक्य कमी होऊ शकले असते आणि कदाचित पाकिस्तानची निर्मितीही टळली गेली असती.

भारताला स्वातंत्र्य मिळाले की मिळवले की, कंगनाच्या भाषेत ती भीक आहे, यापेक्षाही अधिक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे हे स्वातंत्र्य स्वीकारताना आपल्यापुढे ब्रिटिशांनी काही अटी टाकल्या होत्या का, त्या अटी स्वीकारण्याचा मक्ता केवळ काँग्रेस - मुस्लीम लीग यांनाच होता का अन्य कोणाला विचारात घेतले गेले नव्हते का, त्यामध्ये आदिवासींसारख्या मूळ निवासींना काही वेगळे अधिकार दिले गेले होते का किंवा त्यांना स्वतंत्र राज्य - राष्ट्र द्यावे असे काही ब्रिटिशांनीच प्रस्तावित केले होते का? या विविध प्रश्नांची जेव्हा उत्तरे शोधायला आपण जातो, तेव्हा आपण गेल्या ७५ वर्षांमध्ये काय साध्य केले आहे, असा प्रश्न आहेच. किंबहुना हिंदुस्थान हे देशवाचक नाव पूर्वीपासून सर्व जगाला ज्ञात होते. त्यामुळे हिंदुस्थान कोणाचा, त्याची भौगोलिक व्याप्ती किती आहे, त्यात कोणाला काय महत्त्व आणि अस्तित्त्व कसे ठरवावे याची मांडणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ज्या पद्धतीने केली आहे, ती पाहाता तशी मांडणी सूत्रबद्ध आणि बहुसंख्य असलेल्या हिंदुंना विचारात घेऊन काँग्रेसनेही केली नाही.
१९४६ च्या दरम्यान झालेल्या निवडणुकीत हिंदुंचे प्रतिनिधीत्त्व कोणाला हे ठरवले गेले तेव्हा काँग्रेसला तो मान मिळाला. तो का मिळाला, कशा पद्धतीने मिळाला आणि त्यातून हिंदुंसाठी सुरुवातीपासून झटणाऱ्या अखिल भारतीय हिंदु महासभेला कसे बाजूला टाकले गेले, त्यात कोणाकोणा हिंदुंचाही हात होता, हे देखील आज स्पष्ट होण्याची आवश्यकता आहे. रा. स्व. संघाशी संबंधित असलेल्या काही व्यक्तीकडून, काही पुस्तकांमधून आजही हिंदु महासभेच्या त्या पराभवाची मीमांसा बारकाईने केलेली दिसते. तत्कालिन सरसंघचालकांवर अर्थात मा. स. गोळवलकर गुरुजींवर त्या संबंधातील जबाबदारी जाते. १९४५-४६ मधील केंद्रीय आणि प्रांतीक विधिमंडळाच्या निवडणुका ज्या ब्रिटिशांनी घेतल्या त्या निवडणुकांमुळे हिंदुस्थान अखंड राहून स्वतंत्र राहील की, विभाजन होईल, त्याचा निर्णयच राजकीय मंचावर लागणार होता. मात्र त्याबाबतची जाणीव गोळवलकर गुरुजींनी ठेवली नाही, त्यातून रा. स्व. संघाने त्या महत्त्वाच्या अशा ऐतिहासिक निर्णय देणाऱ्या निवडणुकीवरच बहिष्कार टाकला. १९२० नंतर काँग्रेस गांधीजींच्या नेतृत्वाखाली गेली. खिलाफत चळवळीपासून मुसलमानी मागण्यांना अवास्तव असूनही मान्यता देत, त्या पुरवून एकप्रकारे देशविभाजनाला प्रोत्साहनच दिले गेले. या पार्श्वभूमीवर या निवडणुकांमध्ये काँग्रेसला मत म्हणजे देशविभाजनाला वा पाकिस्तानच्या निर्मितीला मत असे समीकरण होते तर अखंड हिंदुस्थानासाठी हिंदुमहासभेला मत असे समीकरण होते. यादृष्टीने हिंदु महासभेने मतदारांना आवाहनही केले होते. मात्र राजसत्तेवर कोणताही राजकीय पक्ष येवो, त्याच्याशी आमचा काही संबंध नाही. त्यामुळे निवडणुकांशी आम्हाला काही कर्तव्य नाही, अशी भूमिका गुरुजी प्रकटपणे मांडत. मात्र यामुळे दुष्परिणाम झाला, हे मान्य करावे लागते. या निवडणुकीमुळे काँग्रेसला हिंदु समाजाचे आणि मुस्लीम लीगला मुस्लीमांचे प्रतिनिधीत्व मिळाले, आणि मग सारे पुढचे फाळणीचे महाभारतही घडले, हे थोडक्यात मांडण्याचे कारण म्हणजे, सावरकरांची हिंदु महासभेची राजकीय विचारधारणा पुढे नेण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी जी भूमिका बजावली, त्यांनी जे धोरण आणि अद्वैत स्वीकारले ते त्यांच्या नंतरच्या तिसऱ्या सरसंघचालकांनी स्वीकारले असते, तर हिंदुमहासभेचे उमेदवार विजयी होऊन काँग्रेसचे अधिक्य कमी होऊ शकले असते आणि कदाचित पाकिस्तानची निर्मितीही टळली गेली असती. धर्माचे महत्त्व हे कर्माने वाढत असते. मात्र हेच शल्य अजूनही कायम राहू नये यासाठी अर्थातच स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विज्ञाननिष्ठ हिंदु संकल्पनेने भारलेले तत्त्वज्ञान समाजात कर्मकांडाने नव्हे तर बौद्धिक आणि काया-वाचिक- मानसिक स्तरावर नेण्याची आवश्यकता आहे. ते जर आधीपासून प्रभावी झाले असते तर ‘हातच्या कंगनाला आरसा’ दाखवण्याची गरज पडली नसती. हे वर्म आता मात्र देशातील बहुसंख्य हिंदुंनी ध्यानात घेण्याची गरज मात्र नक्कीच आहे. मग तो हिंदु कोणत्याही पक्ष वा विचारांचा असो, हिंदुंचे द्वैत संपवून अद्वैत सुरू करण्याचीही गरज आहे, हे सर्व बाजूंनी विचारातही घेतले गेले पाहिजे, इतकेच.

- रवींद्र यशवंत बिवलकर
(17 nov. 2021)

हिंदुत्व, काँग्रेस आणि दिग्विजय!

 धर्म- कर्म आणि वर्म - २

हिंदुत्व, काँग्रेस आणि दिग्विजय!

मानव हाच एक धर्म आहे, असेही मानलेल्या सावरकरांनी हिंदुस्थानाचा विचार करताना राष्ट्रधर्म स्पष्ट केला होता. पण खिलाफतीचा मार्ग स्वीकारण्याची परंपरा मानणाऱ्या काँग्रेसला ना धर्म कळला ना राष्ट्रधर्माचे वर्म कळले, साहजिकच हिंदुत्व हा शब्द न कळण्याचे त्यांचे कर्म हे देशाचेच दुर्भाग्य म्हणावे लागेल.

हिंदु, हिंदुत्व यावरून भाजप आणि संघ यांचे विरोधक असणारे काँग्रेस, साम्यवादी पक्ष, तथाकथित सेक्युलर यांनी गेल्या काही काळापासून हिंदुत्व, हिंदुत्वधार्जीणेपण इतकेच नव्हे तर हिंदुत्वाचे खंदे पुरस्कर्ते म्हणून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावरही टीका, हल्ला चढवण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेस सरकारला २०१४ च्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला आणि तेव्हापासून सत्तावंचित झालेल्या काँग्रेस जनांना त्यांच्या तथाकथित धर्मनिरपेक्षतेबद्दल शंकाही आली नाही उलट त्यांनी हिंदुंचे ध्रुवीकरण झाल्याने, फायदा झाल्याने भाजपवर , पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. ही टीका करताना स्वातंत्र्यवीर सावरकर यांना वेठीसच धरले. काहीही नीट माहिती नसणारे काँग्रेसचे तरुण तडफदार ५० वर्षीय युवा नेते राहुल गांधी यांनी तर सावरकरांना माफीवीर म्हणण्यापर्यंत मजल मारली. मुळात स्वातंत्र्यापासून आजपर्यंत सत्तेची पायरीही न चढलेल्या हिंदुमहासभेचे नेते राहिलेल्या सावरकरांना काळाच्या पडद्याआड जाऊन इतकी वर्षे झाल्यानंतरही राहुल गांधी यांनी अशा प्रकारे सावरकर यांची या हीन पद्धतीने मानहानी केली. त्या सावरकरांबद्दल त्यांच्या आजीनेही चांगले गौरवोद्गार काढले होते. स्वातंत्र्यवीरांनी प्रायोपवेशन केले ते १९६६ मध्ये आणि राहुल गांधी जन्माला आले १९७० मध्ये... तरीही माफीवीर म्हणण्याचा उद्धटपणा करण्याचे कृत्य त्यांनी कोणाच्याही सांगण्यावरून केले असले तरी स्वत:ची बुद्धी मात्र गहाण ठेवली असेच म्हणावे लागेल. सावरकर स्थानबद्धतेतून रत्नागिरीहून सुटून आल्यानंतर ते काँग्रेसमध्ये येतील अशी आशाही काँग्रेसमधील नेत्यांना वाटली, इतकेच नव्हे तर अनेक दिग्गज काँग्रेस नेते त्यांच्या मुंबईतील स्वागत- सत्काराला उपस्थित होते. त्यांचाही त्यामुळे राहुल गांधी यांच्या वक्तव्य, कृत्यामुळे अवमानच झाला आहे, असेच म्हटले पाहिजे. म्हणजे राहुल गांधी यांच्या मते तत्कालिन काँग्रेस नेतेही माफीवीरच म्हणावे लागतील. त्यानंतर काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांनीही सलमान खुर्शीद यांच्या अलीकडेच प्रकाशित केलेल्या सनराइज ओव्हर अयोध्या या वादग्रस्त ठरलेल्या पुस्तकानंतर आपल्या हिंदुत्वाबाबतच्या आणि सावरकरांसंबंधातील वक्तव्याने आपला ‘अज्ञानधर्म’ दाखवून दिला आहे.
खुर्शीद यांच्या त्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने प्रसारमाध्यमांशी बोलताना काँग्रेस नेते दिग्विजय यांनी हिंदू धर्माचे ५०० वर्षांच्या मुघल आणि १५० वर्षांच्या ब्रिटिशांच्या राजवटीत काही नुकसान झालेले नाही, काही बिघडलेले नाही, मग धोका कसला आहे, अशी पृच्छा करीत हा धोका संकुचित विचारसरणीचा असल्याचे सांगितले आहे. त्या अनुषंगाने त्यांनी ब्रिटिश राजवटीच्या फोडा आणि राज्य करा या विचारसरणीचा हा प्रकार असल्याचे सांगत त्याद्वारे सत्ता ज्यांना पाहिजे आहे, त्यांना हा धोका वाटतो. समाज आणि हिंदू धर्माला धोका नसल्याचे सांगतानाच हिंदुत्वाचा हिंदु धर्माशी काही संबंध नाही, आणि सावरकर हे धार्मिक नव्हते, त्यांनी गायीचे मांस भक्षण करण्यामुळे काही समस्या नसल्याचे सांगितले तसेच त्यांनी लोकांमध्ये हिंदु ही अस्तित्त्वाची ओळख प्रस्थापित करण्यासाठी हिंदुत्व शब्द मांडला त्यामुळे लोकांमध्ये भ्रम- गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. दिग्विजय सिंग यांचे हे वक्तव्यही अज्ञानमूलकच आहे. किंबहुना इतकी वर्षे काँग्रेसमध्ये राहून त्यांनी हिंदुस्थानातील हिंदु या शब्दाची महतीही जाणीवपूर्वक विसरण्याचे काम केले आहे. हिंदुत्वाचा स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी पुरस्कार करताना भारताच्या ज्या भौगोलिक रचनेचा स्वीकार करीत त्या भौगोलिक रचनेत रुजलेल्या, रुजविलेल्या तत्त्वज्ञानाला, विचारांना, मार्गदर्शक नीती नियमांना, पुण्यभू अर्थात होली लँड या शब्दाचा वापर करीत हिंदुस्थानाचा खरा धर्म स्पष्ट केला. सनातन हिंदु धर्माला नवविचारांची संजीवनी देण्यास सुरुवात केली. त्यांनी तो हिंदु धर्म स्पष्ट केला, ती संकल्पना खरे म्हणजे राष्ट्र या संकल्पनेला खऱ्या खुऱ्या अर्थाने स्पष्ट करणारी होती. पण काँग्रेसने विशेष करून तुर्कस्थानातील खिलाफत चळवळीला आपले म्हणत हिंदुस्थानातील मुसलमानांनाही त्यात ओढले आणि मुसलमानी जोखडाखाली काँग्रेसला जुंपून बहुसंख्या हिंदुनाच वेठीस धरले. बहुसंख्या हिंदुच्या सर्वधर्मसमभाव या मानसिकतेला ओळखून अहिंसेच्या नावाखाली ज्यांनी मुस्लीम अनुनय पत्करला आणि ब्रिटिशांच्या फोडा - झोडा राजकारणापुढे गुमान मान तुकवली अशा काँग्रेसनेच खरे हिंदु समाजाचे नुकसान केले आहे. या वस्तुस्थितीकडे काँग्रेसमधील नेत्यांनी दुर्लक्ष केले आणि मग अहिंसावादाचा उदय घडवून हिंदु समाजाला दिशाहीन करण्याचाच प्रयत्न केला गेला. हिंदुंचा खरा इतिहास बदलण्याचे कामच त्यावेळेपासून सुरू झाले. काँग्रेसचे हे कर्म हाच त्यांचा धर्म बनला आहे आणि त्यामुळे हिंदु समाजातील वर्ण-जातिभेदासारख्या भेदाभेदी स्थितीमुळे हिंदुंच्याच नव्हे तर हिंदुत्वाच्या आणि पर्यायाने राष्ट्राच्या वर्मावरच घाला घातला गेला आहे.
केवळ हिंदुनाच नव्हे तर मुसलमानांना पोथिनिष्ठ धर्मातूनही विज्ञाननिष्ठ पद्धतीने जगण्याचे तळमळीचे आवाहन करणाऱ्या सावरकरांनी हिंदु समाजालाही भेदाच्या भिंती पाडण्यासाठी अंदमानोत्तर कालखंडात जाणीवपूर्वक जागे केले, त्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. मानव हाच एक धर्म आहे, असेही मानलेल्या सावरकरांनी हिंदुस्थानाचा विचार करताना राष्ट्रधर्म स्पष्ट केला होता. पण खिलाफतीचा मार्ग स्वीकारण्याची परंपरा मानणाऱ्या काँग्रेसला ना धर्म कळला ना राष्ट्रधर्माचे वर्म कळले, साहजिकच हिंदुत्व हा शब्द न कळण्याचे त्यांचे कर्म हे देशाचेच दुर्भाग्य म्हणावे लागेल.

- रवींद्र यशवंत बिवलकर
(16 nov. 2021)

सत्तास्पर्धेतील युद्धापूर्वी जागृती महत्वाची !

धर्म- कर्म आणि वर्म - १

सत्तास्पर्धेतील युद्धापूर्वी जागृती महत्वाची !

आता लोकांनी विशेष करून हिंदु समाजाने सावरकरांच्या हिंदुत्वाचे भान ठेवून, विज्ञाननिष्ठ होऊन आणि बुद्धी, विचाराने अद्ययावत बनून जागृत झाले पाहिजे. सत्तास्पर्धेत भाजप, काँग्रेस, कम्युनिस्ट, स्थानिक पक्ष या सर्वांसंबंधात पूर्ण विचाराने आणि सावधपणे विचार करून आतापासूनच प्रत्येकाने आपला धर्म, आपले कर्म आणि या दोन्ही घटकांचे वर्म ओळखण्याची गरज आहे.

गेल्या काही काळामध्ये सत्तासंघर्षातून आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण अनेक राजकीय पक्ष आणि त्यांचे सर्वस्तरीय नेते सरसावून करीत आहेत. राजकारण म्हटले की, सर्व काही माफ असते असा समज करून तोंडाला येईल ते बरळणे, इतिहासातील व्यक्तींवर मनमानी टीका करणे, समाजातील सर्व घटकांमध्ये आणि विशेष करून प्रत्येक माणसामध्ये जसा एक देव आणि एक राक्षस दडलेला असतो, त्यामधील राक्षसाला जिवंत करण्याचे काम भारतातील राजकीय स्तराने चालवले आहे. आजच्या घडीला प्रत्येकाने आपला धर्म, आपले कर्म आणि या दोन्ही घटकांचे वर्म ओळखण्याची गरज आहे. ते जर त्याने जाणले नाही, तर राक्षसाला जिवंत करणारे शुक्राचार्य संजीवनी विद्येचा गैरवापर करतील, हे ध्यानात घेणे अतिशय आवश्यक आहे. वैदिक-सनातनी परंपरेतील या प्रतिकात्मक बाबींना मुद्दाम येथे मांडण्याचे कारण आहे, ते म्हणजे हिंदुत्व या शब्दाभोवती निर्माण झालेले सत्ताकेंद्राचे वलय. केवळ हिंदु मतांच्या ध्रुवीकरणामुळेच नव्हे तर हिंदुंची मते फोडण्यासाठीही तयार असलेले अन्य विरोधक आणि त्या दोन्ही प्रकारांमध्ये आणखी भर असणाऱ्या धार्मिक आणि धर्मनिरपेक्ष विचारसरणीच्या पक्षांची. मात्र या सर्वांचे धर्म वेगळे आहेत. त्यांचा राष्ट्रधर्माशी काही संबंध आहे का, असा प्रश्न पडू लागला आहे. त्यामुळेच कोणी हिंदुत्वाची तुलना बोको हरामशी, आयसीसशी करतो तर कोणी देशाला स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळाले, या आधी मिळाली ती भीक होती, असा दावा करतो. त्यानंतर त्यावरूनही वादावादीला सुरुवात होते.
देशाला स्वातंत्र्य मिळावे यासाठी विविध स्तरावरून प्रयत्न झाले, योगदान, बलिदान दिले गेले. हिंसा- अहिंसा यांच्या वैचारिक मतभेदामधूनही वादळ निर्माण झाले. इतके होऊनही देशाची फाळणी धर्माच्या आधारावर झाली आणि त्याच धर्माच्या नावावर झालेल्या फाळणीमध्ये बहुसंख्य असलेल्या हिंदुना अहिंसावादाच्या समर्थकांनी भारत नावाच्या धर्मनिरपेक्ष देशामध्ये समाविष्ट केले. ज्या मुसलमानांनी मुस्लीम देशासाठी मते दिली आणि त्या मतांच्या आंकडेवारीपेक्षाही खूप कमी प्रमाणात मुस्लीम मतदार फाळणी झाल्यानंतर मुसलमानांसाठी मागण्यात आलेल्या देशामध्ये न जाता बहुसंख्य हिंदुंच्या बरोबर राहिले. अल्पसंख्याक समाजामध्ये संख्येने वरचा क्रमांक असल्याने मुस्लिमांचा आधार मात्र धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली घेत अनेक वर्षे सत्ता ज्यांनी उपभोगली त्या काँग्रेस पक्षाच्या नेत्याने अयोध्येवर लिहिलेल्या पुस्तकात हिंदुत्वाची तुलना बोको हराम- आयसिससारख्या दहशतवाद्यांशी केली. त्यामध्ये करण्यात आलेल्या शब्दाचा वापरही मोठ्या चतुराईने केला आहे. साधु-संत ज्या सनातन हिंदुधर्माला आणि जुन्या प्राचीन हिंदु धर्माला मांडत होते ते रूप आज नाही. आज वाढवण्यात येणारा हिंदुत्ववाद हा बोको हराम आणि आयसीस या इस्लामी दहशतवादी संघटनेचे राजकीय रूप आहे. हिंदुत्वाचा वापर राजकीय फायद्यासाठी आणि निवडणुकांमधील सभाद्वारे केल्या जाणाऱ्या प्रचारासाठी केला जातो, त्यांच्या या विधानांवरून निर्माण झालेल्या वादांबाबत सारवासारव करण्याचा प्रयत्नही केला मात्र त्याने काही फायदा झाला नाही. मुळात सत्ताधारी भाजप आणि रा. स्व. संघावर निशाणा साधण्याच्या नादात खुर्शीद महाशयांनी अनेक बाबींकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष केले. त्याचप्रमाणे ते ज्या सनातनी हिंदुच्या संबंधात बोलत आहेत, त्या हिंदु धर्माने मुस्लीम आक्रमणे स्वीकारून आपल्या धर्मातील अनेकाचे बलिदान धर्मांतराद्वारे दिले, त्याच्याबद्दल मात्र खुर्शीद यांना कणवही नाही. कारण त्यांना हिंदु धर्मापेक्षा त्यांचा इस्लाम धर्मनिरपेक्ष भासतो.
दुसऱ्या बाजूला स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळाले, या आधी मिळाली ती भीक होती, असा दावा करणाऱ्या कंगना रानावत या अभिनेत्रीचेही म्हणणे, याच प्रकारच्या वादविवाद वाढवणाऱ्या पठडीतील आहे. यामध्ये हिंदुत्त्वाचा खरा विचार मागे पडू लागला आहे. यातून देशाचे आणि बहुसंख्य असणाऱ्या हिंदुंचे किती भले होणार आहे, याचाही विचार करणे गरजेचे आहे. स्वातंत्र्यासाठी केवळ काँग्रेसने काम केलेले नाही, तसेच केवळ अहिंसेचे तत्वज्ञान मांडणाऱ्या गांधीजींचाही प्रभाव त्यात नाही, ब्रिटिशांविरोधा लढलेले क्रांतिकारक, बलिदान दिलेले क्रांतिकारक, फासावर लटकलेले क्रांतिकारक, आपल्या घरादाराचाही विचार न करता झुंजणारे स्वातंत्र्यवीर सावरकर, सावरकर बंधू, नेताजी सुभाषचंद्र बोस, यांच्यासारखे दिग्गजही तितकेच मोलाचे होते. नौदलातील बंड-संप, दुसऱ्या महायुद्धाचे परिणाम, आझाद हिंद सेनेची कामगिरी अशा सर्व बाबींचे एकत्रित परिणाम ब्रिटिशांना हिंदुस्थान सोडावा लागण्यात झाले. त्यामुळेच जरी फाळणी होऊनही स्वातंत्र्य मिळाले तरी त्याचा आनंद मानणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनीही तिरंगा फडकावला होता. यामुळे या गोष्टींचे भान ठेवूनच कंगना रानावतसारख्यांचे दावे बेतालच म्हणावे लागतील. यामुळेच आता लोकांनी विशेष करून हिंदु समाजाने सावरकरांच्या हिंदुत्वाचे भान ठेवून, विज्ञाननिष्ठ होऊन आणि बुद्धी, विचाराने अद्ययावत बनून जागृत झाले पाहिजे. सत्तास्पर्धेत भाजप, काँग्रेस, कम्युनिस्ट, स्थानिक पक्ष या सर्वांसंबंधात पूर्ण विचाराने आणि सावधपणे विचार करून आतापासूनच प्रत्येकाने आपला धर्म, आपले कर्म आणि या दोन्ही घटकांचे वर्म ओळखण्याची गरज आहे.

- रवींद्र यशवंत बिवलकर
(15 nov. 2021)

शनिवार, २० ऑगस्ट, २०२२

देवत्व नको, विचार- अंमल हवा

 देवत्व नको, विचार- अंमल हवा 

सावरकरांचे विज्ञाननिष्ठ आणि समाजसुधारणावादी धर्मतत्त्व अनेकांना पचवता आले नाही. त्यामुळेच काहीजण डीएनए ही संकल्पना मांडत विज्ञाननिष्ठ असल्याचा कावाही करू लागले. सत्ता आणि फक्त सत्ता तसेच सत्ता आणि काँग्रेसी, डाव्यांना विरोध इतक्याच कूपमंडूक वृत्तीने सावरकर समजल्याचा अविर्भाव काही लोक आणू लागले. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांनाही त्यांच्या मातृभूमीत म्हणजे स्वतंत्र झालेल्या भारतातही त्यांच्या पश्चात देवत्व देत कोनाड्यात बसवण्याचा प्रयत्न सुरू झाला.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यामधील एक देदिप्यमान व्यक्तिमत्त्व खरे, मात्र त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची, त्यांच्या कार्याची सुयोग्य दखल ना खानग्रेसी सरकारांनी घेतली, ना बिगरखानग्रेसी पक्ष वा नेत्यांनी घेतली, ना हिंदुत्त्ववादी म्हणवणाऱ्या अनेक पक्ष-नेत्यांनीही घेतली. विचारवंतांना सावरकर यांचे विचार पचवणे तसे कठीणच गेले, कारण त्यांच्यावर कथित धर्मनिरपेक्षतेचे जणू अन्त्यसंस्कार झाले.

ल्याने हिंदुत्व हा शब्द पचवणे, समजून घेणे, सावरकरांचे हिंदुत्व कळणे अवघडच ठरले गेले. यामुळे पुरोगाम्यांनाही ते आपले वाटू शकले नाहीत, ही त्या पुरोगामीपणाचीच शोकात्मिका आहे. इतकेच नव्हे तर अनुयायी म्हणवणाऱ्यांमध्येही अनेक प्रकारचे मतभेद, मनभेद असल्याने सावरकरांचे विज्ञाननिष्ठ आणि समाजसुधारणावादी धर्मतत्त्व अनेकांना पचवता आले नाही. त्यामुळेच काहीजण डीएनए ही संकल्पना मांडत विज्ञाननिष्ठ असल्याचा कावाही करू लागले. सत्ता आणि फक्त सत्ता तसेच सत्ता आणि काँग्रेसी, डाव्यांना विरोध इतक्याच कूपमंडूक वृत्तीने सावरकर समजल्याचा अविर्भाव काही लोक आणू लागले.

छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या प्रखर हिंदुत्वनिष्ठ आणि रयतेला समजून घेणाऱ्या राजाला देवत्त्व देऊन आपण हीन मानव आहोत हे मान्य करून मग देवापुढे आपण किती क्षुल्लक आहोत असेच जणू मनामनात बिंबवले, अशाप्रमाणेच स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांनाही त्यांच्या मातृभूमीत म्हणजे स्वतंत्र झालेल्या भारतातही त्यांच्या पश्चात देवत्व देत कोनाड्यात बसवण्याचा प्रयत्न सुरू झाला. त्यांच्या विचारांचा आणि विज्ञानवादी, समाजसुधारणावादी द्रष्टेपणाचा दृष्टिकोन लोकांमध्ये बिंबवण्याऐवजी त्यांच्यावर आरोप करणारे नतद्रष्ट आणि ‘ते तुमचे आणि हे आमचे’ करणारे नवतरुण नेतृत्त्व आणि त्यांना साथ देणारे सत्ताभिलाषी, सावरकरद्वेषी वा हिंदुत्त्वद्वेष्टे यांनी केवळ सावरकरांनाच नव्हे तर साऱ्या भारतवासींनाच वैचारिक काळ्यापाण्याच्या शिक्षेला पाठवण्याचे घोर कृत्य केले आहे. स्वार्थासाठी, सत्तेसाठी तथाकथित विचारसरणीच्या धर्मनिरपेक्ष नामक नव्या धर्माच्या निर्मितीचा धर्मग्रंथच तयार करू पाहाणाऱ्यांनी या भारतभूमीलाच वेठीस धरले आहे. ते राजकारणी आहेत, ते कथित विचारवंत आहेत, ते कथित हिंदुत्ववादी आहेत, ते मुस्लीमवादी आहेत... केवळ ते त्यांच्या गल्लाभरू वैचारिक क्रांतीला मानणारे ठरले आहेत. अशांना वेळीच योग्य ठिकाणी रोखणे गरजेचे आहे. किंबहुना हिंदू आणि अहिंदू यातील फरक या गल्लाभरूंना कळला नाही, तरी चालेल पण सर्वसामान्य हिंदूंना स्व-अस्तित्त्वाची जाणीव करून देणे गरजेचे आहे. त्यासाठी सांघिक नव्हे तर वैचारिक विज्ञानवादी सावरकरी दृष्टी प्रत्येकाने मिळवावी इतकीच या लिखाणामागे तळमळ आहे. सावरकर यांना देवत्व नको तर त्यांच्या विचारांना अंमलात आणण्याची त्यांचे विचार या नव्या काळातही त्या कालानुरूप पद्धतीने अंमलात आणण्याची आवश्यकता आहे. आधुनिक युगाचा तोच कदाचित महामार्ग ठरू शकेल.

- रवींद्र यशवंत बिवलकर
( 16 oct 2021)

फिर सुबह होगी .... पण कधी?

सुबह कभी तो आयेगी... हे गाणे आज नेहरूवादी नसलेल्या  व नेहरूंच्या राजवटीवर आसुड ओढणाऱ्या विचारसरणीच्या सत्ताधारी ‘भाजपवादी’ अशा १० वर्षांच्या...